सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

               प्रजाभक्षक आणि लिंग लंपट 

दस्यूत्कृष्टा जनपदा वेदाः पाषण्डदूषिताः।
राजानश्च प्रजाभक्षा: शिश्नोदरपरा द्विजाः ।।
'महानगरे चोरांनी भरलेली असतील, वेद नास्तिकांनी केलेल्या व्याख्येद्वारे दूषित केले जातील. राज्यकर्ते प्रजेचे भक्षण करतील आणि तथाकथित बुद्धिजीवी वा ब्राह्मण आपले उदर आणि जननेंद्रियाचे भक्त होतील.' (भागवत १२. ३. ३२)


दस्यूत्कृष्टा जनपदा - 
जगातील मोठमोठ्या नगरांतून, दादा, भाई, गुंड आणि तस्करांचे राज्य चालते. सामान्य माणसांचा गळा आणि खिसा कधी कापला जाईल याची शाश्वती नसते. मंगळसूत्र-साखळी चोरणारे, खिसेकापू, भुरटे चोर, मादक पदार्थ विकणारे, अनेक प्रकारच्या चोऱ्या करणारे बदमाश महानगरातून भरलेले आहेत. मुंबईसारख्या महानगरांतील चोरांकडून लक्षावधी रुपयांची मालमत्ता पोलिसांनी पकडली आहे. पुण्याचा एक कुप्रसिद्ध चोर विमानाने आणि अलिशान गाड्यातून फिरत असे केवळ चोऱ्यांसाठी. मोठमोठे बिल्डर्स, शेअर दलाल हे सर्व याच कुळातील आहेत. व्यापारी लोकही यातीलच आहेत. गोमांस, तंबाखू, दारू, शीतपेये वा अन्य झटपट खाद्यपदार्थ विक्री करणारे व्यापारीही महानगरांतून मोठ्या प्रमाणावर आहेत. हे सफेद कपड्यातील चोर हानिकारक वस्तू लोकांनी खरेदी कराव्यात म्हणून चांगलेच गोड बोलून माल खपवतात. आधुनिक कार्पोरेट जगामधील धनदांडगे आपला माल खपविण्यासाठी विविध माध्यमांतून जाहिराती करून निःसंकोचपणे लूटमार करतात. यातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मायाजाल तर भयंकर आहे. पूर्वी मोंगलादी लुटारू घोड्यांवर बसून येत. तर इंग्रजादी पाश्चिमात्य नौकेतून येत आणि येथे मुंबई-कोलकाता सारखी महानगरे वसवून लूटमार करत. आता मात्र ते आपल्याच देशात बसून संगणकाद्वारे लूटमार करतात. 

वेदाः पाषण्डदूषिताः -- 
नास्तिक लोक आपल्या मनमानी ढंगाने वेद भ्रष्ट करीत आहेत. यांच्या विषयी महाभारतात (१. १. २३८) सांगितले आहे - 
इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृम्हयेत् ।
बिभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रहरिष्यति ।।
'रामायण-महाभारत अशा इतिहास आणि पुराणांचा अभ्यास करून वेदांचा अभ्यास पूर्ण केला जातो. कारण अर्धवट वेद शिकलेल्या माणसाची वेदांना अशी भीती वाटते की हा माणूस माझ्या अर्थाचा अनर्थ करून माझ्यावर जणू प्रहारच करील.'


भागवतात सांगितल्याप्रमाणेच वेदशास्त्रांची मोडतोड करण्यात  देशी-विदेशी तथाकथित विचारवंत अग्रेसर आहेत. मिशनरी लोक योगाला- क्रिस्टोगा करतात, तर आयुर्वेदाला अन्य साज चढवून त्याची विक्री येथेच करतात. विदेशातील विश्वविद्यालयातून हिंदुत्वाची शिकवण शिकवली जाते. त्यातून भारतीय धर्मात अनेक ईश्वरवाद सांगितला असून त्याचा उद्देश निर्विशेष मोक्ष आहे. परंतु याच्या विपरीत अमर्याद प्रमाणे मिळतात. वस्तुतः संपूर्ण वेद वाड्मय एक आहे. जसे भगवद् गीतेत (१५.१५) स्वयं भगवान श्रीकृष्ण सांगतात  - 
वेदेश्च सर्वैरहमेववेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्
'सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.'
सर्व वेद वाड्मयाचा उद्देश परमपुरुष परब्रह्म विष्णू वा कृष्ण यांच्या विषयी आम्हाला प्रबुद्ध करणे हा आहे. यद्यपि ईश्वर अनेक नावांनी संबोधला जातो आणि अनेक रूपांत प्रकट होतो, तरीही तो एकच आहे. परंतु कलियुगात हे खरे वैदिक ज्ञान गुप्त आहे. 
श्रीपाद आद्य शंकराचार्य सांगतात -
एकं शस्त्रं देवकी पुत्र गीतम् 
एको देवो देवकीपुत्र एव ।
एको मन्त्रस्तस्य नामानि यानि 
कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ।।
'केवळ एकच शास्त्र. ते म्हणजे भगवद्गीता. केवळ एकच देव तो म्हणजे देवकीपुत्र (श्रीकृष्ण). एकच मंत्र, तो म्हणजे त्यांचे नाम आणि एकच कर्म म्हणजे त्यांची भक्तिमय सेवा.'

राजानश्च प्रजाभक्षा: - 
राज्यकर्ते प्रजेचे भक्षण करतील. 
कलियुगाच्या प्रारंभानंतर जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे दिसून येतात की राज्यकर्त्यांनी  प्रजेचे  भक्षण कसे केले आहे. काही उदाहरणे पाहूया. हिटलरने ६० लक्ष ज्यूंचे हत्याकांड केले. तर स्टॅलीनने पोलंडच्या डँझिंग बंदराच्या पट्ट्यात दोन कोटी लोकांना ठार मारले. चीनने तिबेट गिळंकृत करून तेथे नरसंहार केला. त्याआधी जपानने चीनवर रासायनीक पदार्थ टाकून नरसंहार केला. पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान निर्मितीसाठी जीनने 'प्रत्यक्ष कृती' चा आदेश देताच लक्षावधी हिंदूंचे शिरकाण केले गेले. भारतात आजही सत्ताधीश विरोधकांचे म्हणजेच आपल्याच प्रजेचे विविध प्रकारे भक्षण करतात. ही केवळ त्रोटक माहिती आहे. गेल्या तीनशे वर्षांत युरोपातून अमेरिकेत गेलेल्या विविध देशांनी मूळ अमेरिकन 'रेड इंडियन्स आणि इंडियन्स' यांचा संहार केला. तो जवळजवळ चार कोटींपेक्षा अधिक आहे. 

शिश्नोदरपरा द्विजाः -
तथाकथित पुरोहित वा विचारवंत आपले पोट आणि जननेंद्रियाचे भक्त होतील. 
कुठल्याही धर्मात पहा त्यांचे धर्मगुरु, पाद्री, मुल्ला-मौलवी, भिक्षुक वा पुरोहित हे सर्वजण केवळ पोट भरण्यासाठीच धडपडत असतात. दिवस पोट भरण्यात आणि रात्र जननेंद्रियाच्या तृप्तीत जाते. तसेच तथाकथित विचारवंत, बुद्धिमान लेखक, प्राध्यापक वा शिक्षकही याच कार्यांत मग्न असतात. 
श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात - 
जिह्वार लालसे येइ इति-उति धाय ।
शिश्नोदरपरायण कृष्ण नाहि पाय ।।                                           
'जो मनुष्य आपल्या जिभेचा दास आहे आणि त्यासाठी इकडे तिकडे भटकतो आणि आपले शिश्न आणि पोट भरण्यात मग्न आहे, तो श्रीकृष्णांना प्राप्त करू शकत नाही.' 
 ज्याला ईश्वर साक्षात्काराची अभिलाषा आहे, त्याने या दोन गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे.                     
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा