कृतज्ञ आणि कृतघ्न
आपल्या अवती भवती, मित्रमंडळीत, नात्यागोत्यात, ज्ञाती बांधवात आणि या संपूर्ण जगात दोन प्रकारची माणसे आढळतात, १) 'कृतज्ञ' आणि २) 'कृतघ्न'!१) 'कृतज्ञ' त्या माणसाला म्हणतात की, जो आपल्यावर उपकार करणाऱ्या व्यक्तीप्रती सदैव ऋणी असतो. आपल्यावर कृपा करणाऱ्याप्रती त्याच्या हृदयात सदैव जाणीव असते. जसे आपले माता पिता, ज्यांनी अनेक प्रकारे कष्ट घेऊन आम्हाला लहानाचे मोठे केले, शिक्षण दिले. आमच्या आजारपणात आमची काळजी घेतली. आमचे आध्यात्मिक गुरु, ज्यांनी भगवंतांविषयी दिव्य ज्ञान प्रदान करून या भौतिक जगातील त्रिविध तापांपासून आम्हाला मुक्त करून भगवद्धामाला परत जाण्याचा मार्ग दाखविला. आमच्या अडीअडचणीला आर्थिक साहाय्य करून आम्हाला व्यवसायाभिमुख केले, ते आमचे सदैव शुभचिंतक असतात, अशा सर्वांच्या प्रति सदैव नम्र असणे, त्यांच्या दयेविषयी ऋणी असणे म्हणजेच 'कृतज्ञ' असणे होय आणि या सर्वांमध्ये श्रेष्ठ आहेत भगवान श्रीकृष्ण! आम्ही भगवान श्रीकृष्णांचे अनादी काळापासून सनातन अंश असल्यामुळे त्यांनी आमच्यावर अनेक प्रकारे कृपा केलेली आहे, पण अज्ञानवश आम्हाला त्याची जाणीव नाही. तरीही भगवान श्रीकृष्ण आमच्यावर अनेक प्रकारे अहैतुकी कृपा करीत असतात. भगवद्गीतेतील दिव्य ज्ञानाच्या अध्ययनाने आम्ही ही कृपा जाणून घेऊ शकतो आणि जेव्हा आम्हाला या समस्त उपकारकर्त्यांच्या उपकाराची, अहैतुकी कृपेची जाणीव होते तेव्हा आम्ही त्यांच्या प्रती 'कृतज्ञ' होतो. आणि जे लोक याच्या विपरीत आचरण करतात त्यांना 'कृतघ्न' म्हणतात. जसे राजकारणी लोक, आपल्याला ज्याच्यामुळे मोठमोठे सन्मान मिळाले आहेत, पैसे, प्रतिष्ठा मिळाली आहे त्या वरिष्ठांप्रती द्वेष बुद्धी ठेवणे, त्यांचा घात करणे. मतदारांची फसवणूक करणे, शत्रू राष्ट्राचे तुष्टीकरण करणे इत्यादी दोषांनी युक्त असलेल्या माणसाला 'कृतघ्न' म्हणतात. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे इंग्रजांशी लढून फासावर चढले त्यांची साधी आठवणही जे लोक काढत नाहीत, अशा लोकांनाही 'कृतघ्न' म्हणतात.
ज्यांनी प्रेमाने आम्हाला दोन घास भरवून आम्हाला जगवले त्या घास भरवणाऱ्या हाताचाच चावा जे लोक घेतात त्या लोकांनाही 'कृतघ्न' म्हणतात. आम्हाला ज्यांनी आर्थिक, सामाजिक वा अन्य काही साहाय्य केले आहे, अशांचे उपकार विसरून त्यांच्यावर उलटणे, त्यांना धोका देणे, त्यांची जाणीव न ठेवणे आणि त्यांचीच निंदानालस्ती करणाऱ्या माणसाला 'कृतघ्न' म्हणतात.
कलह आणि दंभ यांनी भरलेल्या या भीषण युगात अशा 'कृतघ्न' लोकांचाच भरणा अधिक आहे. या 'कृतघ्न' लोकांना कितीही साहाय्य करा, प्रेमपूर्वक व्यवहार करा, याना आपल्या मुलीबाळी द्या, शिक्षण द्या, सवलती द्या, परंतु हे लोक सदैव 'कृतघ्न' असतात.
इंग्रजांच्या काळात दादर (मुंबई) येथील झोपडपट्टी भागात काही गरीब आणि अडाणी लोक रहात होते. घराच्या दारातच मुलांना शौचास बसवत. त्यांना स्वच्छतेची मुळीच आवड नव्हती. त्यामुळे त्यांना स्वच्छतेची आवड लागावी म्हणून महान क्रांतिकारक सेनापती बापट नित्यनेमाने तेथे जात आणि स्वतः झाडू मारून सर्व विष्ठा स्वच्छ करीत. असे अनेक दिवस चालले होते. एक दिवस ते झाडू मारत पुढे जात असताना मागून एक बाई मोठ्याने ओरडली,"अरे ए बामणा जरा थांब, माझं पोर हागायला बसलाय नंतर झाडू मारून जा." हे ऐकून सेनापती बापट आश्चर्याने थक्क झाले! ते या लोकांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून त्या झोपडपट्टीत येत होते. पण तेथील कृतघ्न लोकांना वाटत होते की हा बामण आमची घाण साफ करायला येतोय. त्या लोकांवर त्यांच्या सेवेचा कोणताच परिणाम होत नाही हे पाहून त्यांनी झाडू तेथेच टाकला आणि निघून गेले. आपण सापाला कितीही मधुर दूध पाजा, तो विष ओकणारच! त्याचप्रमाणे 'कृतघ्न' लोकांचे असते, या लोकांना कितीही रुचकर, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी भोजन वाढा, परंतु हे 'कृतघ्न' ते अन्न खातील आणि त्याच पानावर लागलीच 'मल' विसर्जन करतील! उत्तम प्रतीचे सुस्वादू अन्न पदार्थ यांच्या संपर्कात येताच त्या सुग्रास अन्नाचे दुर्गंधीयुक्त विष्ठेत रूपांतर होते. वास्तविक पाहता त्या अन्नात दोष नाही की ते अन्न अर्पण करणाऱ्या अन्नदात्यात दोष नाही. परंतु ते अन्न ज्याच्या संपर्कात येते त्याच्यामुळे त्याचे विष्ठेत रूपांतर होते. परंतु या निगरगट्ट 'कृतघ्न' माणसाने मात्र आपल्या या दूषित विकृतीला आपला नूतन अविष्कार म्हणून घोषित केले. लगेचच काही व्यक्ती स्वातंत्र्यवादी लोक पुढे सरसावले आणि भलावण करू लागले की ही त्याची नूतन कलाकृती आहे. त्यालाही व्यक्ती स्वातंत्र्य हवेच. समाजात अशा प्रकारच्या व्यक्ती असणारच! चाणक्य पंडित सांगतात,"शरीराचा एक अवयव असा असतो की, तो साबण लावून कितीही धुतला तरी तो पवित्रच असतो." असेच असते 'कृतघ्न ' माणसाचे. गोघ्ने चैव सुरापे च चौरे भग्नव्रते तथा ।निष्कृतीर्विहिता सद्भि: कृतघ्ने नास्ति निष्कृति:।।
"गोहत्या, मद्यपान करणाऱ्याला , व्रत मोडणाऱ्याला सज्जनांनी प्रायश्चित सांगितले आहे. परंतु कृतघ्नला मात्र प्रायश्चित नसते."