अबब ! काय ही भोगयोग्याची माया?
विक्रम चौधरी हा भोगी सध्या अमेरिकेत पुष्कळच चर्चेत आहे. विश्वभर पसरलेल्या तब्बल ७०० योगा स्टुडियोचा मालक असलेला हा अब्जाधीश न्यायालयीन तडाख्यात साफ बुडाला आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली लॉस एंजिलिस न्यायालयाने त्याला ५०३ कोटी रुपयांची भरपाई देण्यास फरमावले आहे. हे प्रचंड घबाड त्याची भूतपूर्व वकीलीण मीनाक्षी बोडेन यांना मिळणार आहे आणि त्यावर बोनस म्हणून तिला विक्रमच्या ४३ अलिशान कारसुद्धा मिळणार आहेत.
कोलकत्यातून योग शिकवता शिकवता विक्रम अमेरिकेत पोहचला आणि आपले मायाजाल पसरविण्यास प्रारंभ केला. योग शिकविण्यासाठी तो आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून ११.५ लक्ष रुपये शुल्क घेत असे. मदिरा आणि मदिराक्षींच्या आहारी जाऊन त्याने पाच सहस्त्रांपेक्षा अधिक स्त्रियांचा भोग घेतला होता.
७० वर्षाचा हा भोगगुरु सध्या अमेरिकेतून फरार आहे.
प्रचंड धनसंपदा आणि विविध प्रकारची इंद्रियतृप्तीची अनेकानेक साधने, सर्वप्रकारची नशा, मुक्त लैंगिक भोगाची सुविधा आणि मांसाहाराची रेलचेल असूनही अमेरिकेतील लोक समाधानी नाहीत. त्यामुळे ते लोक सतत आंतरिक समाधानाच्या शोधात असतात. त्यांच्या या कमकुवतपणाचा लाभ उठवण्यासाठी अनेक तथाकथित भारतीय योगगुरु अमेरिकेस जात असतात. त्यातील अनेक जण प्रचंड प्रसिद्धी आणि पैसासुद्धा प्राप्त करतात.
वस्तुतः योग या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे भगवंतांशी तुटलेला संबंध परत जोडणे. परंतु अनेक तथाकथित ढोंगी गुरु शारीरिक कसरती करून सुडौल शरीर आणि भोगवृत्ती वृद्धिंगत करण्याचा प्रसार करतात. तर काही जण खोटा प्रचार करून, काही मंत्र कानात सांगून लोकांना भ्रमित करतात की तुम्ही भगवान होऊ शकता
आणि लोक पैसा देऊन फसतात.
काही वर्षांपूर्वी रजनीश नामक पाखंडी मनुष्याने 'संभोगातून समाधीकडे' हा एक नवा अविष्कार करून अनेकांना फसवले होते. अनेक दिग्गज त्याच्या नादाला लागले आणि बरबाद झाले!
आजचा मानव विस्मृतीच्या गहन अंधकारात नाही. तो विशिष्ट देश, खंड, समाज, जाती-पाती, धर्म, यांनी जखडलेला नाही. त्याने संपूर्ण विश्वात भौतिक सुखसोयींमध्ये, भौतिक शिक्षणात, आर्थिक प्रगतीत, खाण्यापिण्यात, वस्त्रालंकार घालण्यात आणि अन्य अनेक प्रकारच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. तरीही मानवांमध्ये प्रचंड विषमता, भिन्नता दिसून येते. लैंगिक शोषणात बेसुमार वाढ झाली आहे.
सदैव कामरत असलेल्या भोगी विक्रम चौधरीची अवस्था आता अतिशय दयनीय झाली आहे. अशी अवस्था समस्त परस्त्री भोगींची होतच असते. महाभारतातील उद्योगपर्वत याचे यथार्थ वर्णन केलेले आहे -
शीलं प्रधानं पुरूषे तद्यस्येह प्रणश्यति ।
न तस्य जीवितेनार्थो न धनेन न बन्धुभि:।।
"माणसाला शील (चारित्र्य) हेच मुख्य आणि महत्त्वाचे आहे. या जगात ज्याचे चारित्र्य नष्ट झाले त्याला जीविताचा, धनाचा अथवा नातलगांचा काहीही उपयोग नाही."