निर्गुण निराकार
जेव्हा कधी आध्यात्मिक विषयावर चर्चा प्रारंभ होते, त्यावेळी बहुतेक करून काही तथाकथित बुद्धिमान असा दावा करतात की भगवंत निर्गुंण आहेत. ते निराकार आहेत. या विषयावर वाद - विवाद करते वेळी त्या लोकांना बराच हुरूप चढतो. असे लोक मायावादी म्हणून समजले जातात. त्यांच्या बडबडीमुळे खरा जिज्ञासू मनुष्य गोंधळून जातो.
वस्तुतः हे निर्गुण - निराकार शब्द काय सांगतात ते आपण पाहूया. या भौतिक जगात सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तीन गुण आहेत. हे गुण तथा भौतिक प्रकृती भगवान श्रीकृष्णांच्या आधीन आहे. भगवान सर्व शक्तींचे नियंत्रक असल्यामुळे ते आपल्या शक्तींचा वापर स्वतःच्या उद्दिष्टांसाठी करू शकतात. परंतु असे करताना त्यांच्यावर या गुणांचा जराही प्रभाव पडू शकत नाही. परंतु बाकीच्या देवता वा मनुष्य या गुणांच्या आधीन असतात, या गुणांनी युक्त असलेल्यांना सगुण म्हणतात. परंतु श्रीकृष्ण या गुणांच्या पलीकडे असल्याने त्यांना आपण निर्गुण म्हणू शकतो. परंतु मायावादी म्हणतात तसे काही भगवान निर्गुण नाहीत.
तसेच मायावादी म्हणतात भगवंत निराकार आहेत. परंतु भगवंतांना पूर्ण आकारही आहे. आम्हाला भौतिक आकार आहे. आमचा आत्मा आणि शरीर भिन्न आहे. आमचे शरीर भूमी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या पाच भौतिक गोष्टींपासून बनलेले आहे. आमच्या शरीरात कफ, पित्त, वायु, मल, मूत्र, मांस, रक्त असे अनेक पदार्थ आहेत. त्यामुळे आमचे शरीर विशिष्ट आकाराचे आहे. या शरीराला साकार म्हणतात. परंतु भगवान श्रीकृष्णांचे शरीर आणि आत्मा यात काहीच अंतर नाही. तसेच त्यांचे शरीर ( विग्रह ) भौतिक पदार्थांपासून बनलेले नाही. ते संपूर्ण दिव्य आणि शुद्ध आध्यात्मिक आहे. त्यांना भौतिक पदार्थांचा आकार नाही.
मायावादी समजतात तसे भगवंत कधीही निराकार होत नाहीत. परंतु ते साकार असूनही आमच्याप्रमाणे नाहीत. त्यांचे शरीर सच्चिदानंद आहे. मायावादी म्हणतात त्यांचे निराकार स्वरूप आहे किंवा ब्रह्मज्योती आहे. परंतु आस्तिक समजतात ती ब्रह्मज्योती तर भगवंतांच्या दिव्य कांतीचा केवळ प्रकाश आहे वा प्रकाशापलीकडे स्वयं भगवान आहेत.
श्रीमद्भागवतात परम सत्याची संकल्पना पुढीलप्रमाणे दिली आहे - ' परम सत्याचे ज्ञान असणारे परम सत्याचा साक्षात्कार ज्ञानाच्या तीन अवस्थांमध्ये करतात आणि या सर्व एकच आहेत. परम सत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते. '
भगवंत कधीही निराकार होत नाहीत, कारण त्यांचे स्वतःचे शाश्वत रूप आहे; ते आदिपुरुष आहेत. यास्तव श्री इशोपनिषद् म्हणते, ' हे भगवान ! हे सर्व जीवांचे पोषणकर्ता ! आपले खरे मुख आपल्या दीप्तिमान तेजामुळे झाकले गेले आहे. कृपया ते आवरण दूर करा आणि आपल्या शुद्ध भक्ताला दर्शन द्या.
तर आपण सदैव ध्यानात ठेवले पाहिजे की भगवान श्रीकृष्णांना शाश्वत, सच्चिदानंद स्वरूप आहे. परंतु ते रूप त्यांच्या भक्तानाच पहावयास मिळते. नास्तिक लोकांसमोर ते प्रकट होत नाहीत.
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : 92421 76587
धनसंचयाच्या योजना
सध्या आपला देश फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. विदेशी कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे . ऐकाकाळी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत असे. हा देश सुजलाम सुफलाम म्हणून संबोधला जात असे.
आपल्याला इतिहासातून कळते की फार पूर्वी शक, हूण, कुशाण, मोंगल यांनी या देशाची लूटमार केली. त्यानंतर इंग्रजांनी आणि त्यानंतर स्वकियांनी या देशाला लुटले. प्रत्येक व्यक्ती असा विचार करते की मला माझ्या बुद्धिचातुर्याने जेवढे काही खाता येईल तेवढे खाणे आणि हे माझे आहे आणि मीच त्याचा एकमेव भोक्ता आहे. हे सर्व माझ्या सुखासाठीच आहे. परंतु माणूस हे सर्व जाणून घेण्यास तयार नाही की वस्तुतः या जगातील प्रत्येक चेतन किंवा जड पदार्थांचे मूळ मालक भगवान श्रीकृष्ण आहेत आणि तेच एकमेव भोक्ता आहेत. तेच नियंत्रक आहेत आणि त्यांनी आमच्या आवश्यकतेसाठी जेवढे आम्हाला दिले आहे तेवढ्याच गोष्टींचा आम्ही स्वीकार करावा. असे ज्यावेळी आम्ही करू, त्याच वेळी आम्हाला वास्तविक शांती मिळेल, सुख मिळेल.
परंतु कलियुगाच्या प्रभावामुळे सर्वसामान्य लोक इतके पतित आणि मूढ झाले आहेत की त्यांना वाटते की मी जर अधिक पैसा मिळविला तर सुख लवकर मिळेल. भक्तराज प्रह्लाद महाराज सांगतात, "धन इतके प्रिय असते की लोक त्याला मधापेक्षा मधुर समजतात. तर मग असा कोण असेल की जो धन संग्रह करण्याच्या भुकेचा परित्याग करू शकेल आणि ते सुद्धा गृहस्थजीवनात ? चोर, व्यावसायिक नोकर तथा व्यापारी आपल्या प्रिय प्राणांची बाजी लावून धन प्राप्त करू इच्छितात." - भागवत ७.६.१०
पैशाच्या मागे लागलेल्या लोकांविषयी भगवान श्रीकृष्ण सांगतात " इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंतानी ग्रासलेले असते. शेकडो, हजारो आशारुपी पाशांनी बद्ध झालेले कामक्रोधपरायण झालेले हे आसुरी लोक इंद्रियतृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. आसुरी मनुष्य विचार करतो की, आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उतरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौजमजा करेन, अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. " भगवद्गीता १६. ११. १२. १३. १४. १५
तर अशा अनेक आर्थिक योजनांद्वारे आपण सुखी होऊ असे राजकारणी, अर्थतज्ज्ञ, विचारवंताना वाटते. परंतु हे सर्व प्राप्त करूनही लोक सुखी - समाधानी होत नाहीत. असे का? कारण एकच की कोणीही हे जाणून घेण्यास तयार नाही की वास्तविक मालक श्रीकृष्ण आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे.
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : 92421 76587
कृष्णप्रेम
कृष्णभावनामृताचा प्रचार करते वेळी, सर्वसामान्य लोकांच्या लाभासाठी भक्त त्यांना कृष्णप्रसाद देतात. त्यावेळी लोक अनेक चित्रविचित्र प्रश्न विचारतात हा प्रसाद इतका स्वादिष्ट का ? इतका अद्भुत का ?श्रीकृष्ण इतका चांगला नैवेद्य स्वीकारीत असतील तर मग तो अर्पण करण्यास आम्हाला परवडेल का ? हे सर्व करणे अत्यंत खर्चिक आहे. आम्हाला जमणार कसे ? परंतु हे सर्व अज्ञान आहे.
पूर्ण पुरुषोत्तम भगवान स्वतःच 'आत्माराम' आहेत. ते पूर्ण आहेत. त्यांना कोणत्याही ऐश्वर्याची वा पदार्थाची मुळीच आवश्यकता नाही. ते अत्यंत कृपाळू आहेत. आम्ही त्यांच्यावर प्रेम करावे यास्तव ते त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला प्रदान करतात. ते सांगतात जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तिने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो."
अर्थात या जगातील गरीबातील गरीब मनुष्य भगवान श्रीकृष्णांना एखादी लहानशी वस्तु प्रेमाने अर्पण करून कृष्णप्रेम प्राप्त करू शकतो. त्यांने अर्पण केलेल्या पदार्थाचा श्रीकृष्ण आनंदाने स्वीकार करतात तथा त्या मनुष्याचा या दुःखमय जगातून उद्धार करतात. परंतु त्यासाठी मनुष्याला श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असणे आवश्यक आहे.
प्रेमाने आणि भक्तीने अर्पण केलेल्या पदार्थांचा श्रीकृष्ण आनंदने स्वीकार करतात, त्यामुळे त्यांचा प्रसाद स्वादिष्ट आणि अद्भुत लागतो. कारण त्यांच्या स्पर्शामुळे प्रसाद दिव्य बनतो. तसेच श्रीकृष्णांनी आम्हाला जेवढी शक्ती दिली आहे त्यानुसार आपण त्यांची सेवा केली पाहिजे. श्रीकृष्णांच्या लिलातून आपण कीतीतरी उदाहरणे पाहू शकतो. पांडव आणि द्रौपदी वनवासात असते वेळी, त्यांना पीडा देण्यासाठी दुर्योधन दुर्वासा मुनींना वनात पाठवितो. त्यावेळी अत्यंत संकटकालीन स्थितीत द्रौपदी श्रीकृष्णांना पुकारते तथा त्यांना ती केवळ एक कण अन्न देऊ शकते. पुढे श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि दुर्वास मुनींचे संकट टळते. पुढे श्रीकृष्ण पांडवांचे दूत बनून हस्तीनापूरला जातात. त्यावेळी दुर्योधन त्यांना सोन्याच्या ताटातून ऐश्वर्यशाली राजभोग अर्पण करू इच्छितो. परंतु श्रीकृष्ण प्रसन्न होत नाहीत. ते त्याचा स्वीकार करीत नाहीत. ते महात्मा विदुरांच्या घरी जातात आणि त्यांच्या पत्नीने प्रेमाने अर्पण केलेली केळीची सालेही खातात.
श्रीकृष्ण आपल्या बाल मित्राने, सुदाम्याने कळकट पंचातून बांधून आणलेले पोहे त्याच्याकडून जबरदस्तीने काढून घेतात आणि मोठ्या आनंदाने ग्रहण करतात. श्रील प्रभुपाद सांगतात की श्रीकृष्णांना प्रेममयी सेवे व्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा नसते. श्रीकृष्ण एखाद्या फुलाचाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात. ते अभक्तांकडून कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करीत नाहीत. ते स्वावलंबी असल्यामुळे त्यांना कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा नसते. तरीही ते भक्ताकडून प्रेमभावाचे आदानप्रदान करण्याकरिता ते भक्ताच्या भेटीचा स्वीकार करतात. इतर कोणत्याही साधनाने उदाहरणार्थ ब्राह्मण, विद्वान, पंडित, गर्भश्रीमंत किंवा महान तत्तवज्ञानी झाल्याने आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही.
भगवान श्रीकृष्ण सांगतात, "मी कोणाचाही द्वेष करीत नाही. तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत. परंतु जो कोणी भक्तीभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे. माझ्याठायी स्थित आहे आणि मीसुद्धा त्याचा मित्र आहे."
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : 92421 76587
प्रजाभक्षक आणि लिंग लंपट
दस्यूत्कृष्टा जनपदा वेदाः पाषण्डदूषिताः।
राजानश्च प्रजाभक्षा: शिश्नोदरपरा द्विजाः ।।
'महानगरे चोरांनी भरलेली असतील, वेद नास्तिकांनी केलेल्या व्याख्येद्वारे दूषित केले जातील. राज्यकर्ते प्रजेचे भक्षण करतील आणि तथाकथित बुद्धिजीवी वा ब्राह्मण आपले उदर आणि जननेंद्रियाचे भक्त होतील.' (भागवत १२. ३. ३२)
दस्यूत्कृष्टा जनपदा -
जगातील मोठमोठ्या नगरांतून, दादा, भाई, गुंड आणि तस्करांचे राज्य चालते. सामान्य माणसांचा गळा आणि खिसा कधी कापला जाईल याची शाश्वती नसते. मंगळसूत्र-साखळी चोरणारे, खिसेकापू, भुरटे चोर, मादक पदार्थ विकणारे, अनेक प्रकारच्या चोऱ्या करणारे बदमाश महानगरातून भरलेले आहेत. मुंबईसारख्या महानगरांतील चोरांकडून लक्षावधी रुपयांची मालमत्ता पोलिसांनी पकडली आहे. पुण्याचा एक कुप्रसिद्ध चोर विमानाने आणि अलिशान गाड्यातून फिरत असे केवळ चोऱ्यांसाठी. मोठमोठे बिल्डर्स, शेअर दलाल हे सर्व याच कुळातील आहेत. व्यापारी लोकही यातीलच आहेत. गोमांस, तंबाखू, दारू, शीतपेये वा अन्य झटपट खाद्यपदार्थ विक्री करणारे व्यापारीही महानगरांतून मोठ्या प्रमाणावर आहेत. हे सफेद कपड्यातील चोर हानिकारक वस्तू लोकांनी खरेदी कराव्यात म्हणून चांगलेच गोड बोलून माल खपवतात. आधुनिक कार्पोरेट जगामधील धनदांडगे आपला माल खपविण्यासाठी विविध माध्यमांतून जाहिराती करून निःसंकोचपणे लूटमार करतात. यातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मायाजाल तर भयंकर आहे. पूर्वी मोंगलादी लुटारू घोड्यांवर बसून येत. तर इंग्रजादी पाश्चिमात्य नौकेतून येत आणि येथे मुंबई-कोलकाता सारखी महानगरे वसवून लूटमार करत. आता मात्र ते आपल्याच देशात बसून संगणकाद्वारे लूटमार करतात.
वेदाः पाषण्डदूषिताः --
नास्तिक लोक आपल्या मनमानी ढंगाने वेद भ्रष्ट करीत आहेत. यांच्या विषयी महाभारतात (१. १. २३८) सांगितले आहे -
इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृम्हयेत् ।
बिभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रहरिष्यति ।।
'रामायण-महाभारत अशा इतिहास आणि पुराणांचा अभ्यास करून वेदांचा अभ्यास पूर्ण केला जातो. कारण अर्धवट वेद शिकलेल्या माणसाची वेदांना अशी भीती वाटते की हा माणूस माझ्या अर्थाचा अनर्थ करून माझ्यावर जणू प्रहारच करील.'
भागवतात सांगितल्याप्रमाणेच वेदशास्त्रांची मोडतोड करण्यात देशी-विदेशी तथाकथित विचारवंत अग्रेसर आहेत. मिशनरी लोक योगाला- क्रिस्टोगा करतात, तर आयुर्वेदाला अन्य साज चढवून त्याची विक्री येथेच करतात. विदेशातील विश्वविद्यालयातून हिंदुत्वाची शिकवण शिकवली जाते. त्यातून भारतीय धर्मात अनेक ईश्वरवाद सांगितला असून त्याचा उद्देश निर्विशेष मोक्ष आहे. परंतु याच्या विपरीत अमर्याद प्रमाणे मिळतात. वस्तुतः संपूर्ण वेद वाड्मय एक आहे. जसे भगवद् गीतेत (१५.१५) स्वयं भगवान श्रीकृष्ण सांगतात -
वेदेश्च सर्वैरहमेववेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ।
'सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.'
सर्व वेद वाड्मयाचा उद्देश परमपुरुष परब्रह्म विष्णू वा कृष्ण यांच्या विषयी आम्हाला प्रबुद्ध करणे हा आहे. यद्यपि ईश्वर अनेक नावांनी संबोधला जातो आणि अनेक रूपांत प्रकट होतो, तरीही तो एकच आहे. परंतु कलियुगात हे खरे वैदिक ज्ञान गुप्त आहे.
श्रीपाद आद्य शंकराचार्य सांगतात -
एकं शस्त्रं देवकी पुत्र गीतम्
एको देवो देवकीपुत्र एव ।
एको मन्त्रस्तस्य नामानि यानि
कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ।।
'केवळ एकच शास्त्र. ते म्हणजे भगवद्गीता. केवळ एकच देव तो म्हणजे देवकीपुत्र (श्रीकृष्ण). एकच मंत्र, तो म्हणजे त्यांचे नाम आणि एकच कर्म म्हणजे त्यांची भक्तिमय सेवा.'
राजानश्च प्रजाभक्षा: -
राज्यकर्ते प्रजेचे भक्षण करतील.
कलियुगाच्या प्रारंभानंतर जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे दिसून येतात की राज्यकर्त्यांनी प्रजेचे भक्षण कसे केले आहे. काही उदाहरणे पाहूया. हिटलरने ६० लक्ष ज्यूंचे हत्याकांड केले. तर स्टॅलीनने पोलंडच्या डँझिंग बंदराच्या पट्ट्यात दोन कोटी लोकांना ठार मारले. चीनने तिबेट गिळंकृत करून तेथे नरसंहार केला. त्याआधी जपानने चीनवर रासायनीक पदार्थ टाकून नरसंहार केला. पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान निर्मितीसाठी जीनने 'प्रत्यक्ष कृती' चा आदेश देताच लक्षावधी हिंदूंचे शिरकाण केले गेले. भारतात आजही सत्ताधीश विरोधकांचे म्हणजेच आपल्याच प्रजेचे विविध प्रकारे भक्षण करतात. ही केवळ त्रोटक माहिती आहे. गेल्या तीनशे वर्षांत युरोपातून अमेरिकेत गेलेल्या विविध देशांनी मूळ अमेरिकन 'रेड इंडियन्स आणि इंडियन्स' यांचा संहार केला. तो जवळजवळ चार कोटींपेक्षा अधिक आहे.
शिश्नोदरपरा द्विजाः -
तथाकथित पुरोहित वा विचारवंत आपले पोट आणि जननेंद्रियाचे भक्त होतील.
कुठल्याही धर्मात पहा त्यांचे धर्मगुरु, पाद्री, मुल्ला-मौलवी, भिक्षुक वा पुरोहित हे सर्वजण केवळ पोट भरण्यासाठीच धडपडत असतात. दिवस पोट भरण्यात आणि रात्र जननेंद्रियाच्या तृप्तीत जाते. तसेच तथाकथित विचारवंत, बुद्धिमान लेखक, प्राध्यापक वा शिक्षकही याच कार्यांत मग्न असतात.
श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात -
जिह्वार लालसे येइ इति-उति धाय ।
शिश्नोदरपरायण कृष्ण नाहि पाय ।।
'जो मनुष्य आपल्या जिभेचा दास आहे आणि त्यासाठी इकडे तिकडे भटकतो आणि आपले शिश्न आणि पोट भरण्यात मग्न आहे, तो श्रीकृष्णांना प्राप्त करू शकत नाही.'
ज्याला ईश्वर साक्षात्काराची अभिलाषा आहे, त्याने या दोन गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे.
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : ९२४२१ ७६५८७