बुधवार, १२ एप्रिल, २०१७

               २.  भगवंतांचे अधिष्ठान आवश्यक 


सध्या आपल्या देशात आणि विशेष करून महाराष्ट्रात जातीयवादाचा भस्मासुर दिवसेंदिवस बेसुमार वाढतो आहे. पैशाला चटावलेली  वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि त्यातही विशेषकरून टी.व्ही. चॅनेलवाले जाणूनबुजून या कुप्रवृत्तीला पोसत आहेत. कोणतीही दुर्घटना घडली की त्यात मीठ-मसाला टाकून त्याचा ओढून ताणून संबंध ब्राह्मणांशी जोडण्यास या माध्यमांना कमालीची धन्यता वाटते. यातून ते कोणते सामाजिक हित साधणार आहेत कोण जाणे? 

स्वतःला सत्यशोधक वा पुरोगामी म्हणविणारे हे भंपक सत्याचा विपर्यास करून विकृत जातीद्वेष पसरविणारी वक्तव्ये करीत आहेत. असे घडत असताना सुशिक्षित विचारी बहुजन समाज मात्र शांतपणे बघतो आहे. याचे मोठे आश्चर्य वाटते. अशा लोकांनाही अंतःकरणातून दुःख न वाटता सुख वाटते की काय? का, त्यांनाही उघडपणे ब्राह्मणांना शिव्या घालता येत नाही म्हणून समाधान वाटते?

काही अल्पबुद्धीच्या लोकांना वाटते की, केंद्रात काही मंत्री ब्राह्मण आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री ब्राह्मण आहे. पं. बंगाल आणि तामिळनाडू येथे ब्राह्मण स्त्रिया मुख्यमंत्री आहेत; परंतु हे सर्वजण या ब्राह्मण द्वेषावर काहीच करीत नाहीत? असे का? कारण याची अनेक करणे आहेत. या सत्ताधारी मंडळींना परत परत निवडून यायचे आहे; परंतु निवडून येण्यासाठी ३% ब्राह्मणी मतांची आवश्यकता नसून बहुमताची निकड आहे. त्यामुळे हे लोक विकृत विचारसरणीला विरोध करीत नाहीत. तसेच यातील सर्वांनाच ब्राह्मण असण्याची लाज वाटते. यांच्यात वेदशास्त्र प्रमाणित ब्राह्मण गुणांचा पूर्णपणे अभाव आहे. गीता-भागवतातील दिव्य ब्राह्मण गुणांचा हे लोक तिरस्कार करतात. यांना मद्य-मांस यांचे आकर्षण आहेच. त्यामुळे हे द्विजबंधू अर्थात पतित झलेले नामधारी ब्राह्मण आहेत. त्यामुळे हे लोक ब्राह्मणांवर कितीही अत्याचार झाला तरी एक चकार शब्दही काढणार नाहीत, कारण शेवटी त्यांना त्यांची  मतपेटी सांभाळायची आहे. 
परंतु हे मित्रवर्य, आपली मात्र कुचंबणा होत  आहे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात - बुडती हे जन पाहवेना डोळा । म्हणुनी कळवळा येतसे ।। त्याप्रमाणे आपली मनःस्थिती झालेली आहे. ब्राह्मणांची  अवहेलना आपणास बघवत नाही. पदोपदी ब्राह्मण समाजाची होणारी टिंगलटवाळी, हेटाळणी, शिक्षण वा अन्य क्षेत्रांत होणार तिरस्कार यांमुळे आपण व्यथित झाला आहात. ब्रिगेडी दहशती विरुद्ध संघर्ष करण्यासाठी आपण तळमळत आहात हे पाहून आम्हांस नवल वाटते. आपले हे आत्मसन्मानार्थ लढणे प्रशस्त वाटते. 

महोदय, परंतु आपली खरी सल ही आहे की, ज्यांच्यावर असत्य आरोप केले जातात हे ब्राह्मण स्वतः मात्र मूग गिळून गप्प बसतात. ते काहीच बोलत नाहीत. त्यामुळे आपल्याला भीती वाटते की, हे लोक गप्प राहिल्यामुळे इतरांची कोल्हेकुई सत्य वाटू लागते. ज्यु  द्वेष्ट्या हिटलरने ज्यू द्वेष पसरविण्यासाठी आधी पत्रके आणि पुस्तके छापली.भाषणे दिली आणि मग प्रत्यक्ष कृती केली. मोहमद अली जिनानेसुद्धा असेच केले. काश्मिरी पंडितांचा असाच विध्वंस करण्यात आला. तसाच विनाश ब्राह्मण जातीचा व्हावा असा प्रयत्न साध्या चालू आहे. आपल्याला असे वाटणे अगदी रास्त आहे. सध्याचा सर्वच समाज स्वार्थी झालेला आहे. जो तो आपल्याच इंद्रियतृप्तीत बुडालेला आहे; परंतु आपल्यासारखा विरळाच कोणी भविष्यातील उत्पाताविषयी चिंतन करतो. 

सध्या भयानकरीत्या गढूळ होणाऱ्या सामाजिक द्वंद्वाशी टक्कर देण्यासाठी आपल्याला कोणतेच साहाय्य देण्यासाठी समाज बांधव तत्पर नाहीत, कारण यांतील अनेक जण षंढवृत्तीचे झालेले आहेत. आपल्या क्षणभंगुर अशा दहा बाय दहा फुटांच्या बिऱ्हाडात कामग्रस्त झालेले आहेत. काहींना वाटते की, आपण जो न्यायासाठी संघर्ष करीत आहात तो म्हणजे डुकराशी कुस्ती खेळणे होय, कारण डुकराशी कुस्ती लढण्यासाठी आपल्याला गटारात उतरावे लागते. त्या घाणीत लोळावे लागते. भले आपण जरी ही कुस्ती जिंकलात तरी टाळ्या वाजवजला वा अभिनंदन करायला कोणीच नसते. असे असूनही आपण अभिमन्यूप्रमाणे लढू इच्छिता, हे मोठे साहस आहे आणि निश्चितच कौतुकास्पद आहे. यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा सदैव आपल्या पाठीशी आहेत. 
बरे काही लोक आपल्या कार्याचे तोंड भरून कौतुक करतीलही; परंतु कोणतेच भरीव पाठबळ देणार नाहीत. कारण महानगरतील आर्थिक उलाढाल जवळून बघणारा प्रगत ब्राह्मण विचार करतो की, ही 'डेड  इन्व्हेस्टमेंट' आहे. तर काही जण आपल्याच कोषात गुरफटलेले फुकाचा सल्ला देतात, कशाला एवढी  अनाठायी चिंता करता? स्वस्थ बसा, यातून काहीही साध्य होणार नाही. इतके सर्व निरुत्साही वातावरण असले तरी आपण मुळीच निराश होऊ नका. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि प्रत्यक्ष कार्य आरंभले त्या वेळी सर्वच जातीपातीच्या लोकांनी त्यांची हेटाळणी केली; परंतु त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले आणि यशस्वी झाले. आपली ही न्यायपूर्ण चळवळ निश्चितच यशस्वी होईल यात तिळमात्र शंका नाही. चळवळीविषयी समर्थ श्री रामदास स्वामी म्हणतात - सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील त्यांचे| परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भागवंतांचे।।         

आम्ही अनेक तथाकथिक विद्वानांचे साहित्य वाचले आहे. त्यात त्यांनी स्वामींचा हा श्लोक संदर्भ म्हणून दिलेला आहे; परंतु यातील ९०% पढत विद्वान भागवंतांच्या अधिष्ठानाची हेटाळणी करतात. ते भागवंतांच्या उपस्थितीची कुचेष्टा करतात. त्याला अंधश्रद्धा संबोधतात आणि तेथेच घोडं पेंड खात! कारण या अल्पज्ञानी लोकांना माहीत नसते की, परमेश्वराच्या इच्छेविना काहीच घडत नाही. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, आपल्या या चळवळीला बृहत्स्वरूप येण्यासाठी भगवंतांचे अधिष्ठान निश्चितच हवे. अनेक डोकी गोळा करून प्रारंभ केलेली चळवळ म्हणचे दुर्योधनाची विशाल सेना  आणि भगवंतांचे अधिष्ठान म्हणजे अर्जुनाचे सारथ्य करणारे भगवान श्रीकृष्ण!

भगवद्गीतेत (१८. ७८) संजय अंध धृतराष्ट्राला सांगतो - 
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयो भुतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।
'जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत, तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. हे माझे मत आहे.'

आपल्याला जर खरोखरच ब्राह्मणांचे आणि संपूर्ण समाजाचे हित साधायचे असेल, तर आपल्याला आपल्या सर्वश्रेष्ठ हितचिंतकांशी संपर्क साधावा लागेल. जसे कोणाला मोठी शाळा, विशाल मंदिर वा अन्य काही भव्य कार्य संपन्न करायचे असेल, तर तो त्या गोष्टीची आवड असणाऱ्या धनवान हितचिंतकाकडे जातो. त्याच्या समक्ष निवेदन ठेवतो. त्याची स्तुती करतो. त्याला प्रसन्न करून आपला उद्देश साध्य करतो. तर मग आम्हीसुद्धा असेच करायला पाहिजे. आम्ही ब्राह्मणांच्या श्रेष्ठ हितचिंतकांकडे गेले पाहिजे. तर मग असे हितचिंतक कोण आहेत? या संबंधी विष्णू पुराणात (१.१९.३५) सांगितले आहे - 
नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च । 
जगद्हीताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः ।।
'मी त्या भगवान श्रीकृष्णांना सादर नमस्कार करतो, जे समस्त ब्राह्मणांचे आराध्यदेव आहेत. ते गायी आणि ब्राह्मणांचे हितचिंतक आहेत तथा ते सदैव संपूर्ण जगताचे हितचिंतक आहेत. मी कृष्ण आणि गोविंद नामाने विख्यात भगवंतांना वारंवार नमस्कार करतो.'

बुद्धिमान मनुष्याने हे ध्यानात ठेवले पाहिजे की, भगवान श्रीकृष्ण केवळ गायी आणि ब्राह्मणांचेच हितचिंतक नसून ते संपूर्ण जगताचे हितचिंतक आहेत. ते संपूर्ण विश्वाचा भार स्वतः वाहतात म्हणून त्यांना 'विश्वम्भर' म्हणून संबोधले जाते; परंतु सध्या आम्ही त्यांना विसरलो आहोत. त्यामळे आज संपूर्ण विश्वात प्रचंड युद्धे आणि संघर्ष चालू आहेत . प्रत्येक व्यक्ती रोगग्रस्त आहे. पीडित आहे. दुःखी आहे. हे असे का? कारण आम्ही आमच्या परम हितचिंतकाला विसरलो आहोत. भगवान श्रीकृष्णांकडे आम्ही पाठ फिरविली आहे. मूर्खांचे साहित्य वाचून आम्ही श्रीकृष्णांना दोष देण्यात स्वतःला धन्य मानत आहोत. 
भागवन श्रीकृष्णांना प्रिय असलेल्या गायींविषयी आम्हाला किंचितही प्रेम उरलेले नाही. जर आम्ही श्रीकृष्णांच्या प्रिय गायींना सुखी ठेवत नाही, तर मग श्रीकृष्ण आम्हाला कसे काय सुखी ठेवतील? यावर आपण म्हणाल की, आम्ही महानगरात राहतो. आम्हालाच राहण्यासाठी प्रशस्त घर नाही, खावयास चांगले अन्न नाही. प्याव्याचे शुद्ध जल नाही. तर मग गायीला कुठे ठेवणार? तिला काय खाऊ-पिऊ घालणार? परंतु काळजी करू नका. आपण प्रातःकाळी उठल्यावर आणि रात्री निद्राधीन होण्यापूर्वी गायींचे समरण नक्कीच करू शकतो. आपण विरंगुळा म्हणून सप्ताहाअंती किंवा महिन्यातून एकदातरी घरापासून दूर जातोच ना? त्या वेळी जिभेचे चोचले भागवण्यासाठी अनावश्यक खर्च करतोच ना? मग त्या ऐवजी आपण महानगराबाहेरील निसर्गाच्या सान्नीध्यात वसलेल्या गोशाळेत जाऊ शकतो. तेथील गायींच्या पाठींवरून प्रेमाने हात फिरवू शकतो. तिच्या चारापाण्यासाठी काही धन अर्पण करू शकतो. गायीच्या संपर्कात येवून तिची थोडी सेवा केल्यामुळे आपल्या कितीतरी मानसिक आणि शारीरिक व्याधी दूर पळून जातील. जेव्हा आमच्याकडून अल्प प्रमाणात गोसेवा घडते, तेव्हा गायी आमच्यावर प्रसन्न होतात आणि आम्हाला भरपूर आशीर्वाद देतात. परंतु याची आम्हाला पुसटशी कल्पनासुद्धा नाही. छत्रपती शिवरायांना याचे पूर्ण ज्ञान होते. त्यासाठीच त्यांनी आपल्या स्वराज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी लागू केली होती. गोसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले होते. देव, देश आणि धर्म यांचा विध्वंस करणाऱ्या अफजल खानाचा वध करण्यापूर्वी छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावरून निघतेवेळी एक सालंकृत सवत्स गाय एका सत्पात्री ब्राह्मणाला दान दिली होती. आता आम्ही हे सर्व सोईस्करपणे विसरलो आहोत. छत्रपती शिवरायांप्रमाणे आम्ही सुद्धा गोसेवा-गोपूजा केला तर गाय आमच्यावर प्रसन्न राहील आणि जेव्हा गाय प्रसन्न असेल तेव्हा तिचे पालन करणारे गोपाळकृष्ण आमच्यावर प्रसन्न होतील आणि आमचे हितरक्षण करतील. 
भगवान श्रीकृष्णांना ब्रह्मण्यदेवाय अर्थात ब्राह्मणांचे आराध्यदेव म्हटले आहे. परंतु अज्ञानामुळे किंवा मुर्खपणामुळे आम्ही त्यांना तिरस्कृत केले आहे. आमच्या या निर्बुद्ध अवस्थेचे वर्णन मार्मिक शब्दांत स्कंद पुराणात केले आहे - 
वासुदेवं परित्यज्य यो न्यदेवमुपासते ।
स्वमातरं परित्यज्य स्वपचीं वन्दते हि सः ।।
'जी व्यक्ती वासुदेवांचा परित्याग करून अन्य देवांची उपासना करते, ती व्यक्ती म्हणजे एका चेटकिणीचा आश्रय मिळविण्यासाठी स्वमातेच्या आश्रयाचा त्याग करणारी होय.'

तर मग आम्ही ब्राह्मणांनी अन्य कोणाचाही आश्रय न घेता, अन्य कोणाचेही गुणगान न गाता, अन्य कोणाकडेही भीक न मागता संपूर्णपणे भगवान श्रीकृष्णांवर अवलंबून राहिले पाहिजे, कारण तेच आमचे परम हितचिंतक आहेत. आमचा संघर्ष हे युद्धचे आहे आणि त्यासाठी सदैव त्यांचेच समरण केले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला निमित्तमात्र करून आम्हा सर्वांना संबोधित करताना म्हणतात -  
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
'तू सदैव माझे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे.' भगवद्गीता ८. ७ 

तर मग अशा प्रकारे आपण आपली चळवळ किंवा संघर्ष भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करीत चालू ठेवाल तर आपला विजय निश्चित आहे.