गुरुवार, २१ जून, २०१८

                       मूर्ती भंजन आणि पूजन 


भारताच्या ईशान्य भागातील एक छोटेसे राज्य आहे त्रिपुरा. येथे अनेक वर्षांनंतर साम्यवादी राजवट जाऊन नवीन सरकार आले आहे. त्यावेळी क्रूरकर्मा लेनीनचा पुतळा उद्ध्वस्त करून काही अन्यायग्रस्त पीडितांनी आपला क्रोध प्रकट केला. त्यावेळी अनेकांनी निषेध व्यक्त करून
लेनीनच्या भग्न मूर्तीसाठी वस्तुतः पुतळ्यासाठी आक्रोश व्यक्त केला. या घटनेतून प्रेरणा घेऊन भारतातील विविध नगरातून अनेकांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याचे प्रकार वाढीस लागले. 

वस्तुतः लेनीन हा काही संत - सज्जन नव्हता. त्याने रशियात साम्यवादी हुकूमशाही स्थापन करण्यासाठी बंदूकीचा मुक्त वापर केला होता. जो कोणी साम्यवादी विचारांना विरोध करेल त्यांचा मुडदा पाडणे हा त्याचा सरळ मार्ग होता. त्यासाठी त्याने आपल्याच रशियन बांधवांचा वंशविच्छेद केला. लक्षावधी लोकांना किड्या मुंग्यांप्रमाणे ठार मारले. त्याचाच हा साम्यवादी रक्तरंजीत आदर्श ठेवून त्रिपुरा, बंगाल आणि केरळ येथे अनेक हिंदूंना ठार मारले जात आहे. 
साम्यवाद शस्त्रबळाने जेथे  फोफावला त्याच रशियातील समस्त नगरातून लेनीनची स्मारके आणि पुतळे रशियन लोकांनीच उद्ध्वस्त केली आहेत. परंतु भारतात मात्र परक्यांची चाटुगिरी करण्यात स्वतःला धन्य मानणारे अनेक मूर्ख आजही आहेत. 'धर्म ही अफूची गोळी आहे' असे सांगणारा लेनीन सदैव धर्म आणि मूर्ती पूजेचा प्रखरतेने विरोध करत असे आणि त्याचे मूर्ख भारतीय अनुयायी मात्र भारतात त्याचे पुतळे स्थापना करून त्याचे पूजन करीत आहेत. त्याचे उदात्तीकरण करीत आहेत. लेनीन सारख्या क्रूरकम्र्याचा पुतळा फोडल्यामुळे जे लोक रडत आहेत, लेख खरडत आहेत, निषेध मोर्चे काढून टि.व्ही. वर चमकोगिरी करत आहेत, ते लोक इतर महापुरुषांचे पुतळे फोडल्यावर चिडीचूप होत असतात. आपल्या साम्यवादी कुविचारांविरुद्ध प्रचार करणाऱ्यांची हत्या होताना मात्र या बदमाशांना अत्यानंद होतो. 

तसे पाहता मूर्ती भंजनाचीही प्रथा फार जुनी आहे. महंमद बिन कासिमचे भारतावर पाशवी आक्रमण झाल्यापासून येथील मूर्तींचे भंजन मोठ्या वेगाने चालू झाले. मथुरेतील सर्वात प्राचीन आणि विशाल श्रीकृष्ण मंदिराचा विद्ध्वंस करण्यासाठी कासीम आला त्यावेळी हिंदूंनी भगवंतांची मूर्ती फोडू नये म्हणून त्याच्या बदल्यात प्रचंड संपत्ती देऊ केली असता, तो छद्मीपणे हास्य करीत म्हणाला, 'मी मूर्ती विक्रेता नसून, मूर्ती भंजक आहे.' असे बोलून त्याने भव्य दिव्य असे श्रीकृष्णांचे मंदिर आणि विग्रह फोडून नष्ट केले.

अनेकानेक वर्षे परिश्रम करून येथील कलासक्त राजा - महाराजांनी भगवंतांची विशाल आणि अद्भुत मंदिरे निर्माण केली होती. त्या मंदिरांच्या कलाकुसरीसाठी अनेक शिल्पज्ञ, स्थापत्य आणि श्रमिकांनी अथक परिश्रम घेतले होते. या मंदिर निर्मितीसाठी अनेक पिढ्या झिजल्या होत्या. ही मंदिरे म्हणजे काही निवडक ब्राह्मणांची पोटे भरण्याची दुकाने नव्हती. 

भगवद्भक्त राजर्षींच्या सेवेने समस्त प्रजेला भगवद्साक्षात्काराची  सुवर्णसंधी मिळत असे. त्याकाळी राजा आणि प्रजा यांच्यासाठी मंदिरे हे मुख्य संस्कार केंद्र असे. राजाश्रयाने मंदिर आणि मंदिरांच्या आश्रयाने प्रजा ईश-साक्षात्कारी  होत असे. मंदिरातील मुख्य अर्चा विग्रह हा सर्वांच्या आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीचा केंद्र बिंदू असे. ज्ञान-विज्ञान, कला-क्रिडा, नाटक, ग्रंथसंपदा यांची निर्मिती भगवद्प्रसन्नतेसाठी केली जात असे. परंतु जसे इस्लामचे पाशवी आक्रमण भारतावर झाले तसे येथील समस्त सुंदरतेचे विद्ध्वंसीकरण चालू झाले. त्यानंतर आले इंग्रज, डच, फ्रेंच अन् पोर्तुगिज - त्यांनी ख्रिस्तीकरणाचा वरवंटा फिरवून विध्दवस्तीकरण केले. इंग्रजांनी तर समस्त भारतीयांचे बौद्धिक खच्चिकरण करून मेंदूच बाटवून टाकला. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या तथाकथित विद्वानांनी धर्मग्रंथ आणि मूर्ती पूजनालाच विरोध केला. कधी योग, कधी वेद वा कधी तर्क यांचा भडीमार करून संतांच्या शिकवणुकीच्या विपरीत नास्तिक हिंदू निर्माण केला. एकूण काय, परकीय असोत वा स्वकीय सर्वांनीच आपापल्या कृतीने मूर्ती भंजन केले आहे आणि पुढेही करत राहतील. 

या विश्वात प्राचीन काळापासून बहुसंख्य लोक श्रीमूर्तींचे मनोभावे पूजन करीत आहेत आणि अगदी याच्या विपरीत मूर्तीपूजनाला तीव्र विरोध करणारे सुद्धा आहेत. 

पवित्र वैदिक ग्रंथ आणि पंचरात्र नामक ग्रंथातून सांगितले आहे, 'आध्यात्मिक दृष्ट्या अविकसित असलेल्या लोकांवर विशेष कृपा करण्यासाठी भगवंत स्वतः अर्चा विग्रह (श्रीमूर्ती) रूपात म्हणजे अर्चा अवतार म्हणून प्रकट होतात.' कधी कधी अतिशहाणे तर्क करतात की, भगवंत सर्वत्र आहेत तर मग मंदिरातील श्रीमूर्तींची पूजा करण्याची काय आवश्यकता आहे ?' अशा अर्धवट लोकांना श्रील प्रभुपाद यांचे सांगणे आहे, 'जर भगवंत सर्वत्र आहेत तर मग ते मंदिरातही आहेत.' भगवंत सर्वत्र आहेत असे म्हणणे सोपे आहे, परंतु त्यांचे सर्वत्र दर्शन घेऊन त्यांची प्रेममयी सेवा करणे शक्य नाही. त्यामुळेच अल्पबुद्धीच्या लोकांकडून सेवा स्वीकारून त्यांच्यावर दिव्य कृपा करण्यासाठी भगवंत श्रीमूर्ती रूपात प्रकट होतात. 


वेदशास्त्रे आम्हाला वेळोवेळी स्मरण करून देतात, 'वेदशास्त्रांचा अभ्यास हा नेहमी आध्यात्मिक क्षेत्रातील प्रगत अशा आचार्यांकडून वा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच केला पाहिजे.' असे केले तर वेदशास्त्रांचे ज्ञान आपल्याला कळू शकेल. परंतु दुर्दैवाने साम्प्रतचे अनेक बाबा-बापू-हिंदू नेते वा आधुनिक बुद्धिमान लोक या उपदेशांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ते आपला तर्क प्रस्तुत करतात. त्यांना वाटते की संस्कृत भाषेचे ज्ञान हे वेदशास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी पर्याप्त आहे. तसेच काही इंग्रजी पढत पंडित गुगलवर शोध घेऊन चुकीचा अभ्यास करून स्वतःला सर्वज्ञ समजतात. अशा दिड शहाण्यांच्या ठोकताळ्यांमुळे वेदशास्त्रांचा अभ्यास त्यांना चुकीच्या निर्णयाकडे नेतो. असे पढत महामानव आणि त्यांचे दुष्ट प्रवृत्तीचे अनुयायी बेताल बडबड करतात, 'ही वेदशास्त्रे म्हणजे अशा असंबद्ध ग्रंथांचा समूह आहे की ज्यात विरोधाभास करणारी शिकवण दिलेली आहे.' अशा वाचाळ विद्वानांना कधीच दिव्यज्ञान कळणार नाही. हे लोक सदैव पशुवत आचरण करणारे असतात. नशा पान, मांस भक्षण, व्यभिचार आणि जुगार यातच आपला विकास आणि आनंद शोधत असतात. परंतु आदर्श वर्तन करणारे अनेक संत-महात्म्ये आणि आध्यात्मिक आचार्यांनी कधीच असा निर्णय दिल्याचे दिसून येत नाही. असे लोक वेदशास्त्रानुसार स्वतः आदर्श आध्यात्मिक जीवन जगले आणि इतरांनाही त्यांनी वैदिक संस्कृतीचे योग्य मार्गदर्शन केले. सहस्त्रावधी वर्षांपासून हेच घडले आहे.                     
                                
आध्यात्मिक क्षेत्रात प्रगत झालेल्या या महान संतांनी भगवंतांची दिव्य योजना जाणली आणि वेदज्ञानाचा प्रचार करून लक्षावधी भवरोगाने पछाडलेल्या लोकांना त्यांनी भक्त बनवले आणि अगदी याच्या विपरीत आजकालचे हे आधुनिक प्राध्यापक, उद्योगपती, खेळाडू, नट - नट्या, राजकारणी, पत्रकार, लेखक, सत्यशोधक जात्यंध वा धर्मांध नेते स्वतःही भक्त बनले नाहीत आणि इतरांनाही भक्त बनवू शकले नाहीत. त्यांच्या या कुवर्तनामुळे हे आधुनिक विद्वान अतिशयोक्ती करीत आहेत. वेदशास्त्रांविषयी स्वतःच्या कुबुद्धीने तर्कवितर्क करून ते आपली मते मांडत आहेत आणि सत्यज्ञानाच्या विरुद्ध भलतेच काही पसरवत आहेत. असे मूढ विद्वान हे सुद्धा मूर्तीभंजकच आहेत. 

श्रीपाद शंकराचार्य (आद्य), श्रीपाद रामानुजाचार्य, श्रीपाद निम्बाराकाचार्य, श्रीपाद विष्णुस्वामी, श्रीपाद मध्वाचार्य, संत ज्ञानेश्वर माऊली, श्री तुकाराम महाराज आणि श्री रामदास स्वामी इत्यादी भारतातील समस्त भागातील संत, आचार्य वा साधुंनी श्रीमूर्तींचे पूजन केलेले आहे. त्यांनी आपल्या ग्रंथातून भगवद्पूजनाचे उत्तमप्रकारे वर्णन केलेले आहे. चौदाव्या शतकातील महान विद्वान संत श्रीरूप गोस्वामी यांनी वेदशास्त्रांचे अनेक वर्षे सखोल अध्ययन आपल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली केले आणि नंतर घोषित केले, "अध्यात्मिक साधनेच्या महत्वपूर्ण  उपयुक्त कार्यामध्ये अर्चा - विग्रहांचे पूजन, आराधनेचा समावेश होतो. अर्चा - विग्रह पूजनासोबत अन्य चार महत्वपूर्ण कार्ये म्हणजे - भक्तांचा संग घेणे, भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करणे, पवित्र वेदशास्त्रांचे पठण आणि अध्ययन करणे आणि पवित्र तीर्थक्षेत्री यात्रा करणे." यावरून निश्चितच सिद्ध होते कि अर्चा - विग्रह अर्थात श्रीमूर्तींचे पूजन हे वेदशास्त्रानुसारच आहे. 

श्रीमुर्तीपूजन आध्यात्मिक जीवनात महत्वपूर्ण असले तरी कधी कधी दुष्ट लोक प्रश्न करतात, "मूर्ती आपल्या तोंडावर बसलेली साधी माशीसुद्धा का उडवू शकत नाही? "

श्रीमूर्ती रूपातील भगवंत आपल्या मुखावर बसलेली माशी निश्चितच उडवू शकतात ! हे करण त्यांना सहज शक्य असले तरी ते तसे करीत नाहीत. का ? कारण भगवंत स्वतः सर्वशक्तिमान आहेत हे सिद्ध करण्यासाठी श्रीमूर्ती रूपात ते प्रकट होत नाहीत. खरतर, या भौतिक जगात भगवंत, आपले सर्वशक्तिमान असणे शक्यतो प्रकट करीत नाहीत. ते मुर्खांना भ्रमित करण्यासाठी स्वतःला अप्रकट ठेवतात. 

भगवंत स्वतःला अर्चा - विग्रह (श्रीमूर्ती) रूपात या भौतिक रूपात प्रकट करतात. त्यावेळी ते या जगताचे नियम मोडण्यातून आपली दिव्यता प्रकट करत नाहीत. परंतु ते स्वतःच्या दिव्य शक्तीने गंभीरपणे भगवद्भक्ती करणाऱ्या भक्तांचे हृदय परिवर्तन करून त्यांना आध्यात्मिक जीवनात प्रगत करतात. 

कधी कधी मूर्ख लोक पवित्र ग्रंथ जाळतात किंवा फाडतात. असे कुकृत्य करून त्यांना बघायचे असते की या ग्रंथांची दिव्यता कमी होते का ? निश्चितच नाही ! मूर्ख, उद्धट वा उर्मट लोकांना असे करून त्या ग्रंथांच्या दिव्यतेचा अनुभव मिळणे शक्य नाही. जर त्यांना या ग्रंथांच्या दिव्यतेचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांनी भक्तिमय सेवेच्या दृष्टिकोनातून या ग्रंथांचे अध्ययन करणे आवश्यक आहे. अगदी त्याच प्रमाणे श्रीमूर्तींचे आहे. मुर्खांना वाटते की आम्ही  मूर्ती भंजन केले असून यात भगवंत नाहीत परंतु असे मुळीच नाही. ते केवळ दगड फोडतात, पण भगवंताना फोडू शकत नाहीत. 

वेदशास्त्रे विविध प्रकारे स्पष्टीकरण देत असूनही त्यावर आपण मात्र आपली वेडगळ स्पष्टीकरण रेटून देत असतो. वेदशास्त्रात भगवंतांच्या मानवसदृश्य रूपाविषयी अनेक उल्लेख आहेत. असे असताना स्वतःची विकृत मते वा कुतर्क  मांडण्यापेक्षा  सरळपणे अधिकृत वेदशास्त्रांवर नम्रपणे श्रद्धा ठेवणे अधिक लाभकारक नाही का ?

बायबलमध्ये एक चांगले उदाहरण दिलेले आहे - भगवंतांच्या प्रतिमेतून मानवाची जडणघडण झालेली आहे. मानवाच्या प्रतिमेतून भगवंतांची निर्मिती झाली असे कोणतेही आध्यात्मिक शास्त्र सांगत नाही. यास्तव बुद्धिमान माणसाने जाणले पाहिजे की, भगवंत हे मानवाच्या रूपाप्रमाणे नसून भगवंतांच्या मूळ रूपाप्रमाणे मनुष्याचा आकार घडला आहे. 

                      साधुसंगतीचा लाभ

गेल्या पंधरवड्यात पुणे येथे एक भव्य आणि दिव्य अशा सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील विविध नगरातून तथा विदेशातून अनेक भक्त या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रतिवर्षी एवढ्या मोठ्या सत्संगाचे आयोजन करण्यामागे हेतू काय आहे?  असा प्रश्न नवोदित भक्त नेहमीच विचारतात. अर्थात या सत्संगाचा हेतू हाच असतो की शुद्ध भक्तांची  दिव्य कृपा प्राप्त करणे. कारण शुद्ध भक्तांच्या दिव्य संगतीने, त्यांच्या दिव्य वाणीने, त्यांच्या चरणकमळांची धूळ मस्तकी धारण केल्याने सामान्य मनुष्य आपल्या भक्तिपूर्ण सेवेची पूर्णावस्था तात्काळ प्राप्त करू शकतो.

लोक भक्तिपूर्ण जीवनातील सर्वोच्च अवस्था प्राप्त करण्यासाठी विविध प्रकारची तपस्या करतात. कोणी वेदांचे अनुसरण  करतात. कोणी विविध उपासनांचा अंगिकार करतात. कोणी घरादाराचा त्याग करून संन्यासाश्रमाचा अंगिकार करतात. तर पुष्कळजण गृहस्थाश्रमातील कर्तव्यांचे पालन करतात, काहीजण वेदमंत्रांचे  पठण, होमहवन करतात. तर काहीजण कडक सूर्यप्रकाशात किंवा थंड पाण्यात किंवा भडकत्या अग्नीसमोर साधना करतात आणि समजतात की त्यांना भक्तिपूर्ण जीवनाची सर्वोच्च अवस्था प्राप्त झाली आहे. परंतु शुद्ध भक्तिचे परिपक्क फळ असे श्रीमद्भागवत महापुराण सांगते की शुद्ध भक्तांची चरणधूळ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणीही भक्तिपूर्ण सेवेची पूर्णावस्था प्राप्त करू शकत नाही. 

भक्तराज प्रह्लाद महाराज सांगतात - कोणीही आपल्या वैयक्तिक प्रयत्नाने किंवा दुसऱ्यांच्या सांगण्याने आपले जीवन सुधारू शकत नाही. परंतु जर का त्याने शुद्ध भक्तांच्या चरणधूळीचे स्नान केले तर तो तात्काळ आपल्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय प्राप्त करू शकतो. कारण भगवान श्रीकृष्ण त्यांच्या शुद्ध भक्तांच्या मालकीचे धन आहे. यास्तव शुद्ध भक्तांच्या कृपेशिवाय परस्पर श्रीकृष्णांना प्राप्त करणे शक्य नाही. स्वतः श्रीकृष्ण सांगतात की साधू माझ्या हृदयात निवास करतात आणि मी त्यांच्या हृदयात निवास करतो. ते माझ्या व्यतिरिक्त काहीही जाणत नाहीत आणि मी त्यांच्या व्यतिरिक्त काहीही जाणत नाही. जो कोणी माझा भक्त म्हणवतो तो माझा भक्त नव्हे, तर जो माझ्या भक्तांचा भक्त आहे तो माझा खरा भक्त आहे. 

म्हणून कोणीही असल्या तसल्या कोणत्याही मार्गाने भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करू शकत नाही.  श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याचा सरळ मार्ग म्हणजे त्यांच्या शुद्ध भक्तांची संगती करणे आणि त्यांच्याकडून कोणतीही भौतिक गोष्ट न मागणे आणि सत्संगाची तीव्रतेने मागणी करणे. यास्तव श्रीचैतन्य महाप्रभू सांगतात - साधु संग साधु संग सर्व शास्त्र कय । लव मात्र साधु सांगे सर्व सिद्धि हय ।।                              

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

                                      निर्गुण निराकार 


जेव्हा कधी आध्यात्मिक विषयावर चर्चा प्रारंभ होते, त्यावेळी बहुतेक करून काही तथाकथित बुद्धिमान असा दावा करतात की भगवंत निर्गुंण आहेत. ते निराकार आहेत. या विषयावर वाद - विवाद करते वेळी त्या लोकांना बराच हुरूप चढतो. असे लोक मायावादी म्हणून समजले जातात. त्यांच्या बडबडीमुळे खरा जिज्ञासू मनुष्य गोंधळून जातो. 

वस्तुतः हे निर्गुण - निराकार शब्द काय सांगतात ते आपण पाहूया. या भौतिक जगात सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तीन गुण आहेत. हे गुण तथा भौतिक प्रकृती भगवान श्रीकृष्णांच्या आधीन आहे. भगवान सर्व शक्तींचे नियंत्रक असल्यामुळे ते आपल्या शक्तींचा वापर स्वतःच्या उद्दिष्टांसाठी करू शकतात. परंतु असे करताना त्यांच्यावर या गुणांचा जराही प्रभाव पडू शकत नाही. परंतु बाकीच्या देवता वा मनुष्य या गुणांच्या आधीन असतात, या गुणांनी युक्त असलेल्यांना सगुण म्हणतात. परंतु श्रीकृष्ण या गुणांच्या पलीकडे असल्याने त्यांना आपण निर्गुण म्हणू शकतो. परंतु मायावादी म्हणतात तसे काही भगवान निर्गुण नाहीत. 

तसेच मायावादी म्हणतात भगवंत निराकार आहेत. परंतु भगवंतांना पूर्ण आकारही आहे. आम्हाला भौतिक आकार आहे. आमचा आत्मा आणि शरीर भिन्न आहे.  आमचे शरीर भूमी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या पाच भौतिक गोष्टींपासून बनलेले आहे. आमच्या शरीरात कफ, पित्त, वायु, मल, मूत्र, मांस, रक्त असे अनेक पदार्थ आहेत. त्यामुळे आमचे शरीर विशिष्ट आकाराचे आहे. या शरीराला साकार म्हणतात. परंतु भगवान श्रीकृष्णांचे शरीर आणि आत्मा यात काहीच अंतर  नाही. तसेच त्यांचे शरीर ( विग्रह ) भौतिक पदार्थांपासून बनलेले नाही. ते संपूर्ण दिव्य आणि शुद्ध आध्यात्मिक आहे. त्यांना भौतिक पदार्थांचा आकार नाही. 

मायावादी समजतात तसे भगवंत कधीही निराकार होत नाहीत. परंतु ते साकार असूनही आमच्याप्रमाणे नाहीत. त्यांचे शरीर सच्चिदानंद आहे. मायावादी म्हणतात त्यांचे निराकार स्वरूप आहे किंवा ब्रह्मज्योती आहे. परंतु आस्तिक समजतात ती ब्रह्मज्योती तर भगवंतांच्या दिव्य कांतीचा केवळ प्रकाश आहे वा प्रकाशापलीकडे स्वयं भगवान आहेत. 

श्रीमद्भागवतात परम सत्याची संकल्पना पुढीलप्रमाणे दिली आहे - ' परम सत्याचे ज्ञान असणारे परम सत्याचा साक्षात्कार ज्ञानाच्या तीन अवस्थांमध्ये करतात आणि या सर्व एकच आहेत. परम सत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते. '

भगवंत कधीही निराकार होत नाहीत, कारण त्यांचे स्वतःचे शाश्वत रूप आहे; ते आदिपुरुष आहेत. यास्तव श्री इशोपनिषद् म्हणते, ' हे भगवान ! हे सर्व जीवांचे पोषणकर्ता ! आपले खरे मुख आपल्या दीप्तिमान तेजामुळे झाकले गेले आहे. कृपया ते आवरण दूर करा आणि आपल्या शुद्ध भक्ताला दर्शन द्या. 

तर आपण सदैव ध्यानात ठेवले पाहिजे की भगवान श्रीकृष्णांना शाश्वत, सच्चिदानंद स्वरूप आहे. परंतु ते रूप त्यांच्या भक्तानाच पहावयास मिळते. नास्तिक लोकांसमोर ते प्रकट होत नाहीत. 

©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : 92421 76587

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

                              धनसंचयाच्या योजना 


सध्या आपला देश फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. विदेशी कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे . ऐकाकाळी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत असे. हा देश सुजलाम सुफलाम म्हणून संबोधला जात असे.

आपल्याला इतिहासातून कळते की फार पूर्वी शक, हूण, कुशाण, मोंगल यांनी या देशाची लूटमार केली. त्यानंतर इंग्रजांनी आणि त्यानंतर स्वकियांनी या देशाला लुटले. प्रत्येक व्यक्ती असा विचार करते की मला माझ्या बुद्धिचातुर्याने जेवढे काही खाता येईल तेवढे खाणे आणि हे माझे आहे आणि मीच त्याचा एकमेव भोक्ता आहे. हे सर्व माझ्या सुखासाठीच आहे. परंतु माणूस हे सर्व जाणून घेण्यास तयार नाही की वस्तुतः या जगातील प्रत्येक चेतन किंवा जड पदार्थांचे मूळ मालक भगवान श्रीकृष्ण आहेत आणि तेच एकमेव भोक्ता आहेत. तेच नियंत्रक आहेत आणि त्यांनी आमच्या आवश्यकतेसाठी जेवढे आम्हाला दिले आहे तेवढ्याच गोष्टींचा आम्ही स्वीकार करावा. असे ज्यावेळी आम्ही करू, त्याच वेळी आम्हाला वास्तविक शांती मिळेल, सुख मिळेल. 

परंतु कलियुगाच्या प्रभावामुळे सर्वसामान्य लोक इतके पतित आणि मूढ झाले आहेत की त्यांना वाटते की मी जर अधिक पैसा मिळविला तर सुख लवकर मिळेल. भक्तराज प्रह्लाद महाराज सांगतात, "धन इतके प्रिय असते की लोक त्याला मधापेक्षा मधुर समजतात. तर मग असा कोण असेल की जो धन संग्रह करण्याच्या भुकेचा परित्याग करू शकेल आणि ते सुद्धा गृहस्थजीवनात ? चोर, व्यावसायिक नोकर तथा व्यापारी आपल्या प्रिय प्राणांची बाजी लावून धन प्राप्त करू इच्छितात." - भागवत ७.६.१०

पैशाच्या मागे लागलेल्या  लोकांविषयी भगवान श्रीकृष्ण सांगतात " इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंतानी ग्रासलेले असते. शेकडो, हजारो आशारुपी पाशांनी बद्ध झालेले कामक्रोधपरायण झालेले हे आसुरी लोक इंद्रियतृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. आसुरी मनुष्य विचार करतो की, आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उतरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौजमजा करेन, अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. " भगवद्गीता १६. ११. १२. १३. १४. १५ 

तर अशा अनेक आर्थिक योजनांद्वारे आपण सुखी होऊ असे राजकारणी, अर्थतज्ज्ञ, विचारवंताना वाटते. परंतु हे सर्व प्राप्त करूनही लोक सुखी - समाधानी होत नाहीत. असे का? कारण एकच की कोणीही हे जाणून घेण्यास तयार नाही की वास्तविक मालक श्रीकृष्ण आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे. 
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : 92421 76587
                                         कृष्णप्रेम 

कृष्णभावनामृताचा प्रचार करते वेळी, सर्वसामान्य लोकांच्या लाभासाठी भक्त त्यांना कृष्णप्रसाद देतात. त्यावेळी लोक अनेक चित्रविचित्र प्रश्न विचारतात हा प्रसाद इतका स्वादिष्ट का ? इतका अद्भुत का ?श्रीकृष्ण इतका चांगला नैवेद्य स्वीकारीत असतील तर मग तो अर्पण करण्यास आम्हाला परवडेल का ? हे सर्व करणे अत्यंत खर्चिक आहे. आम्हाला जमणार कसे ? परंतु हे सर्व अज्ञान आहे. 


पूर्ण पुरुषोत्तम भगवान स्वतःच 'आत्माराम' आहेत. ते पूर्ण आहेत. त्यांना कोणत्याही ऐश्वर्याची वा पदार्थाची मुळीच आवश्यकता नाही. ते अत्यंत कृपाळू आहेत. आम्ही त्यांच्यावर प्रेम करावे यास्तव ते त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला प्रदान करतात. ते सांगतात जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तिने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो."

अर्थात या जगातील गरीबातील गरीब मनुष्य भगवान श्रीकृष्णांना एखादी लहानशी वस्तु प्रेमाने अर्पण करून कृष्णप्रेम प्राप्त करू शकतो. त्यांने अर्पण केलेल्या पदार्थाचा श्रीकृष्ण आनंदाने स्वीकार करतात तथा त्या मनुष्याचा या दुःखमय जगातून उद्धार करतात. परंतु त्यासाठी मनुष्याला श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असणे आवश्यक आहे. 

प्रेमाने आणि भक्तीने अर्पण केलेल्या पदार्थांचा श्रीकृष्ण आनंदने स्वीकार करतात, त्यामुळे त्यांचा प्रसाद स्वादिष्ट आणि अद्भुत लागतो. कारण त्यांच्या स्पर्शामुळे प्रसाद दिव्य बनतो. तसेच श्रीकृष्णांनी आम्हाला जेवढी शक्ती दिली आहे त्यानुसार आपण त्यांची सेवा केली पाहिजे. श्रीकृष्णांच्या लिलातून आपण कीतीतरी उदाहरणे पाहू शकतो. पांडव आणि द्रौपदी वनवासात असते वेळी, त्यांना पीडा देण्यासाठी दुर्योधन दुर्वासा मुनींना वनात पाठवितो. त्यावेळी अत्यंत संकटकालीन स्थितीत द्रौपदी श्रीकृष्णांना पुकारते तथा त्यांना ती केवळ एक कण अन्न देऊ शकते.  पुढे श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि दुर्वास मुनींचे संकट टळते. पुढे श्रीकृष्ण पांडवांचे दूत बनून हस्तीनापूरला जातात. त्यावेळी दुर्योधन त्यांना सोन्याच्या ताटातून ऐश्वर्यशाली राजभोग अर्पण करू इच्छितो. परंतु श्रीकृष्ण प्रसन्न होत नाहीत. ते त्याचा स्वीकार करीत नाहीत. ते महात्मा विदुरांच्या घरी जातात आणि त्यांच्या पत्नीने प्रेमाने अर्पण केलेली केळीची सालेही खातात.


श्रीकृष्ण आपल्या बाल मित्राने, सुदाम्याने कळकट पंचातून बांधून आणलेले पोहे त्याच्याकडून जबरदस्तीने काढून घेतात आणि मोठ्या आनंदाने ग्रहण करतात. श्रील प्रभुपाद सांगतात की श्रीकृष्णांना प्रेममयी सेवे व्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा नसते. श्रीकृष्ण एखाद्या फुलाचाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात. ते अभक्तांकडून कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करीत नाहीत. ते स्वावलंबी असल्यामुळे त्यांना कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा नसते. तरीही ते भक्ताकडून प्रेमभावाचे आदानप्रदान करण्याकरिता ते भक्ताच्या भेटीचा स्वीकार करतात. इतर कोणत्याही साधनाने उदाहरणार्थ ब्राह्मण, विद्वान, पंडित, गर्भश्रीमंत किंवा महान तत्तवज्ञानी झाल्याने आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही. 

भगवान श्रीकृष्ण सांगतात, "मी कोणाचाही द्वेष करीत नाही. तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत. परंतु जो कोणी भक्तीभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे. माझ्याठायी स्थित आहे आणि मीसुद्धा त्याचा मित्र आहे." 
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : 92421 76587

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

               प्रजाभक्षक आणि लिंग लंपट 

दस्यूत्कृष्टा जनपदा वेदाः पाषण्डदूषिताः।
राजानश्च प्रजाभक्षा: शिश्नोदरपरा द्विजाः ।।
'महानगरे चोरांनी भरलेली असतील, वेद नास्तिकांनी केलेल्या व्याख्येद्वारे दूषित केले जातील. राज्यकर्ते प्रजेचे भक्षण करतील आणि तथाकथित बुद्धिजीवी वा ब्राह्मण आपले उदर आणि जननेंद्रियाचे भक्त होतील.' (भागवत १२. ३. ३२)


दस्यूत्कृष्टा जनपदा - 
जगातील मोठमोठ्या नगरांतून, दादा, भाई, गुंड आणि तस्करांचे राज्य चालते. सामान्य माणसांचा गळा आणि खिसा कधी कापला जाईल याची शाश्वती नसते. मंगळसूत्र-साखळी चोरणारे, खिसेकापू, भुरटे चोर, मादक पदार्थ विकणारे, अनेक प्रकारच्या चोऱ्या करणारे बदमाश महानगरातून भरलेले आहेत. मुंबईसारख्या महानगरांतील चोरांकडून लक्षावधी रुपयांची मालमत्ता पोलिसांनी पकडली आहे. पुण्याचा एक कुप्रसिद्ध चोर विमानाने आणि अलिशान गाड्यातून फिरत असे केवळ चोऱ्यांसाठी. मोठमोठे बिल्डर्स, शेअर दलाल हे सर्व याच कुळातील आहेत. व्यापारी लोकही यातीलच आहेत. गोमांस, तंबाखू, दारू, शीतपेये वा अन्य झटपट खाद्यपदार्थ विक्री करणारे व्यापारीही महानगरांतून मोठ्या प्रमाणावर आहेत. हे सफेद कपड्यातील चोर हानिकारक वस्तू लोकांनी खरेदी कराव्यात म्हणून चांगलेच गोड बोलून माल खपवतात. आधुनिक कार्पोरेट जगामधील धनदांडगे आपला माल खपविण्यासाठी विविध माध्यमांतून जाहिराती करून निःसंकोचपणे लूटमार करतात. यातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मायाजाल तर भयंकर आहे. पूर्वी मोंगलादी लुटारू घोड्यांवर बसून येत. तर इंग्रजादी पाश्चिमात्य नौकेतून येत आणि येथे मुंबई-कोलकाता सारखी महानगरे वसवून लूटमार करत. आता मात्र ते आपल्याच देशात बसून संगणकाद्वारे लूटमार करतात. 

वेदाः पाषण्डदूषिताः -- 
नास्तिक लोक आपल्या मनमानी ढंगाने वेद भ्रष्ट करीत आहेत. यांच्या विषयी महाभारतात (१. १. २३८) सांगितले आहे - 
इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृम्हयेत् ।
बिभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रहरिष्यति ।।
'रामायण-महाभारत अशा इतिहास आणि पुराणांचा अभ्यास करून वेदांचा अभ्यास पूर्ण केला जातो. कारण अर्धवट वेद शिकलेल्या माणसाची वेदांना अशी भीती वाटते की हा माणूस माझ्या अर्थाचा अनर्थ करून माझ्यावर जणू प्रहारच करील.'


भागवतात सांगितल्याप्रमाणेच वेदशास्त्रांची मोडतोड करण्यात  देशी-विदेशी तथाकथित विचारवंत अग्रेसर आहेत. मिशनरी लोक योगाला- क्रिस्टोगा करतात, तर आयुर्वेदाला अन्य साज चढवून त्याची विक्री येथेच करतात. विदेशातील विश्वविद्यालयातून हिंदुत्वाची शिकवण शिकवली जाते. त्यातून भारतीय धर्मात अनेक ईश्वरवाद सांगितला असून त्याचा उद्देश निर्विशेष मोक्ष आहे. परंतु याच्या विपरीत अमर्याद प्रमाणे मिळतात. वस्तुतः संपूर्ण वेद वाड्मय एक आहे. जसे भगवद् गीतेत (१५.१५) स्वयं भगवान श्रीकृष्ण सांगतात  - 
वेदेश्च सर्वैरहमेववेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्
'सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.'
सर्व वेद वाड्मयाचा उद्देश परमपुरुष परब्रह्म विष्णू वा कृष्ण यांच्या विषयी आम्हाला प्रबुद्ध करणे हा आहे. यद्यपि ईश्वर अनेक नावांनी संबोधला जातो आणि अनेक रूपांत प्रकट होतो, तरीही तो एकच आहे. परंतु कलियुगात हे खरे वैदिक ज्ञान गुप्त आहे. 
श्रीपाद आद्य शंकराचार्य सांगतात -
एकं शस्त्रं देवकी पुत्र गीतम् 
एको देवो देवकीपुत्र एव ।
एको मन्त्रस्तस्य नामानि यानि 
कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ।।
'केवळ एकच शास्त्र. ते म्हणजे भगवद्गीता. केवळ एकच देव तो म्हणजे देवकीपुत्र (श्रीकृष्ण). एकच मंत्र, तो म्हणजे त्यांचे नाम आणि एकच कर्म म्हणजे त्यांची भक्तिमय सेवा.'

राजानश्च प्रजाभक्षा: - 
राज्यकर्ते प्रजेचे भक्षण करतील. 
कलियुगाच्या प्रारंभानंतर जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे दिसून येतात की राज्यकर्त्यांनी  प्रजेचे  भक्षण कसे केले आहे. काही उदाहरणे पाहूया. हिटलरने ६० लक्ष ज्यूंचे हत्याकांड केले. तर स्टॅलीनने पोलंडच्या डँझिंग बंदराच्या पट्ट्यात दोन कोटी लोकांना ठार मारले. चीनने तिबेट गिळंकृत करून तेथे नरसंहार केला. त्याआधी जपानने चीनवर रासायनीक पदार्थ टाकून नरसंहार केला. पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान निर्मितीसाठी जीनने 'प्रत्यक्ष कृती' चा आदेश देताच लक्षावधी हिंदूंचे शिरकाण केले गेले. भारतात आजही सत्ताधीश विरोधकांचे म्हणजेच आपल्याच प्रजेचे विविध प्रकारे भक्षण करतात. ही केवळ त्रोटक माहिती आहे. गेल्या तीनशे वर्षांत युरोपातून अमेरिकेत गेलेल्या विविध देशांनी मूळ अमेरिकन 'रेड इंडियन्स आणि इंडियन्स' यांचा संहार केला. तो जवळजवळ चार कोटींपेक्षा अधिक आहे. 

शिश्नोदरपरा द्विजाः -
तथाकथित पुरोहित वा विचारवंत आपले पोट आणि जननेंद्रियाचे भक्त होतील. 
कुठल्याही धर्मात पहा त्यांचे धर्मगुरु, पाद्री, मुल्ला-मौलवी, भिक्षुक वा पुरोहित हे सर्वजण केवळ पोट भरण्यासाठीच धडपडत असतात. दिवस पोट भरण्यात आणि रात्र जननेंद्रियाच्या तृप्तीत जाते. तसेच तथाकथित विचारवंत, बुद्धिमान लेखक, प्राध्यापक वा शिक्षकही याच कार्यांत मग्न असतात. 
श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात - 
जिह्वार लालसे येइ इति-उति धाय ।
शिश्नोदरपरायण कृष्ण नाहि पाय ।।                                           
'जो मनुष्य आपल्या जिभेचा दास आहे आणि त्यासाठी इकडे तिकडे भटकतो आणि आपले शिश्न आणि पोट भरण्यात मग्न आहे, तो श्रीकृष्णांना प्राप्त करू शकत नाही.' 
 ज्याला ईश्वर साक्षात्काराची अभिलाषा आहे, त्याने या दोन गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे.                     
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

पशू  + धर्म = मनुष्य 
मनुष्य - धर्म = पशू 
'हितोपदेश' मध्ये सांगितले आहे - 
आहार निद्रा भय मैथुनं च सामान्य एतत् पशुभीर्नराणाम् ।
धर्मो ही तेषां अधिको विशेषो धर्मेण हिनः पशूभीः समानः ।।
मनुष्य आणि प्राणी यांच्यात सामान्यतः चार गोष्टी सारख्या आहेत. त्या म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथुन या होय. परंतु मनुष्याला एक गोष्ट विशेषकरून दिली आहे आणि ती म्हणजे धर्म; आणि जर मनुष्य धर्महीन असेल तर तो पशुसमान आहे. 
              आहार :
प्रत्येक प्राणी आहारासाठी - पोटासाठी धडपडत असतो. पशू - पक्षी आपल्या गुणांनुसार आहार घेतात. कुत्री - मांजरे कोठेही बसून हाडे चघळतात वा एका तुकड्यासाठी वणवण भटकून आहार प्राप्त करतात. मनुष्याची बुद्धी थोडी विकसित असल्याने तो टेबलावर वा अन्य सुखसोयीनी युक्त असा आहार घेतो, परंतु पोट भरण्याचा आनंद पशूंना आणि मनुष्यांना सारखाच आहे. 

     निद्रा : 
कुत्री - मांजरे रस्त्याच्या कडेला वा अडगळीच्या ठिकाणी वा कोठेही निद्रा घेतात. मनुष्य मात्र गादी - उशी, पलंग - मच्छरदाणी वा वातानुकुलीत जागी झोप घेतो. परंतु झोप लागल्यावर आपण कोठे आहोत याची काळजी प्राणी वा मनुष्य करीत नाही. झोपेचा आनंद देघांनाही सारखाच आहे. परंतु मनुष्य कधी कधी झोप मिळविण्यासाठी दारू वा मादक पदार्थ सेवन करून निद्रेचा आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतो. 
        भय : 
शत्रुपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्राणी आपली नखे, शिंगे वा दातांचा उपयोग करतात. ते आपल्या पिल्लांचे उत्तम प्रकारे रक्षण करतात. मनुष्यालासुद्धा शत्रुपासून स्वतःचे रक्षण करण्याची कला माहीत आहे. तो शस्त्र - अस्त्र, बंदुका, तोफा इत्यादी साधनांनी रक्षण करतो. म्हणजेच पशू आणि मनुष्यात रक्षण करण्याची वृत्ती सारखीच आहे. 
      मैथुन :
पशू आणि मनुष्यातील चौथी सामान्य गोष्ट म्हणजे मैथुन! मैथुन सर्वच प्राणी करतात. हत्तीसारखा प्राणी केवळ पाण्यातच मैथुन करतो, तर कावळा आपल्या जीवनात एकदाच, तर कबुतरासारखा पक्षी दिवसातून वीस वेळा, तर कित्येक प्राणी केवळ विशिष्ट ऋतुतच करतात. परंतु कलियुगातील मनुष्य इतके कामुक झाले आहेत की त्यांना वेळ, स्थान, मर्यादा यांचे भानच नाही. मनुष्य मैथुनासाठी इतका कष्ट करतो की त्याला आपल्यात आणि पशुत काही फरक आहे याची कल्पनाच नाही. पशू मैथुनाचा आनंद लुटतात आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या पिल्लांची जबाबदारी सुद्धा घेतात. परंतु मनुष्य इतका धूर्त झाला आहे की तो मैथुनाचा आनंद लुटू इच्छितो, परंतु गर्भपात करून आपली जबाबदारी टाळतो.
तर सामान्यपणे या चार गोष्टी मनुष्य आणि प्राण्यात सारख्याच आहेत. परंतु पशुंपेक्षा एक गोष्ट मनुष्याला अधिक दिली आहे आणि ती म्हणजे धर्म! आणि धर्म नसलेला मनुष्य पशुंसमान आहे. कधी कधी भौतिकतावादी मनुष्य असा खोटा प्रचार करतात की धर्मामुळे मनुष्यात भांडणे, दंगे वा युद्धे होतात. परंतु प्राण्यात नाही. यास्तव धर्म ही अफुची गोळी आहे. धर्माचा नायनाट करा आणि नास्तिक व्हा, जेणेकरून आपल्याला पशुंप्रमाणे मुक्त कामाचार करता येईल. 
ज्यांना आपण पशू आहोत (दोन पायांचे ) असे वाटते त्यांना तसे खुशाल वाटू दे. परंतु जे स्वतःला मानव समजतात त्यांना मात्र धर्माचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. आता धर्म म्हटले की पुन्हा मोठा प्रश्न निर्माण होतो की धर्म म्हणजे काय ? लोक आपापल्या सोयीप्रमाणे त्याला अनेक नांवे देतात वा जीवन पद्धतीचे प्रतीक म्हणतात. परंतु हे सर्व तथाकथित धर्म सरकारी कार्यालयात एक कागद भरून देऊन बदलून घेता येतात. 
मग खरा धर्म कोणता ? तर खरा धर्म म्हणजे काय ते श्रीमद् भागवतात सांगितले आहे. धर्मम् तु साक्षात् भगवत् प्रणितम्! भगवान श्रीकृष्ण सांगतात तोच धर्म बाकी सर्व अधर्म वा विकल्प. श्रीमद् भागवतात (१.२.६) स्पष्टपणे सांगितले आहे - 
स वै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरअधोक्षजे ।
अहैतुक्य प्रतिहता ययात्मा सुप्रसीदति ।।
'ज्यामुळे मनुष्याला परम दिव्य अशा भगवंतांची प्रेममयी भक्ती प्राप्त होते तो अखिल मानव जातीचा परम धर्म होय. अशी भक्ती अहैतुकी (हेतूरहित) आणि अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो, तृप्त होतो. '

केवळ भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करणे म्हणजेच परम धर्म होय. ज्या मनुष्याकडून या धर्माचे पालन होत नाही तो मनुष्य धर्मेण हीनः पशुभीः समानः आहे.              
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : 92421 76587