शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

                              सोवळे आवळे 

     पुरोगामी पुण्यात स्वयंपाकासाठी आलेल्या बाईने आपली जात लपवून सोवळे ओवळे मोडले म्हणून डॉ. मेधा खोले यांनी या प्रकरणी  तक्रार  दाखल केली आणि सर्वत्र चर्चा, आरोप अन् प्रत्यारोप यांचा धुरळा उडू लागला. 
     डॉ. मेधा खोले यांनी २०१६ मध्ये आपल्या आई वडिलांच्या श्राद्धसाठी आणि त्यानंतर गणपती-गौरीच्या सोवळ्यातील स्वयंपाकासाठी एका सुवासिनी ब्राह्मण बाईची नेमणूक केली. त्या बाईनी आपले नाव सौ. निर्मला कुलकर्णी असे सांगितले आणि तिच्या जातीची फडताळणी  करण्यासाठी डॉ. मेधा खोले यांनी त्या बाईच्या धायरी येथील घराला भेटही दिली. पुढे दोन वर्षांनंतर जोशी भटजींनी त्या बाई ब्राह्मण नसल्याचे डॉ. मेधा खोले यांना सांगितले. हे ऐकून डॉ. मेधा खोले यांना आपली फसवणूक झाली असे वाटून त्यांनी त्या बाईविरुद्ध पोलिसात तक्रार केली आणि त्या सुवासिनी नसलेल्या निर्मला यादव यांनी डॉ. मेधा खोले यांच्या विरुद्ध तक्रार केली. 
     आता या प्रकरणावर जो तो आपापली तिखट, आंबट वा कडवट प्रतिक्रिया देऊन आपापला द्वेष  आणि अज्ञान प्रकट करीत आहे. या विषयावर आमचे चिंतन पुढील प्रकारे आहे. 
     डॉ. मेधा खोले या भौतिक शिक्षणात अतिशय प्रगत असून हवामान खात्याच्या उच्च पदावर शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. परंतू माता पित्याच्या मृत्यूच्या धक्क्यानंतर त्या स्वतःला सावरू शकल्या नाहीत आणि कामावर जाणे सोडले. 
     भारत स्वतंत्र झाल्यापासून ब्राह्मणांनी भौतिक शिक्षणात विलक्षण प्रगती करून प्रचंड पैसा मिळविण्यास प्रारंभ केला आहे. त्यांना पैशाच्या जोरावर सर्वप्रकारच्या शारीरिक सुखसुविधा मिळत असल्या तरी आत्मज्ञानाच्या अभावामुळे दुःखसुद्धा प्रचंड मिळत आहे. आध्यात्मिक ज्ञानाची किंचितही जोपासना न केल्यामुळे ब्राह्मण स्वतःवर कोसळणाऱ्या दुःखापासून स्वतःला सावरू शकत नाहीत. दिव्य आध्यात्मिक ज्ञानाच्या अभावामुळे त्यांच्या अंतःकरणात क्षुद्र दुबळेपणा त्वरित प्रकट होतो आणि या दुबळेपणापासून मुक्त होण्यासाठी डॉ. खोलेंनी सर्व सामान्य मानुषांप्रमाणे कर्मकांडी जोशी नामक ब्राह्मणाचा आश्रय  घेतला. या ब्राह्मणाच्या सल्ल्यानेच डॉ. खोलेंनी निर्मला यांना सोवळ्यातील स्वयंपाक करण्यास नेमले. 
     निर्मला बाईंनी केलेल्या तक्रारीनुसार कळून येते की, जोशीनीच त्यांची जात मराठा असल्याचे डॉ. खोलेंना सांगितले आणि सर्व चर्चा चवाट्यावर आली. दोन वर्षांनंतर जोशीने असे का सांगितले? कारण स्पष्ट आहे; जोशीला बाईकडून कमिशन मिळाले नाही. 
     डॉ. खोलें जर बुद्धिमान आहेत तर त्यांना निर्मला यादव यांच्या घरी गेल्यावर त्यांचे घर, बोलणे, वागणे वा गोत्र यावरून त्या कुळकर्णी आहेत की नाही हे कळायला हवे होते. पण त्यांना ते कळले नाही; उलट त्यांची खात्री झाली की त्या सव्वशीणा आहेत. परंतु जोशीने चहाडी केल्यावर त्यांना कळले की आपण नेमलेली बाई सव्वशीण नाही अन् ब्राह्मणही नाही, तेव्हा त्यांनी आधी जोशींविरुद्ध तक्रार करावयास हवी होती. पण असे न करता एका निःसहाय अन् निर्धन स्त्रीला छळले. 
     मागील दोन वर्षांपासून आई वडिलांच्या मृत्यूमुळे डॉ. खोलेंना जो मानसिक धक्का बसला आहे त्या धक्क्यातून त्या सावरल्या नाहीत. हे कसे काय शक्य आहे? बरे मानसिक धक्का बसलेले लोक देवाला दोष देतात आणि कोणतेही कर्मकांड करत नाहीत. असे असूनही त्यानी पोलिस ठाण्यात रितसर आणि पूर्ण विचारांती तक्रार केली आहे; हे त्यांच्या लेखी तक्रारी वरून कळून येते. याचाच अर्थ हा की त्यांना विशेष धक्का बसलेला नाही. 
     हल्ली ९५% सुशीक्षित ब्राह्मण सुतकातही हास्यविनोद करत असतात आणि मग पुण्यासारख्या पुढारलेल्या नगरातील या दोघी उच्च शिक्षित भगिनी कशा काय सावरल्या नाहीत? पूर्वी म.टा. वृत्तपत्रात डॉ. खोलेंवर प्रसिद्ध झालेल्या एका अप्रतिम लेखावरून त्यांच्या बुद्धीमत्तेची  अन् कार्यक्षमतेची उंची कळून येते. असे असूनही त्या मानसिक धक्क्यातून सावरल्या नाहीत हे कसे काय?
     अशोचन्प्रतिकुर्वीत यदि पश्येत्पराक्रमम् ।
     भैषज्यमेतद्दुःखस्य यदेतन्नानुचिन्तयेत् ।।                            
      पराक्रम करता येईल असे वाटले तर शोक सोडून प्रतिकार करावा. दुःखाचे सतत चिंतन करीत न बसणे हीच गोष्ट त्या दुःखावर औषध असते. - महाभारत, स्त्रीपर्व २.२७ 
     वास्तुत: डॉ. खोलेंनी आपले दुःख विसरण्यासाठी स्वतःला आपल्या देशहितार्थ असलेल्या कार्यात झोकून द्यावयास हवे होते. पण असे न करता त्यांनी एका अल्पबुद्धीच्या ब्राह्मणाचा आश्रय घेतला आणि स्वतः वरील दुःखाचा भार अधिकच वाढविला. 
     पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात - 
     कामैस्तैस्तैऱहृतज्ञानाः  प्रपद्यन्ते अन्यदेवताः ।
     तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ।।
     ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे, ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपापल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. - भगवद् गीता ७.२०                            
     ज्या लोकांना मनुष्य जन्माचे उच्च ध्येय काय आहे आणि त्याची प्राप्ती कशी करावी याचे ज्ञान नसते तथा जे तुच्छ अशा आकांक्षानी प्रेरित झालेले असतात तेच लोक देवतांची उपासना अर्थात कर्मकांड करतात आणि त्यासाठी आवश्यक असलेले सोवळे-ओवळे अर्थात आपापल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. डॉ. खोलेंना सुद्धा आपल्या स्वभावानुसार गौरी-गणपती आणि श्राद्धाच्या विधिविधानांचे पालन करण्यासाठी सव्वाशीण बाईने बनलेला स्वयंपाक हवा होता. पण पुण्यासारख्या महानगरात ३% शिल्लक असलेल्या ब्राह्मण समाजातून अशी बाई मिळणे कठीण असल्यामुळे जोशी भटाने अन्य स्त्री उभी केली आणि तिलाही खोटे आचरण करण्यास लावले. अजूनही सर्वसामान्य गरीब स्त्रिया ब्राह्मणावर विश्वास ठेऊन खोटे बोलून काम करण्यास धजावतात. अर्थात असे करण्यास ब्राह्मणच उत्तरदायी असतो. वस्तुतः अशा सव्वाशीण मिळणे कठीण असल्यामुळे सुज्ञ ब्राह्मणांनी स्वतः पुढाकार घेऊन अन्य समाजातून योग्य आणि गुणवान स्त्रियांना ब्राह्मणी संस्काराने प्रशिक्षित केले पाहिजे कारण ब्राह्मण हा समाजाचा मार्गदर्शक असल्यामुळे समाजहितार्थ जे जे आवश्यक आहे ते ते त्याने केले पाहिजे. परंतु असे होत नाही. कलह आणि दंभ यांनी भरलेल्या या भीषण कलियुगात ब्राह्मणांचेच पतन सर्वात आधी झाले आहे त्यामुळे संपूर्ण समाज पतित झाला आहे मग इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे? 
     वस्तुतः विविध कर्मकांडे करणे हे काही बुद्धिमंताचेलक्षण नव्हे. 
      पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांगतात - 
     अन्यवत्तु फलं तेषां तद् भवत्यल्पमेधसाम् ।
     अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित आणि अनित्य असतात - भगवद् गीता ७.२३   
                   
     आता काही तर्कवादी लोक मोठ्या आवेशात सोवळ्याचा तिरस्कार करताना दिसतात. अर्थात यासाठीही ब्राह्मणच उत्तरदायी आहेत. ते कसे काय? कारण ब्राह्मणांनाच सोवळ्याचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे तथाकथीत विज्ञाननिष्ठ, बुद्धिजिवी वा पुरोगामी सोवळ्यावर सडकून टिका करतात. सोवळे वा स्वच्छता काय असते हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला थोडे इतिहासाचे ज्ञान घेणे सुद्धा आवश्यक आहे. 
     शेकडो वर्षांपासून इस्लामी आक्रमणाखाली भरडला जाणारा हिंदू समाज या इस्लामी आक्रमणाचा प्रतिकार करण्यात गुंतून पडला होता. त्याला संघटित आणि व्यवस्थित होण्यासाठी काही कालावधी मिळत असतानाच इंग्रज आणि पोर्तुगीज इत्यादी गोऱ्यांची आक्रमणे यशस्वी होऊ लागली आणि त्यांच्या  धूर्त आणि असुरी संस्कृती (विकृती)चे हिंदुंवर आक्रमण झाले. त्यांच्या वेगळ्या युरोपीय संस्कृतीचे मायाजाल आम्ही जाणू शकलो नाही. हिंदू वचनाचे पक्के आणि इंग्रजादी गोरे संधी मिळताच वचनभंग करून विश्वासघात करणारे. हिंदू शरणार्थींना आश्रय प्रदान करणारे आणि गोरे शरणार्थी म्हणून आले आणि आश्रय देणाऱ्यांचीच हत्या करणारे. हिंदू प्रामाणिक व्यापारी तर इंग्रज व्यापाऱ्यांच्या रूपातील ठग आणि लुटारू. हिंदू युद्धात पकडलेल्या शत्रूंचाही सन्मान करणारे तर इंग्रज शत्रूंच्या मस्तकांना कापून फुटबाँल प्रमाणे लाथाडणारे! हिंदू वनातील हिंस्त्र पशूंची मृगया करणारे, तर इंग्रज मनोरंजनासाठी निःशस्त्र गुलामांची शिकार करणारे. हिंदू मानवतेच्या सद्गुणांची पराकाष्ठा  प्रदर्शित करणारे आणि गोरी चामडी असलेले हे लोक क्रूर असुर, इतका भयंकर पतित समाज हिंदुंच्या कल्पनेपलीकडचा होता. 
     भारतीय अर्थव्यवस्था कोसळल्यामुळे संपूर्ण सामाजिक व्यवस्था कोसळून समाज नष्टभ्रष्ट झाला. कुटिल कारस्थानी इंग्रजांनी खोटीनाटी, कपटकारस्थाने रचून, नवनवीन चाली खेळून समाजात एकमेकांविरुद्ध ईर्षा, संशय, द्वेष आणि भ्रम निर्माण करून समाजाला नष्ट केले. 
      इंग्रज ज्याप्रमाणे काळ्या लोकांना अस्पृश्य मानत होते, त्याप्रमाणे भारतात कोण्या जातीला  अस्पृश्य मानण्याची प्रथा नव्हती. भारतात अपराधी मनुष्याला दंडित करण्यासाठी समाजातून बहिष्कृत केले जात असे. जोपर्यंत तो आपला दंड भोगत नाही, तोपर्यंत तो अस्पृश्य राहत असे. 
      विशेष पूजा-अनुष्ठानांच्या वेळी सोवळ्याचे पालन पवित्रतेच्या दृष्टीने होत असे, ते सध्याच्या वैज्ञानिकांच्या hygiene (स्वच्छता) पेक्षा अधिक शास्त्रीय होते. 
     ज्या इंग्रजांना ' उष्टे ' हा शब्दच माहीत नव्हता, शौचानंतर डावा हात स्वच्छ धुतला पाहिजे हे ज्ञात नव्हते, महिनोंमहिने स्नान करणे माहित नव्हते, वस्त्र बदलणे माहित नव्हते, त्यांना भोजनातील उष्टे-खरकटे यांचे पालन करण्यात काय विज्ञान आहे हे कसे काय कळणार? त्यांनी पद्धतशीरपणे शुद्र जातींना अस्पृश्य बनविले आणि सर्व दोषारोपण ब्राह्मणांवर केले. 
     इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतातील प्रत्येक मनुष्य शिक्षित होता. ज्या गावची लोकसंख्या चारशे आहे तेथे एक पाठशाळा होती. अशा पाठशाळांतून पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक विध्यार्थी आणि शिक्षक शूद्र होते. मुलींना घरातूनच शिक्षण घेण्याची व्यवस्था होती.  
     अशा सुंदर भारताला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी सर्वप्रथम येथील गुरुकूल शिक्षण पद्धत नष्ट केली. पंधरा वर्षे काहीही करू दिले नाही आणि त्यानंतर आपले मॅकॅलोप्रणीत इंग्रजी शिक्षण चालू केले. आपल्या शासन व्यवस्थेसाठी कारकुनांची आवश्यकता असल्यामुळे इंग्रजांनी मोठ्या नगरातून ABCD शिकवणाऱ्या शाळा काढून तेथील ब्राह्मणांना शिकवून थोडा पैसा देऊन त्यांना इतरेजनांपासून तुम्ही वेगळे आहात असे शिकवून समाजात भेद पाडला. 
     १९४७ नंतर ब्राह्मणांच्या घरातील आजी आजोबा देवघरात पूजा करत असताना इंग्रजी शिकलेला नातू बेधडक जोडे घालून आत शिरत असे आणि असे करू नकोस असे म्हणताच मोठ्या आढ्यतेने उलट उत्तर देत असे की, तुमचा धर्म वेगळा आहे आणि माझा वेगळा आहे. हळूहळू समाजवादी, पुरोगामी, अंनिस, बामसेफी वा ब्रिगेडी कुविचारांचा पगडा वाढू लागला. तथाकथीत भौतिक शिक्षणाने अंध झालेले पतित ब्राहमण मांस, मद्य, जुगार आणि व्यभिचार यात इतके गुरफटून गेले की, त्यांना हीच हिंदू धर्माची प्रगती वाटू लागली आहे. जे कार्य इस्लामी वा पाश्चिमात्य किरिस्तावांना करता आले नाही ते धर्मद्रोही हिंदू मोठ्या आनंदाने करीत आहेत.                                                                           
      सांगण्याचे तात्पर्य हेच की कर्मकांड असो वा भगवद्भक्ती, वेद असो वा पुराण, सोवळे अर्थात शुचिर्भूतता (स्वच्छता) ही पूर्णपणे वैज्ञानिक असून मानवाच्या भौतिक आणि आध्यात्मिक लाभासाठीच आहे. परंतु कलियुगाच्या प्रभावामुळे याचे शास्त्रोक्त ज्ञान नसल्यामुळे पोटभरू द्विजबंधू   समाजाला भ्रमित करतात आणि दुष्ट, पाखंडी, देशद्रोही लोक वेदशास्त्रांचा नाश करण्यासाठी मोठ्या त्वेषाने मर्माघात करतात. 
     बरे आपल्याला सोवळे आणि कर्मकांड हाच आपला धर्म वाटत असेल तर मग तो तरी काटेकोरपणे पाळावा. त्यात धूर्त वकीला प्रमाणे चोरवाटा शोधत बसू नये. 
     धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ।।
     धर्माचा घात केल्यास धर्म आपला घात करतो. आपण धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले रक्षण करतो.  - महाभारत, वनपर्व ३१३.१२८
     डॉ. खोले या जर स्वतःला ब्राह्मण मानून सोवळ्याची अपेक्षा करत असतील तर त्यांनी सर्वात आधी सरकारी नोकरी सोडली पाहिजे कारण नोकरी करणे हे तर शुद्राचे काम आहे; ब्राह्मणाचे काम नाही आणि नोकरी करायचीच असेल तर ब्राह्मणी कर्मकांड आणि सोवळे यांचा त्याग करावा. तसेच एका प्रामाणिक ब्राह्मणाने झाल्या घटने विषयी दुसऱ्याला दोष न देता उदार मनाने क्षमा करण्यास तत्पर असले पाहिजे. 
     भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत (१८.४२) ब्राह्मणी गुणांचे वर्णन केले आहे - 
     शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेवच ।
     ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ।।
   शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात. 
      यातील एकही गुण आचरणात आणता येत नसेल तर मग ती व्यक्ती कशी काय ब्राह्मण असेल? अशा गुणहीन ब्राह्मणाच्या सोवळ्यातील पूजनाने देवीदेवता कधी तरी प्रसन्न होतील काय?
     भगवान श्रीकृष्णांचे साहित्यिक अवतार श्री वेदव्यास आपला पुत्र शुकदेव गोस्वामींना सांगतात - 
     ब्राह्मण्यं बहुभिरवाप्यते तपोभिस् 
     तल्लब्ध्वा न रतिपरेण होलितव्यम् ।
     स्वाध्याये तपसि दमे च नित्ययुक्तः 
     क्षेमार्थी कुशलपरः सदा यतस्व ।।
    अनेक प्रकारे तप करावे तेव्हा ब्राह्मणत्व मिळते. ते लाभल्यावर उपभोगाच्या मागे लागून ते ब्राह्मणत्व वाया घालवू नये. ज्याला स्वतःचे कल्याण साधण्याची इच्छा असेल, त्याने वेदाभ्यास, तप आणि इंद्रियसंयम यांमध्ये दक्ष राहावे आणि सत्कर्म करण्यासाठी झटून प्रयत्न करावा. - महाभारत १२.३२१.२४
     निर्मला यादव यांनी त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे असत्य बोलून फसवणूक केली असेलही; त्यांना  त्यांच्या कर्माचे फळ भोगावे लागेल. परंतु डॉ. खोलेंचे काय? त्यांच्या या वागण्यामुळे  वृत्तपत्रे. टी.व्ही., पुरोगामी, बामसेफी, ब्रिगेडी वा अंनिसवाल्यांना ब्राह्मणांविरुद्ध आणि पर्यायाने हिंदू धर्माविरुद्ध गरळ ओकण्यास चांगलीच संधी मिळाली आहे. आपल्यात ब्राह्मणी गुणांचा अभाव असताना इतरांना दोष का द्यावा? 
     अतिक्रान्तं हि यात्कार्यं पश्चाच्चिन्तयते नरः ।
     तच्चास्य न भवेत्कार्यं चिन्तया च विनश्यति ।।
     एखादी घटना घडून गेल्यानंतर त्याविषयी मागाहून जो काळजी करत बसतो, त्याचे ते कार्य तर होत नाहीच, पण काळजीमुळे त्याचा नाश होतो.                                                                   - महाभारत, कर्णपर्व ३१.२९ 
      या सर्व प्रकरणात अनेक लोक आपापल्या बौद्धिक क्षमतेनुसार तर्क प्रस्तुत करीत आहेत. प्रत्येकजण आपापल्या मनोधर्माला पुढे रेटत आहे. मी सांगतो तेच कसे खरे आहे, मीच धर्माचा कसा जाणकार आहे इत्यादी. परंतु आम्ही हे ध्यानातच घेत नाही की, जेव्हा यमदूत आमच्या समक्ष प्रकट होतील तेव्हा त्यांना आमचे तर्क, आमचे बौद्धिक चातुर्य, आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आम्हाला वाटणारा तथाकथीत धर्म हे सर्व कुचकामी ठरणार आहे. कारण या भौतिक ब्रह्मांण्डात यमदूत कोणाचेही काहीही ऐकत नाहीत. ते केवळ आपले स्वामी यमराजांचेच ऐकतात आणि यमराजांचा यमदूतांना स्पष्ट आदेश आहे, धर्मंतु साक्षात् भगवद्प्रणितम्।अर्थात धर्म साक्षात भगवान श्रीकृष्णनांनी सांगितलेला आहे. भगवद् प्रणित धर्माव्यतिरिक्त अन्य सर्व कैतव धर्म आहेत. 
     आज सर्व लोक आपापल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आपल्याला आवडेल अशा धर्माचा उदोउदो करण्यात व्यस्त आहेत. परंतु यमदूतांवर याचा यत्किंचितही परिणाम होत नाही. ते आम्हाला बलपूर्वक पकडून यमपुरीला नेतात आणि यमराजांच्या आज्ञेनुसार दंडित करतात. 
     आज जो तो आपल्या सामर्थ्यानुसार  धर्माची चळवळ पुढे रेटत आहे. परंतु त्यांच्या या चळवळीत भगवंतांचे अधिष्ठाना मुळीच नाही. तर्कावर आधारीत असलेले त्यांचे धर्मज्ञान काही काळसाठी त्यांना समाधान मिळवून देत असेलही; पण शाश्वत सुख खचितच नाही. आपल्या मानसिक, बौद्धिक, शारीरिक धर्मांपेक्षा एक असा परमश्रेष्ठ धर्म आहे की, जो आम्हाला नित्य संतुष्ट ठेवेल.
     स वै पुंसां परौ धर्मो यतो भक्तिरधोक्षजे।
     अहैतुक्यप्रतिहता ययात्मा सुप्रसीदति ।।
     अखिल मानव जातीचा परम धर्म तो होय, ज्यामुळे मनुष्याला परम दिव्य अशा अधोक्षज भगवंतांची प्रेममय भक्ती प्राप्त होते. अशी भक्ती अहैतुकी आणि अखंड स्वरूपाची असावी म्हणजे अशा  भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रेसन्न होतो. - श्रीमद् भागवत १.२.६