शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

                     2. उत्तम गुणांचाऱ्हास 

ततश्चानुदिनं धर्म: सत्यं शौचं क्षमा दया ।
कालेन बलिना राजन्नड्क्ष्यत्यायुर्बलं स्मृति: ।। 
'हे राजन, कलियुगाच्या प्रबळ प्रभावामुळे धर्म, सत्य, पावित्र्य, क्षमा, दया, आयू, शारीरिक बळ आणि स्मरणशक्ती दिवसेंदिवस घटत जाईल' (भागवत पुराण १२.२.१)
कलियुगात भौतिक प्रगती अतिशय वेगाने होत आहे. परंतु माणसातील चांगल्या गुणांची अधोगतीही चौपट वेगाने होत आहे. अशुद्ध गुणांची वा दुर्गुणांची वाढ झपाट्याने होत आहे. वैदिक आचार संहितेला तिरस्कृत करून तथाथित विज्ञाननिष्ठ, भोगी, चंगळवादी आणि नास्तिक धर्मांचे प्राबल्य वाढत आहे. 

या आश्चर्यकारक गोष्टींचे वर्णन पाच सहस्र  वर्षींपूर्वी  रचलेल्या अमल पुराण भागवताच्या बाराव्या स्कंधाच्या दुसऱ्या अध्यायात केलेले आहे. अर्जुन पौत्र-अभिमन्यू पुत्र आणि या विश्वातील अंतिम सम्राट महाराज परीक्षित यांना सांगताना श्री शुकदेव गोस्वामी वरील श्लोकात म्हणाले होते. 
तथाकथित इंग्रजी आणि पाश्चात्त्य भौतिक प्रगतीमुळे युरोप, अमेरिकादी देशातून धर्माधिकारी लोक ईश्वरी नियमांना किंवा स्वयं ईश्वराला लोकांच्या समक्ष वैज्ञाननिक पद्धतीने प्रस्तुत करण्यास असमर्थ होत आहेत. त्यामुळे पाश्चात्त्य बौद्धिक इतिहासात धर्मशास्त्र आणि विज्ञान यांच्यात एक कठोर द्वंद्व उभे ठाकले आहे. या झगड्याला मूठमाती देण्यासाठी काही धर्माचार्य आपल्या सिद्धान्ताचे पुनः संशोधन करण्यासाठी उतावळे झाले आहेत. त्यासाठी ते वैज्ञानिक सिद्धान्तानुसार आणि त्या छद्म वैज्ञानिकांच्या धारणेनुसार त्यांना अनुरूप असेल असा धर्म प्रस्थापित करू इच्छितात. वस्तूत तो धर्म सिद्ध न झाल्याने सुद्धा विज्ञानाच्या क्षेत्रात कपटाने घुसडवत आहेत आणि याच्या अगदी विपरीत दुसरीकडे असे उन्मादी धर्माचार्य आहेत त्यांना वैज्ञानिक विधी अजिबात मान्य नाही. ते आपला जुनापुराणा सांप्रदायिक धर्म अंधविश्वासाने तोच खरा असल्याचे बेंबीच्या देठापासून उच्चस्वरांत सांगत आहेत. दूरदर्शन वा संगणकीय जाळ्यातून याचा भडीमार चालू आहे. 
विदेशातून आयात झालेले तथाकथित ज्ञान हिंदुस्तानातील तथाकथित सुशिक्षित, मॉडर्न, अपटुडेट, स्मार्ट लोक स्वतः स्वीकारतात आणि इतरांच्या गळी उतरविण्यासाठी भयंकर प्रयत्न  करतात. हे अज्ञानी लोक क्रमबद्ध वेदशास्त्रे न अभ्यासातच त्यात त्यांचे विध्वंसक क्षेत्र निर्माण करीत आहेत. हे लोक इंग्रजी चष्म्यातून हिंदुस्थानी संस्कृतीचा अभ्यास करून त्यात अधिकच उत्पात माजवत आहेत. त्यामुळे अनेकदा निष्ठावान लोक यांच्या आक्रमणामुळे भरकटत चालले आहेत. तर काही लोक आपल्या अंधविश्वाला पैशाच्या जोरावर धर्म म्हणून पसरवत आहेत. अर्थात खऱ्या धर्माचा लोप होत आहे. 
वस्तुतः धर्म कशाला म्हणतात? 'धर्म' शब्दाची व्याख्या अशा प्रकारे आहे - 'धरति लोकान् ध्रियते पुण्यात्मभि: इति वा' अर्थात 'जो लोकांना धारण करतो' किंवा 'जो पुण्यात्माद्वारे   धारण केला जातो तो 'धर्म' आहे. आश्वलायन गृह्यसूत्रात' 'धर्मा' संबंधी सांगितले आहे की 'धारणात् श्रेय आदधाति इति धर्म: ।' अर्थात ज्याच्यानुसार चालण्यामुळे मनुष्याचे 'श्रेय' (कल्याण) होते, यश, उन्नती आणि मोक्ष प्राप्त होतो त्याला 'धर्म' म्हणतात. महर्षि  जैमिनी प्रणित पूर्वमीमांसामध्ये ' धर्म' विषयात म्हटले आहे - 'चोदनालाक्षणो र्थो धर्म:'। अर्थात उपदेशाने, आज्ञेने किंवा विधीने ज्ञान होणारा श्रेयस्कर अर्थ 'धर्म' आहे. या सर्वांत सुस्पष्ट शब्दांत श्रीमद् भागवत सांगते 'धर्मन्तु साक्षात् भगवद् प्रणितम् । अर्थात भगवान श्रीकृष्णांनी जे काही सांगतिले आहे ते म्हणजे धर्म होय. अशा या धर्माचे श्रेष्ठत्व श्रीमद् भागवत सांगते - 
स वै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे ।
अहैतुक्यप्रतिहता ययात्मा सुप्रसिदती ।।
'ज्यामुळे मनुष्याला परम दिव्य अशा भगवंतांची प्रेममयी भक्ती प्राप्त होते तो अखिल मानव जातीचा परम धर्म होय. अशी भक्ती अहैतुकी (हेतूरहित) आणि अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो, तृप्त होतो.' (श्रीमद् भागवत १.२.६)

अर्थात प्रत्येक माणसाला संतुष्ट करतो, तृप्त करतो तोच खरा आणि परम धर्म होय आणि धर्म कोठे असतो? महाभारतात भीष्मदेव सांगतात - 'यत:कृष्णस्ततो धर्मो यतो धर्मस्ततो जय:।' अर्थात जेथे श्रीकृष्ण आहेत, तेथे धर्म आहे आणि जेथे धर्म आहे, तेथे विजय आहे. मात्र कलियुगात अशा धर्माचा आश्रय न घेताच, भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा न करता लोक मनोकल्पित वा भ्रामक धर्माचा स्वीकार करीत आहेत. 

                                        'सत्यम्' -
 सत्याचा म्हणजे खरेपणाचाही नाश होत आहे. कलियुगात लोकांना सत्य काय आहे हे माहीतच नाही. वृत्तपत्रे, दूरदर्शन, भ्रमणध्वनी, संगणकीय जाळे यांवरील वार्ता म्हणजे सत्य असा लोकांचा समज आहे. परब्रह्माला जाणण्याविना केवळ काल्पनिक वा क्षणिक सत्यवार्तांचा ढीग रचला म्हणजे सत्यशोधन झाले. असत्याचा गवगवा इतका आहे की लोक खोट्यालाच खरे मानतात. असत्यालाच सत्य मानले जाते. 
भागवत पुराणाच्या पहिल्याच श्लोकात भगवान श्रीकृष्णांचे ध्यान 'सत्यं परं धीमहि' ने केले जाते. 

सत्यं ब्रूयात्प्रियं ब्रूयान्न ब्रूयात्सत्यप्रियम् । 
प्रियं च नानृतं ब्रूयादेश धर्म सनातनः ।।     
सत्य बोलावे, जे सत्य तर आहे पण प्रिय नाही, असे वचन बोलू नये; त्याचप्रमाणे जे ऐकण्यास गोड, मात्र असत्य असेल तर तसेही बोलू नये - हाच सनातन धर्म आहे. 
सत्येन धार्यते पृथ्वी सत्येन तपते रवि: ।
सत्येन वायवो वान्ति सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ।।
'सत्यानेच पृथ्वीला धारण केले आहे, सत्यामुळेच सूर्य तळपतो. सत्याच्या प्रभावाने वायू वाहतो. तसेच संपूर्ण विश्व सत्यातच प्रतिष्ठीत आहे.'
सत्यं जनविरोधायासत्यं च जनरंजने ।
सुरा विक्रियते स्थाने, दधिक्षीरं गृहे गृहे ।।
'सत्याने लोकांचा विरोध पत्करावा लागतो तर असत्याने लोकरंजनाचे साधन बनतो. दारू ही विशिष्ट ठिकाणीच विकली जाते. दूध-दही काय घरोघरी असते.'
सत्यमेकपदं ब्रह्म, सत्ये धर्म: प्रतिष्ठित: ।
सत्यमेवाक्षया वेदा: सत्येनावाप्यते परम् ।। 
'सत्य हे एकपदी ब्रह्मच आहे. धर्म हा सत्यावर आधारलेला आणि स्थिर झालेला आहे. सत्य म्हणजे सर्व अक्षय वेदच. सत्याने सारे काही प्राप्त  होते  ब्रह्मही प्राप्त होते.'

                                 शौचं - अर्थात शुद्धता. 
कलियुगात शुद्धतेला महत्त्वपूर्ण स्थान राहिलेले नाही. नित्य प्रतिदिन स्नान करणे, स्वच्छ वस्त्रे परिधान करणे लोकांना आवडत नाही. पाश्चात्यां प्रमाणे जीन पँट घालणे, ती अनेक दिवस न बदलणे, त्यामुळे येणारा घामट दर्प झाकण्यासाठी कृत्रिम सुगंधी फवारे अंगावर मारून घेणे लोकांना आवडते. युरोप-अमेरिकेत सहा महिने बर्फ पडत असतो. त्यामुळे तेथील लोक रात्रंदिन एकाच पॅंटीवर अनेकानेक आठवडे राहतात. शौचाला गेल्यावर पाणी न वापरता कागद वापरतात. त्यांचेच अंधानुकरण भारतीय करतात. पूर्वी आई-बहिणीने बनविलेले उत्तम पदार्थ खाऊन लोक घरा बाहेर शौचास जात आणि आता बाहेरील निकृष्ट पदार्थ खाऊन घरात येऊन घाण करतात. 
भारतीय प्रदेश उष्ण आहे. येथे नित्य स्नान आवश्यक आहे. तसेच हलके सुती वस्त्र परिधान करणेसुद्धा चांगले आहे. परंतु पाश्चात्यांची गोरी कात बुरशी जात असल्यामुळे त्यांच्या मार्गाने जाण्यास भारतीयांना मोठी धन्यता वाटते. बूट पायमोजे घातलेला अपटुडेट माणूस जवळ येताच त्याच्या घामटेपणामुळे पोटात ढवळून येते. तसेच कोठेही मलमूत्र विसर्जन करणे, डावा हात साबण लावून न धुणे, पान - गुटखा खाऊन सार्वजनिक स्थानी थूंकून घाण करणे, या असल्या अस्वच्छतेत भारतीय अगदी निर्ढावलेले आहेत. 
कलियुगात माणसाचे केवळ शरीरच अपवित्र-अशुद्ध राहिले नाही तर अंत:करणही घाणीने भरलेले आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर इत्यादी घाण हृदयात आहेच आहे. दुसऱ्याचे धन अपहरण करणे, फसवणे, धोका देणे अशा अनेक वृत्तींनी हृदय नुसते बरबटून गेले आहे. लोकांना ही मलिनता स्वच्छ करण्याची इच्छा नाही. वस्तुतः ही घाण स्वच्छ करण्याची साधी सोपी पद्धत कलियुगात उपलब्ध आहे. तसेच ती अतिशय प्रभावशालीही आहे. ती पद्धत म्हणजे भगवंतांच्या नामांचा जप करणे होय. पण हरिनामाचे उच्चारण करण्यासही लोक उत्सुक नाहीत.

                          क्षमा - क्षमासुद्धा लोप पावत आहे. 
कलियुगात अशी कोणतीही व्यावहारिक कृती नाही की ज्यामुळे लोक स्वतःला शुद्ध बनवून ईर्ष्या द्वेषापासून मुक्त होतील. जोपर्यंत मनुष्य आध्यात्मिक सुधारणेच्या कोण्या प्रामाणिक कार्यक्रमाचे अंतर्गत भगवन्नामाचे कीर्तन करून शुद्ध होत नाही, तोपर्यंत त्याचे मन क्रोध, ईर्ष्या आणि क्षुद्रपणा यांनी ठासून भरलेले राहील. 
क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा ।
वशीकर्त्री क्षमा लोके क्षमया किं न सिध्यति ।।
'क्षमा हे अशक्तांचे बळ आणि शक्तिमानांचे भूषण आहे. क्षमा ही विश्वात कुणालाही वश करणारी आहे; क्षमेने काय साध्य होत नाही?
अशी क्षमा कलियुगात मात्र दुर्मीळ होत आहे. 

                                              दया
कलियुगात दयेचा नाश तर अतिशय वेगाने होत आहे. सर्व जीव भगवंतांच्या दैवी अस्तित्वात सहभागी असल्यामुळे शाश्वत  रूपाने जोडलेले आहेत. जेव्हा नास्तिकता आणि संशयवाद एकत्र येतात तेव्हा लोक एकमेकांवर दया दाखवत नाहीत. लोक इतरांप्रति सोडा स्वतःप्रतिसुद्धा दयाळू राहत नाहीत. विविध प्रकारची नशा करणे, मांसाहार, व्यभिचार आणि सर्व प्रकारची मौज- मजा-मस्तीची साधने वापरून मनुष्य स्वतःला क्रमबद्धरीत्या नष्ट करीत आहे. असल्या अनेकानेक आत्मघातकी वाईट सवयींमुळे आणि काळाच्या प्रबळ प्रभावामुळे माणसाचे अर्धे आयुष्य नष्ट होत आहे. आधुनिक शास्त्रज्ञ खोटे आकडे प्रकाशित करतात. आपले तथाकथित संशोधन खपवण्यासाठी ते म्हणतात, की आयुष्य वाढत आहे. परंतु यापेक्षा  कित्येक पटीने गर्भपाताद्वारे प्राप्त होणारे आकडे अधिक आहेत. 
दयाभाव नसल्यामुळेच दिवसेंदिवस कित्तेलखाने वाढत आहेत. लोक अनेक प्रकारचे पशू, पक्षी, किडे, साप इ. आनंदाने खात आहेत. 

                                                                  बलम् -
 शारीरिक बालसुद्धा घटत आहे. पाच सहस्र  वर्षांपूर्वी मनुष्य, प्राणी आणि वृक्ष आतापेक्षा अधिक उंच आणि सशक्त होते. फार पूर्वीचे  जाऊ द्या. तीनशे - चारशे वर्षांपूर्वी बांधलेली मंदिरे वा किल्ले इत्यादी बघितले की प्रचंड आश्चर्य वाटते. कोणतीही आवडजड यंत्र सामुग्री नसताना हे  प्रचंड कार्य कसे काय केले? छत्रपती शिवरायांनी भर समुद्रात सिंधुदुर्गाची निर्मिती कशी केली? शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आलेल्या इंग्रजांना रायगडावर दोन महाकाय हत्ती पाहून आश्चर्य वाटले. माणसाला चढण्याला कठीण असलेल्या गडावर एवढे प्रचंड प्राणी`कसे आले? महाराणा प्रताप आपल्या अंगावर जे चिलखत, मस्तकावर जिरेटोप आणि विविध शस्त्रे धारण करीत आणि आपल्या प्रिय चेतक नामक घोड्यावर स्वार होऊन लढाई करीत त्या वस्तू उचलण्यासाठी आता आठ माणसांची आवश्यकता वाटते. अशी एक नाही अनेक उदाहरणे देता येतील. याचाच अर्थ दिवसेंदिवस लोक बलहिन होत आहेत. 

                                                स्मृति - 
स्मृती तर सर्वांचीच क्षीण होत आहे. पूर्वीच्या युगातील माणसांची स्मृती उत्तम होती. कोणतीही गोष्ट  पुनः पुन्हा  सांगावी लागत नसे. गुरुकुलात विद्यार्थी गुरुमुखातून एकदा ऐकलेला मंत्र कधीच विसरत नसत. पण कलियुगाच्या प्रबळ प्रभावामुळे लोकांना घरातल्या घरात ठेवलेल्या वस्तू मिळत नाहीत. विद्यार्थ्यांना अभ्यास लक्षात राहत नाही. गणितासाठी पाढे पाठ होत नाहीत. कॅलक्युलेटरविना गणित करता येत नाही. गृहिणींना स्वयंपाकातील मीठ मसाले लक्षात राहात नाहीत. पुरोहितांना मंत्र लक्षात नसतात. एक नाही अनेक बाबतीत माणसांची स्मृती मंद होत आहे.  


©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७  








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा