गुरुवार, २१ जून, २०१८

                       मूर्ती भंजन आणि पूजन 


भारताच्या ईशान्य भागातील एक छोटेसे राज्य आहे त्रिपुरा. येथे अनेक वर्षांनंतर साम्यवादी राजवट जाऊन नवीन सरकार आले आहे. त्यावेळी क्रूरकर्मा लेनीनचा पुतळा उद्ध्वस्त करून काही अन्यायग्रस्त पीडितांनी आपला क्रोध प्रकट केला. त्यावेळी अनेकांनी निषेध व्यक्त करून
लेनीनच्या भग्न मूर्तीसाठी वस्तुतः पुतळ्यासाठी आक्रोश व्यक्त केला. या घटनेतून प्रेरणा घेऊन भारतातील विविध नगरातून अनेकांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याचे प्रकार वाढीस लागले. 

वस्तुतः लेनीन हा काही संत - सज्जन नव्हता. त्याने रशियात साम्यवादी हुकूमशाही स्थापन करण्यासाठी बंदूकीचा मुक्त वापर केला होता. जो कोणी साम्यवादी विचारांना विरोध करेल त्यांचा मुडदा पाडणे हा त्याचा सरळ मार्ग होता. त्यासाठी त्याने आपल्याच रशियन बांधवांचा वंशविच्छेद केला. लक्षावधी लोकांना किड्या मुंग्यांप्रमाणे ठार मारले. त्याचाच हा साम्यवादी रक्तरंजीत आदर्श ठेवून त्रिपुरा, बंगाल आणि केरळ येथे अनेक हिंदूंना ठार मारले जात आहे. 
साम्यवाद शस्त्रबळाने जेथे  फोफावला त्याच रशियातील समस्त नगरातून लेनीनची स्मारके आणि पुतळे रशियन लोकांनीच उद्ध्वस्त केली आहेत. परंतु भारतात मात्र परक्यांची चाटुगिरी करण्यात स्वतःला धन्य मानणारे अनेक मूर्ख आजही आहेत. 'धर्म ही अफूची गोळी आहे' असे सांगणारा लेनीन सदैव धर्म आणि मूर्ती पूजेचा प्रखरतेने विरोध करत असे आणि त्याचे मूर्ख भारतीय अनुयायी मात्र भारतात त्याचे पुतळे स्थापना करून त्याचे पूजन करीत आहेत. त्याचे उदात्तीकरण करीत आहेत. लेनीन सारख्या क्रूरकम्र्याचा पुतळा फोडल्यामुळे जे लोक रडत आहेत, लेख खरडत आहेत, निषेध मोर्चे काढून टि.व्ही. वर चमकोगिरी करत आहेत, ते लोक इतर महापुरुषांचे पुतळे फोडल्यावर चिडीचूप होत असतात. आपल्या साम्यवादी कुविचारांविरुद्ध प्रचार करणाऱ्यांची हत्या होताना मात्र या बदमाशांना अत्यानंद होतो. 

तसे पाहता मूर्ती भंजनाचीही प्रथा फार जुनी आहे. महंमद बिन कासिमचे भारतावर पाशवी आक्रमण झाल्यापासून येथील मूर्तींचे भंजन मोठ्या वेगाने चालू झाले. मथुरेतील सर्वात प्राचीन आणि विशाल श्रीकृष्ण मंदिराचा विद्ध्वंस करण्यासाठी कासीम आला त्यावेळी हिंदूंनी भगवंतांची मूर्ती फोडू नये म्हणून त्याच्या बदल्यात प्रचंड संपत्ती देऊ केली असता, तो छद्मीपणे हास्य करीत म्हणाला, 'मी मूर्ती विक्रेता नसून, मूर्ती भंजक आहे.' असे बोलून त्याने भव्य दिव्य असे श्रीकृष्णांचे मंदिर आणि विग्रह फोडून नष्ट केले.

अनेकानेक वर्षे परिश्रम करून येथील कलासक्त राजा - महाराजांनी भगवंतांची विशाल आणि अद्भुत मंदिरे निर्माण केली होती. त्या मंदिरांच्या कलाकुसरीसाठी अनेक शिल्पज्ञ, स्थापत्य आणि श्रमिकांनी अथक परिश्रम घेतले होते. या मंदिर निर्मितीसाठी अनेक पिढ्या झिजल्या होत्या. ही मंदिरे म्हणजे काही निवडक ब्राह्मणांची पोटे भरण्याची दुकाने नव्हती. 

भगवद्भक्त राजर्षींच्या सेवेने समस्त प्रजेला भगवद्साक्षात्काराची  सुवर्णसंधी मिळत असे. त्याकाळी राजा आणि प्रजा यांच्यासाठी मंदिरे हे मुख्य संस्कार केंद्र असे. राजाश्रयाने मंदिर आणि मंदिरांच्या आश्रयाने प्रजा ईश-साक्षात्कारी  होत असे. मंदिरातील मुख्य अर्चा विग्रह हा सर्वांच्या आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीचा केंद्र बिंदू असे. ज्ञान-विज्ञान, कला-क्रिडा, नाटक, ग्रंथसंपदा यांची निर्मिती भगवद्प्रसन्नतेसाठी केली जात असे. परंतु जसे इस्लामचे पाशवी आक्रमण भारतावर झाले तसे येथील समस्त सुंदरतेचे विद्ध्वंसीकरण चालू झाले. त्यानंतर आले इंग्रज, डच, फ्रेंच अन् पोर्तुगिज - त्यांनी ख्रिस्तीकरणाचा वरवंटा फिरवून विध्दवस्तीकरण केले. इंग्रजांनी तर समस्त भारतीयांचे बौद्धिक खच्चिकरण करून मेंदूच बाटवून टाकला. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या तथाकथित विद्वानांनी धर्मग्रंथ आणि मूर्ती पूजनालाच विरोध केला. कधी योग, कधी वेद वा कधी तर्क यांचा भडीमार करून संतांच्या शिकवणुकीच्या विपरीत नास्तिक हिंदू निर्माण केला. एकूण काय, परकीय असोत वा स्वकीय सर्वांनीच आपापल्या कृतीने मूर्ती भंजन केले आहे आणि पुढेही करत राहतील. 

या विश्वात प्राचीन काळापासून बहुसंख्य लोक श्रीमूर्तींचे मनोभावे पूजन करीत आहेत आणि अगदी याच्या विपरीत मूर्तीपूजनाला तीव्र विरोध करणारे सुद्धा आहेत. 

पवित्र वैदिक ग्रंथ आणि पंचरात्र नामक ग्रंथातून सांगितले आहे, 'आध्यात्मिक दृष्ट्या अविकसित असलेल्या लोकांवर विशेष कृपा करण्यासाठी भगवंत स्वतः अर्चा विग्रह (श्रीमूर्ती) रूपात म्हणजे अर्चा अवतार म्हणून प्रकट होतात.' कधी कधी अतिशहाणे तर्क करतात की, भगवंत सर्वत्र आहेत तर मग मंदिरातील श्रीमूर्तींची पूजा करण्याची काय आवश्यकता आहे ?' अशा अर्धवट लोकांना श्रील प्रभुपाद यांचे सांगणे आहे, 'जर भगवंत सर्वत्र आहेत तर मग ते मंदिरातही आहेत.' भगवंत सर्वत्र आहेत असे म्हणणे सोपे आहे, परंतु त्यांचे सर्वत्र दर्शन घेऊन त्यांची प्रेममयी सेवा करणे शक्य नाही. त्यामुळेच अल्पबुद्धीच्या लोकांकडून सेवा स्वीकारून त्यांच्यावर दिव्य कृपा करण्यासाठी भगवंत श्रीमूर्ती रूपात प्रकट होतात. 


वेदशास्त्रे आम्हाला वेळोवेळी स्मरण करून देतात, 'वेदशास्त्रांचा अभ्यास हा नेहमी आध्यात्मिक क्षेत्रातील प्रगत अशा आचार्यांकडून वा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच केला पाहिजे.' असे केले तर वेदशास्त्रांचे ज्ञान आपल्याला कळू शकेल. परंतु दुर्दैवाने साम्प्रतचे अनेक बाबा-बापू-हिंदू नेते वा आधुनिक बुद्धिमान लोक या उपदेशांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ते आपला तर्क प्रस्तुत करतात. त्यांना वाटते की संस्कृत भाषेचे ज्ञान हे वेदशास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी पर्याप्त आहे. तसेच काही इंग्रजी पढत पंडित गुगलवर शोध घेऊन चुकीचा अभ्यास करून स्वतःला सर्वज्ञ समजतात. अशा दिड शहाण्यांच्या ठोकताळ्यांमुळे वेदशास्त्रांचा अभ्यास त्यांना चुकीच्या निर्णयाकडे नेतो. असे पढत महामानव आणि त्यांचे दुष्ट प्रवृत्तीचे अनुयायी बेताल बडबड करतात, 'ही वेदशास्त्रे म्हणजे अशा असंबद्ध ग्रंथांचा समूह आहे की ज्यात विरोधाभास करणारी शिकवण दिलेली आहे.' अशा वाचाळ विद्वानांना कधीच दिव्यज्ञान कळणार नाही. हे लोक सदैव पशुवत आचरण करणारे असतात. नशा पान, मांस भक्षण, व्यभिचार आणि जुगार यातच आपला विकास आणि आनंद शोधत असतात. परंतु आदर्श वर्तन करणारे अनेक संत-महात्म्ये आणि आध्यात्मिक आचार्यांनी कधीच असा निर्णय दिल्याचे दिसून येत नाही. असे लोक वेदशास्त्रानुसार स्वतः आदर्श आध्यात्मिक जीवन जगले आणि इतरांनाही त्यांनी वैदिक संस्कृतीचे योग्य मार्गदर्शन केले. सहस्त्रावधी वर्षांपासून हेच घडले आहे.                     
                                
आध्यात्मिक क्षेत्रात प्रगत झालेल्या या महान संतांनी भगवंतांची दिव्य योजना जाणली आणि वेदज्ञानाचा प्रचार करून लक्षावधी भवरोगाने पछाडलेल्या लोकांना त्यांनी भक्त बनवले आणि अगदी याच्या विपरीत आजकालचे हे आधुनिक प्राध्यापक, उद्योगपती, खेळाडू, नट - नट्या, राजकारणी, पत्रकार, लेखक, सत्यशोधक जात्यंध वा धर्मांध नेते स्वतःही भक्त बनले नाहीत आणि इतरांनाही भक्त बनवू शकले नाहीत. त्यांच्या या कुवर्तनामुळे हे आधुनिक विद्वान अतिशयोक्ती करीत आहेत. वेदशास्त्रांविषयी स्वतःच्या कुबुद्धीने तर्कवितर्क करून ते आपली मते मांडत आहेत आणि सत्यज्ञानाच्या विरुद्ध भलतेच काही पसरवत आहेत. असे मूढ विद्वान हे सुद्धा मूर्तीभंजकच आहेत. 

श्रीपाद शंकराचार्य (आद्य), श्रीपाद रामानुजाचार्य, श्रीपाद निम्बाराकाचार्य, श्रीपाद विष्णुस्वामी, श्रीपाद मध्वाचार्य, संत ज्ञानेश्वर माऊली, श्री तुकाराम महाराज आणि श्री रामदास स्वामी इत्यादी भारतातील समस्त भागातील संत, आचार्य वा साधुंनी श्रीमूर्तींचे पूजन केलेले आहे. त्यांनी आपल्या ग्रंथातून भगवद्पूजनाचे उत्तमप्रकारे वर्णन केलेले आहे. चौदाव्या शतकातील महान विद्वान संत श्रीरूप गोस्वामी यांनी वेदशास्त्रांचे अनेक वर्षे सखोल अध्ययन आपल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली केले आणि नंतर घोषित केले, "अध्यात्मिक साधनेच्या महत्वपूर्ण  उपयुक्त कार्यामध्ये अर्चा - विग्रहांचे पूजन, आराधनेचा समावेश होतो. अर्चा - विग्रह पूजनासोबत अन्य चार महत्वपूर्ण कार्ये म्हणजे - भक्तांचा संग घेणे, भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करणे, पवित्र वेदशास्त्रांचे पठण आणि अध्ययन करणे आणि पवित्र तीर्थक्षेत्री यात्रा करणे." यावरून निश्चितच सिद्ध होते कि अर्चा - विग्रह अर्थात श्रीमूर्तींचे पूजन हे वेदशास्त्रानुसारच आहे. 

श्रीमुर्तीपूजन आध्यात्मिक जीवनात महत्वपूर्ण असले तरी कधी कधी दुष्ट लोक प्रश्न करतात, "मूर्ती आपल्या तोंडावर बसलेली साधी माशीसुद्धा का उडवू शकत नाही? "

श्रीमूर्ती रूपातील भगवंत आपल्या मुखावर बसलेली माशी निश्चितच उडवू शकतात ! हे करण त्यांना सहज शक्य असले तरी ते तसे करीत नाहीत. का ? कारण भगवंत स्वतः सर्वशक्तिमान आहेत हे सिद्ध करण्यासाठी श्रीमूर्ती रूपात ते प्रकट होत नाहीत. खरतर, या भौतिक जगात भगवंत, आपले सर्वशक्तिमान असणे शक्यतो प्रकट करीत नाहीत. ते मुर्खांना भ्रमित करण्यासाठी स्वतःला अप्रकट ठेवतात. 

भगवंत स्वतःला अर्चा - विग्रह (श्रीमूर्ती) रूपात या भौतिक रूपात प्रकट करतात. त्यावेळी ते या जगताचे नियम मोडण्यातून आपली दिव्यता प्रकट करत नाहीत. परंतु ते स्वतःच्या दिव्य शक्तीने गंभीरपणे भगवद्भक्ती करणाऱ्या भक्तांचे हृदय परिवर्तन करून त्यांना आध्यात्मिक जीवनात प्रगत करतात. 

कधी कधी मूर्ख लोक पवित्र ग्रंथ जाळतात किंवा फाडतात. असे कुकृत्य करून त्यांना बघायचे असते की या ग्रंथांची दिव्यता कमी होते का ? निश्चितच नाही ! मूर्ख, उद्धट वा उर्मट लोकांना असे करून त्या ग्रंथांच्या दिव्यतेचा अनुभव मिळणे शक्य नाही. जर त्यांना या ग्रंथांच्या दिव्यतेचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांनी भक्तिमय सेवेच्या दृष्टिकोनातून या ग्रंथांचे अध्ययन करणे आवश्यक आहे. अगदी त्याच प्रमाणे श्रीमूर्तींचे आहे. मुर्खांना वाटते की आम्ही  मूर्ती भंजन केले असून यात भगवंत नाहीत परंतु असे मुळीच नाही. ते केवळ दगड फोडतात, पण भगवंताना फोडू शकत नाहीत. 

वेदशास्त्रे विविध प्रकारे स्पष्टीकरण देत असूनही त्यावर आपण मात्र आपली वेडगळ स्पष्टीकरण रेटून देत असतो. वेदशास्त्रात भगवंतांच्या मानवसदृश्य रूपाविषयी अनेक उल्लेख आहेत. असे असताना स्वतःची विकृत मते वा कुतर्क  मांडण्यापेक्षा  सरळपणे अधिकृत वेदशास्त्रांवर नम्रपणे श्रद्धा ठेवणे अधिक लाभकारक नाही का ?

बायबलमध्ये एक चांगले उदाहरण दिलेले आहे - भगवंतांच्या प्रतिमेतून मानवाची जडणघडण झालेली आहे. मानवाच्या प्रतिमेतून भगवंतांची निर्मिती झाली असे कोणतेही आध्यात्मिक शास्त्र सांगत नाही. यास्तव बुद्धिमान माणसाने जाणले पाहिजे की, भगवंत हे मानवाच्या रूपाप्रमाणे नसून भगवंतांच्या मूळ रूपाप्रमाणे मनुष्याचा आकार घडला आहे. 

  ©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : 92421 76587      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा