शुक्रवार, २४ मार्च, २०१७

                                       श्रीकृष्णाष्टकं 


     विविध वेदशास्त्रांमध्ये भगवान श्रीकृष्णांची अनेक सुंदर श्लोकांद्वारे स्तुती केलेली आहे . या प्राचीन वेद शास्त्रांव्यतिरिक्त  अनेक आचार्यांनी  संस्कृत भाषेतून भगवान श्रीकृष्णांवर विविध स्तुति स्तोत्रांचा वर्षाव  केलेला आहे. इस्लामी आक्रमणानंतर कलियुगाचा प्रभाव अधिक तीव्रतेने वाढू लागल्यावर  संस्कृत भाषेची काही प्रमाणात पीछेहाट होऊन  सर्व सामान्य लोकांचे सोडाच, पण ब्राह्मणांनासुद्धा  संस्कृत कळणे कठीण झाले. 
     सर्व सामान्य व्यक्तींना भगवद्भक्ती कळावी यासाठी अनेक साधू-संतांनी विविध स्थानिक भाषांमधून अभंगांयी रचना करून भगवान श्रीकृष्णांची  स्तुती गायीली आहे. त्यांनी रचलेली कवने कृष्णभक्तीच्या अवीट गोडीने ओथंबलेली आहेत. जेव्हा ही  स्तुती कर्णेन्द्रियांद्वारे हृदय मंदिरात प्रवेश करतात तेव्हा पाषाण बनलेले हृदयसुद्धा नवनीतासमान कोमल होते. त्यातील मलीनता दूर होते आणि त्या हृदय मंदिरात भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात . 
     सांप्रतच्या कलह आणि दंभ यांनी संत्रस्त झालेल्या जीवांना दिव्यानंदाची प्रचीती येण्यासाठी भगवंतांच्या स्तुतीची नितांत आवश्यकता आहे. भगवान श्रीकृष्णांवर अनेक प्रकारे रचलेल्या स्तुतींमध्ये ' सहस्त्रनाम ',' शतक', ' दशक ' आणि 'अष्टक' असे विविध प्रकार आहेत. 
     विश्वभरातील हरे कृष्ण मंदिरातून वा केंद्रांतून वर्षभर विविध अष्टके गायीली जातात . भक्त  सुमधुर स्वरात गाउन भगवंतांयी प्रेममयी आराधना करतात. या अष्टकांमध्ये ब्राह्ममुहूर्तावर  श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर रचित 'श्री गुरुवाष्टकं' नित्य गायीले जाते. त्यानंतर  हरे कृष्ण महामंत्राच्या निर्धारित माळा प्रारंभ करण्यापूर्वी  श्री चैतन्य महाप्रभू  रचित 'श्री शिक्षाष्टकं ' अवश्य उच्चारले जाते.  सहा  गोस्वामींच्या आविर्भाव दिनी 'श्री षडगोस्वाम्याष्टकं ' गौर पूर्णिमेला सार्वभौम भट्टाचार्य विरचित ' श्री शचीतनयाष्टकं ',  जगन्नाथ रथयात्रेत  ' श्री जगन्नाथाष्टकं ' आणि कार्तिक मासात ' श्री दामोदराष्टकं ' विशेष उत्सहाने गायीले जाते.
     अशा अनेकानेक अष्टकांपैकी ' श्रीकृष्णाष्टकं' एक विशेष अष्टक आहे. याची रचना श्रीपाद आद्य शंकराचार्यांनी केलेली आहे. आद्य शंकराचार्य भगवंतांचे निष्ठावान भक्त होते. त्यांनी रचलेली 'श्री पांडुरंगाष्टकं ', 'श्री अच्युताष्टकं ' ,' श्री नृसिंहाष्टकं ' इत्यादी स्तुति-स्तोत्रे  प्रसिद्ध आहेत. 
     महान आचार्यांनी रचलेल्या स्तुती-स्तोत्रांचे  गायन , चिन्तन वा मनन केले तर आमचे  आध्यात्मिक जीवन अधिकच  समृद्ध होईल यात तिळमात्र  संशय नाही. 
      या 'श्री कृष्णाष्टकं' चा पहिला श्लोक पुढिला प्रमाणे आहे --
                       भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं  
                             स्वभक्तचित्तरंजनम् सदैव नंदानंदम् ।
                      सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं 
                            अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरम् ।। १ ।। 
     व्रजभूमीचे एकमेव भूषण असणाऱ्या , समस्त पापांचा नाश करणाऱ्या  , स्वभक्तांच्या मनाला आनंदित करणाऱ्या  भगवान श्रीकृष्णांना मी सदैव भजतो . ज्यांच्या मस्तकावर सुंदर मोरपिसांचा मुकुट असून हातात मधुर स्वरांची बासुरी आहे, तसेच ते प्रेमतरंगानी युक्त असा सागर आहेत अशा नटनागर श्रीकृष्णांना मी नमन करतो .
     या भौतिक जगत मनुष्यगण अन्य मर्त्य मनुष्याला  ' भूषण'  पदवी प्रदान करून त्यांचा  गौरव करतात . जसे ग्रामभूषण , नगरभूषण, महाराष्ट्रभूषण वा भारतभूषण इत्यादी पदव्यांनी अलंकृत केले जाते. परंतु हे सर्व कालौघात  विस्मृतीत जाते. परंतु भगवंतांचे  तसे नाही. भगवान श्रीकृष्ण अनंत कोटी ब्रह्माण्डांचे  भूषण आहेत. त्यांची  किर्ती वा यश कधीही नष्ट होत नाही. वास्तविक भगवान श्रीकृष्ण 'गोलोक वृंदावन' नामक दिव्य आध्यात्मिक जगतात निवास करतात. ते त्यांचे   हे आध्यात्मिक धाम या पृथ्वीवरही प्रकट करतात; त्याला 'भौम वृंदावन' असे संबोधले जाते. लौकिक दृष्ट्या हे वृंदावन उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्हयात आज ही पाहावयास मिळते . 
     आध्यात्मिक शक्तीने परीपूर्ण  असलेल्या वृंदावनाचे एकमेव भूषण 'भगवान श्रीकृष्ण' आहेत! महान कृष्णभक्त श्रील बिल्वमंगल ठाकूर म्हणतात  --     ' व्रजे प्रसिद्धम् नवनीत चौरं । '                  व्रजभूमी वृंदावनाचे अधिपती नंद महाराज आणि त्यांची अर्धांगिनी यशोदा या दोघांसाठी भगवान श्रीकृष्ण जीव की प्राण आहोत. ब्रजभूमीतील बालगोपाळांसाठी ते सर्वोत्तम सखा आहोत आणि गोपबालिकांसाठी प्राणधन,  सर्वोत्तम प्रियकर आहोत. समस्त साधुगणांसाठी ते आराध्य भगवान आहोत.
     स्वतः भगवान श्रीकृष्ण आपला  प्रियतम भक्त उद्धव यांस  सांगतात , 'मी एक क्षणासुद्धा वृंदावनाचा  त्याग करीत नाही. यास्तव या अष्टकाच्या प्रारंभी आचार्य म्हणतात - ' भजे व्रजैकमण्डनं ' मी व्रजभूमीचे  एकमेव भूषण असणाऱ्या  श्रीकृष्णांना भाजतो. 
                              समस्त पापखण्डनं 
     भगवान श्रीकृष्ण समस्त पापांचे खंडन करतात, विनाश करतात. आम्ही समस्त जीव या भौतिक जगात अनेकानेक जन्मापासून, इंद्रियतृप्तीच्या अभिलाषेमुळे उन्मत्त झालो आहोत. त्यामुळे आमच्या हातून अनेकानेक पापकर्म वा अपराध घडत असतात. ' अपराध सहस्राणी क्रियन्ते अहर्निशम् मया। ' या पापकर्मांमुळे आम्हाला  अनेक प्रकारची दुःखे  भोगावी लागतात. मृत्यूनंतर यमराज अनेक शिक्षा भोगण्यासाठी  नारकीय लोकात डांबून विविध प्रकारे दंड देतात. परंतु भगवान श्रीकृष्ण आपल्या अहैतुकी कृपेने आमच्या समस्त पापांचे  खंडन करतात. विविध प्रकारच्या पापकर्मातून मुक्त होण्यासाठी विविध प्रकारची प्रायःश्चितें  शास्त्रातून सांगितलेली आहोत. या सर्वांमध्ये प्रभावी उपाय आहे  गंगा स्नान किंवा कुंभमेळ्यात विशिष्ट मुहूर्तावर स्नान! अशी पवित्र स्नाने करून मनुष्य पूर्व संचित पाप कर्मांपासून मुक्त होतो. परंतु पाप करण्याची वृत्ती, जी त्याच्या हृदयात ठाण मांडून बसलेली आहे ती काही नष्ट होत नाही. त्यामुळे तो परत परत पापकर्म करीत असतो. त्याच्या हृदयातील पापकर्मांचे बीज अन्य कोणत्याही उपायाने नष्ट होत नाही. केवळ भगवान श्रीकृष्णच ते बीज नष्ट करू शकतात. श्रीकृष्ण आपल्या पवित्र नामाद्वारे पापी व्यक्तीच्या हृदयातील पापकर्मांचे  समुळ  उच्चाटन करतात. 
     ज्यावेळी पापी मनुष्य श्रीकृष्णांच्या पवित्र नामाच्या संपर्कात येतो आणि पवित्र कृष्णनामांचे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।।  उच्चारण करू लागतो त्यावेळी श्रीकृष्ण त्याच्या समस्त पापांचे खंडन करतात. हे कसे घडते ? जसे एखाद्या वृक्षावर शेकडो कावळे बसलेले असतील तर त्यांना हुसकावुन लावसाठी शेकडो दगड मारण्याची  आवश्यकता नसते. केवळ एक दगड मारला की झाले! त्याचप्रमाणे आमच्या हृदयात अनेक पापरूपी कावळे बसलेले आहेत. त्यांना हाकलून देण्यासाठी केवळ एकच  हरिनाम पुरेसे आहे. 
                                     स्वभक्तचित् रंजनम 
     भगवान श्रीकृष्ण स्वभक्तांच्या चित्ताला  सदैव आनंद प्रदान करतात. श्रीकृष्णांचे एक नाम आहे 'गोविंद' जे गायीना  आणि आमच्या इंद्रियांना आनंद देतात. जेव्हा आम्ही श्रीकृष्णांच्या मधुर बाळलीलांचे, वीररसयुक्त शौर्याचे वर्णन श्रवण करतो तेव्हा आमच्या कर्णाना  अतिशय आनंद होतो. जेव्हा आम्ही मंदिरातील शृंगार आरतीच्या वेळी श्रीकृष्णांचे दर्शन घेतो, त्यांची चित्रे पहातो तेव्हा आमच्या नेत्रांना आनंद मिळतो. भगवंतांच्या चरणकमलांवर अर्पण केलेले पुष्प प्रसाद म्हणून हूंगतो तेव्हा आमच्या घाणेंद्रियांना दिव्यानंद प्राप्त होतो. भक्त अतिव प्रेमाने भगवान श्रीकृष्णांना विविध प्रकारचे भोज्य, प्येय, गेह्य , च्युस्य,  लेह्य  वा चर्व्य  पदार्थ अर्पण करतो आणि नंतर ते पदार्थ भगवंतांचा  कृपाप्रसाद म्हणून  आम्हाला प्राप्त होतात,. तो महाप्रसाद मुखाद्वारे जीभेला प्राप्त होतो तेव्हा त्या अमृतमयी प्रसादाच्या ग्रहणाने भक्तांना अवीट आनंद मिळतो. अशा प्रकारे विविध मार्गांनी भगवान श्रीकृष्ण स्वभक्तांचे चित्तरंजन करतात. 
                                 सदैवनंदनंदनम्
     श्रीकृष्ण 'केवळ आनंदकन्द ' आहोत. ते आनंदाचे स्रोत आहेत. वेदांमध्ये ' ओम  आनंदोमेयोभ्यासाद  ' असे त्यांचे  वर्णन केलेले आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः नित्य आनंदांत मग्न असतात. त्यामुळेच ते त्यांच्या संपर्कात येणाऱ्या गायी-वासरांनी, गोप-गोपींना, वृक्ष-वेलींना, पशू-पक्षांना, यमुना, पृथ्वी, देवी-देवता आणि स्वभक्तांना आनंद प्रदान करतात. अशा नंदनंदनास  अर्थात नंद महाराजांच्या पुत्रास मी सदैव भजतो. 
     श्रीकृष्ण आनंद देतात, परंतु त्यापेक्षा अधिक आनंद श्रीकृष्ण संकीर्तनाने मिळतो . श्री चैतन्य महाप्रभूंनी श्रीकृष्णसंकीर्तनाला आनंदाचा  सागर म्हटले आहे. हा श्रीकृष्णसंकीर्तनाचा आनंदरूपी सागर सदैव वाढतच असतो. या आनंदसागराला नेहमी भरतीचे  उधाण आलेले असते. ओहोटी मुळी नसतेच !
                              सुपिच्छगुच्छमस्तकं 
      श्रीकृष्ण आपल्या मस्तकावर सुंदरसा मोरपिसांचा मुकुट धारण करतात. श्रीकृष्णांना मोरपीस अतिशय आवडते. त्यामुळे त्यांनी मोरपिसाला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यासाठी  स्वतःच्या मस्तकावर धारण केले आहे. भगवंतांना मोर अत्यंत प्रिय आहे. कारण मोर नित्य ब्रह्मचारी असतो. तो अन्य पशू-पक्षांप्रमाणे मैथून करीत नाही. मोर जेव्हा अत्यानंदाने नृत्य करतो तेव्हा त्याच्या नेत्रांतून आनंदाश्रू वाहू लागतात. या अश्रूंचे  सेवन लांडोर करते आणि त्यांची  वंशवृद्धी होते. अशा या प्रेमस्वरूप मोराची पिसे नेत्रांना आनंददायी वाटतात. त्या पिसांमधील रंगसंगती अतिशय नयनरम्य आणि आकर्षक असतो. 
                                   सुनादवेणूहस्तकं 
     भगवान श्रीकृष्णांच्या हातात वेणू असून ती त्यांच्या अधरांचे  पान करीत मधुर नाद उत्पन्न करीत असते. या वेणूला विविध नावे असून त्यानुसार श्रीकृष्णांना विविध नामांनी पुकारले जाते. उदा. वेणूगोपाळ, मुरलीधर, बंशीधारी, इत्यादी. 
     श्रील रूप गोस्वामी रचित 'भक्तिरसामृतसिंधू' नामक ग्रंथाच्या  'प्रेमाचे  उद्दीपन' नामक सव्वीसाव्या अध्यायात कृष्णकृपामूर्ती ए.सी. भक्तीवेदान्त स्वामी प्रभुपद श्रीकृष्णांच्या बासरी विषयी लिहितात, "श्रीकृष्णांची बासुरी इतकी अद्भुत आहे की तिच्या ध्वनीने परमहंसांची ध्यानक्रियाही भंग होऊ शकते. श्रीकृष्णांच्या बासुरीची वेणू, मुरली आणि वंशी असो तीन प्रकार आहेत. वेणू अतिशय लहान असून सहा इंचाहून  अधिक लांब नसते तिला सहा छिद्रे  असतात. मुरली आठ इंच लांबीची असते आणि तिच्या टोकाला एक छिद्र अन् मध्यभागी चार छिद्रे असतात. तिच्यातून अतिशय मधुर ध्वनी उत्पन्न होत असतो. वंशी पंधरा इंच लांब असते आणि तिच्यावर नऊ छिद्रे असतात. श्रीकृष्ण यथासमय या सर्व बासऱ्यांचे वादन करीत असतात. श्रीकृष्णांकडे 'महानंदा' किंवा ' संमोहनी' नामक एक मोठी वंशीसुद्धा आहे. त्याहून अधिक लांब बासुरीला ' आकर्षिणी ' असे म्हणतात. ' आनंदिनी' नामक बासरी आकर्षिणीहून अधिक लांब असते. ही आनंदिनी वंशी गोपबालकांना अतिशय प्रिय असते. तिला ' वंशुली ' असेही म्हणतात. कधीकधी या बासऱ्यांना रत्नांनी मढविले जाते. या बसाऱ्या  कधी संगमरवरापासून, तर कधी वेळूपासून निर्माण केल्या जातात. रत्नांनी निर्माण केलेल्या बासरीला 'संमोहिनी' म्हणतात आणि सुवर्णाने निर्मिलेल्या बासरीला 'आकर्षिणी' म्हणतात.
     श्रीकृष्ण वंशीवटा खाली उभे राहून बासरी वादन करू लागताच गायीवासरे, मोर-पोपट, यमुनेचे जळ, लता-वृक्षा स्तब्ध हऊन तो मधुर स्वर ऐकू लागतात. गोपी आपली गृहकृत्ये विसरून श्रीकृष्णांकडे धाव घेवू  लागतात. 
     भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मधुर वेणू वादनाने ब्रह्मदेवांना गायत्री मंत्र प्रदान केला आहे. 
                                            अनंगरंगसागर 
      भगवान श्रीकृष्ण विविध प्रेम तरंगांनी युक्त असा सागर आहेत. या पृथ्वीवरील सागर खाऱ्या  पाण्याचा असून त्यात विविध प्रकारचे तरंग उमटत असतात. वर्षा ऋतुत या सागराचे तरंग (लाटा ) भीषण रौद्र रूप धारण करतात. तर कधी सौम्य रूप. परंतु श्रीकृष्ण प्रेमसागर आहेत. ते आपल्या विविध लीलांद्वारे आपल्या भक्तांना प्रेमरस प्रदान करतात. श्रीकृष्ण अद्भुत प्रेमरससागर असून त्यात प्रामुख्याने शांतरस, दास्यरस, साख्यरस, वात्सल्यरस आणि माधुर्यरस त्यांच्या भक्तांना प्राप्त होत असतो. 
     विविध प्रकारचे प्रेमरस प्रदान करणाऱ्या  या अनंगरंगसागरातून दिव्य अमृताचा सर्वश्रेष्ठ रस आहे ' श्रीहरिनाम संकीर्तन!' श्री चैतन्य महाप्रभू सांगतात. "हे हरिनाम संकीर्तन दिव्य आनंद सागराचे सतत निरंतर वधर्न करीतय असते. ज्या अमृताची आस आपल्याला आहे त्या अमृताये पान आपण या संकीर्तनाने करू शकतो."             
                              नमामि कृष्णनागरम्
     नारदीय पुराणात भगवंतांच्या अर्चा विग्रहाना बघताच  क्षणी त्यांना प्रणाम करून त्यांचा  आदर करण्यासंबंधी  सांगितले आहे-
                              एकोअपि कृष्णाय  कृतः प्रणामो 
                                  दशाश्वमेधावभृथैर्न तुल्यः।
                             दशाश्वमेधी पुनरेति जन्म 
                                   कृष्णप्रणामी न पुनर्भवाय ।। 

      'श्रीकृष्णांना एकदा केलेला प्रणाम दहा अश्वमेध यज्ञ केल्याने मिळणाऱ्या  फळाहून अधिक श्रेष्ठ आहे. कारण दहा अश्वमेध यज्ञ करणारा परत जन्म घेतो, परंतु श्रीकृष्णांना प्रणाम करणारा पुनर्जन्म घेत नाही. " अन्य युगात संपन्न होणारे  अश्वमेध वा गोमेध यज्ञ कलियुगात निषिद्ध मानले आहेत. परंतु तरीही कोणी असे यज्ञ संपन्न करीत असेल तर त्यापासून प्राप्त होणारे फळ अल्प काळातच  नष्ट होते. अशा यज्ञ कर्त्यास   या पृथ्वीवर परत जन्म घ्यावा लागतो. तथापि, जर कोणी एकदाच  श्रीकृष्णांच्या अर्चा विग्रहांना नम्रपणे प्रणाम करील तर तो मनुष्य परत या भौतिक जगात जन्म घेणार नाही. त्याला अध्यात्मिक धामाची प्राप्ती होईल. 
लेखन सेवा - विनय शंकर गोडसे 
9242176587
                                   -----------------------------