बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

                              धनसंचयाच्या योजना 


सध्या आपला देश फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. विदेशी कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे . ऐकाकाळी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत असे. हा देश सुजलाम सुफलाम म्हणून संबोधला जात असे.

आपल्याला इतिहासातून कळते की फार पूर्वी शक, हूण, कुशाण, मोंगल यांनी या देशाची लूटमार केली. त्यानंतर इंग्रजांनी आणि त्यानंतर स्वकियांनी या देशाला लुटले. प्रत्येक व्यक्ती असा विचार करते की मला माझ्या बुद्धिचातुर्याने जेवढे काही खाता येईल तेवढे खाणे आणि हे माझे आहे आणि मीच त्याचा एकमेव भोक्ता आहे. हे सर्व माझ्या सुखासाठीच आहे. परंतु माणूस हे सर्व जाणून घेण्यास तयार नाही की वस्तुतः या जगातील प्रत्येक चेतन किंवा जड पदार्थांचे मूळ मालक भगवान श्रीकृष्ण आहेत आणि तेच एकमेव भोक्ता आहेत. तेच नियंत्रक आहेत आणि त्यांनी आमच्या आवश्यकतेसाठी जेवढे आम्हाला दिले आहे तेवढ्याच गोष्टींचा आम्ही स्वीकार करावा. असे ज्यावेळी आम्ही करू, त्याच वेळी आम्हाला वास्तविक शांती मिळेल, सुख मिळेल. 

परंतु कलियुगाच्या प्रभावामुळे सर्वसामान्य लोक इतके पतित आणि मूढ झाले आहेत की त्यांना वाटते की मी जर अधिक पैसा मिळविला तर सुख लवकर मिळेल. भक्तराज प्रह्लाद महाराज सांगतात, "धन इतके प्रिय असते की लोक त्याला मधापेक्षा मधुर समजतात. तर मग असा कोण असेल की जो धन संग्रह करण्याच्या भुकेचा परित्याग करू शकेल आणि ते सुद्धा गृहस्थजीवनात ? चोर, व्यावसायिक नोकर तथा व्यापारी आपल्या प्रिय प्राणांची बाजी लावून धन प्राप्त करू इच्छितात." - भागवत ७.६.१०

पैशाच्या मागे लागलेल्या  लोकांविषयी भगवान श्रीकृष्ण सांगतात " इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंतानी ग्रासलेले असते. शेकडो, हजारो आशारुपी पाशांनी बद्ध झालेले कामक्रोधपरायण झालेले हे आसुरी लोक इंद्रियतृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. आसुरी मनुष्य विचार करतो की, आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उतरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौजमजा करेन, अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. " भगवद्गीता १६. ११. १२. १३. १४. १५ 

तर अशा अनेक आर्थिक योजनांद्वारे आपण सुखी होऊ असे राजकारणी, अर्थतज्ज्ञ, विचारवंताना वाटते. परंतु हे सर्व प्राप्त करूनही लोक सुखी - समाधानी होत नाहीत. असे का? कारण एकच की कोणीही हे जाणून घेण्यास तयार नाही की वास्तविक मालक श्रीकृष्ण आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे. 
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : 92421 76587
                                         कृष्णप्रेम 

कृष्णभावनामृताचा प्रचार करते वेळी, सर्वसामान्य लोकांच्या लाभासाठी भक्त त्यांना कृष्णप्रसाद देतात. त्यावेळी लोक अनेक चित्रविचित्र प्रश्न विचारतात हा प्रसाद इतका स्वादिष्ट का ? इतका अद्भुत का ?श्रीकृष्ण इतका चांगला नैवेद्य स्वीकारीत असतील तर मग तो अर्पण करण्यास आम्हाला परवडेल का ? हे सर्व करणे अत्यंत खर्चिक आहे. आम्हाला जमणार कसे ? परंतु हे सर्व अज्ञान आहे. 


पूर्ण पुरुषोत्तम भगवान स्वतःच 'आत्माराम' आहेत. ते पूर्ण आहेत. त्यांना कोणत्याही ऐश्वर्याची वा पदार्थाची मुळीच आवश्यकता नाही. ते अत्यंत कृपाळू आहेत. आम्ही त्यांच्यावर प्रेम करावे यास्तव ते त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला प्रदान करतात. ते सांगतात जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तिने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो."

अर्थात या जगातील गरीबातील गरीब मनुष्य भगवान श्रीकृष्णांना एखादी लहानशी वस्तु प्रेमाने अर्पण करून कृष्णप्रेम प्राप्त करू शकतो. त्यांने अर्पण केलेल्या पदार्थाचा श्रीकृष्ण आनंदाने स्वीकार करतात तथा त्या मनुष्याचा या दुःखमय जगातून उद्धार करतात. परंतु त्यासाठी मनुष्याला श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असणे आवश्यक आहे. 

प्रेमाने आणि भक्तीने अर्पण केलेल्या पदार्थांचा श्रीकृष्ण आनंदने स्वीकार करतात, त्यामुळे त्यांचा प्रसाद स्वादिष्ट आणि अद्भुत लागतो. कारण त्यांच्या स्पर्शामुळे प्रसाद दिव्य बनतो. तसेच श्रीकृष्णांनी आम्हाला जेवढी शक्ती दिली आहे त्यानुसार आपण त्यांची सेवा केली पाहिजे. श्रीकृष्णांच्या लिलातून आपण कीतीतरी उदाहरणे पाहू शकतो. पांडव आणि द्रौपदी वनवासात असते वेळी, त्यांना पीडा देण्यासाठी दुर्योधन दुर्वासा मुनींना वनात पाठवितो. त्यावेळी अत्यंत संकटकालीन स्थितीत द्रौपदी श्रीकृष्णांना पुकारते तथा त्यांना ती केवळ एक कण अन्न देऊ शकते.  पुढे श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि दुर्वास मुनींचे संकट टळते. पुढे श्रीकृष्ण पांडवांचे दूत बनून हस्तीनापूरला जातात. त्यावेळी दुर्योधन त्यांना सोन्याच्या ताटातून ऐश्वर्यशाली राजभोग अर्पण करू इच्छितो. परंतु श्रीकृष्ण प्रसन्न होत नाहीत. ते त्याचा स्वीकार करीत नाहीत. ते महात्मा विदुरांच्या घरी जातात आणि त्यांच्या पत्नीने प्रेमाने अर्पण केलेली केळीची सालेही खातात.


श्रीकृष्ण आपल्या बाल मित्राने, सुदाम्याने कळकट पंचातून बांधून आणलेले पोहे त्याच्याकडून जबरदस्तीने काढून घेतात आणि मोठ्या आनंदाने ग्रहण करतात. श्रील प्रभुपाद सांगतात की श्रीकृष्णांना प्रेममयी सेवे व्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा नसते. श्रीकृष्ण एखाद्या फुलाचाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात. ते अभक्तांकडून कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करीत नाहीत. ते स्वावलंबी असल्यामुळे त्यांना कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा नसते. तरीही ते भक्ताकडून प्रेमभावाचे आदानप्रदान करण्याकरिता ते भक्ताच्या भेटीचा स्वीकार करतात. इतर कोणत्याही साधनाने उदाहरणार्थ ब्राह्मण, विद्वान, पंडित, गर्भश्रीमंत किंवा महान तत्तवज्ञानी झाल्याने आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही. 

भगवान श्रीकृष्ण सांगतात, "मी कोणाचाही द्वेष करीत नाही. तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत. परंतु जो कोणी भक्तीभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे. माझ्याठायी स्थित आहे आणि मीसुद्धा त्याचा मित्र आहे." 
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : 92421 76587