शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

                                      निर्गुण निराकार 


जेव्हा कधी आध्यात्मिक विषयावर चर्चा प्रारंभ होते, त्यावेळी बहुतेक करून काही तथाकथित बुद्धिमान असा दावा करतात की भगवंत निर्गुंण आहेत. ते निराकार आहेत. या विषयावर वाद - विवाद करते वेळी त्या लोकांना बराच हुरूप चढतो. असे लोक मायावादी म्हणून समजले जातात. त्यांच्या बडबडीमुळे खरा जिज्ञासू मनुष्य गोंधळून जातो. 

वस्तुतः हे निर्गुण - निराकार शब्द काय सांगतात ते आपण पाहूया. या भौतिक जगात सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तीन गुण आहेत. हे गुण तथा भौतिक प्रकृती भगवान श्रीकृष्णांच्या आधीन आहे. भगवान सर्व शक्तींचे नियंत्रक असल्यामुळे ते आपल्या शक्तींचा वापर स्वतःच्या उद्दिष्टांसाठी करू शकतात. परंतु असे करताना त्यांच्यावर या गुणांचा जराही प्रभाव पडू शकत नाही. परंतु बाकीच्या देवता वा मनुष्य या गुणांच्या आधीन असतात, या गुणांनी युक्त असलेल्यांना सगुण म्हणतात. परंतु श्रीकृष्ण या गुणांच्या पलीकडे असल्याने त्यांना आपण निर्गुण म्हणू शकतो. परंतु मायावादी म्हणतात तसे काही भगवान निर्गुण नाहीत. 

तसेच मायावादी म्हणतात भगवंत निराकार आहेत. परंतु भगवंतांना पूर्ण आकारही आहे. आम्हाला भौतिक आकार आहे. आमचा आत्मा आणि शरीर भिन्न आहे.  आमचे शरीर भूमी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या पाच भौतिक गोष्टींपासून बनलेले आहे. आमच्या शरीरात कफ, पित्त, वायु, मल, मूत्र, मांस, रक्त असे अनेक पदार्थ आहेत. त्यामुळे आमचे शरीर विशिष्ट आकाराचे आहे. या शरीराला साकार म्हणतात. परंतु भगवान श्रीकृष्णांचे शरीर आणि आत्मा यात काहीच अंतर  नाही. तसेच त्यांचे शरीर ( विग्रह ) भौतिक पदार्थांपासून बनलेले नाही. ते संपूर्ण दिव्य आणि शुद्ध आध्यात्मिक आहे. त्यांना भौतिक पदार्थांचा आकार नाही. 

मायावादी समजतात तसे भगवंत कधीही निराकार होत नाहीत. परंतु ते साकार असूनही आमच्याप्रमाणे नाहीत. त्यांचे शरीर सच्चिदानंद आहे. मायावादी म्हणतात त्यांचे निराकार स्वरूप आहे किंवा ब्रह्मज्योती आहे. परंतु आस्तिक समजतात ती ब्रह्मज्योती तर भगवंतांच्या दिव्य कांतीचा केवळ प्रकाश आहे वा प्रकाशापलीकडे स्वयं भगवान आहेत. 

श्रीमद्भागवतात परम सत्याची संकल्पना पुढीलप्रमाणे दिली आहे - ' परम सत्याचे ज्ञान असणारे परम सत्याचा साक्षात्कार ज्ञानाच्या तीन अवस्थांमध्ये करतात आणि या सर्व एकच आहेत. परम सत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते. '

भगवंत कधीही निराकार होत नाहीत, कारण त्यांचे स्वतःचे शाश्वत रूप आहे; ते आदिपुरुष आहेत. यास्तव श्री इशोपनिषद् म्हणते, ' हे भगवान ! हे सर्व जीवांचे पोषणकर्ता ! आपले खरे मुख आपल्या दीप्तिमान तेजामुळे झाकले गेले आहे. कृपया ते आवरण दूर करा आणि आपल्या शुद्ध भक्ताला दर्शन द्या. 

तर आपण सदैव ध्यानात ठेवले पाहिजे की भगवान श्रीकृष्णांना शाश्वत, सच्चिदानंद स्वरूप आहे. परंतु ते रूप त्यांच्या भक्तानाच पहावयास मिळते. नास्तिक लोकांसमोर ते प्रकट होत नाहीत. 

©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : 92421 76587

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

                              धनसंचयाच्या योजना 


सध्या आपला देश फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. विदेशी कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे . ऐकाकाळी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत असे. हा देश सुजलाम सुफलाम म्हणून संबोधला जात असे.

आपल्याला इतिहासातून कळते की फार पूर्वी शक, हूण, कुशाण, मोंगल यांनी या देशाची लूटमार केली. त्यानंतर इंग्रजांनी आणि त्यानंतर स्वकियांनी या देशाला लुटले. प्रत्येक व्यक्ती असा विचार करते की मला माझ्या बुद्धिचातुर्याने जेवढे काही खाता येईल तेवढे खाणे आणि हे माझे आहे आणि मीच त्याचा एकमेव भोक्ता आहे. हे सर्व माझ्या सुखासाठीच आहे. परंतु माणूस हे सर्व जाणून घेण्यास तयार नाही की वस्तुतः या जगातील प्रत्येक चेतन किंवा जड पदार्थांचे मूळ मालक भगवान श्रीकृष्ण आहेत आणि तेच एकमेव भोक्ता आहेत. तेच नियंत्रक आहेत आणि त्यांनी आमच्या आवश्यकतेसाठी जेवढे आम्हाला दिले आहे तेवढ्याच गोष्टींचा आम्ही स्वीकार करावा. असे ज्यावेळी आम्ही करू, त्याच वेळी आम्हाला वास्तविक शांती मिळेल, सुख मिळेल. 

परंतु कलियुगाच्या प्रभावामुळे सर्वसामान्य लोक इतके पतित आणि मूढ झाले आहेत की त्यांना वाटते की मी जर अधिक पैसा मिळविला तर सुख लवकर मिळेल. भक्तराज प्रह्लाद महाराज सांगतात, "धन इतके प्रिय असते की लोक त्याला मधापेक्षा मधुर समजतात. तर मग असा कोण असेल की जो धन संग्रह करण्याच्या भुकेचा परित्याग करू शकेल आणि ते सुद्धा गृहस्थजीवनात ? चोर, व्यावसायिक नोकर तथा व्यापारी आपल्या प्रिय प्राणांची बाजी लावून धन प्राप्त करू इच्छितात." - भागवत ७.६.१०

पैशाच्या मागे लागलेल्या  लोकांविषयी भगवान श्रीकृष्ण सांगतात " इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंतानी ग्रासलेले असते. शेकडो, हजारो आशारुपी पाशांनी बद्ध झालेले कामक्रोधपरायण झालेले हे आसुरी लोक इंद्रियतृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. आसुरी मनुष्य विचार करतो की, आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उतरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौजमजा करेन, अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. " भगवद्गीता १६. ११. १२. १३. १४. १५ 

तर अशा अनेक आर्थिक योजनांद्वारे आपण सुखी होऊ असे राजकारणी, अर्थतज्ज्ञ, विचारवंताना वाटते. परंतु हे सर्व प्राप्त करूनही लोक सुखी - समाधानी होत नाहीत. असे का? कारण एकच की कोणीही हे जाणून घेण्यास तयार नाही की वास्तविक मालक श्रीकृष्ण आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे. 
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : 92421 76587
                                         कृष्णप्रेम 

कृष्णभावनामृताचा प्रचार करते वेळी, सर्वसामान्य लोकांच्या लाभासाठी भक्त त्यांना कृष्णप्रसाद देतात. त्यावेळी लोक अनेक चित्रविचित्र प्रश्न विचारतात हा प्रसाद इतका स्वादिष्ट का ? इतका अद्भुत का ?श्रीकृष्ण इतका चांगला नैवेद्य स्वीकारीत असतील तर मग तो अर्पण करण्यास आम्हाला परवडेल का ? हे सर्व करणे अत्यंत खर्चिक आहे. आम्हाला जमणार कसे ? परंतु हे सर्व अज्ञान आहे. 


पूर्ण पुरुषोत्तम भगवान स्वतःच 'आत्माराम' आहेत. ते पूर्ण आहेत. त्यांना कोणत्याही ऐश्वर्याची वा पदार्थाची मुळीच आवश्यकता नाही. ते अत्यंत कृपाळू आहेत. आम्ही त्यांच्यावर प्रेम करावे यास्तव ते त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला प्रदान करतात. ते सांगतात जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तिने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो."

अर्थात या जगातील गरीबातील गरीब मनुष्य भगवान श्रीकृष्णांना एखादी लहानशी वस्तु प्रेमाने अर्पण करून कृष्णप्रेम प्राप्त करू शकतो. त्यांने अर्पण केलेल्या पदार्थाचा श्रीकृष्ण आनंदाने स्वीकार करतात तथा त्या मनुष्याचा या दुःखमय जगातून उद्धार करतात. परंतु त्यासाठी मनुष्याला श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असणे आवश्यक आहे. 

प्रेमाने आणि भक्तीने अर्पण केलेल्या पदार्थांचा श्रीकृष्ण आनंदने स्वीकार करतात, त्यामुळे त्यांचा प्रसाद स्वादिष्ट आणि अद्भुत लागतो. कारण त्यांच्या स्पर्शामुळे प्रसाद दिव्य बनतो. तसेच श्रीकृष्णांनी आम्हाला जेवढी शक्ती दिली आहे त्यानुसार आपण त्यांची सेवा केली पाहिजे. श्रीकृष्णांच्या लिलातून आपण कीतीतरी उदाहरणे पाहू शकतो. पांडव आणि द्रौपदी वनवासात असते वेळी, त्यांना पीडा देण्यासाठी दुर्योधन दुर्वासा मुनींना वनात पाठवितो. त्यावेळी अत्यंत संकटकालीन स्थितीत द्रौपदी श्रीकृष्णांना पुकारते तथा त्यांना ती केवळ एक कण अन्न देऊ शकते.  पुढे श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि दुर्वास मुनींचे संकट टळते. पुढे श्रीकृष्ण पांडवांचे दूत बनून हस्तीनापूरला जातात. त्यावेळी दुर्योधन त्यांना सोन्याच्या ताटातून ऐश्वर्यशाली राजभोग अर्पण करू इच्छितो. परंतु श्रीकृष्ण प्रसन्न होत नाहीत. ते त्याचा स्वीकार करीत नाहीत. ते महात्मा विदुरांच्या घरी जातात आणि त्यांच्या पत्नीने प्रेमाने अर्पण केलेली केळीची सालेही खातात.


श्रीकृष्ण आपल्या बाल मित्राने, सुदाम्याने कळकट पंचातून बांधून आणलेले पोहे त्याच्याकडून जबरदस्तीने काढून घेतात आणि मोठ्या आनंदाने ग्रहण करतात. श्रील प्रभुपाद सांगतात की श्रीकृष्णांना प्रेममयी सेवे व्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा नसते. श्रीकृष्ण एखाद्या फुलाचाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात. ते अभक्तांकडून कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करीत नाहीत. ते स्वावलंबी असल्यामुळे त्यांना कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा नसते. तरीही ते भक्ताकडून प्रेमभावाचे आदानप्रदान करण्याकरिता ते भक्ताच्या भेटीचा स्वीकार करतात. इतर कोणत्याही साधनाने उदाहरणार्थ ब्राह्मण, विद्वान, पंडित, गर्भश्रीमंत किंवा महान तत्तवज्ञानी झाल्याने आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही. 

भगवान श्रीकृष्ण सांगतात, "मी कोणाचाही द्वेष करीत नाही. तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत. परंतु जो कोणी भक्तीभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे. माझ्याठायी स्थित आहे आणि मीसुद्धा त्याचा मित्र आहे." 
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : 92421 76587

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

               प्रजाभक्षक आणि लिंग लंपट 

दस्यूत्कृष्टा जनपदा वेदाः पाषण्डदूषिताः।
राजानश्च प्रजाभक्षा: शिश्नोदरपरा द्विजाः ।।
'महानगरे चोरांनी भरलेली असतील, वेद नास्तिकांनी केलेल्या व्याख्येद्वारे दूषित केले जातील. राज्यकर्ते प्रजेचे भक्षण करतील आणि तथाकथित बुद्धिजीवी वा ब्राह्मण आपले उदर आणि जननेंद्रियाचे भक्त होतील.' (भागवत १२. ३. ३२)


दस्यूत्कृष्टा जनपदा - 
जगातील मोठमोठ्या नगरांतून, दादा, भाई, गुंड आणि तस्करांचे राज्य चालते. सामान्य माणसांचा गळा आणि खिसा कधी कापला जाईल याची शाश्वती नसते. मंगळसूत्र-साखळी चोरणारे, खिसेकापू, भुरटे चोर, मादक पदार्थ विकणारे, अनेक प्रकारच्या चोऱ्या करणारे बदमाश महानगरातून भरलेले आहेत. मुंबईसारख्या महानगरांतील चोरांकडून लक्षावधी रुपयांची मालमत्ता पोलिसांनी पकडली आहे. पुण्याचा एक कुप्रसिद्ध चोर विमानाने आणि अलिशान गाड्यातून फिरत असे केवळ चोऱ्यांसाठी. मोठमोठे बिल्डर्स, शेअर दलाल हे सर्व याच कुळातील आहेत. व्यापारी लोकही यातीलच आहेत. गोमांस, तंबाखू, दारू, शीतपेये वा अन्य झटपट खाद्यपदार्थ विक्री करणारे व्यापारीही महानगरांतून मोठ्या प्रमाणावर आहेत. हे सफेद कपड्यातील चोर हानिकारक वस्तू लोकांनी खरेदी कराव्यात म्हणून चांगलेच गोड बोलून माल खपवतात. आधुनिक कार्पोरेट जगामधील धनदांडगे आपला माल खपविण्यासाठी विविध माध्यमांतून जाहिराती करून निःसंकोचपणे लूटमार करतात. यातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मायाजाल तर भयंकर आहे. पूर्वी मोंगलादी लुटारू घोड्यांवर बसून येत. तर इंग्रजादी पाश्चिमात्य नौकेतून येत आणि येथे मुंबई-कोलकाता सारखी महानगरे वसवून लूटमार करत. आता मात्र ते आपल्याच देशात बसून संगणकाद्वारे लूटमार करतात. 

वेदाः पाषण्डदूषिताः -- 
नास्तिक लोक आपल्या मनमानी ढंगाने वेद भ्रष्ट करीत आहेत. यांच्या विषयी महाभारतात (१. १. २३८) सांगितले आहे - 
इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृम्हयेत् ।
बिभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रहरिष्यति ।।
'रामायण-महाभारत अशा इतिहास आणि पुराणांचा अभ्यास करून वेदांचा अभ्यास पूर्ण केला जातो. कारण अर्धवट वेद शिकलेल्या माणसाची वेदांना अशी भीती वाटते की हा माणूस माझ्या अर्थाचा अनर्थ करून माझ्यावर जणू प्रहारच करील.'


भागवतात सांगितल्याप्रमाणेच वेदशास्त्रांची मोडतोड करण्यात  देशी-विदेशी तथाकथित विचारवंत अग्रेसर आहेत. मिशनरी लोक योगाला- क्रिस्टोगा करतात, तर आयुर्वेदाला अन्य साज चढवून त्याची विक्री येथेच करतात. विदेशातील विश्वविद्यालयातून हिंदुत्वाची शिकवण शिकवली जाते. त्यातून भारतीय धर्मात अनेक ईश्वरवाद सांगितला असून त्याचा उद्देश निर्विशेष मोक्ष आहे. परंतु याच्या विपरीत अमर्याद प्रमाणे मिळतात. वस्तुतः संपूर्ण वेद वाड्मय एक आहे. जसे भगवद् गीतेत (१५.१५) स्वयं भगवान श्रीकृष्ण सांगतात  - 
वेदेश्च सर्वैरहमेववेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्
'सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.'
सर्व वेद वाड्मयाचा उद्देश परमपुरुष परब्रह्म विष्णू वा कृष्ण यांच्या विषयी आम्हाला प्रबुद्ध करणे हा आहे. यद्यपि ईश्वर अनेक नावांनी संबोधला जातो आणि अनेक रूपांत प्रकट होतो, तरीही तो एकच आहे. परंतु कलियुगात हे खरे वैदिक ज्ञान गुप्त आहे. 
श्रीपाद आद्य शंकराचार्य सांगतात -
एकं शस्त्रं देवकी पुत्र गीतम् 
एको देवो देवकीपुत्र एव ।
एको मन्त्रस्तस्य नामानि यानि 
कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ।।
'केवळ एकच शास्त्र. ते म्हणजे भगवद्गीता. केवळ एकच देव तो म्हणजे देवकीपुत्र (श्रीकृष्ण). एकच मंत्र, तो म्हणजे त्यांचे नाम आणि एकच कर्म म्हणजे त्यांची भक्तिमय सेवा.'

राजानश्च प्रजाभक्षा: - 
राज्यकर्ते प्रजेचे भक्षण करतील. 
कलियुगाच्या प्रारंभानंतर जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे दिसून येतात की राज्यकर्त्यांनी  प्रजेचे  भक्षण कसे केले आहे. काही उदाहरणे पाहूया. हिटलरने ६० लक्ष ज्यूंचे हत्याकांड केले. तर स्टॅलीनने पोलंडच्या डँझिंग बंदराच्या पट्ट्यात दोन कोटी लोकांना ठार मारले. चीनने तिबेट गिळंकृत करून तेथे नरसंहार केला. त्याआधी जपानने चीनवर रासायनीक पदार्थ टाकून नरसंहार केला. पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान निर्मितीसाठी जीनने 'प्रत्यक्ष कृती' चा आदेश देताच लक्षावधी हिंदूंचे शिरकाण केले गेले. भारतात आजही सत्ताधीश विरोधकांचे म्हणजेच आपल्याच प्रजेचे विविध प्रकारे भक्षण करतात. ही केवळ त्रोटक माहिती आहे. गेल्या तीनशे वर्षांत युरोपातून अमेरिकेत गेलेल्या विविध देशांनी मूळ अमेरिकन 'रेड इंडियन्स आणि इंडियन्स' यांचा संहार केला. तो जवळजवळ चार कोटींपेक्षा अधिक आहे. 

शिश्नोदरपरा द्विजाः -
तथाकथित पुरोहित वा विचारवंत आपले पोट आणि जननेंद्रियाचे भक्त होतील. 
कुठल्याही धर्मात पहा त्यांचे धर्मगुरु, पाद्री, मुल्ला-मौलवी, भिक्षुक वा पुरोहित हे सर्वजण केवळ पोट भरण्यासाठीच धडपडत असतात. दिवस पोट भरण्यात आणि रात्र जननेंद्रियाच्या तृप्तीत जाते. तसेच तथाकथित विचारवंत, बुद्धिमान लेखक, प्राध्यापक वा शिक्षकही याच कार्यांत मग्न असतात. 
श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात - 
जिह्वार लालसे येइ इति-उति धाय ।
शिश्नोदरपरायण कृष्ण नाहि पाय ।।                                           
'जो मनुष्य आपल्या जिभेचा दास आहे आणि त्यासाठी इकडे तिकडे भटकतो आणि आपले शिश्न आणि पोट भरण्यात मग्न आहे, तो श्रीकृष्णांना प्राप्त करू शकत नाही.' 
 ज्याला ईश्वर साक्षात्काराची अभिलाषा आहे, त्याने या दोन गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे.                     
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

पशू  + धर्म = मनुष्य 
मनुष्य - धर्म = पशू 
'हितोपदेश' मध्ये सांगितले आहे - 
आहार निद्रा भय मैथुनं च सामान्य एतत् पशुभीर्नराणाम् ।
धर्मो ही तेषां अधिको विशेषो धर्मेण हिनः पशूभीः समानः ।।
मनुष्य आणि प्राणी यांच्यात सामान्यतः चार गोष्टी सारख्या आहेत. त्या म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथुन या होय. परंतु मनुष्याला एक गोष्ट विशेषकरून दिली आहे आणि ती म्हणजे धर्म; आणि जर मनुष्य धर्महीन असेल तर तो पशुसमान आहे. 
              आहार :
प्रत्येक प्राणी आहारासाठी - पोटासाठी धडपडत असतो. पशू - पक्षी आपल्या गुणांनुसार आहार घेतात. कुत्री - मांजरे कोठेही बसून हाडे चघळतात वा एका तुकड्यासाठी वणवण भटकून आहार प्राप्त करतात. मनुष्याची बुद्धी थोडी विकसित असल्याने तो टेबलावर वा अन्य सुखसोयीनी युक्त असा आहार घेतो, परंतु पोट भरण्याचा आनंद पशूंना आणि मनुष्यांना सारखाच आहे. 

     निद्रा : 
कुत्री - मांजरे रस्त्याच्या कडेला वा अडगळीच्या ठिकाणी वा कोठेही निद्रा घेतात. मनुष्य मात्र गादी - उशी, पलंग - मच्छरदाणी वा वातानुकुलीत जागी झोप घेतो. परंतु झोप लागल्यावर आपण कोठे आहोत याची काळजी प्राणी वा मनुष्य करीत नाही. झोपेचा आनंद देघांनाही सारखाच आहे. परंतु मनुष्य कधी कधी झोप मिळविण्यासाठी दारू वा मादक पदार्थ सेवन करून निद्रेचा आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतो. 
        भय : 
शत्रुपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्राणी आपली नखे, शिंगे वा दातांचा उपयोग करतात. ते आपल्या पिल्लांचे उत्तम प्रकारे रक्षण करतात. मनुष्यालासुद्धा शत्रुपासून स्वतःचे रक्षण करण्याची कला माहीत आहे. तो शस्त्र - अस्त्र, बंदुका, तोफा इत्यादी साधनांनी रक्षण करतो. म्हणजेच पशू आणि मनुष्यात रक्षण करण्याची वृत्ती सारखीच आहे. 
      मैथुन :
पशू आणि मनुष्यातील चौथी सामान्य गोष्ट म्हणजे मैथुन! मैथुन सर्वच प्राणी करतात. हत्तीसारखा प्राणी केवळ पाण्यातच मैथुन करतो, तर कावळा आपल्या जीवनात एकदाच, तर कबुतरासारखा पक्षी दिवसातून वीस वेळा, तर कित्येक प्राणी केवळ विशिष्ट ऋतुतच करतात. परंतु कलियुगातील मनुष्य इतके कामुक झाले आहेत की त्यांना वेळ, स्थान, मर्यादा यांचे भानच नाही. मनुष्य मैथुनासाठी इतका कष्ट करतो की त्याला आपल्यात आणि पशुत काही फरक आहे याची कल्पनाच नाही. पशू मैथुनाचा आनंद लुटतात आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या पिल्लांची जबाबदारी सुद्धा घेतात. परंतु मनुष्य इतका धूर्त झाला आहे की तो मैथुनाचा आनंद लुटू इच्छितो, परंतु गर्भपात करून आपली जबाबदारी टाळतो.
तर सामान्यपणे या चार गोष्टी मनुष्य आणि प्राण्यात सारख्याच आहेत. परंतु पशुंपेक्षा एक गोष्ट मनुष्याला अधिक दिली आहे आणि ती म्हणजे धर्म! आणि धर्म नसलेला मनुष्य पशुंसमान आहे. कधी कधी भौतिकतावादी मनुष्य असा खोटा प्रचार करतात की धर्मामुळे मनुष्यात भांडणे, दंगे वा युद्धे होतात. परंतु प्राण्यात नाही. यास्तव धर्म ही अफुची गोळी आहे. धर्माचा नायनाट करा आणि नास्तिक व्हा, जेणेकरून आपल्याला पशुंप्रमाणे मुक्त कामाचार करता येईल. 
ज्यांना आपण पशू आहोत (दोन पायांचे ) असे वाटते त्यांना तसे खुशाल वाटू दे. परंतु जे स्वतःला मानव समजतात त्यांना मात्र धर्माचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. आता धर्म म्हटले की पुन्हा मोठा प्रश्न निर्माण होतो की धर्म म्हणजे काय ? लोक आपापल्या सोयीप्रमाणे त्याला अनेक नांवे देतात वा जीवन पद्धतीचे प्रतीक म्हणतात. परंतु हे सर्व तथाकथित धर्म सरकारी कार्यालयात एक कागद भरून देऊन बदलून घेता येतात. 
मग खरा धर्म कोणता ? तर खरा धर्म म्हणजे काय ते श्रीमद् भागवतात सांगितले आहे. धर्मम् तु साक्षात् भगवत् प्रणितम्! भगवान श्रीकृष्ण सांगतात तोच धर्म बाकी सर्व अधर्म वा विकल्प. श्रीमद् भागवतात (१.२.६) स्पष्टपणे सांगितले आहे - 
स वै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरअधोक्षजे ।
अहैतुक्य प्रतिहता ययात्मा सुप्रसीदति ।।
'ज्यामुळे मनुष्याला परम दिव्य अशा भगवंतांची प्रेममयी भक्ती प्राप्त होते तो अखिल मानव जातीचा परम धर्म होय. अशी भक्ती अहैतुकी (हेतूरहित) आणि अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो, तृप्त होतो. '

केवळ भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करणे म्हणजेच परम धर्म होय. ज्या मनुष्याकडून या धर्माचे पालन होत नाही तो मनुष्य धर्मेण हीनः पशुभीः समानः आहे.              
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : 92421 76587

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

         हानिकारक दया 
वृत्तपत्रातून अनेक वेळा विविध संस्था वा संघटना, क्लब यांचे द्वारा अनेक कल्याणकारी कार्ये केली जातात, असे आपल्याला वाचायला मिळते. केवळ दयेच्या पोटी, जी मंद किंवा वाईटाला जन्म देत नाही तिला अमन्दोदाय दया म्हणतात. परुंतु रोग्याला कुपथ्य करू देणे किंवा दारुड्याला बारपर्यंत पोहचविण्यास साहाय्य करणे यातून सुद्धा दयेचे प्रदर्शन होतेच. परंतु अशी दया ती प्राप्त करणाऱ्या व्यक्तिला हानिकारक असू शकते. जर रोग्याला त्याच्या इच्छेविरुद्ध औषध दिले किंवा दारुड्याला त्याच्या कुमार्गापासून वाचविले तर ती दया अमन्दोदाय दया होते. 
महापूर वा दुष्काळाला रोखणे, मरणासन्न व्यक्तिची सेवा करणे, कोणा व्यक्तिला प्रसन्न करणे वा रुष्ट करणे, शून्यवाद -निर्विशेषवाद यांना  
वाढवणे, यातील प्रत्येकात मन्दोदाय दया म्हणजे हानिकारक दया आहे. अशा कार्यातून मनुष्याला तोपर्यंत वास्तविक लाभ मिळू शकत नाही, जोपर्यंत तो स्वतःची वास्तविक स्थिती काय आहे हे जाणत नाही. 
सामाजिक संस्था वा सर्वच लोक दुःख, रोग, कष्ट, गरीबी याना समूळ नष्ट करू इच्छितात. परंतु ते जाणू शकत नाहीत की हे जग 'दुःखालयम अशाश्वतम्' आहे. इंद्रियांना संतुष्ट केल्याने सुखी होऊ असा सर्वांचा समज आहे. परंतु इंद्रियांच्या भौतिक इच्छांच्या प्रती घृणा उत्पन्न केल्याने रोग, दुःख वा कष्ट चांगल्या प्रकारे बरे होऊ शकतात. 
मुण्डक उपनिषद (१.२.६) सांगते, 'अज्ञानी व्यक्ती घोर अविद्येमध्ये राहून असा विचार करते की 'आम्ही जे इच्छिले ते आम्हाला मिळाले आहे. 'परंतु ती आपल्या कर्मात अनुरक्त राहून आपल्या हिताचे कार्य करते, म्हणून तिला खऱ्या सत्याचा कोणताही अनुभव नाही. ती आपल्याला फलस्वरूप पुष्कळच कमी लाभ घेऊ शकते. काही काळानंतर ती आपल्या कार्याने पदच्युत होते. 
पुढे असे सांगितले आहे- 
'अज्ञानात राहूनही लोक स्वतःला पंडित मानतात. असे विकृत तथा अज्ञानी लोक आंधळ्याचा हात धरून चालणाऱ्या अंध व्यक्तिप्रमाणे दुःखाला प्राप्त करतात.'                                                        
सर्वजण मोहाच्या जाळ्यात सापडून, आपल्या शाश्वत गृहाला विसरून विरुद्ध दिशेला पळत आहेत. ते आपली मदोन्मत्तता, उत्सुकता, एकाग्रता तथा दृढसंकल्पता यात इतके व्यस्त आहेत की त्यांना आपल्या शाश्वत घराविषयी विचार करण्यासही वेळ मिळत नाही . परंतु कृष्णभक्त  सदैव घोषणा करतात  - कृष्ण' बल, संगे चल एइ - मात्र भिक्षा चाई 'हरे कृष्ण 
आंदोलनाचा संदेश आहे - भगवद् धामाला परत जाणे. 
कृष्णभक्त सांगतात , 'विश्वातील सर्व लोक भेदभावाविना आमच्या परिवारातील आहे. पशु-पक्षी, वेली-झाडे सर्वजण आमचे आहेत. जेवढे चेतन प्राणी आहेत, जे विद्यमान आहे ते सर्व काही भगवान श्रीकृष्णांचेच आहेत. आम्ही आमच्या परिवारातील सर्वांना मायेच्या पाशातून सोडवून भगवद्धामाला घेऊन जाणार. आम्ही त्यांनी मायेच्या अधीन ठेवणारी दया दाखविणार नाही. जरी ते सर्वजण एकसाथ मायेच्या अधिन राहून, एकस्वरात विरोध करतील तरीही आम्ही त्यांना अमृत संदेश देऊच. कारण हीच खरी लाभदायक दया आहे.'                                  
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : 92421 76587

रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

               3. धन हेच सर्वस्व 


वित्ते कलौ नृणां  जन्माचारगुणोदयः।
धर्मन्यायव्यवस्थायां करणं बलमेव हि ।।
'कलियुगात केवळ 'वित्त' - पैशालाच मनुष्याचा उत्तम जन्म, योग्य व्यवहार आणि सद्गुणांचे लक्षण मानले जाईल. धर्म आणि तर मनुष्याच्या बळानुसार लागू होईल.' (भागवत पुराण १२.२.२)
कलियुगात सर्वच गोष्टींचे मोजमाप पैशाने केले जाते. ज्याच्याकडे पैसा आहे तो कसल्याही प्रवृत्तीचा असेना का! लोक त्याच्या दारात तिष्ठत उभे राहतील. 'जो वरी पैसा तो वरी बैसा' , या न्यायाने पैसा असणाऱ्याचा लोक सन्मान करतील. पैसा म्हणजे भगवान आहे. पैशाच्या जोरावर माणूस काय वाटेल ते प्राप्त करू शकतो. पैशाच्या बळाने न्याय विकत घेता येतो. सरकारी यंत्रणा वेठीला धरता येते. निवडणुकीत जिंकता येते. पण नसेल तर काहीच मिळत नाही. 
       एकेकाळी बहुजन समाजाला अक्षरओळख नव्हती. उच्च्वर्णीय अक्षरे शिकवित नसत. त्यामुळे बहुजन समाजाची घोर फरवणूक होत असे. इंग्रजतर सर्वांनाच लुटत. परंतु त्यांच्याकडून थोडीफार कारकुनी शिकलेले उचचर्णीय - बहुजनांसी लुबाडत. पश्चिम महाराष्ट्रात त्यामुळे अनेक धनाढ्य जमीनदार, सावकार, कुळकर्णी, पाटील इत्यादी प्रबळ झाले होते. गांधी हत्येनंतर या सर्वांचाच नाश झाला. आता स्वतंत्र भारतात सर्वजणांसाठी शिक्षणाचे वारे वाहू लागले आहे. अनेक शिक्षण संस्था उदयास आल्या आणि आताही येत आहेत. तळागाळातील सर्वच लोकांना विनामूल्य शिक्षण मिळू लागले आहे.
शिक्षणामुळे प्रगत झालेले लोक सहकारी साखर कारखाने, दूध सोसायट्या, पतसंस्था, शेतीमाल खरेदी विक्री संघ,  सूतगिरण्या, मार्केट यार्ड, सहकारी बँका इत्यादी काढू लागले. यांतील सर्व खुर्चीधारी, पदाधिकारी, कारकून मंडळी बहुजन समाजातील शिक्षित लोक आहेत आणि ते सर्वजण मिळून आपल्याच जनतेला, ज्ञाती बांधवाना लुबाडत आहेत, नागवत आहेत, फसवत आहेत. परंतु साहित्य संमलने वा सार्वजनिक सभातून अजूनही धडधडीत खोट बोलतात की बहुजन समाजाला ब्राह्मण लुटत आहेत. पैशाच्या बळावर मते मिळून सत्ता घेऊन परत प्रचंड प्रमाणावर पैसा मिळवत आहेत. जनतेच्या पैशातून स्वतःचेच फोटो गल्ली बोळातून, महामार्गातून लावून आम्हालाच खोट्या शाब्दिक शुभेच्छा देत आहेत. 
धनाने उन्मत्त झालेल्यांचे यथायोग्य वर्णन भगवान श्रीकृष्णांनी भगवद् गीतेच्या १६वा अध्यायात केलेले आहे. ते असे - कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत, मोहित झालेले असुरी लोक, अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचिर्भूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंतानी ग्रासलेले असते. शोकडो सहस्रो आशारुपी पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोधपरायण झालेले हे आसुरी लोक इंद्रियतृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. आसुरी मनुष्य विचार करतो की, 'आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करीन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजुबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढय् मनुष्य आहे. माझ्या सारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करीन, मी दान देईन आणि या प्रमाणे मी मौजमजा करीन' अशा प्रकारे असुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात.'
अर्थ, वित्त, धन, द्रव्य, संपत्ती म्हणजेच पैसा. तो इतका बलवान आहे की भल्याभल्यांना बांधून ठेवतो. पितामह भीष्मदेव महाराज युधिष्ठिरांना म्हणतात - 
अर्थस्य पुरुषो वासो दास्यसत्वर्थो न कस्यचित् ।
इति सत्यं महाराज बद्धोअस्म्यर्थन कौरवै: ।।
'माणूस हा अर्थाचा (पैशाचा) दास आहे. तो पैशानेच बांधला जातो. मात्र अर्थ (पैसा) कोणाचाही दास होऊ शकत नाही. म्हणूनच हे राजा, मी खरोखरच या अर्थाने (पैशाने) कौरवांशी बांधलो गेलो आहे.'
कलियुगात पैशाला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेले आहे. तुमच्या पाशी धन असले तर सर्व जग तुमच्या पायाशी लोळण घेईल. 
पितामह भीष्मदेव महाराज युधिष्ठिरांना पैशाचे गुपित सांगतात - 
दौष्कुलेयाश्च लुब्धाश्च नृसांशा निरपत्रपाः।
ते त्वां तात निषेवेयुर यावदार्द्रकपाणयः ।।
'वाईट कुळात जन्मलेले लोभी, दुष्ट, निर्लज्ज असे जे लोक असतात, ते त्यांचा हात ओला होत आहे (पैसा मिळत आहे) तोपर्यंतच तुझी  सेवा करतील.' 
यस्यार्था: स च विक्रान्तो यस्यार्था: स च बुद्धिमान् ।
यस्यार्था: स महाषाहुर्यस्यार्था: स गुणाधिकः ।।
'ज्याच्याजवळ द्रव्य आहे तोच पराक्रमी असतो, ज्याच्याजवळ धन असते  तोच बुद्धिमान असतो. ज्याच्याजवळ द्रव्य आहे तोच सामर्थ्यवान  आणि तोच अधिक गुणवान असतो.' (रामायण ६.३.३६)
राजा भर्तृहरी म्हणतो - 
यस्यास्ति वित्तम  स नरः कुलिनः 
स पंडितः स श्रुतवान् गुणज्ञ: ।
स एव वक्ता स च दर्शनीय:
सर्वे गुणाः काश्चनमाश्रयन्ति ।। 
'ज्याच्याजवळ वित्त (पैसा) आहे तोच मनुष्य कुलिन, तोच पंडित, खरा शास्त्रज्ञ आणि गुणवान होय. तोच वक्ता, तोच दर्शन घेण्यास योग्य समजला जातो. या जगात संपूर्ण उत्तम गुण सुवर्णाच्या आश्रयानेच  राहतात.'
जरा डोळे उघडून सभोवताली बघा. सर्वत्र झगमगाट, जाहिरातबाजी, मोठे मोठे फलक लावून पैसेवाला मनुष्य आपल्या सर्व दुर्गुणांना लपवून ठेवतो. हे धनदांडगे धनाच्या बळाने सर्वांनाच आपल्या समक्ष झुकवतात. 
शाड् र्गंधर पद्धति सांगते - 
वयोवृद्धास्तपोवृद्धा: ज्ञानवृद्धाश्च ये परे ।
ते सर्वे धनिनद्वारे तिष्ठन्ति किंकराइव ।।
'जे वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानाने वृद्ध आहेत ते सर्व जण धनवंतांच्या दारी सेवकाप्रमाणे हात जोडून उभे असतात.'
सर्वांना आकर्षून घेण्याचे सामर्थ्य  धनामध्ये आहे. भक्तश्रेष्ठ प्रह्लाद महाराज भागवतात सांगतात - 
को न्वर्थतृष्णां विसृजेत्प्राणेभ्यो पि य ईप्सितः।
यं क्रीणात्यसुभि: प्रेष्ठैस्तस्करः सेवको वणिक् ।।
'गृहासक्त मनुष्यास धन प्राणापेक्षाही अधिक प्रिय असते. म्हणून या जगात विशेष करून कौटुंबिक जीवन जगणाऱ्या मनुष्यासह इतर कोण मनुष्य असा आहे, ज्याने धनसंचय करण्याची इच्छा त्यागलेली आहे? चोर, सेवक (सैनिक) आणि व्यापारी हे सर्व जण स्वतःचे प्रिय प्राणही संकटात घालून धनार्जन करण्याचा प्रयत्न करतात.'
कलियुगात पैसाच सर्वस्व असल्यामुळे शंकराचार्य म्हणतात - यावद्वित्तोपार्जनसक्त स्तावन्निजपरिवारो रक्त: ।
प्रश्चाद्धावति जर्जरदेहे वार्तां पृच्छति कोपि न गेहे ।।
'मनुष्यात जोपर्यंत पैसा मिळविण्याची क्षमता असते, तोपर्यंत त्याच्या कुटुंबातील माणसे त्याच्यावर प्रेम दाखवतात. पण एकदा का तो मनुष्य म्हातारा होऊन इकडे तिकडे भटकू लागला की त्याच्या परिवारातील कुणीच त्याची विचारपूस करीत नाही.'
गतवयसामपि पुसां येषामर्था भवन्ति ते तरुणा: ।
अर्थेन तु ये हीना वृद्धास्ते यौवने पि च ।।
'अगदी वृद्ध - म्हातारे झाले असले तरी ज्यांच्याजवळ सगळ्या प्रकारची संपत्ती असते ते तरुणच असतात. पण ज्यांच्याजवळ द्रव्याचा अभाव असतो ते ऐन तारुण्यातही म्हातारे असतात.'
इहलोके हि धनिनां परोsपि स्वजनायते ।
स्वजनोsपि दरीद्राणां सर्वदा दुर्जनायाने ।।
'या जगात धनवंतांशी परकेलोकसुद्धा आपलेपणाने वागतात, तर दरिद्री माणसाशी त्याचे स्वजनही शत्रू प्रमाणे त्याच्याशी दुष्टपणे वागतात.'
महाभारतात युधिष्ठिर महाराज म्हणतात - 
अधनाद्धि निवर्तन्ते ज्ञातयः सुहृदो द्विजाः ।
अपुष्पादफलाद् दृक्षाद् यथा कृष्ण पतित्रिणः ।।
'हे कृष्ण, ज्याप्रमाणे फुले-फळे नसलेल्या वृक्षाचा पक्षी त्याग करतात, त्याप्रमाणे दरिद्री माणसाला त्याचे नातेवाईक, मित्र आणि ब्राह्मण सोडून देतात.' 
            धर्मन्यायव्यवस्थायां                                               धर्म (कायदा) आणि न्याय तर मनुष्याच्या बळानुसार लागू होईल. 
बलवान माणूस आपल्या मनगटाच्या जोरावर आपल्याला पाहिजे तसा कायदा बनवेल. न्यायसुद्धा त्यालाच मिळेल. फार पूर्वी इंग्लंडच्या राजाला दारू अतिशय आवडे. पण जिझस दारू पीत नसल्यामुळे बायबलमध्ये तसा उल्लेख नव्हता. राजाने सर्व पादऱ्यांना गोळा केले आणि आदेश दिला की इंग्लंडमध्ये नवीन बायबल प्रसारित केले जावे. त्यात जिझस दारू पित होता असे छापा. ज्यांनी विरोध केला त्यांना राजाने ठार मारले. आपल्या शक्तीने राजाने पाहिजे तसा नियम बनवला. सम्राट अशोकने बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्याच्या राज्यात पशू बळी देण्यास सक्त मनाई करणारा आदेश त्याने दिला. प्राण्यांना मारणाऱ्या व्यक्तीस मात्र तो ठार मारण्याची शिक्षा देत असे. मोगलांच्या आक्रमक इतिहासातही आपण बघतो की त्यांनी बळाने कसे आणि किती अत्याचार केले. या विषयी अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. शस्त्रबळाच्या जोरावर इंग्रजांनी भारतात आणि जगात अनेक धर्म आणि संस्कृतींचा नाश केला. अर्थात 'बळी तो कान पिळी'. 
सध्या तर आपल्या देशात अनेक घोटाळे, भ्रष्टाचार, अत्याचार गाजत आहेत. सर्व जण पैसा आणि सत्तेच्या बळावर मोकाट सुटत आहेत. हेच या कलियुगाचे विशेष लक्षण आहे.                                   
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७  









शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

                     2. उत्तम गुणांचाऱ्हास 

ततश्चानुदिनं धर्म: सत्यं शौचं क्षमा दया ।
कालेन बलिना राजन्नड्क्ष्यत्यायुर्बलं स्मृति: ।। 
'हे राजन, कलियुगाच्या प्रबळ प्रभावामुळे धर्म, सत्य, पावित्र्य, क्षमा, दया, आयू, शारीरिक बळ आणि स्मरणशक्ती दिवसेंदिवस घटत जाईल' (भागवत पुराण १२.२.१)
कलियुगात भौतिक प्रगती अतिशय वेगाने होत आहे. परंतु माणसातील चांगल्या गुणांची अधोगतीही चौपट वेगाने होत आहे. अशुद्ध गुणांची वा दुर्गुणांची वाढ झपाट्याने होत आहे. वैदिक आचार संहितेला तिरस्कृत करून तथाथित विज्ञाननिष्ठ, भोगी, चंगळवादी आणि नास्तिक धर्मांचे प्राबल्य वाढत आहे. 

या आश्चर्यकारक गोष्टींचे वर्णन पाच सहस्र  वर्षींपूर्वी  रचलेल्या अमल पुराण भागवताच्या बाराव्या स्कंधाच्या दुसऱ्या अध्यायात केलेले आहे. अर्जुन पौत्र-अभिमन्यू पुत्र आणि या विश्वातील अंतिम सम्राट महाराज परीक्षित यांना सांगताना श्री शुकदेव गोस्वामी वरील श्लोकात म्हणाले होते. 
तथाकथित इंग्रजी आणि पाश्चात्त्य भौतिक प्रगतीमुळे युरोप, अमेरिकादी देशातून धर्माधिकारी लोक ईश्वरी नियमांना किंवा स्वयं ईश्वराला लोकांच्या समक्ष वैज्ञाननिक पद्धतीने प्रस्तुत करण्यास असमर्थ होत आहेत. त्यामुळे पाश्चात्त्य बौद्धिक इतिहासात धर्मशास्त्र आणि विज्ञान यांच्यात एक कठोर द्वंद्व उभे ठाकले आहे. या झगड्याला मूठमाती देण्यासाठी काही धर्माचार्य आपल्या सिद्धान्ताचे पुनः संशोधन करण्यासाठी उतावळे झाले आहेत. त्यासाठी ते वैज्ञानिक सिद्धान्तानुसार आणि त्या छद्म वैज्ञानिकांच्या धारणेनुसार त्यांना अनुरूप असेल असा धर्म प्रस्थापित करू इच्छितात. वस्तूत तो धर्म सिद्ध न झाल्याने सुद्धा विज्ञानाच्या क्षेत्रात कपटाने घुसडवत आहेत आणि याच्या अगदी विपरीत दुसरीकडे असे उन्मादी धर्माचार्य आहेत त्यांना वैज्ञानिक विधी अजिबात मान्य नाही. ते आपला जुनापुराणा सांप्रदायिक धर्म अंधविश्वासाने तोच खरा असल्याचे बेंबीच्या देठापासून उच्चस्वरांत सांगत आहेत. दूरदर्शन वा संगणकीय जाळ्यातून याचा भडीमार चालू आहे. 
विदेशातून आयात झालेले तथाकथित ज्ञान हिंदुस्तानातील तथाकथित सुशिक्षित, मॉडर्न, अपटुडेट, स्मार्ट लोक स्वतः स्वीकारतात आणि इतरांच्या गळी उतरविण्यासाठी भयंकर प्रयत्न  करतात. हे अज्ञानी लोक क्रमबद्ध वेदशास्त्रे न अभ्यासातच त्यात त्यांचे विध्वंसक क्षेत्र निर्माण करीत आहेत. हे लोक इंग्रजी चष्म्यातून हिंदुस्थानी संस्कृतीचा अभ्यास करून त्यात अधिकच उत्पात माजवत आहेत. त्यामुळे अनेकदा निष्ठावान लोक यांच्या आक्रमणामुळे भरकटत चालले आहेत. तर काही लोक आपल्या अंधविश्वाला पैशाच्या जोरावर धर्म म्हणून पसरवत आहेत. अर्थात खऱ्या धर्माचा लोप होत आहे. 
वस्तुतः धर्म कशाला म्हणतात? 'धर्म' शब्दाची व्याख्या अशा प्रकारे आहे - 'धरति लोकान् ध्रियते पुण्यात्मभि: इति वा' अर्थात 'जो लोकांना धारण करतो' किंवा 'जो पुण्यात्माद्वारे   धारण केला जातो तो 'धर्म' आहे. आश्वलायन गृह्यसूत्रात' 'धर्मा' संबंधी सांगितले आहे की 'धारणात् श्रेय आदधाति इति धर्म: ।' अर्थात ज्याच्यानुसार चालण्यामुळे मनुष्याचे 'श्रेय' (कल्याण) होते, यश, उन्नती आणि मोक्ष प्राप्त होतो त्याला 'धर्म' म्हणतात. महर्षि  जैमिनी प्रणित पूर्वमीमांसामध्ये ' धर्म' विषयात म्हटले आहे - 'चोदनालाक्षणो र्थो धर्म:'। अर्थात उपदेशाने, आज्ञेने किंवा विधीने ज्ञान होणारा श्रेयस्कर अर्थ 'धर्म' आहे. या सर्वांत सुस्पष्ट शब्दांत श्रीमद् भागवत सांगते 'धर्मन्तु साक्षात् भगवद् प्रणितम् । अर्थात भगवान श्रीकृष्णांनी जे काही सांगतिले आहे ते म्हणजे धर्म होय. अशा या धर्माचे श्रेष्ठत्व श्रीमद् भागवत सांगते - 
स वै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे ।
अहैतुक्यप्रतिहता ययात्मा सुप्रसिदती ।।
'ज्यामुळे मनुष्याला परम दिव्य अशा भगवंतांची प्रेममयी भक्ती प्राप्त होते तो अखिल मानव जातीचा परम धर्म होय. अशी भक्ती अहैतुकी (हेतूरहित) आणि अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो, तृप्त होतो.' (श्रीमद् भागवत १.२.६)

अर्थात प्रत्येक माणसाला संतुष्ट करतो, तृप्त करतो तोच खरा आणि परम धर्म होय आणि धर्म कोठे असतो? महाभारतात भीष्मदेव सांगतात - 'यत:कृष्णस्ततो धर्मो यतो धर्मस्ततो जय:।' अर्थात जेथे श्रीकृष्ण आहेत, तेथे धर्म आहे आणि जेथे धर्म आहे, तेथे विजय आहे. मात्र कलियुगात अशा धर्माचा आश्रय न घेताच, भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा न करता लोक मनोकल्पित वा भ्रामक धर्माचा स्वीकार करीत आहेत. 

                                        'सत्यम्' -
 सत्याचा म्हणजे खरेपणाचाही नाश होत आहे. कलियुगात लोकांना सत्य काय आहे हे माहीतच नाही. वृत्तपत्रे, दूरदर्शन, भ्रमणध्वनी, संगणकीय जाळे यांवरील वार्ता म्हणजे सत्य असा लोकांचा समज आहे. परब्रह्माला जाणण्याविना केवळ काल्पनिक वा क्षणिक सत्यवार्तांचा ढीग रचला म्हणजे सत्यशोधन झाले. असत्याचा गवगवा इतका आहे की लोक खोट्यालाच खरे मानतात. असत्यालाच सत्य मानले जाते. 
भागवत पुराणाच्या पहिल्याच श्लोकात भगवान श्रीकृष्णांचे ध्यान 'सत्यं परं धीमहि' ने केले जाते. 

सत्यं ब्रूयात्प्रियं ब्रूयान्न ब्रूयात्सत्यप्रियम् । 
प्रियं च नानृतं ब्रूयादेश धर्म सनातनः ।।     
सत्य बोलावे, जे सत्य तर आहे पण प्रिय नाही, असे वचन बोलू नये; त्याचप्रमाणे जे ऐकण्यास गोड, मात्र असत्य असेल तर तसेही बोलू नये - हाच सनातन धर्म आहे. 
सत्येन धार्यते पृथ्वी सत्येन तपते रवि: ।
सत्येन वायवो वान्ति सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ।।
'सत्यानेच पृथ्वीला धारण केले आहे, सत्यामुळेच सूर्य तळपतो. सत्याच्या प्रभावाने वायू वाहतो. तसेच संपूर्ण विश्व सत्यातच प्रतिष्ठीत आहे.'
सत्यं जनविरोधायासत्यं च जनरंजने ।
सुरा विक्रियते स्थाने, दधिक्षीरं गृहे गृहे ।।
'सत्याने लोकांचा विरोध पत्करावा लागतो तर असत्याने लोकरंजनाचे साधन बनतो. दारू ही विशिष्ट ठिकाणीच विकली जाते. दूध-दही काय घरोघरी असते.'
सत्यमेकपदं ब्रह्म, सत्ये धर्म: प्रतिष्ठित: ।
सत्यमेवाक्षया वेदा: सत्येनावाप्यते परम् ।। 
'सत्य हे एकपदी ब्रह्मच आहे. धर्म हा सत्यावर आधारलेला आणि स्थिर झालेला आहे. सत्य म्हणजे सर्व अक्षय वेदच. सत्याने सारे काही प्राप्त  होते  ब्रह्मही प्राप्त होते.'

                                 शौचं - अर्थात शुद्धता. 
कलियुगात शुद्धतेला महत्त्वपूर्ण स्थान राहिलेले नाही. नित्य प्रतिदिन स्नान करणे, स्वच्छ वस्त्रे परिधान करणे लोकांना आवडत नाही. पाश्चात्यां प्रमाणे जीन पँट घालणे, ती अनेक दिवस न बदलणे, त्यामुळे येणारा घामट दर्प झाकण्यासाठी कृत्रिम सुगंधी फवारे अंगावर मारून घेणे लोकांना आवडते. युरोप-अमेरिकेत सहा महिने बर्फ पडत असतो. त्यामुळे तेथील लोक रात्रंदिन एकाच पॅंटीवर अनेकानेक आठवडे राहतात. शौचाला गेल्यावर पाणी न वापरता कागद वापरतात. त्यांचेच अंधानुकरण भारतीय करतात. पूर्वी आई-बहिणीने बनविलेले उत्तम पदार्थ खाऊन लोक घरा बाहेर शौचास जात आणि आता बाहेरील निकृष्ट पदार्थ खाऊन घरात येऊन घाण करतात. 
भारतीय प्रदेश उष्ण आहे. येथे नित्य स्नान आवश्यक आहे. तसेच हलके सुती वस्त्र परिधान करणेसुद्धा चांगले आहे. परंतु पाश्चात्यांची गोरी कात बुरशी जात असल्यामुळे त्यांच्या मार्गाने जाण्यास भारतीयांना मोठी धन्यता वाटते. बूट पायमोजे घातलेला अपटुडेट माणूस जवळ येताच त्याच्या घामटेपणामुळे पोटात ढवळून येते. तसेच कोठेही मलमूत्र विसर्जन करणे, डावा हात साबण लावून न धुणे, पान - गुटखा खाऊन सार्वजनिक स्थानी थूंकून घाण करणे, या असल्या अस्वच्छतेत भारतीय अगदी निर्ढावलेले आहेत. 
कलियुगात माणसाचे केवळ शरीरच अपवित्र-अशुद्ध राहिले नाही तर अंत:करणही घाणीने भरलेले आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर इत्यादी घाण हृदयात आहेच आहे. दुसऱ्याचे धन अपहरण करणे, फसवणे, धोका देणे अशा अनेक वृत्तींनी हृदय नुसते बरबटून गेले आहे. लोकांना ही मलिनता स्वच्छ करण्याची इच्छा नाही. वस्तुतः ही घाण स्वच्छ करण्याची साधी सोपी पद्धत कलियुगात उपलब्ध आहे. तसेच ती अतिशय प्रभावशालीही आहे. ती पद्धत म्हणजे भगवंतांच्या नामांचा जप करणे होय. पण हरिनामाचे उच्चारण करण्यासही लोक उत्सुक नाहीत.

                          क्षमा - क्षमासुद्धा लोप पावत आहे. 
कलियुगात अशी कोणतीही व्यावहारिक कृती नाही की ज्यामुळे लोक स्वतःला शुद्ध बनवून ईर्ष्या द्वेषापासून मुक्त होतील. जोपर्यंत मनुष्य आध्यात्मिक सुधारणेच्या कोण्या प्रामाणिक कार्यक्रमाचे अंतर्गत भगवन्नामाचे कीर्तन करून शुद्ध होत नाही, तोपर्यंत त्याचे मन क्रोध, ईर्ष्या आणि क्षुद्रपणा यांनी ठासून भरलेले राहील. 
क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा ।
वशीकर्त्री क्षमा लोके क्षमया किं न सिध्यति ।।
'क्षमा हे अशक्तांचे बळ आणि शक्तिमानांचे भूषण आहे. क्षमा ही विश्वात कुणालाही वश करणारी आहे; क्षमेने काय साध्य होत नाही?
अशी क्षमा कलियुगात मात्र दुर्मीळ होत आहे. 

                                              दया
कलियुगात दयेचा नाश तर अतिशय वेगाने होत आहे. सर्व जीव भगवंतांच्या दैवी अस्तित्वात सहभागी असल्यामुळे शाश्वत  रूपाने जोडलेले आहेत. जेव्हा नास्तिकता आणि संशयवाद एकत्र येतात तेव्हा लोक एकमेकांवर दया दाखवत नाहीत. लोक इतरांप्रति सोडा स्वतःप्रतिसुद्धा दयाळू राहत नाहीत. विविध प्रकारची नशा करणे, मांसाहार, व्यभिचार आणि सर्व प्रकारची मौज- मजा-मस्तीची साधने वापरून मनुष्य स्वतःला क्रमबद्धरीत्या नष्ट करीत आहे. असल्या अनेकानेक आत्मघातकी वाईट सवयींमुळे आणि काळाच्या प्रबळ प्रभावामुळे माणसाचे अर्धे आयुष्य नष्ट होत आहे. आधुनिक शास्त्रज्ञ खोटे आकडे प्रकाशित करतात. आपले तथाकथित संशोधन खपवण्यासाठी ते म्हणतात, की आयुष्य वाढत आहे. परंतु यापेक्षा  कित्येक पटीने गर्भपाताद्वारे प्राप्त होणारे आकडे अधिक आहेत. 
दयाभाव नसल्यामुळेच दिवसेंदिवस कित्तेलखाने वाढत आहेत. लोक अनेक प्रकारचे पशू, पक्षी, किडे, साप इ. आनंदाने खात आहेत. 

                                                                  बलम् -
 शारीरिक बालसुद्धा घटत आहे. पाच सहस्र  वर्षांपूर्वी मनुष्य, प्राणी आणि वृक्ष आतापेक्षा अधिक उंच आणि सशक्त होते. फार पूर्वीचे  जाऊ द्या. तीनशे - चारशे वर्षांपूर्वी बांधलेली मंदिरे वा किल्ले इत्यादी बघितले की प्रचंड आश्चर्य वाटते. कोणतीही आवडजड यंत्र सामुग्री नसताना हे  प्रचंड कार्य कसे काय केले? छत्रपती शिवरायांनी भर समुद्रात सिंधुदुर्गाची निर्मिती कशी केली? शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आलेल्या इंग्रजांना रायगडावर दोन महाकाय हत्ती पाहून आश्चर्य वाटले. माणसाला चढण्याला कठीण असलेल्या गडावर एवढे प्रचंड प्राणी`कसे आले? महाराणा प्रताप आपल्या अंगावर जे चिलखत, मस्तकावर जिरेटोप आणि विविध शस्त्रे धारण करीत आणि आपल्या प्रिय चेतक नामक घोड्यावर स्वार होऊन लढाई करीत त्या वस्तू उचलण्यासाठी आता आठ माणसांची आवश्यकता वाटते. अशी एक नाही अनेक उदाहरणे देता येतील. याचाच अर्थ दिवसेंदिवस लोक बलहिन होत आहेत. 

                                                स्मृति - 
स्मृती तर सर्वांचीच क्षीण होत आहे. पूर्वीच्या युगातील माणसांची स्मृती उत्तम होती. कोणतीही गोष्ट  पुनः पुन्हा  सांगावी लागत नसे. गुरुकुलात विद्यार्थी गुरुमुखातून एकदा ऐकलेला मंत्र कधीच विसरत नसत. पण कलियुगाच्या प्रबळ प्रभावामुळे लोकांना घरातल्या घरात ठेवलेल्या वस्तू मिळत नाहीत. विद्यार्थ्यांना अभ्यास लक्षात राहत नाही. गणितासाठी पाढे पाठ होत नाहीत. कॅलक्युलेटरविना गणित करता येत नाही. गृहिणींना स्वयंपाकातील मीठ मसाले लक्षात राहात नाहीत. पुरोहितांना मंत्र लक्षात नसतात. एक नाही अनेक बाबतीत माणसांची स्मृती मंद होत आहे.  


©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७  








गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

कृतज्ञ आणि कृतघ्न

                                 कृतज्ञ  आणि   कृतघ्न

आपल्या अवती भवती, मित्रमंडळीत, नात्यागोत्यात, ज्ञाती बांधवात आणि या संपूर्ण जगात दोन प्रकारची माणसे आढळतात, १) 'कृतज्ञ' आणि २) 'कृतघ्न'!१) 'कृतज्ञ' त्या माणसाला म्हणतात की, जो आपल्यावर उपकार करणाऱ्या व्यक्तीप्रती  सदैव ऋणी असतो. आपल्यावर कृपा करणाऱ्याप्रती त्याच्या हृदयात सदैव जाणीव असते. जसे आपले माता पिता, ज्यांनी अनेक प्रकारे कष्ट घेऊन आम्हाला लहानाचे मोठे केले, शिक्षण दिले. आमच्या आजारपणात आमची काळजी घेतली.  आमचे आध्यात्मिक गुरु, ज्यांनी भगवंतांविषयी दिव्य ज्ञान प्रदान करून या भौतिक जगातील त्रिविध तापांपासून आम्हाला मुक्त करून भगवद्धामाला परत जाण्याचा मार्ग दाखविला. आमच्या अडीअडचणीला आर्थिक साहाय्य करून आम्हाला व्यवसायाभिमुख केले, ते आमचे सदैव शुभचिंतक असतात, अशा सर्वांच्या प्रति सदैव नम्र असणे, त्यांच्या दयेविषयी ऋणी असणे म्हणजेच 'कृतज्ञ' असणे होय   आणि या सर्वांमध्ये श्रेष्ठ  आहेत भगवान श्रीकृष्ण! आम्ही भगवान श्रीकृष्णांचे अनादी काळापासून सनातन अंश असल्यामुळे त्यांनी आमच्यावर अनेक प्रकारे कृपा केलेली आहे, पण अज्ञानवश आम्हाला त्याची जाणीव नाही. तरीही भगवान श्रीकृष्ण आमच्यावर अनेक प्रकारे अहैतुकी कृपा करीत असतात. भगवद्गीतेतील दिव्य ज्ञानाच्या अध्ययनाने आम्ही ही कृपा जाणून घेऊ शकतो आणि जेव्हा आम्हाला या समस्त उपकारकर्त्यांच्या उपकाराची, अहैतुकी कृपेची जाणीव होते तेव्हा आम्ही त्यांच्या प्रती 'कृतज्ञ' होतो.    आणि जे लोक याच्या विपरीत आचरण करतात त्यांना 'कृतघ्न' म्हणतात. जसे राजकारणी लोक, आपल्याला ज्याच्यामुळे मोठमोठे सन्मान मिळाले आहेत, पैसे, प्रतिष्ठा मिळाली आहे त्या वरिष्ठांप्रती द्वेष बुद्धी ठेवणे, त्यांचा घात करणे. मतदारांची फसवणूक करणे, शत्रू राष्ट्राचे तुष्टीकरण करणे इत्यादी दोषांनी युक्त असलेल्या माणसाला 'कृतघ्न' म्हणतात. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे इंग्रजांशी  लढून फासावर चढले त्यांची साधी आठवणही जे लोक काढत नाहीत, अशा लोकांनाही 'कृतघ्न' म्हणतात.  
  ज्यांनी प्रेमाने आम्हाला दोन घास भरवून आम्हाला जगवले त्या घास भरवणाऱ्या हाताचाच चावा  जे लोक घेतात त्या लोकांनाही 'कृतघ्न' म्हणतात. आम्हाला ज्यांनी आर्थिक, सामाजिक वा अन्य काही साहाय्य केले आहे, अशांचे उपकार विसरून त्यांच्यावर उलटणे, त्यांना धोका देणे, त्यांची जाणीव न ठेवणे आणि त्यांचीच निंदानालस्ती करणाऱ्या माणसाला 'कृतघ्न' म्हणतात.    
 कलह आणि दंभ यांनी भरलेल्या या भीषण युगात अशा 'कृतघ्न' लोकांचाच भरणा अधिक आहे. या 'कृतघ्न' लोकांना कितीही साहाय्य करा, प्रेमपूर्वक व्यवहार करा, याना आपल्या मुलीबाळी द्या, शिक्षण द्या, सवलती द्या, परंतु हे लोक सदैव 'कृतघ्न' असतात.   
 इंग्रजांच्या काळात दादर (मुंबई) येथील झोपडपट्टी भागात काही गरीब आणि अडाणी लोक रहात होते. घराच्या दारातच मुलांना शौचास बसवत. त्यांना स्वच्छतेची मुळीच आवड नव्हती. त्यामुळे त्यांना स्वच्छतेची आवड लागावी म्हणून महान क्रांतिकारक सेनापती बापट नित्यनेमाने तेथे जात आणि स्वतः झाडू मारून सर्व  विष्ठा स्वच्छ करीत. असे अनेक दिवस चालले होते. एक दिवस ते झाडू मारत पुढे जात असताना मागून एक बाई मोठ्याने ओरडली,"अरे ए बामणा जरा थांब, माझं पोर हागायला बसलाय नंतर झाडू मारून जा." हे ऐकून सेनापती बापट आश्चर्याने थक्क झाले! ते या लोकांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून त्या झोपडपट्टीत येत होते. पण तेथील कृतघ्न लोकांना वाटत होते की हा बामण आमची घाण साफ करायला येतोय. त्या  लोकांवर त्यांच्या सेवेचा कोणताच परिणाम होत नाही हे पाहून त्यांनी झाडू तेथेच टाकला आणि निघून गेले.   आपण सापाला कितीही मधुर दूध पाजा, तो विष ओकणार! त्याचप्रमाणे  'कृतघ्न' लोकांचे असते, या लोकांना कितीही रुचकर, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी भोजन वाढा, परंतु हे  'कृतघ्न' ते अन्न खातील आणि त्याच पानावर लागलीच 'मल' विसर्जन करतील! उत्तम प्रतीचे सुस्वादू अन्न पदार्थ यांच्या संपर्कात येताच त्या सुग्रास अन्नाचे दुर्गंधीयुक्त विष्ठेत रूपांतर होते. वास्तविक पाहता त्या अन्नात दोष नाही की ते अन्न अर्पण करणाऱ्या अन्नदात्यात दोष नाही. परंतु ते अन्न ज्याच्या संपर्कात येते त्याच्यामुळे त्याचे विष्ठेत रूपांतर होते. परंतु या निगरगट्ट  'कृतघ्न' माणसाने मात्र आपल्या या दूषित विकृतीला आपला नूतन अविष्कार म्हणून घोषित केले. लगेचच काही  व्यक्ती स्वातंत्र्यवादी लोक पुढे सरसावले आणि भलावण करू लागले की ही  त्याची नूतन  कलाकृती आहे. त्यालाही व्यक्ती स्वातंत्र्य हवेच. समाजात अशा प्रकारच्या व्यक्ती असणारच! चाणक्य पंडित सांगतात,"शरीराचा एक अवयव असा असतो की, तो साबण लावून कितीही धुतला तरी तो पवित्रच असतो." असेच असते 'कृतघ्न ' माणसाचे. गोघ्ने चैव सुरापे  च चौरे भग्नव्रते  तथा ।निष्कृतीर्विहिता सद्भि: कृतघ्ने नास्ति निष्कृति:।।
"गोहत्या, मद्यपान करणाऱ्याला , व्रत  मोडणाऱ्याला  सज्जनांनी  प्रायश्चित सांगितले आहे. परंतु कृतघ्नला मात्र  प्रायश्चित नसते."

© विनय शंकर गोडसे संपर्क - ९२४२१७६५८७

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

                                   कलीची निवास स्थाने 

          पाच सहस्र  वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी या पृथ्वीचा त्याग केला आणि ते आपल्या निजधामाला गेले. त्यानंतर पांडवांनीसुद्धा प्रयाण केले. तत्पूर्वी महाराज युधीष्ठीरांनी आपला नातू अभिमन्यू पुत्र परीक्षित यास राजसिंहासनावर बसविले. त्या वेळी भगवंतांचे महान भक्त परीक्षित महाराज थोर द्विजवर्यांच्या मार्गदर्शनाखाली जगावर राज्य करू लागले. 
          जेव्हा परीक्षित महाराज कुरु साम्राजाच्या राजधानीत राहत होते, तेव्हा त्यांनी आपल्या राज्याच्या सीमेत कलियुगाच्या लक्षणांचा प्रवेश होत असल्याचे पाहिले. त्यांना ही गोष्ट आवडली नाही, परंतु यामुळे त्यांना त्याच्या विरुद्ध लढण्याची संधी मिळाली. त्यांनी आपले धनुष्य उचलले आणि बाण मारण्यासाठी ते सिद्ध झाले. त्यांनी दाही दिशा जिंकून तेथील राजांकडून खंडणी वसुल केली. 
          त्या काळी साक्षात धर्म बैलाचे रूप घेऊन इतस्त्तः हिंडत असताना त्याला पृथ्वी एका गायीच्या रूपात दिसली. अपत्यहीन माता जशी असावी तशा मातेप्रमाणे ती खिन्न दिसत होती. तिच्या नेत्रांतून अश्रू ओघळत होते आणि तिच्या शरीराला अवकळा प्राप्त झाली होती. ते पाहून धर्माने तिला विचारले, "हे देवी, तू प्रकृतीने स्वस्थ आणि प्रसन्न नाहीस काय? तू दुःखाने काळवंडलेली दिसतेस. तुझे मुख काळजीग्रस्त दिसते आहे. तुला काही आजार झाला आहे का की दूरच्या स्नेह्यांमुळे तू चिंताग्रस्त आहेस? मी माझे तीन पाय गमावून एकाच पायावर उभा आहे. या माझ्या दु:खावस्थेमुळे तू शोकाकुल आहेस काय? का तुला अशी भयानक काळजी वाटते आहे की अन्यायी मांसभक्षक लोक आता तुझे शोषण करतील?          
           "चारित्र्यहीन माणसांनी स्त्रिया आणि मुलांना निराधार करून दुःखी बनवून त्यागल्यामुळे तुला त्यांची दया वाटून दुःख होते काय? धर्मतत्त्वांच्या विरुद्ध आचरण करणाऱ्या ब्राह्मणांकडून सरस्वती देवीची जी विटंबना केली जात आहे, त्यामुळे तू दुःखी आहेस? किंवा ब्राह्मणी संस्कृतीविषयी ज्यांना अनास्था आहे अशा शासकीय लोकांचा ब्राह्मणांनी आश्रय  घेतला आहे ते बघून तू उदास झाली आहेस?"
            "तथाकथित अपात्र शासकीय लोकांनी कलियुगाच्या प्रभावामुळे मोहग्रस्त होऊन त्यांनी सर्व शासनव्यवस्था भ्रष्ट करून सोडली आहे त्यामुळे तुला दुःख होत आहे का? किंवा मानव समाज झोप, खाणे-पिणे, समागम यांचे नियम तोडत असल्यामुळे तू दुःखी आहेस का? हे मातोश्री तुझ्यावरील वाढलेला अनावश्यक भार कमी करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः अवतरित झाले. त्यांची येथील सर्व कार्ये दिव्य स्वरूपाची आणि मुक्ती प्रदान करणारी आहेत. तू त्यांच्या जाण्याने चिंतित झाली आहेस का?
          "हे वसुंधरे, तू सर्व ऐश्वर्यांची खाण आहेस. परंतु खंगून तू इतकी दुबळी झाली आहेस, त्या तुझ्या दुःखाचे मूळ कारण मला सांग. मला असे वाटते की, अत्यंत शक्तिशाली लोकांचेही दमन करणाऱ्या काळाच्या अमोघ प्रभावाने तुझे सर्व सौभाग्य हरण करून घेतले असावे. खरे पाहता तुझ्या भाग्याची देवदेवतांनीही आराधना करावी."
         त्या बैल रूपातील धर्माने असे विचारल्यावर गायरूपी पृथ्वीने उत्तर दिले, "हे धर्मा आपण जे विचारलात त्या प्रश्नांची मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन. एके समयी आपल्यालाही चार पाय होते आणि भगवत्कृपेने आपण संपूर्ण विश्वात सुखवृद्धी करीत होता. सत्य, स्वच्छता, दया, क्रोधावर नियंत्रण, आत्मतृष्टी, सरळपणा, मनःस्थैर्य, इंद्रियनिग्रह, निष्ठेने कर्तव्याचरण, समता, सहिष्णुता, समदर्शिता, आज्ञापालन, ज्ञान, इंद्रिय भोगाविषयी अनासक्ती, नेतृत्व, शौर्य, प्रभाव, कोणतीही गोष्ट करण्याचे सामर्थ्य , कर्तव्यपालन, पूर्ण स्वातंत्र्य, कुशलता, सौंदर्यपूर्णता, धैर्य, कनवाळूपणा, चातुर्य, विनय, उदारता, दृढनिश्चय, ज्ञानपूर्णता, योग्य दक्षता, सर्व विषयांवर स्वामित्व, प्रसन्नता, स्थैर्य, निष्ठा, कीर्ती, पूज्यता, निरहंकारीपणा, भगवान परमेश्वर म्हणून अस्तित्व, शाश्वतता आणि असे कित्येक अन्य गुण भगवंतांच्या ठायी नित्य वसत असतात आणि ते कधीही त्यांच्यापासून वेगळे होत नाहीत. भगवान श्रीकृष्ण हे सर्व सौंदर्य आणि मांगल्य यांचे आश्रयस्थान असून त्यांनी आता पृथ्वीवरील आपल्या सर्व दिव्य लीला आवरत्या घेतल्या आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आता कलियुगाने सर्वत्र प्रभाव टाकला आहे आणि त्यामुळे माझी ही अशी क्षीण अवस्था झाली आहे."
         "मी, माझा आणि देवश्रेष्ठ अशा आपणासंबंधीही विचार करते. तसेच एकूण  सर्व देव, पितर, ऋषिमुनी आणि भगवद्भक्त तसेच वर्णाश्रमधर्मांचे पालन करणारे अशा सर्वांसंबंधी मी विचार करीत आहे."
         "जिचा कृपाकटाक्ष लाभावा म्हणून ब्रह्मादी देवसुद्धा भगवंतांना शरण जाऊन कित्येक दिवस तपाचरण करतात, ती लक्ष्मी स्वतः आपले कमळ वनातील निवासस्थान सोडून ज्यांच्या चरणकमळांच्या सेवेत निरंतर मग्न होऊन राहते, त्या भगवंतांच्या ध्वज, वज्र, अंकुश, कमल इत्यादी चिन्हांनी शोभणाऱ्या चरणांनी अलंकृत होऊन, त्यामुळे तीनही लोकांहून आपले भाग्य मोठे असल्याचा गर्व करणारी मी......  पण दुर्दैव माझे, की मी माझ्या सौभाग्याचा विचार करीत असता भगवान मला सोडून गेले." 
          "हे धर्ममूर्ते! या नास्तिक राजांनी जमविलेल्या सैनिकी दळभाराने मला प्रचंड ओझे झाले होते. पण भगवंतांच्या कृपेने माझी त्यातून सुटका झाली."
           जेव्हा पृथ्वी आणि धर्म हे अशा संवादात गुंतलेले होते, तेव्हा राजर्षी परीक्षित पूर्वेकडे वाहात जाणाऱ्या सरस्वती नदीच्या काठावर येऊन पोहोचले. त्या स्थानी पोहचल्यानंतर राजाला असे दिलसे की कोणी एक कनिष्ठ जातीचा शूद्र राजवेश करून गायीला, बैलाला काठीने झोडपत आहे, जणू काय त्या पशूंना कोणी धनीच नव्हता. श्वेतकमळासमान पांढराशुभ्र असलेला  तो बैल शूद्राच्या मारहाणीमुळे अतिशय भयभीत होऊन, एकाच पायावर उभा राहून, थरथर कापत होता. भीतीमुळे त्याला नैसर्गिक विधी आवतरता येत नव्हता. 
          धर्मतत्त्वे देऊ शकणारी उपकारकर्ती गाय आता अगदी दीन आणि अपत्यहीन झाली होती. शूद्र तिच्या पायांवरही आघात करीत होता. तिच्या नेत्रांतून अश्रू येत होते, ती अगदी खिन्न आणि क्षीण झाली होती. वनातील थोडेसे गवत खावयास मिळावे यासाठी ती आतुर होती. 
           धनुष्यबाणाने सुसज्जित तसेच रथारूढ असलेले परीक्षित महाराज आपल्या मेघासमान गरजणाऱ्या गंभीर वाणीने त्या शूद्राला म्हणाले, "अरे, तू कोण आहेस? तू तर अतिशय बलवान दिसतोस आणि तरीही तू जुलुमाने या जगातील दुर्बलांना ठार करू पाहतोस! त्यांना माझे संरक्षण आहे. पोषाखावरून तू एखाद्या राजासारखा दिसतोस, पण तुझी कृती एखाद्या शुद्रासारखी आहे. अरे दुष्टा, भगवान श्रीकृष्ण आणि गांडीव धनुष्यधारी अर्जन हे दोघे आता अदृश्य झाले म्हणून तू गरीब बिचाऱ्या गायीला मारण्याचे साहस दाखवितोस? अशा निर्जन जागी निरपराध प्राण्याला मारण्याचा प्रयत्न केलेला तू अपराधी आहेस आणि तू मृत्युदंडास पात्र आहेस."

           असे बोलून सहस्रावधी शत्रूंशी एकट्याने लढणाऱ्या महाराज परिक्षितांनी धर्म आणि पृथ्वीचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी समस्त अधर्म युक्त कलीला मारण्यासाठी आपले तेजस्वी खड्ग उपसले. जेव्हा कलीला कळून चुकले की, राजा आपल्याला ठार मारण्यास उत्सुक आहे, तेव्हा एकदम त्याने आपला राजवेष टाकून दिला आणि भयभीत होऊन तथा नतमस्तक होऊन राजाच्या  चरणाशी लोळण घेतली. जे शरणागत रक्षक तसेच इतिहासात प्रशंसनीय आहेत अशा परीक्षित महाराजांनी त्या शरण आलेल्या पतित कलीला ठार मारले नाही. तर उलट दिनांसाठी दयाळू असलेले महाराज करुणापूर्वक स्मित करून म्हणाले, "अर्जुनाच्या यशाचा वारसा आम्हाला प्राप्त आहे, त्यामुळे हात जोडून शरण आल्यावर तुला प्राणाचे भय बाळगण्याचे कारण नाही. पण तू अधर्माचा मित्र असल्याने माझ्या राज्यात तुला राहता येणार नाही. जर मूर्तिमंत अधर्म अशा कलीला नरदेव अथवा शासक म्हणून कार्य करू दिले तर लोभ, असत्य, लूटमार, असभ्यता, विश्वासघात, दुर्भाग्य, कपट, कलह आणि दंभ अशा अधार्मीक तत्त्वांचा सुळसुळाट होईल. म्हणून हे अधर्माच्या मित्रा, जेथे विशेष विद्वान भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी सत्याला आणि धर्माला अनुसरून यज्ञ करीत असतात तेथे राहण्यास तू योग्य नाहीस."
            अशा प्रकारे परीक्षित महाराजांकडून आज्ञा मिळालेला कली भयाने थरथर कापत म्हणाला, "हे सम्राट, आपल्या आज्ञेने मी कोठेही राहण्याचा विचार केला तरी सर्व ठिकाणी आपणाला हाती धनुष्यबाण घेऊन सिद्ध असल्याचे पाहात आहे. धर्मरक्षकांमध्ये श्रेष्ठ असलेल्या महाराजा, म्हणून कृपया माझ्यासाठी कोणते तरी एक स्थान निश्चित करावे. तेथे मी सदैव आपल्या शासनाच्या संरक्षणाखाली निश्चितपणे स्थिर पाहू शकेन."
          कलीन अशी प्रार्थना केल्यानंतर महाराज परीक्षितानी त्याला द्युतं पानं स्त्रियः सूना यत्राधर्मश्वतुविर्धः -- जे थे जुगार, मद्यपान, वेश्यावृत्ती आणि पशुहत्या चालत असेल अशा ठिकाणी राहण्यास अनुमती दिली. परंतु महाराज परिक्षितांच्या राज्यात ही चारही ठिकाणे नव्हतीच. त्यामुळे कलीने आणखी काही द्यावे अशी याचना केली, तेव्हा महाराजांनी त्याला सोने-सुवर्ण जेथे असेल तेथे राहण्यास अनुमती दिली. कारण जेथे जेथे सुवर्ण असते, तेथे तेथे असत्य, नशा, कामुकता, हेवा आणि वैर हे असते. 
          या प्रकारे अधर्माला उत्तेजन देणारा कली उत्तरापुत्र परिक्षितांनी दिलेल्या या सर्व पाच ठिकाणी त्यांच्याकडून आज्ञा मिळविल्यानंतर निश्चितपणे निवास करू लागला. म्हणून, ज्याला कोणाला आपल्या कल्याणाची इच्छा असेल, त्याने विशेषतः राजा, धर्मशील मनुष्य, सार्वजनिक नेता, ब्राह्मण आणि संन्यासी यांनी वरील चार अधार्मिक गोष्टीच्या संपर्कातसुद्धा कधी येऊ नये. 
          संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या गाथेत स्पष्टपणे लिहितात -  १) मांसाहार न करणे - 
     आणिकांच्या कापिती माना ।
     निष्ठुपणा पार नाही ।
     करिती बेटे उसणवारी ।
     यमपुरी भोगावया ।।
      आपल्या लाभासाठी दुसऱ्यांच्या माना कापतात, त्यांच्या निष्ठुरपणाला अंत नाही. त्यांचे हे कृत्य यमपुरीचे दुःख भोगण्याची उसनवारी आहे. 
      कांद्यासाठी झाले ज्ञान, तेणे जग नाडिले, कामक्रोध बुचबुची 
      पुराणीक म्हणविती। जाणोनि कांदे ते भक्षिती ।
      अगस्तीचे मूत्र मळ । लावुनि म्हणती कृष्णावळ ।
      स्वतःला भागवतादी ग्रंथांचे पुराणिक म्हणून घेतात आणि पुराणात सांगितलेल्या आचारसंहितेचे विचार न करता निषिद्ध कर्मे करतात. कांदे खातात. अगस्तीचे मलमूत्र असलेल्या समुद्राचे मीठ त्या कांद्याला लावून त्यास 'कृष्णावळ' (कोशिंबीर) असे नाव देतात. तुकाराम महाराज म्हणतात. मी कठोर शब्दांचा तडाखा देऊन, अधम पुराणिकांचे हात तोडीत आहे. 
   २) जुगार न खेळणे --   
    अरे हे देह व्यर्थ जावे। ऐसे जरी तुज व्हावे ।
    द्यूत कर्म मनोभावे । सारीपाट खेळावा ।।
    मग कैंचे हरीचे नाम । निजे लिया जागा राम ।
    जन्मोजन्मीचा अधम। दुःख थोर साधिले ।।
     हा नर जन्म वाया जावा असे वाटत असेल तर मनःपूर्वक सारीपाट खेळत जा. खेळाचा नाद लागल्यावर हरीचे नाम तोंडात येणार नाही. अविद्येच्या  निद्रेत असणाऱ्याला राम कसा जागा करणार?
   ३) नशा न करणे निषेध - 
    पाने जो खाईल बैसोनी कथेशी।
    घडेल तयासी गोहत्या ते ।
    तमाखू ओढून काढील जो धूर ।
    बुडेल ते घर तेणे पापे ।।
    हरीकथेत बसून जो पान खाईल त्याला गोहत्या पाप लागते. तंबाखू ओढून जो धूर काढतो, त्याला पाप लागेल आणि त्याचे घर बुडेल. 
    ४) अवैध स्त्री संग न करणे --
     साधने तरी हीच दोन्ही। जरी कोणी साधील ।
     परद्रव्य परनारी। यांचा धरी विटाळ ।।
      परद्रव्य, पारनारीपासून जो लांब राहील तीच दोन साधने आहेत.   
       यास्तव कलियुगात ज्या कोण्या सुज्ञ माणसास आपले जीवन सार्थक करावयाचे आहे त्याने अभक्षण करू नये, कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नये, कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन करू नये आणि परस्त्री संग करू नये आणि सदैव - 
        हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
        हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।।
या महामंत्राचा जप आणि कीर्तन करावे.