बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

            भ्रामक राष्ट्रवाद आणि धर्मशासन 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी हे प्रखर राष्ट्रवादी होते. परंतु त्यांच्या संकल्पनेचा विनाकारण विपर्यास झाला आहे, असे मत काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील केंद्रिय मनुष्यबळ विकास खात्याच्या संशोधन समितीने मांडले होते. त्याविषयीचे 'गैरसमज'  दूर  करण्यासाठी एक परिसंवाद आयोजित करण्याचा  या समितीचा
 मानस आहे. या समितीच्या एका  ज्येष्ठ सदस्याने  आपले मत मांडताना अनेक प्रकारे बडबड केली होती. आम्हाला त्यांचे नाव ज्ञात  झाले नाही. त्यामुळे सध्या आम्ही त्यांना 'पंतोजी' असे संबोधू! त्यांच्या भरमसाठ बोलण्यातील एका वाक्याकडे आमचे लक्ष्य वेधले गेले. ते वाक्य असे होते - 'ते हिंदूराष्ट्र अशी संकल्पना मांडत असतात, तेव्हा खरे तर तो प्रखर राष्ट्रवादच असतो. ही ईश्वरशासित पध्दती नव्हे, तर धर्मशासित पध्दती आहे. 
आता या वरील वाक्यावरून तथाकथित थोरकट विचारवंत कसा वैचारिक गोंधळ घालतात यावर आम्ही काही चर्चा करणार आहोत. ही चर्चा डोळयांना झापड लावलेल्या अनुयायींना आवडणार नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. तसेच ते आमच्यावर अप्रसन्न होणार याचीही पूर्ण जाणीव नव्हे तर अनुभवही आहे. 
या वाक्यातील भोंगळपणा किंवा भिन्नता कशी आहे ते पहा. ' राष्ट्रवाद  ही ईश्वरशासित पध्दती नव्हे.' पंतोजींचे हे म्हणणे अगदी शतप्रतीशत खरे आहे. ते कसे? त्यांनी ईश्वर म्हणजे कोण हे स्पष्ट न केल्यामुळे आम्ही   
ईश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण असे गृहीत धरूया. श्रीकृष्णांनी भगवद् गीतेत कोठेही 'प्रखर राष्ट्रवाद' मांडलेला नाही. किंबहुना कोणत्याही वेदशास्त्रे, पुराणे, रामायण वा महाभारतादी प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये या विषयी प्रखर वा साधक बाधक चर्चा सुद्धा केलेली नाही. ते कसे काय? वस्तुतः प्राचीन काळापासून या संपूर्ण पृथ्वीलाच भारतवर्ष म्हणून संबोधले जात असे. शकुंतला आणि दुष्यंत पुत्र भरताने या संपूर्ण पृथ्वीला आपल्या अंकीत ठेवले होते. त्याच्या नावावरून या वसुंधरेला अर्थात पृथ्वीला भारतवर्ष म्हणत होते. ही पृथ्वी, भूदेवी असून ती श्रीविष्णूंची शाश्वत पत्नी आहे. 
कलियुगाचा प्रारंभ झाल्यानंतर या पृथ्वीवरील भूमीचे अनेक तुकडे विभागले जाऊन त्यातील एका विशिष्ट भूभागाला भारतभूमी म्हणण्याचा प्रघात अलीकडच्या काळातील आहे. पुढे भाषावार प्रांत रचना करून या भारतमातेचे आणखीन विभाग करून त्यांना कर्नाटक माता; नागालँड, तामिळनाडू (नाडू म्हणजे राष्ट्र वा देश), महाराष्ट्र, सौराष्ट्र, वंगदेश, तेलगूदेशम्, तुळूनाड, प्रदेश, गढ, स्थान इत्यादी संबोधले जात आहे. 
त्यात कर्नाटक मातेच्या लालपिवळया कुपुत्रांनी स्वतंत्र कर्नाटक ध्वजाची मागणी केली आहे.  या सर्व मागण्या वा संकल्पना मानव निर्मित असून पंतोजी म्हणतात तो प्रखर राष्ट्रवादही मानव निर्मित आहे. त्या संकल्पनांचा ईश्वर-शासित पद्धतीशी काहीही संबंध नाही. त्यांचे म्हणणे अगदी सोळा आणे खर आहे. 
प्राचीन काळी क्षत्रिय राजा आपल्या बाहुबळाने जेव्हडा  भूभाग  जिंकून आपल्या अधिपत्याखाली ठेवत असे, तेवढया भूभागाला तो स्वतःचे राज्य, साम्राज्य वा देश म्हणत असे. तेथील समस्त प्रजेला आपल्या अंकीत ठेवून, त्या प्रजेचे पुत्रवत पालन करीत असे. तो आपण नव्याने जिंकलेल्या भूमीवरील प्रजेची कत्तल करीत नसे. तेथील प्रजेचे पालन पोषण करताना तो भेदभाव करीत नसे. प्रजा म्हणजे केवळ मनुष्य प्राणीच नव्हे तर सर्व प्रकारचे पशू, पक्षी, सरपटणारे जीव, जलचर आणि वनस्पती, वृक्षवेली 
यासर्वांना प्रजा म्हटले जाते. पूर्वी वेदांना प्रमाण मानणारे राजे अशा प्रकारे वागत. श्रीविष्णू जसे संपूर्ण सृष्टीचे पालन पोषण करतात तसेच येथील राजे समस्त प्रजेचे पालन पोषण करतात, यास्तव राजाला श्री विष्णूंचा प्रतिनिधी म्हणून संबोधले जात असे. 
या संपूर्ण पृथ्वीचे शेवटचे सम्राट परीक्षित महाराज होते. त्यानंतर सर्वत्र कलिचे साम्राज्य पसरल्यामुळे पृथ्वीवरील भारतवर्षाचे तुकडे पडू लागले. जो तो आपापल्या परीने तुकडे पाडून आपला देश निर्माण करू लागला. आणि तुकडे पडण्याची  प्रक्रिया सतत चालू असून युनोच्या कार्यालयाबाहेर नित्य नवा राष्ट्रध्वज वाढतच आहे. 
प्रत्येक व्यक्ती आपल्या संकल्पनेनुसार आपल्या भूभागाला राष्ट्र म्हणून संबोधेल  आणि आपला राष्ट्रवाद मांडेल. काही काळ एखाद्या व्यक्तीने मांडलेले मत काही लोकांना प्रभावित करेल आणि त्यानुसार क्रांति धडवून ते आपले राष्ट्र उभारतील. कार्ल मार्क्सच्या वादाने रशियात लेनिनने साम्यवादी राष्ट्र उभे केले आणि पुढे ते लयास गेले. त्यापूर्वी युरोपीय देशांनी भांडवलवाद मांडून संपूर्ण जग वेठीला धरले होते, परंतु ते सुद्धा नष्ट झाले. पुढे अन्य कोणी अधिक आकर्षक वाद मांडेल आणि नवीन पिढी तो उचलून धरेल. ते आपले शासन चालवतील आणि  कालांतराने अन्य कोणी ते नष्ट करेल. प्रतिदिन सूर्य उगवतो आणि मावळतो, ऋतू येतात आणि जातात हे जसे अव्याहतपणे चालूच असते त्याप्रमाणे सर्व प्रकारचे वाद चालूच असतात. त्यामुळे पंतोजी म्हणतात ते खरे आहे 'राष्ट्रवाद ही ईश्वरशासित पद्धत नव्हे.' पण त्यांचे हे  वचन अर्धसत्य आहे!
या भौतिक जगातील प्रत्येक मानवामध्ये चार प्रमुख दोष असतात, मात्र भगवंतांकडे हे चार दोष नसतात. तसेच जे बोटावर मोजता येईल असे काही विरळाच भगवद्भक्त आहेत त्यांच्याकडेही ते चार दोष नसतात. ते 
चार दोष कोणते? 
१) मनुष्य निश्चितपणे चुका करतो. 
२) मनुष्य मोहग्रस्त किंवा भ्रमात असतो. 
३) त्याची इंद्रिये निःसंशय अपूर्ण असतात. 
४) त्याच्यात इतरांना फसविण्याची वृत्ती असते. 
या चार मानवी दोषांमुळे प्रत्येक वेळी मानव निर्मित राष्ट्रवाद प्रारंभी आदर्शवत वाटतो आणि कालांतराने निकृष्ट वाटून टाकाऊ होतो. 
इस्लामी आक्रमणानंतर भारतीत अनेक राज्ये लयास गेली आणि वेगळीच
विकृत विचारसरणी रुजली आणि फोफावली. त्यांच्या नंतर आले इंग्रज; अतिशय धूर्त आणि लुच्चे! या कावेबाज गोऱ्यांनी भारत आणि अन्य अनेक देशांवर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यांच्या विरुद्ध लढव्यासाठी भारतीय लोक पहिल्यांदा  व्यापक प्रमाणात एकत्र आले आणि पहिले स्वातंत्र्यायुद्ध १८५७ मध्ये घडले. परंतु या युद्धात इंग्रज विजयी झाले. त्यानंतर इंग्रजांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण करण्याचे आणि स्वतंत्र भारत घडविण्याचे महत कार्य टिळकांनी केले. त्यांचा राष्ट्रवाद त्याकाळी लोकांना भावला आणि टिळक लोकमान्य झाले. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर गांधींचे  षंढयुग प्रारंभ झाले. प्रखर टिळकवाद मागे पडला. अनेक जहालवादी टिळकभक्त गांधी भजनाला लागले. गांधीवाद इतका प्रचंड फोफावला आणि लोक षंढवादी बनले. या षंढ गांधीवादाचा किती भयंकर परिणाम देशाला भोगावा लागणार आहे याचे 
भाकित स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वेळोवेळी व्यक्त केले. गांधी गोंधळावर प्रखर प्रहार करीत स्वातंत्र्यवीरांनी हिंदुराष्ट्रवाद मांडला. पण गांधी हत्येनंतर सावरकरवाद मागे पडला. गांधी हत्येचा पद्धतशीरपणे लाभ उठवत गांधींच्या अनुयायींनी भोंगळ गांधीवादाची लक्तरे बनवून त्याला समाजवाद, समतावाद, साम्यवाद वा भोगवाद यांची ठिगळे जोडून भारतवासीयांचे  बेसुमार शोषण केले. 
काही प्रमाणात सावरकरवाद तेजस्वी आणि देशहितकारक असूनही षंढत्वाने ग्रासलेल्या भारतीयांना वा हिंदुना पचला नाही. त्याचे साधे आकलनही झाले नाही. त्यामुळे प्रखर हिंदूराष्ट्रवाद मुठभर लोकांच्या तोंडी आणि लेखणीत अडकून पडला. 
भोंगळ गांधीवादामुळेच लोक दुःख भोगत राहिल्यामुळे त्यातूनच अन्य विखारी वाद निर्माण झाले. उदाहरण: नक्शलवाद, आतंकवाद, मावोवाद वा नास्तिकवाद, भोगवाद, चंगळवाद इत्यादी. 
आता घ संघ प्रणीत मोदी विकासवाद आणि त्याच्या आडून अन्य वाद प्रस्थापित केला जात आहे. याची  भूरळ अनेकांना पडली आहे. कधी कधी आम्ही सुद्धा मोहग्रस्त होतो. कालांतराने हा राष्ट्रवादही मागे पडणार आणि दुसराच कुठलातरी राष्ट्रवाद उगवणार. त्यावेळी तो उचलून धरणारे लोकही आस्तित्वात असणारच !
प्रत्येक काळातील राष्ट्रवादामुळे त्याकाळातील लोकांचे काही प्रमाणात मनोरंजन झाले. काहींना मानसिक आनंद मिळाला आणि काहींना इंद्रियसुख मिळाले. तर काहींना याच्या विपरीत दुःख प्राप्त झाले. 
पंतोजींचे पुढील अर्धवाक्य असे आहे - 'तर धर्मशासित पद्धत आहे.' आधी बोलले की, 'राष्ट्रवाद ही ईश्वरशासित पद्धत नव्हे' आणि पुढे म्हणतात, 'तर धर्मशासित पद्धत आहे.' काय गंमत आहे पहा; 'रामराज्य हवे पण राम नको.' श्रीरामांनी लागू केलेली ईश्वरशासित पद्धत नको; पण मानव निर्मित धर्मशासित पद्धत हवी. हा कोणता भोंगळपणा आहे? ही धर्मशासित पद्धत म्हणजे काय? किंवा कोणत्या पद्धतीला धर्मशासित पद्धती म्हणतात? यांना अभिप्रेत असलेला धर्म कोणता आणि ईश्वराला अभिप्रेत असलेला धर्म कोणता? असे अनेक प्रश्न येथे उपस्थित होतात. 
वस्तुतः ईश्वर प्रणित धर्म, वेदांचे परिपक्व फळ असलेल्या भागवत पुराणात सांगितला आहे - 'धर्मम् तु साक्षात् भगवत् प्रणितम् । अर्थात भगवंत सांगतात तो धर्म आणि बाकी सर्व अधर्म! वेद, रामायण, महाभारत, पुराणे, उपनिषदे इत्यादींमधून हा भगवद् प्रणित धर्म सुस्पष्टपणे सांगितलेला आहे.  या धर्मावर कधीही पुट चढत नाहीत. जळमटे वा किल्मिषे धरत नाहीत. तथाकथित भौतिकतावादी विद्वान म्हणतात त्याप्रमाणे हा पोथ्या पुराणातील बुरसटलेला धर्म नाही. हा धर्म सूर्य प्रकाशाप्रमाणे स्वच्छ आहे. वर्षा ऋतुत जसे काळेकुट्ट ढग एकत्र आल्यावर आपल्या नेत्रपटलांसमोरून सूर्य अदृश्य होतो. त्यावेळी आपल्याला वाटते की सूर्याला ढगांनी गिळंकृत केले आहे, सूर्य मंदावला आहे. पण असे मुळीच  नसते. हा आपला दृष्टिदोष आहे. ढगांपलिकडे सूर्य पूर्वीप्रमाणेच तेजस्वी आहे. अगदी तसेस आहे भगवत्प्रणित धर्माचे! या
भगवत्प्रणित तेजस्वी धर्मावर मानव निर्मित पुटे चढलेली आहेत. त्यामुळे तो धर्म आपल्याला तेजस्वी वाटत नाही. परंतु प्रामाणिक आणि प्रामाणित
 भगवद्भक्तांना या तेजस्वी धर्माचे ज्ञान आहे. त्यांनी वेळोवेळी झाडू मारून ही मळभटे वा घाणीची  पुटे स्वच्छ केलेली आहेत. परंतु दुर्दैवाने इंग्रजी शिक्षण घेतलेल्या तत्कालीन नेत्यांनी 'गुरु-साधू आणि शास्त्र' यांचा संग न करता आपली भौतिक बुद्धी वापरून अधिकच जळमटे निर्माण करून सावळा गोंधळ घातलेला आहे. सद्गुरूंच्या आश्रयाला न जाता, हे काळेढग वा घाण स्वच्छ न करता, आपली तथाकथित वैयक्तिक मते मांडून नवनविन राष्ट्रवाद निर्माण केला आहे. या तथाकथित विद्वानांनी, नव प्रेषितांनी वा नेत्यांनी आपला स्वयंप्रेरित धर्म मांडला आहे. त्यांना या मानव निर्मित धर्माचे धर्मशासन स्थापीत करायाचे आहे. पुनः पुन्हा त्याच त्याच गंभीर चुका करून हे महामानव प्रभू श्रीराम प्रणित भगवद शासन अर्थात रामराज्य  नाकारून मानव निर्मित अल्पायुषी धर्मशासन स्थापू इच्छित आहेत. या मानव निर्मित 'धर्मशासित पद्धती' मध्ये  इंद्रियतृप्तीला प्रचंड प्रोत्साहन असल्यामुळे बहुसंख्य हिंदू या पद्धतीला उचलून धरतात. 
कलियुग प्रारंभ झाल्यापासून भारतात अनेक लहान मोठे राजे - महाराजे होऊन गेले. त्यांनी बांधकेली मंदिरे, धरणे , सरोवरे , रचलेली ग्रंथ संपदा, साधू-संत, पंडित, कलावंत इत्यादी गुणीजनांना दिलेला राजाश्रय  यावरून कळून येते की, त्यांची राज्य आणि न्यायव्यवस्था ही ईश्वरप्रणित धर्मशासित होती. या राज  परंपरेतील  सर्वश्रेष्ठ आणि अंतिम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! शिवराय अतिशय नम्रतेने म्हणत - 'हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा! त्यांनी आपल्या कार्याचे श्रेय भगवंतांना अर्पण केले होते. आजच्या राजकारण्यां प्रमाणे केवळ तोंडाने बोलायचे  एक  आणि  कृती मात्र भलतीच करायची असे वागणे शिवरायांचे नव्हते. त्यांच्या  प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी भगवंतांचे  अधिष्ठान होते. भगवंतांचे प्रामाणिक प्रतिनिधी बनून त्यांनी आपल्या प्रजेचे  संरक्षण आणि पालन पोषण केले होते. परंतु आता तसे होणे शक्य नाही. कारण ही ईश्वरालाच बहिष्कृत केलेली  मानव निर्मित भ्रष्ट धर्मशासित पद्धती आहे. 'राम विरहीत  रामराज्य!'
 ©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 

संपर्क : 92421 76587 


सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

                             १.  आमची अवस्था 
                               (कलियुगाची लक्षणें )

भागवत पुराणाच्या प्रथम स्कंधातील, प्रथम अध्यायातील दहाव्या श्लोकात सध्याच्या स्थितीचे मार्मिक वर्णन केलेले आहे. ते असे - 
प्रायेणाल्पायुष: सभ्य कलावस्मिन् युगे जना: ।
मन्दा: सुमन्दमतयो मन्दभाग्या ह्युपद्रुता: ।।
'हे सभ्य! कलियुग नामक या लोहयुगात लोक अल्पायुषी आहेत. ते भांडखोर आहेत, आळशी आहेत, मार्ग चुकलेले आहेत, दुर्दैवी आहेत आणि पूर्णपणे त्रासलेले आहेत.'
पाच सहस्र  वर्षांपूर्वी एकदा नैमिषारण्य नामक पवित्र स्थानी, श्री शौनक प्रमुख असलेल्या महर्षी गणांनी भगवान आणि त्यांचे भक्त यांच्या प्रसन्नतेसाठी एका महान यज्ञाचे आयोजन केले होते. हा यज्ञ एक सहस्र  वर्षे चालणार होता. महान ऋषी मुनी जनकल्याणासाठी नेहमी उत्सुक असतात, कारण सर्व सामान्य लोकांना शांतता आणि समृद्धीचा चांगला मार्ग कोणता ते ज्ञात नसते. परंतु ऋषीमुनींना तो मार्ग माहीत असतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय कशात आहे याचे ज्ञान त्यांना असते. जगात शांतता नांदेल अशी समाजकार्ये संपन्न करण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात. ते सर्व रंजलेल्या गांजलेल्यांचे खरे शुभचिंतक असतात. ते स्वतः सर्व प्रकारचे कष्ट सोसून सर्व लोकांच्या हितार्थ भगवंतांच्या सेवेत सदैव मग्न असतात. चिंता करतो विश्वाची अशी त्यांची अवस्था असते. सध्याच्या नास्तिक पुढाऱ्यांच्या सर्व योजना पदोपदी कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे बहुजन समाज हा आधुनिक जडवादी - भोगवादी बनून भगवद्संबंधापासून वेगळा झाला आहे. अशा अंध समाजाला दिव्य दृष्टी प्रदान करून सुखी बनविण्यासाठी हे ऋषिमुनी एकत्र आले होते.

एके दिनी सर्व ऋषिमुनींनी यज्ञाग्नी  प्रज्वलित करून प्रभात समयीची कर्तव्ये संपन्न केली आणि वरिष्ठ ऋषी श्री सूत गोस्वामींना सन्मानपूर्वक उच्चासन देऊन त्यांना जनकल्याणार्थ अनेक प्रकारे पृच्छा केली. त्यातील एका पृच्छेचे वर्णन वरील श्लोकात केले आहे. त्यात ते म्हणतात - प्रायेणाल्पायुष: अर्थात अल्पायुषी

कलियुगातील माणसे अल्पायुषी आहेत. या आधीच्या युगातील माणसांचे आयुष्य दीर्घ होते. सत्ययुगातील मनुष्याचे आयुष्य एक लक्ष वर्षे होते. त्यानंतरच्या त्रेतायुगातील मनुष्यांचे आयुष्य दहा सहस्र  वर्षे होते, तर द्वापर युगातील मनुष्यांचे आयुष्य एक सहस्र  वर्षे होते आणि प्रारंभ झालेल्या कलियुगातील माणसांचे आयुष्य केवळ शंभर वर्षेच असल्यामुळे ऋषीमुनी म्हणतात, प्रायेणाल्पायुष: शंभर वर्षे आयुष्य असूनही माणसे आधीच मरत आहेत. असे का? कोणी म्हणेल की, अन्नधान्यांची भीषण टंचाई आहे. पण हे खरे नाही. आयुष्य कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे अनियमितपणाच्या घाणेरड्या सवयी. चांगल्या नियमित सवयी आणि साधे अन्न खाण्यामुळे माणूस आपले आरोग्य चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. आवश्यकतेपेक्षा हावरटाप्रमाणे अन्न खाणे, अनावश्यक चंगळ करणे, इंद्रियतृप्तीसाठी सदैव धडपडणे, बांडगुळाप्रमाणे दुसऱ्याच्या दयेवर अवलंबून राहणे आणि कुत्रिम पद्धतीने जगणे, यांमुळे मनुष्यांच्या जीवनशक्तीचाच नाश होत आहे. त्यामुळेच माणसाच्या आयष्याचा कालावधी अल्प झाला आहे. 

रात्री उशीरा झोपणे, मद्यपान - मांसाहार यांचे सेवन करणे, सकाळी उशीरा उठणे, उठताच तोंडात रसायने कोंबणे. खाण्या - पिण्यात सडलेले पदार्थ, रासायनिक प्रभावाने दिसण्याला चांगले असलेले पदार्थ खाणे. थोड्याशा पैशासाठी भयंकर कष्ट करणे किंवा फसवणूक, धोका, लूटमार करणे अशा वाईट सवयींमुळे माणसाचे आयुष्य  अल्प झाले आहे. त्यातच विविध रोग- व्याधी यांची भरच आहे. 

मन्दा: अर्थात आळशी. 

या युगातील लोक पुष्कळच आळशी आहेत. ते केवळ सांसारिका दृष्टीने आळशी आहेत एवढेच नव्हे, तर आत्मसाक्षात्काराच्या बाबतीतही आळशी आहेत. 

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती ।
करमूले तू गोविंद: प्रभाते करदर्शनम् ।। 
असे म्हणत पहाटे उठायच्या बाबतील लोक महाआळशी झाले आहेत. सकाळी लवकर न उठणे, व्यायाम न करणे किंवा उठताच टी.व्ही. समोर बसून रहाणे. स्वतः उद्योगी न होता इतरांचे उद्योग पाहून जळणे हा आळशी लोकांचा जन्मजात स्वभावच असतो. 
शास्त्र सांगते -      
क्षणश: कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् ।
क्षणत्यागे कृतो विद्या, कणत्यागे कुतो धनम् ।। 
प्रत्येक क्षणाचा उपयोग करून विद्या मिळवावी, प्रत्येक कणाचा संग्रह करून अर्थ (धन) मिळवावे. एकेक क्षण वाया गेल्यावर विद्या कोठून मिळेल? एकेक कण व्यर्थ गेल्यावर धन कसे मिळेल? 

केवळ धन प्राप्तीसाठी आळस त्यागावा असे नाही तर वास्तविक मनुष्य-जीवन कशासाठी मिळाले आहे हे जाणण्यासाठी आळस झटकला पाहिजे. मानव जीवन विशेषतः आत्मसाक्षात्कारासाठी आहे. मी कोण आहे? मी येथे का जन्मलो आहे? माझी इच्छा नसतानाही मला दुःख का भोगावे लागते? हे जग काय आहे? परम सत्य म्हणजे काय? हे माणसाला कळले पाहिजे. मात्र सध्याची जी कौटुंबिक, सामाजिक वा राजकीय शिक्षणपद्धती आहे, ती माणसाला केवळ भोगप्रवृत्तीकडे नेत आहे. त्यामुले आळशी माणसाला आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे समजत नाही.

सुमन्द मतय: - अर्थात मार्गभ्रष्ट. 

या कलियुगातील मनुष्य मार्गभ्रष्ट झालेले आहेत. ते वेगवेगळे राजकीय पक्ष, खोटे भगवान, बाई, बुवा, बाबा वा तथाकथित पंथ यांच्या आहारी गेले आहेत. तसेच विविध चंगळवादी साधनांच्याही नादाला लागलेले आहेत. उदाहरणार्थ - चित्रपट, इंटरनेट, खेळ, स्पर्धा, रिऑलीटी शो, जुगार, क्लब, कुसंगती, धूम्रपान, मद्यपान, मांसाहार, धोका, चोरी, भांडणे इत्यादी. तसेच जे वास्तविक भगवान आहेत त्यांना सामान्य माणूस समजणे आणि सामान्य माणसाला भगवान म्हणून पुजणे. धर्माच्या नावाखाली पशुबळी देणे, अंधश्रद्धा बाळगणे इत्यादी अनेक मार्गभ्रष्ट गोष्टींचा अंगिकार करणे. 
मार्गभ्रष्ट लोक शास्त्रांचा कसा विपरीत उपयोग करतात याविषयी महाभारत सांगते - 
मद्यमांसपरस्वानि तथा दारा धनानि च ।
आहरेद्रगवशगस्तथा शास्त्रं प्रदर्शयेत् ।। 
विषयासक्त माणूस मद्य, मांस, परस्त्री आणि परधन याचा अपहार करील आणि आपल्या कुकर्माचे समर्थन करण्यासाठी अनुकूल असे शास्त्रधारही काढून दाखवील.

कलियुगातील अनेक बदमाश लोक आपले स्वतःचे असे धार्मिक पंथ निर्माण करतात. त्यांना कोणत्याही शास्त्राचा आधार नसतो. तरीही ते ओढून ताणून शास्त्राधार दाखवितात आणि अनेक वेळा असे घडते की, इंद्रियतृप्तीच्या अधीन झालेल्या लोकांना अशा पंथांचे आकर्षण असते. त्यामुळेच ते धर्माच्या नावाखाली इतकी पापकृत्ये करतात. 

मन्दभाग्या: अर्थात दुर्दैवी. 

कलियुगातील लोक अतिशय दुर्दैवी आहेत. मानव जीवन भगवद्प्राप्तीसाठी मिळालेले असूनही ते या जीवनाचा व्यर्थ नाश करीत आहेत. अन्य युगात भगवद्प्राप्ती अतिशय कठीण होती. याविषयी भागवत पुराणात (१२.३.५२) सांगितले आहे - 
कृते यद् ध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मखै: ।
द्वापरे परिचर्यायां कलौ तद्धरिकीर्तनात् ।। 
जे फळ सत्ययुगात विष्णूध्यान करण्याने, त्रेतायुगात यज्ञ करण्याने आणि द्वापरयुगात भगवंतांची पूजा केल्याने प्राप्त होते ते कलियुगात केवळ हरिनाम संकीर्तनाने प्राप्त होते.

सत्ययुगात माणसाला दीर्घ आयुष्य असल्यामुळे त्याला घोर वनात, पर्वतात जाऊन श्री विष्णूंचे अनेकानेक वर्षे ध्यान करावे लागत असे. त्यानंतर त्याला भगवद्प्राप्ती होत असे. त्रेतायुगात मोठमोठे यज्ञ-याग श्रीविष्णूंच्या संतुष्टीसाठी करवे लागत. त्यांनतर भगवद्प्राप्ती होत असे आणि द्वापारयुगात भगवंतांची शोडषोपचार अर्चना अनेकदा केल्यानंतर कुठे भगवंत प्रसन्न होत. पण कलियुगात तसे नाही. या युगात भगवंत विशेष कृपाळू आहेत. त्यांना माहीत आहे की, कलियुगातील जीव अल्पायुषी आहेत, त्यांच्याकडे शारीरिक बळ नाही, धन नाही, त्यांच्याकडे अन्य तीन युगांतील कोणतीच  पात्रता नाही. त्यामुळे जीवांना स्वउद्धार करणे कठीण. म्हणून कृपावंत भगवंतांनी स्वतःला हरिनामात प्रकट केले. कोणीही जीव कलियुगात केवळ हरिनामाचे कीर्तन करून या दुःखमय जगातून स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो. परंतु हायरे कलियुग! माणूस इतका दुर्दैवी आहे की या सहज सोप्या गोष्टीचा अंगिकार करून घेत नाही. श्री चैतन्य महाप्रभु आपल्या शिक्षाष्टकात अतिशय मार्मिक शब्दांत म्हणतात - 
नाम्नामकारि बहुधा निजसर्वशक्ती 
स्तत्रार्पिता नियमित: स्मरणे न कालः।
एतादृशी तव कृपा भगवन्ममापि 
दुर्दैवमीदृशमिहाजानि नानुरागः।।
हे प्रभो! केवळ तुमचे पवित्र नामच  सर्व जीवांना सर्व प्रकारची कृपा प्रदान करू शकते आणि कृष्ण, गोविंद अशी तुमची लक्षावधी नवे आहेत. या नावांचे समरण करण्यासाठी कठोर नियमही नाहीत. हे भगवान! आपण आपल्या अकारण कृपेमुळेच आम्हास आपली प्राप्ती करून देण्यास पात्र बनविता. परंतु मी इतका दुर्दैवी आहे की मला या नावंप्रति मुळीच आकर्षण नाही. 
पहा भगवान श्रीकृष्ण इतके कृपाळू असूनही कलियुगातील मनुष्य इतका  दुर्दैवी आहे की तो अन्य काल्पनिक मंत्रांच्या मागे लागत आहे. खोटे भगवान वा देवीदेवतांची उपासना करून दुर्लभ मनुष्यजन्माचा नाश करीत आहे. हे सर्व पाहून संत सज्जनांना दुःख होते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात - 'बुडती हे जन पाहवेना डोळा । म्हणुनी कळवळा येतसे ।। 
    
पद्रुता: - अशांत, त्रासलेले. 

कलियुगातील मनुष्य अशांत असतो. सदैव त्रासलेला, काहींना पोटभर खावयास नाही म्हणून त्रास, तर काहींना अधिक खाण्याने  त्रास, महागाई, रोगराई, प्रचंड धावाधाव, ताण तणाव, दुष्काळ, भ्रष्टाचार, दंगे, युद्ध अशा एक नाही तर अनेक समस्यांनी कलियुगातील माणसे त्रस्त आहेत. कोणतेही वर्तमानपत्र उघडून पहा. अपघात, अपमृत्यू, रोग, चोरी इत्यादी अनेक दुःखद वार्तांनी ती भरून गेलेली असतात. अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याची भयंकर दुःस्थिती. पण दारू आणि मांसाहाराचा सुकाळ. दिवसेंदिवक पेट्रोल, डिझेल महाग होत आहे. तर गाड्यांची संख्या वाढतेच आहे. त्यातून बाहेर पडणाऱ्या धुराने वायुप्रदूषण वाढून कर्करोग वा अन्य व्याधी वाढत आहेत. एकूण काय तर मनुष्य त्रासलेला आहे.            

©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७  
        







    
     

               
       

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

                                      कामशास्त्र नैपुण्य 

           सध्याच्या तथाकथित मनुष्य जीवनाचे सुस्पष्ट वर्णन संपूर्ण वेदांचे परिपक्व फळ  असलेल्या भागवत पुराणात पुढील प्रमाणे केलेले आहे -- 
           दाम्पत्ये भिरुचिर्हेतुर्मायैव व्यावहारिके ।
           स्त्रीत्वे पुंस्त्वे च हि रतिर्विप्रत्वे सूत्रमेव हि ।।
           पुरुष आणि स्त्रिया केवळ बाह्य आकर्षणामुळे एकत्र राहतील आणि व्यावहारिक सफलता कपटावर अवलंबून असेल. पुरुषत्व आणि स्त्रीत्व यांचा निर्णय कामशास्त्रातील त्यांच्या निपुणतेनुसार केला जाईल. - भागवत पुराण १२.२.३
           या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की, कलियुगातील स्त्री-पुरुष कशा प्रकारे एकमेकांच्या शारीरिक आकर्षणामुळे अर्थात कामवासनेमुळे एकत्र येतात. स्त्रिया तंग-तोकडे कपडे, भडक कामुक शृंगार करून पुरुषांना उत्तेजित करतात. विशिष्ट वस्त्रांमुळे विषयवासनेच्या दृष्टीने स्त्री आकर्षक वाटलीच पाहिजे तरच तिला चांगली स्त्री संबोधले जाते. त्याच प्रकारे स्त्रियांना पुरुषही कामवासनेच्या दृष्टीने चांगले दिसले तरच स्त्रिया त्यांच्याकडे बघतात. चित्रपट, टी.व्ही. इंटरनेट द्वारे यांचे सदैव प्रदर्शन केले जाते. नटनट्यांची लफडी-कुलंगडी, चित्रांसह वृत्तपत्रे-मासिके यांतून मोठ्या प्रमाणात छापली जातात आणि आवडीने वाचली जातात. 
        कलियुगातील माणसे सदैव उन्मत्त अवस्थेतच असतात. नूनं प्रमत्तः कुरुते विकर्म - सदैव वाईट कृत्ये करण्यात मग्न असतात. मूर्ख माणसे सदैव भिन्न लिंगी व्यक्तिद्वारे आकर्षित होतात. घराघरातून योग्य प्रशिक्षण नसल्यामुळे युवक - युवती शारीरिक भोगाप्रति जबरदस्त आकृष्ट होतात. मुला-मुलींनी एकत्र मिसळणे, हास्यविनोद करणे, भ्रमणध्वनीतून विविध कामुक संदेशांची/चित्रांची देवाण घेवाण करणे सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. बेळगावातील एका डॉक्टरच्या २३ वर्षीय मुलाने तरुणींना मॉडेल बनवितो या आकर्षक योजनेनुसार आपल्या जाळ्यात ओढले आणि शेकडो तरुणींची अर्ध/पूर्ण नग्न चित्रे आपल्या भ्रमणध्वनी आणि संगणकात संग्रहित केली. यात कित्येक विवाहित तरुणी सुद्धा आहेत. जर बेळगावच्या टिळकवाडी सारख्या उपनगरात इतक्या तरुणी आकृष्ट होतात तर मग विचार करा संपूर्ण जगातील किती कोट्यवधी तरुण-तरुणी या आकर्षणात फसल्या असतील. 
          स्त्रिया आणि पुरुष तरुण्यावस्था प्राप्त होताच शारीरिक भोगाच्या इच्छेने एकमेकांशी घनिष्ठता प्राप्त करण्यासाठी आणि 'काम' व्यवहारातील यशोशिखर गाठण्यासाठी प्रत्येक संधीचा पुरेपूर उपभोग घेतात. असे करण्यासाठी त्यांना काही निवडक प्रसंगच मिळतात. परंतु त्यांची चेतना सदैव एकमेकांच्या शरीराचा स्पर्श करणे, त्यांची विवस्त्र शरीरे बघणे आणि संभोगरत होण्याच्या विचारात मग्न असते. या सर्व आकर्षक कामाला ते 'प्रेम' असे गोंडस नाव देतात. परंतु हे सर्व काही आहे 'कामप्राविण्य'. 
          या युगात स्त्रियांशी अवैध संबंधामुळे अनेक स्त्रिया आणि त्यांच्यापासून जन्मलेली बालके अनाथ होत आहेत. तरुण तरुणी काही काळ एकत्र राहून नंतर विभक्त होतात. स्त्रिया पुरुषांशी फारकत घेऊन स्वतंत्र राहू इच्छितात आणि त्यामुळेच एका स्वतंत्र स्त्रिचा भोग अन्य पुरुष घेतात. कोणत्याही जाहिरातीत आपण बधू शकता स्त्रियांची अर्धनग्न चित्रे! लोक स्त्रियांप्रति सन्मानाची भावना हरवून बसले आहेत. ते स्त्री शरीराचे शोषण करण्यासाठी विविध वस्त्रे, आभूषणे व अन्य वस्तूंद्वारे प्रसार माध्यमातून प्रोत्साहन देत आहेत. शारीरिक आकर्षणातून एकत्र येणारे स्त्री-पुरुष विवाहाला औपचारिक तडजोड समजतात. जोपर्यंत ते एकमेकांपासून इंद्रियसुख प्राप्त करतात, तोपर्यंत एकत्र राहतात आणि नंतर विवाह विच्छेद करतात. 
         तसे पाहिले तर तात्त्विक रूपाने तरुण-तरुणींचे तथाकथित सुंदर-सुडौल शरीर म्हणजे काय आहे? केवळ एक चामड्याची झोळी! ज्यात केवळ कफ-पित्त-वायू-मल-मूत्र-मांस, चरबी-रक्त-हाडे आणि अन्य कितीतरी घाणेरडे पदार्थ भरलेले असतात. कुत्रा-कुत्री, डुकर-डुक्रीण जसे एकमेकांशी संभोग करतात तसेच नर-नारीही करतात. त्यांनी कामशास्त्रातील प्राविण्य प्रदर्शित करणे म्हणजे काहीतरी विशेष करणे  असे नव्हे. हे काही अद्भूत कृत्य नसून ही तर एक शारीरिक क्रिया आहे. एक साधारण नैसर्गिक अनुभवाची प्रतिक्रिया आहे. तरीही प्रत्येक जण यात मग्न आहे. जगातील श्रेष्ठ राजे-महाराजे केवळ स्त्री सहवासासाठी युद्ध करीत. ज्युलियस सिझर प्रचंड पराक्रमी, अनेकांवर त्याचे नियंत्रण होते. पण क्लिओपात्राशी संभोग करता यावा म्हणून तो तिच्याशी लोचटपणे लगट करी. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनची पत्नी त्याची उत्तम प्रकारे सेवा करीत असे पण आईनस्टाईन तिच्यावर आसक्त न होता आपल्या चुलत बहिणीवर आसक्त असे. चाकांच्या खुर्चीविना काहीच हालचार करू न शकणाऱ्या  एका प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञाने  आपल्या नर्सला गर्भवती केले. एकूण काय भारतीय असो वा अमेरिकन राष्ट्रप्रमुख असो, कोणी श्रीमंत असो वा रस्त्याकडेचा भिकारी असो, सर्व जण या मैथुनक्रीयेत व्यस्त आहेत.
          बहुसंख्य लोकांना देव, देश, धर्म वा संस्कृती यांची मुळीच आवड नाही. मग त्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या अध्यात्मशास्त्रांची आवड कशी असणार? 
           राजा भर्तृहरी आपल्या वैराग्य शतकमध्ये लिहितो - 
           उडुराजमुखी, मृगराजकटी 
           र्गजराजविराजित मन्दगतिः ।
           यदि सा वनिता हृदये निहिता,
           क्व तपः? क्व जपः? क्व समाधिरतिः? ।।
           चंद्रासारखे मुख असलेली, सिंहासारखी कटी असलेली, गजराजासारखी डौलदार पण मंद गती असलेली सुंदरी जर हृदयात ठाण मांडून बसली असेल, तर कुठले तप, कुठला जप आणि कुठली समाधीची आवड?

           डॉ. केविन स्कीन (टिटिंग पोर्नीग्राफी ऑडिक्शन) म्हणतात, "सांप्रत प्रसार माध्यमांद्वारे लोकांच्या चेतनेवर होणारा कामुकतेचा भडीमार संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात इतका कधीच झाला नव्हता. लैंगिक वासना चालविणारे घटक आणि कामवासनेच्या प्रभावाला आपण सर्वजण बळी पडत असल्यामुळे आजचा समाज डोळ्यांसमक्ष अधोगतीला जात असल्याचे आपण पाहू शकत नाही. आजच्या अशा समाजात कामवासनेला बळी पडलेले कोट्यवधी लोक असतील."
गरुड पुराणात सांगितले आहे कामातुरांणा न भयं न लज्जा. तर हे आजच्या युगातील कामातुरता वाढविणारे घटक म्हणजे सध्याचे व्यापारी जगत आणि प्रसार माध्यमे होत. जे आपला माल खपविण्यासाठी या कामुकतेचा पुरेपूर वापर करतात.  उद्योजकांना पक्के ठाऊक आहे की, लोक कामुकतेकडे त्वरित आणि अगदी सहजरीत्या खेचले जातात. यासाठीच ते कामाकर्षणाचा पुरेपूर वापर आपल्या जाहिरातीतून करतात. 

पैसे कमविण्यासाठी काम निपुणतेचा सढळ वापर आपल्याला हॉलीवूड आणि बॉलीवूड सारख्या चित्रपटसृष्टीत अगदी सर्रासपणे केला जातो. त्यात स्त्री-पुरुषांचे शारीरिक आकर्षण प्रधान असते. संभोग दाखविणारे चित्रपट, मासिके, इंटरनेट, केबल टी.व्ही. यांची जणू स्पर्धाच चाललेली आहे. अन्य उद्योगधंद्यांपेक्षा यातून प्रचंड पैसा मिळविला जातो. 

आजची स्वतंत्र स्त्री विचार करते की, तिने केवळ तितकीच कामुकता व्यक्त करावी की ज्यामुळे पुरुषाने तिच्याकडे आकर्षित तर व्हावेच, पण त्यांनी तिचे लैंगिक शोषण करू नये. परंतु एकदा धर्माच्या मर्यादा पार केल्यावर काम कोणाचाही आणि कशाचाही विचार करीत नाही. तो आपले रंग उधळणारच. अग्नीजवळ लोणी येताच वितळणारच. 

विश्वामित्रपराशर प्रभृतयो वाताम्बुपर्णशना - 
स्ते पि स्त्रीमुखपड्कजं सुललितं दृष्ट् वैव मोहं गताः ।
शाल्यन्नम् सघृतं पयोदधियुतं भु जन्ति ये मानवाः 
तेषामिन्द्रियनिग्रहो यदि भवेद्विन्ध्यस्तरेत्सागरे ।। 

'विस्वामित्र, पराशरादी वारा, पाणी, झाडाची पाने खाऊन तपश्चर्या करणारे भले भले महर्षी सुद्धा सुंदर स्त्रियांची मुखकमळे बघताच त्यांच्या मोहात पडले आणि आपली तपश्चर्या हरवून बसले. मग साळीचा सुरेख भात वर साजूक तूप, उत्तम दूध आणि साईचे दही असलेले अन्न जी माणसे नेहमी खातात त्यांचा जर इंद्रिय निग्रह झाला तर मग विंध्य पर्वत समुद्रात तरंगायला लागेल. 

स्त्री-पुरुष यांच्यातील व्यावहारिक सफलता कपटावर अवलंबून असेल. विदेशी लोकांप्रमाणे आता भारतीय लोक सुद्धा कपटी व्यावहारिकता अवलंबित आहेत. सुंदर कन्या असेल तर बाप भरपूर धन घेऊन वराला कन्या देत आहे. विवाहानंतर पतीला पत्नीसाठी प्रचंड कष्ट करावे लागते. पती जर दाग दागिने, साड्या, चित्रपट, हॉटेल वा अन्य चैनीच्या गरजा पुरवित असेल तर पत्नी त्याला रतिसुख देते किंवा ते मिळविण्यासाठी पती हर प्रकारे धडपडतो. कधी कधी पुरुष पत्नी उत्तम गुणांची असूनही बाहेर शेण खातो. तर कधी पत्नी आपल्या प्रियकराशी संगनमत करून पतीला ठार मारते किंवा पती पत्नीला ठार मारतो. अर्थात पुरुषत्त्व आणि स्त्रीत्व यांचा निर्णय कामशास्त्रातील त्यांच्या निपुणतेनुसार केला जाईल. 

या श्लोकातील अंतिम तीन शब्द आहेत - विप्रत्वे सूत्रमेवहि अर्थात कलियुगात कोणताही मनुष्य वेशभूषेवरून पुरोहित वा ब्राह्मण म्हणून संबोधलं जाईल. भारतातील विप्रलोक जानवे धारण करतात आणि विश्वभरातील इतर धर्मांतील पुरोहित विविध अलंकार किंवा काही विशिष्ट चिन्हे धारण करतात. कलियुगात अशी काहीतरी चिन्हे धारण करून कोणीही माणूस धार्मिक नेता बनू शकतो. भले त्याला ईश्वर विषयी ज्ञान असो वा नसो. पाद्री, मुल्ला-मौलवी, पुरोहित, भिक्षुक वा अन्य नावाने ओळखले जाणारे प्रत्येक धर्मातील पुरोहित केवळ बाह्यवस्त्र आणि काही अलंकार धारण करतात. हा त्यांचा देखावा असतो. परंतु यातील कोणीही आपापल्या धर्माचे खरे स्वरूप जाणत नाही. आपण कोणत्याही धर्म ग्रंथांचा प्रामाणिकपणे अभ्यास केला तर आपल्याला आढळून येईल की धर्माचे खरे स्वरूप आहे भगवंतांवर अहैतुकी प्रेम करणे. परंतु कलियुगात प्रत्येक जण विपरीत कार्य करण्यास मग्न आहे.                                                                                        ©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 

संपर्क : ९२४२१ ७६५८७  

रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

                                       कृतघ्न पवार 

आपल्या अवती भवती, मित्रमंडळीत, नात्यागोत्यात, ज्ञाती आणि देशबांधवात तथा संपूर्ण विश्वरभरात दोन प्रकारची आढळतात; एक आहे 'कृतज्ञ' आणि दुसरा 'कृतघ्न'! आपल्यावर उपकार करणाऱ्या व्यक्तीप्रति जो मनुष्य सदैव ऋणी असतो त्याला 'कृतज्ञ' म्हणतात. आपल्यावर कृपा करणाऱ्या व्यक्तीप्रति त्याचे हृदय सदैव कृतज्ञतेच्या भावनेने ओथंबलेले असते. असा मनुष्य आपल्याला सुखाचे दोन घास भरवणाऱ्याच्या हाताचा कधीही चावा घेत नाही आणि याच्या विरुद्ध असतो त्याला 'कृतघ्न' म्हणतात. कलियुगात अशा कृतघ्न माणसांचा भरणा मोठ्या प्रमाणावर आहे. मतदारांची फसवणूक करणारे, पक्षबदलू राजकारणी, मोठमोठे धनदांडगे, क्रिकेटपटू, नटनट्या, तथाकथीत सामाजिक कार्यकर्ते असे अनेकानेक क्षेत्रातील तथाकथीत लब्धप्रतिष्ठित लोक 'कृतघ्न' असतात. अशा 'कृतघ्न' लोकांमघ्ये सर्वश्रेष्ठ आहेत शरद पवार! सध्या सत्ताभ्रष्ट असलेले पवार सतत ब्राह्मणद्वेष पसरवून ब्राह्मणेतर समाजाची दिशाभूल करण्यात अग्रेसर आहेत. वास्तविक पाहता पवार यांना जे उच्चस्थान प्राप्त झाले आहे ते सुद्धा एका ब्राह्मणामुळेच आणि या ब्राह्मणाचे नाव आहे बिडेश कुलकर्णी! ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अनुयायी होते बिडेश कुलकर्णी! नेताजींच्या गूढ मृत्यू नंतर बिडेश कुलकर्णी नेहरूंचे सेवक झाले आणि कांग्रेसी खासदार झाले. पुढे त्यांना त्यांच्या नेहरूनिष्ठेमुळे  पदूचेरीचे नायब राज्यपाल होण्याचे भाग्य लाभले. त्यानंतर कुलकर्णी इंदिरा गांधींचे निकटचे समादेशकही झाले. त्या काळी भारतीय सेनेत मेजर पदावर कार्यरत असलेला अभय कुलकर्णी हा बिडेश कुलकर्णी यांचा ज्येष्ठ पुत्र शरद पवारांचा मित्र होता. दोघेही सुट्टीच्या काळात उघड्या जीप मधून पुणे-बारामती असा थरारक प्रवास करीत आपल्या तारुण्याचा जल्लोष साजरा करीत. तेव्हा बिडेश कुलकर्णींनी विचार केला की, एक चांगला होतकरू मराठा तरुण वाया जाण्यापूर्वीच राजकारणात गुंतवला पाहिजे. ब्राह्मणी दूरदृष्टी असलेल्या बिडेश कुलकर्णींनी एक दिवस शरद पवारांना आपल्या सोबत घेतले आणि सरळ यशवंतराव चव्हाणांकडे नेले आणि सांगितले की, हा माझ्या मुलाचा मित्र आहे, याला आपल्या मायेच्या पंखाखाली घ्या. समस्त जातीपातींचे नेते असलेल्या बुद्धिमान यशवंतराव यांचा वरदहस्त मस्तकावर प्राप्त होताच शरद पवार युवक काँग्रेसचे नेते झाले आणि बघता बघता राजकीय गुरुंचेही बाप झाले. त्यांचा बाकीचा इतिहास सर्वांनाच ज्ञात असल्यामुळे परत उगाळण्यात काही अर्थ नाही. 

सांगण्याचे तात्पर्य हे की, पुराण काळापासून ते सम्राट चंद्रगुप्त मौर्य असो की छत्रपती शिवराय, समस्त राजा-महाराजांचे गुरु, समादेशक वा प्रधानमंत्री हे सर्वजण ब्राह्मणच होते. या सर्व ब्राह्मणांनी आपला राजा, देव, देश आणि धर्माची निःस्वार्थपणे सेवा केलेली होती आणि त्यामुळे सर्वच राजे त्यांच्याप्रति सदैव 'कृतज्ञ' होते, पण पवारांसारखा कोणी एखादाच अपवादात्मक 'कृतघ्न' असतो, ब्राह्मणद्वेषी  असतो.                                                                
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 

संपर्क : 92421 76587