बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

                                         कृष्णप्रेम 

कृष्णभावनामृताचा प्रचार करते वेळी, सर्वसामान्य लोकांच्या लाभासाठी भक्त त्यांना कृष्णप्रसाद देतात. त्यावेळी लोक अनेक चित्रविचित्र प्रश्न विचारतात हा प्रसाद इतका स्वादिष्ट का ? इतका अद्भुत का ?श्रीकृष्ण इतका चांगला नैवेद्य स्वीकारीत असतील तर मग तो अर्पण करण्यास आम्हाला परवडेल का ? हे सर्व करणे अत्यंत खर्चिक आहे. आम्हाला जमणार कसे ? परंतु हे सर्व अज्ञान आहे. 


पूर्ण पुरुषोत्तम भगवान स्वतःच 'आत्माराम' आहेत. ते पूर्ण आहेत. त्यांना कोणत्याही ऐश्वर्याची वा पदार्थाची मुळीच आवश्यकता नाही. ते अत्यंत कृपाळू आहेत. आम्ही त्यांच्यावर प्रेम करावे यास्तव ते त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला प्रदान करतात. ते सांगतात जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तिने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो."

अर्थात या जगातील गरीबातील गरीब मनुष्य भगवान श्रीकृष्णांना एखादी लहानशी वस्तु प्रेमाने अर्पण करून कृष्णप्रेम प्राप्त करू शकतो. त्यांने अर्पण केलेल्या पदार्थाचा श्रीकृष्ण आनंदाने स्वीकार करतात तथा त्या मनुष्याचा या दुःखमय जगातून उद्धार करतात. परंतु त्यासाठी मनुष्याला श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असणे आवश्यक आहे. 

प्रेमाने आणि भक्तीने अर्पण केलेल्या पदार्थांचा श्रीकृष्ण आनंदने स्वीकार करतात, त्यामुळे त्यांचा प्रसाद स्वादिष्ट आणि अद्भुत लागतो. कारण त्यांच्या स्पर्शामुळे प्रसाद दिव्य बनतो. तसेच श्रीकृष्णांनी आम्हाला जेवढी शक्ती दिली आहे त्यानुसार आपण त्यांची सेवा केली पाहिजे. श्रीकृष्णांच्या लिलातून आपण कीतीतरी उदाहरणे पाहू शकतो. पांडव आणि द्रौपदी वनवासात असते वेळी, त्यांना पीडा देण्यासाठी दुर्योधन दुर्वासा मुनींना वनात पाठवितो. त्यावेळी अत्यंत संकटकालीन स्थितीत द्रौपदी श्रीकृष्णांना पुकारते तथा त्यांना ती केवळ एक कण अन्न देऊ शकते.  पुढे श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि दुर्वास मुनींचे संकट टळते. पुढे श्रीकृष्ण पांडवांचे दूत बनून हस्तीनापूरला जातात. त्यावेळी दुर्योधन त्यांना सोन्याच्या ताटातून ऐश्वर्यशाली राजभोग अर्पण करू इच्छितो. परंतु श्रीकृष्ण प्रसन्न होत नाहीत. ते त्याचा स्वीकार करीत नाहीत. ते महात्मा विदुरांच्या घरी जातात आणि त्यांच्या पत्नीने प्रेमाने अर्पण केलेली केळीची सालेही खातात.


श्रीकृष्ण आपल्या बाल मित्राने, सुदाम्याने कळकट पंचातून बांधून आणलेले पोहे त्याच्याकडून जबरदस्तीने काढून घेतात आणि मोठ्या आनंदाने ग्रहण करतात. श्रील प्रभुपाद सांगतात की श्रीकृष्णांना प्रेममयी सेवे व्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा नसते. श्रीकृष्ण एखाद्या फुलाचाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात. ते अभक्तांकडून कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करीत नाहीत. ते स्वावलंबी असल्यामुळे त्यांना कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा नसते. तरीही ते भक्ताकडून प्रेमभावाचे आदानप्रदान करण्याकरिता ते भक्ताच्या भेटीचा स्वीकार करतात. इतर कोणत्याही साधनाने उदाहरणार्थ ब्राह्मण, विद्वान, पंडित, गर्भश्रीमंत किंवा महान तत्तवज्ञानी झाल्याने आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही. 

भगवान श्रीकृष्ण सांगतात, "मी कोणाचाही द्वेष करीत नाही. तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत. परंतु जो कोणी भक्तीभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे. माझ्याठायी स्थित आहे आणि मीसुद्धा त्याचा मित्र आहे." 
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : 92421 76587

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा