बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

            भ्रामक राष्ट्रवाद आणि धर्मशासन 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी हे प्रखर राष्ट्रवादी होते. परंतु त्यांच्या संकल्पनेचा विनाकारण विपर्यास झाला आहे, असे मत काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील केंद्रिय मनुष्यबळ विकास खात्याच्या संशोधन समितीने मांडले होते. त्याविषयीचे 'गैरसमज'  दूर  करण्यासाठी एक परिसंवाद आयोजित करण्याचा  या समितीचा
 मानस आहे. या समितीच्या एका  ज्येष्ठ सदस्याने  आपले मत मांडताना अनेक प्रकारे बडबड केली होती. आम्हाला त्यांचे नाव ज्ञात  झाले नाही. त्यामुळे सध्या आम्ही त्यांना 'पंतोजी' असे संबोधू! त्यांच्या भरमसाठ बोलण्यातील एका वाक्याकडे आमचे लक्ष्य वेधले गेले. ते वाक्य असे होते - 'ते हिंदूराष्ट्र अशी संकल्पना मांडत असतात, तेव्हा खरे तर तो प्रखर राष्ट्रवादच असतो. ही ईश्वरशासित पध्दती नव्हे, तर धर्मशासित पध्दती आहे. 
आता या वरील वाक्यावरून तथाकथित थोरकट विचारवंत कसा वैचारिक गोंधळ घालतात यावर आम्ही काही चर्चा करणार आहोत. ही चर्चा डोळयांना झापड लावलेल्या अनुयायींना आवडणार नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. तसेच ते आमच्यावर अप्रसन्न होणार याचीही पूर्ण जाणीव नव्हे तर अनुभवही आहे. 
या वाक्यातील भोंगळपणा किंवा भिन्नता कशी आहे ते पहा. ' राष्ट्रवाद  ही ईश्वरशासित पध्दती नव्हे.' पंतोजींचे हे म्हणणे अगदी शतप्रतीशत खरे आहे. ते कसे? त्यांनी ईश्वर म्हणजे कोण हे स्पष्ट न केल्यामुळे आम्ही   
ईश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण असे गृहीत धरूया. श्रीकृष्णांनी भगवद् गीतेत कोठेही 'प्रखर राष्ट्रवाद' मांडलेला नाही. किंबहुना कोणत्याही वेदशास्त्रे, पुराणे, रामायण वा महाभारतादी प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये या विषयी प्रखर वा साधक बाधक चर्चा सुद्धा केलेली नाही. ते कसे काय? वस्तुतः प्राचीन काळापासून या संपूर्ण पृथ्वीलाच भारतवर्ष म्हणून संबोधले जात असे. शकुंतला आणि दुष्यंत पुत्र भरताने या संपूर्ण पृथ्वीला आपल्या अंकीत ठेवले होते. त्याच्या नावावरून या वसुंधरेला अर्थात पृथ्वीला भारतवर्ष म्हणत होते. ही पृथ्वी, भूदेवी असून ती श्रीविष्णूंची शाश्वत पत्नी आहे. 
कलियुगाचा प्रारंभ झाल्यानंतर या पृथ्वीवरील भूमीचे अनेक तुकडे विभागले जाऊन त्यातील एका विशिष्ट भूभागाला भारतभूमी म्हणण्याचा प्रघात अलीकडच्या काळातील आहे. पुढे भाषावार प्रांत रचना करून या भारतमातेचे आणखीन विभाग करून त्यांना कर्नाटक माता; नागालँड, तामिळनाडू (नाडू म्हणजे राष्ट्र वा देश), महाराष्ट्र, सौराष्ट्र, वंगदेश, तेलगूदेशम्, तुळूनाड, प्रदेश, गढ, स्थान इत्यादी संबोधले जात आहे. 
त्यात कर्नाटक मातेच्या लालपिवळया कुपुत्रांनी स्वतंत्र कर्नाटक ध्वजाची मागणी केली आहे.  या सर्व मागण्या वा संकल्पना मानव निर्मित असून पंतोजी म्हणतात तो प्रखर राष्ट्रवादही मानव निर्मित आहे. त्या संकल्पनांचा ईश्वर-शासित पद्धतीशी काहीही संबंध नाही. त्यांचे म्हणणे अगदी सोळा आणे खर आहे. 
प्राचीन काळी क्षत्रिय राजा आपल्या बाहुबळाने जेव्हडा  भूभाग  जिंकून आपल्या अधिपत्याखाली ठेवत असे, तेवढया भूभागाला तो स्वतःचे राज्य, साम्राज्य वा देश म्हणत असे. तेथील समस्त प्रजेला आपल्या अंकीत ठेवून, त्या प्रजेचे पुत्रवत पालन करीत असे. तो आपण नव्याने जिंकलेल्या भूमीवरील प्रजेची कत्तल करीत नसे. तेथील प्रजेचे पालन पोषण करताना तो भेदभाव करीत नसे. प्रजा म्हणजे केवळ मनुष्य प्राणीच नव्हे तर सर्व प्रकारचे पशू, पक्षी, सरपटणारे जीव, जलचर आणि वनस्पती, वृक्षवेली 
यासर्वांना प्रजा म्हटले जाते. पूर्वी वेदांना प्रमाण मानणारे राजे अशा प्रकारे वागत. श्रीविष्णू जसे संपूर्ण सृष्टीचे पालन पोषण करतात तसेच येथील राजे समस्त प्रजेचे पालन पोषण करतात, यास्तव राजाला श्री विष्णूंचा प्रतिनिधी म्हणून संबोधले जात असे. 
या संपूर्ण पृथ्वीचे शेवटचे सम्राट परीक्षित महाराज होते. त्यानंतर सर्वत्र कलिचे साम्राज्य पसरल्यामुळे पृथ्वीवरील भारतवर्षाचे तुकडे पडू लागले. जो तो आपापल्या परीने तुकडे पाडून आपला देश निर्माण करू लागला. आणि तुकडे पडण्याची  प्रक्रिया सतत चालू असून युनोच्या कार्यालयाबाहेर नित्य नवा राष्ट्रध्वज वाढतच आहे. 
प्रत्येक व्यक्ती आपल्या संकल्पनेनुसार आपल्या भूभागाला राष्ट्र म्हणून संबोधेल  आणि आपला राष्ट्रवाद मांडेल. काही काळ एखाद्या व्यक्तीने मांडलेले मत काही लोकांना प्रभावित करेल आणि त्यानुसार क्रांति धडवून ते आपले राष्ट्र उभारतील. कार्ल मार्क्सच्या वादाने रशियात लेनिनने साम्यवादी राष्ट्र उभे केले आणि पुढे ते लयास गेले. त्यापूर्वी युरोपीय देशांनी भांडवलवाद मांडून संपूर्ण जग वेठीला धरले होते, परंतु ते सुद्धा नष्ट झाले. पुढे अन्य कोणी अधिक आकर्षक वाद मांडेल आणि नवीन पिढी तो उचलून धरेल. ते आपले शासन चालवतील आणि  कालांतराने अन्य कोणी ते नष्ट करेल. प्रतिदिन सूर्य उगवतो आणि मावळतो, ऋतू येतात आणि जातात हे जसे अव्याहतपणे चालूच असते त्याप्रमाणे सर्व प्रकारचे वाद चालूच असतात. त्यामुळे पंतोजी म्हणतात ते खरे आहे 'राष्ट्रवाद ही ईश्वरशासित पद्धत नव्हे.' पण त्यांचे हे  वचन अर्धसत्य आहे!
या भौतिक जगातील प्रत्येक मानवामध्ये चार प्रमुख दोष असतात, मात्र भगवंतांकडे हे चार दोष नसतात. तसेच जे बोटावर मोजता येईल असे काही विरळाच भगवद्भक्त आहेत त्यांच्याकडेही ते चार दोष नसतात. ते 
चार दोष कोणते? 
१) मनुष्य निश्चितपणे चुका करतो. 
२) मनुष्य मोहग्रस्त किंवा भ्रमात असतो. 
३) त्याची इंद्रिये निःसंशय अपूर्ण असतात. 
४) त्याच्यात इतरांना फसविण्याची वृत्ती असते. 
या चार मानवी दोषांमुळे प्रत्येक वेळी मानव निर्मित राष्ट्रवाद प्रारंभी आदर्शवत वाटतो आणि कालांतराने निकृष्ट वाटून टाकाऊ होतो. 
इस्लामी आक्रमणानंतर भारतीत अनेक राज्ये लयास गेली आणि वेगळीच
विकृत विचारसरणी रुजली आणि फोफावली. त्यांच्या नंतर आले इंग्रज; अतिशय धूर्त आणि लुच्चे! या कावेबाज गोऱ्यांनी भारत आणि अन्य अनेक देशांवर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यांच्या विरुद्ध लढव्यासाठी भारतीय लोक पहिल्यांदा  व्यापक प्रमाणात एकत्र आले आणि पहिले स्वातंत्र्यायुद्ध १८५७ मध्ये घडले. परंतु या युद्धात इंग्रज विजयी झाले. त्यानंतर इंग्रजांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण करण्याचे आणि स्वतंत्र भारत घडविण्याचे महत कार्य टिळकांनी केले. त्यांचा राष्ट्रवाद त्याकाळी लोकांना भावला आणि टिळक लोकमान्य झाले. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर गांधींचे  षंढयुग प्रारंभ झाले. प्रखर टिळकवाद मागे पडला. अनेक जहालवादी टिळकभक्त गांधी भजनाला लागले. गांधीवाद इतका प्रचंड फोफावला आणि लोक षंढवादी बनले. या षंढ गांधीवादाचा किती भयंकर परिणाम देशाला भोगावा लागणार आहे याचे 
भाकित स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वेळोवेळी व्यक्त केले. गांधी गोंधळावर प्रखर प्रहार करीत स्वातंत्र्यवीरांनी हिंदुराष्ट्रवाद मांडला. पण गांधी हत्येनंतर सावरकरवाद मागे पडला. गांधी हत्येचा पद्धतशीरपणे लाभ उठवत गांधींच्या अनुयायींनी भोंगळ गांधीवादाची लक्तरे बनवून त्याला समाजवाद, समतावाद, साम्यवाद वा भोगवाद यांची ठिगळे जोडून भारतवासीयांचे  बेसुमार शोषण केले. 
काही प्रमाणात सावरकरवाद तेजस्वी आणि देशहितकारक असूनही षंढत्वाने ग्रासलेल्या भारतीयांना वा हिंदुना पचला नाही. त्याचे साधे आकलनही झाले नाही. त्यामुळे प्रखर हिंदूराष्ट्रवाद मुठभर लोकांच्या तोंडी आणि लेखणीत अडकून पडला. 
भोंगळ गांधीवादामुळेच लोक दुःख भोगत राहिल्यामुळे त्यातूनच अन्य विखारी वाद निर्माण झाले. उदाहरण: नक्शलवाद, आतंकवाद, मावोवाद वा नास्तिकवाद, भोगवाद, चंगळवाद इत्यादी. 
आता घ संघ प्रणीत मोदी विकासवाद आणि त्याच्या आडून अन्य वाद प्रस्थापित केला जात आहे. याची  भूरळ अनेकांना पडली आहे. कधी कधी आम्ही सुद्धा मोहग्रस्त होतो. कालांतराने हा राष्ट्रवादही मागे पडणार आणि दुसराच कुठलातरी राष्ट्रवाद उगवणार. त्यावेळी तो उचलून धरणारे लोकही आस्तित्वात असणारच !
प्रत्येक काळातील राष्ट्रवादामुळे त्याकाळातील लोकांचे काही प्रमाणात मनोरंजन झाले. काहींना मानसिक आनंद मिळाला आणि काहींना इंद्रियसुख मिळाले. तर काहींना याच्या विपरीत दुःख प्राप्त झाले. 
पंतोजींचे पुढील अर्धवाक्य असे आहे - 'तर धर्मशासित पद्धत आहे.' आधी बोलले की, 'राष्ट्रवाद ही ईश्वरशासित पद्धत नव्हे' आणि पुढे म्हणतात, 'तर धर्मशासित पद्धत आहे.' काय गंमत आहे पहा; 'रामराज्य हवे पण राम नको.' श्रीरामांनी लागू केलेली ईश्वरशासित पद्धत नको; पण मानव निर्मित धर्मशासित पद्धत हवी. हा कोणता भोंगळपणा आहे? ही धर्मशासित पद्धत म्हणजे काय? किंवा कोणत्या पद्धतीला धर्मशासित पद्धती म्हणतात? यांना अभिप्रेत असलेला धर्म कोणता आणि ईश्वराला अभिप्रेत असलेला धर्म कोणता? असे अनेक प्रश्न येथे उपस्थित होतात. 
वस्तुतः ईश्वर प्रणित धर्म, वेदांचे परिपक्व फळ असलेल्या भागवत पुराणात सांगितला आहे - 'धर्मम् तु साक्षात् भगवत् प्रणितम् । अर्थात भगवंत सांगतात तो धर्म आणि बाकी सर्व अधर्म! वेद, रामायण, महाभारत, पुराणे, उपनिषदे इत्यादींमधून हा भगवद् प्रणित धर्म सुस्पष्टपणे सांगितलेला आहे.  या धर्मावर कधीही पुट चढत नाहीत. जळमटे वा किल्मिषे धरत नाहीत. तथाकथित भौतिकतावादी विद्वान म्हणतात त्याप्रमाणे हा पोथ्या पुराणातील बुरसटलेला धर्म नाही. हा धर्म सूर्य प्रकाशाप्रमाणे स्वच्छ आहे. वर्षा ऋतुत जसे काळेकुट्ट ढग एकत्र आल्यावर आपल्या नेत्रपटलांसमोरून सूर्य अदृश्य होतो. त्यावेळी आपल्याला वाटते की सूर्याला ढगांनी गिळंकृत केले आहे, सूर्य मंदावला आहे. पण असे मुळीच  नसते. हा आपला दृष्टिदोष आहे. ढगांपलिकडे सूर्य पूर्वीप्रमाणेच तेजस्वी आहे. अगदी तसेस आहे भगवत्प्रणित धर्माचे! या
भगवत्प्रणित तेजस्वी धर्मावर मानव निर्मित पुटे चढलेली आहेत. त्यामुळे तो धर्म आपल्याला तेजस्वी वाटत नाही. परंतु प्रामाणिक आणि प्रामाणित
 भगवद्भक्तांना या तेजस्वी धर्माचे ज्ञान आहे. त्यांनी वेळोवेळी झाडू मारून ही मळभटे वा घाणीची  पुटे स्वच्छ केलेली आहेत. परंतु दुर्दैवाने इंग्रजी शिक्षण घेतलेल्या तत्कालीन नेत्यांनी 'गुरु-साधू आणि शास्त्र' यांचा संग न करता आपली भौतिक बुद्धी वापरून अधिकच जळमटे निर्माण करून सावळा गोंधळ घातलेला आहे. सद्गुरूंच्या आश्रयाला न जाता, हे काळेढग वा घाण स्वच्छ न करता, आपली तथाकथित वैयक्तिक मते मांडून नवनविन राष्ट्रवाद निर्माण केला आहे. या तथाकथित विद्वानांनी, नव प्रेषितांनी वा नेत्यांनी आपला स्वयंप्रेरित धर्म मांडला आहे. त्यांना या मानव निर्मित धर्माचे धर्मशासन स्थापीत करायाचे आहे. पुनः पुन्हा त्याच त्याच गंभीर चुका करून हे महामानव प्रभू श्रीराम प्रणित भगवद शासन अर्थात रामराज्य  नाकारून मानव निर्मित अल्पायुषी धर्मशासन स्थापू इच्छित आहेत. या मानव निर्मित 'धर्मशासित पद्धती' मध्ये  इंद्रियतृप्तीला प्रचंड प्रोत्साहन असल्यामुळे बहुसंख्य हिंदू या पद्धतीला उचलून धरतात. 
कलियुग प्रारंभ झाल्यापासून भारतात अनेक लहान मोठे राजे - महाराजे होऊन गेले. त्यांनी बांधकेली मंदिरे, धरणे , सरोवरे , रचलेली ग्रंथ संपदा, साधू-संत, पंडित, कलावंत इत्यादी गुणीजनांना दिलेला राजाश्रय  यावरून कळून येते की, त्यांची राज्य आणि न्यायव्यवस्था ही ईश्वरप्रणित धर्मशासित होती. या राज  परंपरेतील  सर्वश्रेष्ठ आणि अंतिम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! शिवराय अतिशय नम्रतेने म्हणत - 'हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा! त्यांनी आपल्या कार्याचे श्रेय भगवंतांना अर्पण केले होते. आजच्या राजकारण्यां प्रमाणे केवळ तोंडाने बोलायचे  एक  आणि  कृती मात्र भलतीच करायची असे वागणे शिवरायांचे नव्हते. त्यांच्या  प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी भगवंतांचे  अधिष्ठान होते. भगवंतांचे प्रामाणिक प्रतिनिधी बनून त्यांनी आपल्या प्रजेचे  संरक्षण आणि पालन पोषण केले होते. परंतु आता तसे होणे शक्य नाही. कारण ही ईश्वरालाच बहिष्कृत केलेली  मानव निर्मित भ्रष्ट धर्मशासित पद्धती आहे. 'राम विरहीत  रामराज्य!'
 ©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 

संपर्क : 92421 76587