सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

                             १.  आमची अवस्था 
                               (कलियुगाची लक्षणें )

भागवत पुराणाच्या प्रथम स्कंधातील, प्रथम अध्यायातील दहाव्या श्लोकात सध्याच्या स्थितीचे मार्मिक वर्णन केलेले आहे. ते असे - 
प्रायेणाल्पायुष: सभ्य कलावस्मिन् युगे जना: ।
मन्दा: सुमन्दमतयो मन्दभाग्या ह्युपद्रुता: ।।
'हे सभ्य! कलियुग नामक या लोहयुगात लोक अल्पायुषी आहेत. ते भांडखोर आहेत, आळशी आहेत, मार्ग चुकलेले आहेत, दुर्दैवी आहेत आणि पूर्णपणे त्रासलेले आहेत.'
पाच सहस्र  वर्षांपूर्वी एकदा नैमिषारण्य नामक पवित्र स्थानी, श्री शौनक प्रमुख असलेल्या महर्षी गणांनी भगवान आणि त्यांचे भक्त यांच्या प्रसन्नतेसाठी एका महान यज्ञाचे आयोजन केले होते. हा यज्ञ एक सहस्र  वर्षे चालणार होता. महान ऋषी मुनी जनकल्याणासाठी नेहमी उत्सुक असतात, कारण सर्व सामान्य लोकांना शांतता आणि समृद्धीचा चांगला मार्ग कोणता ते ज्ञात नसते. परंतु ऋषीमुनींना तो मार्ग माहीत असतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय कशात आहे याचे ज्ञान त्यांना असते. जगात शांतता नांदेल अशी समाजकार्ये संपन्न करण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात. ते सर्व रंजलेल्या गांजलेल्यांचे खरे शुभचिंतक असतात. ते स्वतः सर्व प्रकारचे कष्ट सोसून सर्व लोकांच्या हितार्थ भगवंतांच्या सेवेत सदैव मग्न असतात. चिंता करतो विश्वाची अशी त्यांची अवस्था असते. सध्याच्या नास्तिक पुढाऱ्यांच्या सर्व योजना पदोपदी कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे बहुजन समाज हा आधुनिक जडवादी - भोगवादी बनून भगवद्संबंधापासून वेगळा झाला आहे. अशा अंध समाजाला दिव्य दृष्टी प्रदान करून सुखी बनविण्यासाठी हे ऋषिमुनी एकत्र आले होते.

एके दिनी सर्व ऋषिमुनींनी यज्ञाग्नी  प्रज्वलित करून प्रभात समयीची कर्तव्ये संपन्न केली आणि वरिष्ठ ऋषी श्री सूत गोस्वामींना सन्मानपूर्वक उच्चासन देऊन त्यांना जनकल्याणार्थ अनेक प्रकारे पृच्छा केली. त्यातील एका पृच्छेचे वर्णन वरील श्लोकात केले आहे. त्यात ते म्हणतात - प्रायेणाल्पायुष: अर्थात अल्पायुषी

कलियुगातील माणसे अल्पायुषी आहेत. या आधीच्या युगातील माणसांचे आयुष्य दीर्घ होते. सत्ययुगातील मनुष्याचे आयुष्य एक लक्ष वर्षे होते. त्यानंतरच्या त्रेतायुगातील मनुष्यांचे आयुष्य दहा सहस्र  वर्षे होते, तर द्वापर युगातील मनुष्यांचे आयुष्य एक सहस्र  वर्षे होते आणि प्रारंभ झालेल्या कलियुगातील माणसांचे आयुष्य केवळ शंभर वर्षेच असल्यामुळे ऋषीमुनी म्हणतात, प्रायेणाल्पायुष: शंभर वर्षे आयुष्य असूनही माणसे आधीच मरत आहेत. असे का? कोणी म्हणेल की, अन्नधान्यांची भीषण टंचाई आहे. पण हे खरे नाही. आयुष्य कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे अनियमितपणाच्या घाणेरड्या सवयी. चांगल्या नियमित सवयी आणि साधे अन्न खाण्यामुळे माणूस आपले आरोग्य चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. आवश्यकतेपेक्षा हावरटाप्रमाणे अन्न खाणे, अनावश्यक चंगळ करणे, इंद्रियतृप्तीसाठी सदैव धडपडणे, बांडगुळाप्रमाणे दुसऱ्याच्या दयेवर अवलंबून राहणे आणि कुत्रिम पद्धतीने जगणे, यांमुळे मनुष्यांच्या जीवनशक्तीचाच नाश होत आहे. त्यामुळेच माणसाच्या आयष्याचा कालावधी अल्प झाला आहे. 

रात्री उशीरा झोपणे, मद्यपान - मांसाहार यांचे सेवन करणे, सकाळी उशीरा उठणे, उठताच तोंडात रसायने कोंबणे. खाण्या - पिण्यात सडलेले पदार्थ, रासायनिक प्रभावाने दिसण्याला चांगले असलेले पदार्थ खाणे. थोड्याशा पैशासाठी भयंकर कष्ट करणे किंवा फसवणूक, धोका, लूटमार करणे अशा वाईट सवयींमुळे माणसाचे आयुष्य  अल्प झाले आहे. त्यातच विविध रोग- व्याधी यांची भरच आहे. 

मन्दा: अर्थात आळशी. 

या युगातील लोक पुष्कळच आळशी आहेत. ते केवळ सांसारिका दृष्टीने आळशी आहेत एवढेच नव्हे, तर आत्मसाक्षात्काराच्या बाबतीतही आळशी आहेत. 

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती ।
करमूले तू गोविंद: प्रभाते करदर्शनम् ।। 
असे म्हणत पहाटे उठायच्या बाबतील लोक महाआळशी झाले आहेत. सकाळी लवकर न उठणे, व्यायाम न करणे किंवा उठताच टी.व्ही. समोर बसून रहाणे. स्वतः उद्योगी न होता इतरांचे उद्योग पाहून जळणे हा आळशी लोकांचा जन्मजात स्वभावच असतो. 
शास्त्र सांगते -      
क्षणश: कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् ।
क्षणत्यागे कृतो विद्या, कणत्यागे कुतो धनम् ।। 
प्रत्येक क्षणाचा उपयोग करून विद्या मिळवावी, प्रत्येक कणाचा संग्रह करून अर्थ (धन) मिळवावे. एकेक क्षण वाया गेल्यावर विद्या कोठून मिळेल? एकेक कण व्यर्थ गेल्यावर धन कसे मिळेल? 

केवळ धन प्राप्तीसाठी आळस त्यागावा असे नाही तर वास्तविक मनुष्य-जीवन कशासाठी मिळाले आहे हे जाणण्यासाठी आळस झटकला पाहिजे. मानव जीवन विशेषतः आत्मसाक्षात्कारासाठी आहे. मी कोण आहे? मी येथे का जन्मलो आहे? माझी इच्छा नसतानाही मला दुःख का भोगावे लागते? हे जग काय आहे? परम सत्य म्हणजे काय? हे माणसाला कळले पाहिजे. मात्र सध्याची जी कौटुंबिक, सामाजिक वा राजकीय शिक्षणपद्धती आहे, ती माणसाला केवळ भोगप्रवृत्तीकडे नेत आहे. त्यामुले आळशी माणसाला आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे समजत नाही.

सुमन्द मतय: - अर्थात मार्गभ्रष्ट. 

या कलियुगातील मनुष्य मार्गभ्रष्ट झालेले आहेत. ते वेगवेगळे राजकीय पक्ष, खोटे भगवान, बाई, बुवा, बाबा वा तथाकथित पंथ यांच्या आहारी गेले आहेत. तसेच विविध चंगळवादी साधनांच्याही नादाला लागलेले आहेत. उदाहरणार्थ - चित्रपट, इंटरनेट, खेळ, स्पर्धा, रिऑलीटी शो, जुगार, क्लब, कुसंगती, धूम्रपान, मद्यपान, मांसाहार, धोका, चोरी, भांडणे इत्यादी. तसेच जे वास्तविक भगवान आहेत त्यांना सामान्य माणूस समजणे आणि सामान्य माणसाला भगवान म्हणून पुजणे. धर्माच्या नावाखाली पशुबळी देणे, अंधश्रद्धा बाळगणे इत्यादी अनेक मार्गभ्रष्ट गोष्टींचा अंगिकार करणे. 
मार्गभ्रष्ट लोक शास्त्रांचा कसा विपरीत उपयोग करतात याविषयी महाभारत सांगते - 
मद्यमांसपरस्वानि तथा दारा धनानि च ।
आहरेद्रगवशगस्तथा शास्त्रं प्रदर्शयेत् ।। 
विषयासक्त माणूस मद्य, मांस, परस्त्री आणि परधन याचा अपहार करील आणि आपल्या कुकर्माचे समर्थन करण्यासाठी अनुकूल असे शास्त्रधारही काढून दाखवील.

कलियुगातील अनेक बदमाश लोक आपले स्वतःचे असे धार्मिक पंथ निर्माण करतात. त्यांना कोणत्याही शास्त्राचा आधार नसतो. तरीही ते ओढून ताणून शास्त्राधार दाखवितात आणि अनेक वेळा असे घडते की, इंद्रियतृप्तीच्या अधीन झालेल्या लोकांना अशा पंथांचे आकर्षण असते. त्यामुळेच ते धर्माच्या नावाखाली इतकी पापकृत्ये करतात. 

मन्दभाग्या: अर्थात दुर्दैवी. 

कलियुगातील लोक अतिशय दुर्दैवी आहेत. मानव जीवन भगवद्प्राप्तीसाठी मिळालेले असूनही ते या जीवनाचा व्यर्थ नाश करीत आहेत. अन्य युगात भगवद्प्राप्ती अतिशय कठीण होती. याविषयी भागवत पुराणात (१२.३.५२) सांगितले आहे - 
कृते यद् ध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मखै: ।
द्वापरे परिचर्यायां कलौ तद्धरिकीर्तनात् ।। 
जे फळ सत्ययुगात विष्णूध्यान करण्याने, त्रेतायुगात यज्ञ करण्याने आणि द्वापरयुगात भगवंतांची पूजा केल्याने प्राप्त होते ते कलियुगात केवळ हरिनाम संकीर्तनाने प्राप्त होते.

सत्ययुगात माणसाला दीर्घ आयुष्य असल्यामुळे त्याला घोर वनात, पर्वतात जाऊन श्री विष्णूंचे अनेकानेक वर्षे ध्यान करावे लागत असे. त्यानंतर त्याला भगवद्प्राप्ती होत असे. त्रेतायुगात मोठमोठे यज्ञ-याग श्रीविष्णूंच्या संतुष्टीसाठी करवे लागत. त्यांनतर भगवद्प्राप्ती होत असे आणि द्वापारयुगात भगवंतांची शोडषोपचार अर्चना अनेकदा केल्यानंतर कुठे भगवंत प्रसन्न होत. पण कलियुगात तसे नाही. या युगात भगवंत विशेष कृपाळू आहेत. त्यांना माहीत आहे की, कलियुगातील जीव अल्पायुषी आहेत, त्यांच्याकडे शारीरिक बळ नाही, धन नाही, त्यांच्याकडे अन्य तीन युगांतील कोणतीच  पात्रता नाही. त्यामुळे जीवांना स्वउद्धार करणे कठीण. म्हणून कृपावंत भगवंतांनी स्वतःला हरिनामात प्रकट केले. कोणीही जीव कलियुगात केवळ हरिनामाचे कीर्तन करून या दुःखमय जगातून स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो. परंतु हायरे कलियुग! माणूस इतका दुर्दैवी आहे की या सहज सोप्या गोष्टीचा अंगिकार करून घेत नाही. श्री चैतन्य महाप्रभु आपल्या शिक्षाष्टकात अतिशय मार्मिक शब्दांत म्हणतात - 
नाम्नामकारि बहुधा निजसर्वशक्ती 
स्तत्रार्पिता नियमित: स्मरणे न कालः।
एतादृशी तव कृपा भगवन्ममापि 
दुर्दैवमीदृशमिहाजानि नानुरागः।।
हे प्रभो! केवळ तुमचे पवित्र नामच  सर्व जीवांना सर्व प्रकारची कृपा प्रदान करू शकते आणि कृष्ण, गोविंद अशी तुमची लक्षावधी नवे आहेत. या नावांचे समरण करण्यासाठी कठोर नियमही नाहीत. हे भगवान! आपण आपल्या अकारण कृपेमुळेच आम्हास आपली प्राप्ती करून देण्यास पात्र बनविता. परंतु मी इतका दुर्दैवी आहे की मला या नावंप्रति मुळीच आकर्षण नाही. 
पहा भगवान श्रीकृष्ण इतके कृपाळू असूनही कलियुगातील मनुष्य इतका  दुर्दैवी आहे की तो अन्य काल्पनिक मंत्रांच्या मागे लागत आहे. खोटे भगवान वा देवीदेवतांची उपासना करून दुर्लभ मनुष्यजन्माचा नाश करीत आहे. हे सर्व पाहून संत सज्जनांना दुःख होते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात - 'बुडती हे जन पाहवेना डोळा । म्हणुनी कळवळा येतसे ।। 
    
पद्रुता: - अशांत, त्रासलेले. 

कलियुगातील मनुष्य अशांत असतो. सदैव त्रासलेला, काहींना पोटभर खावयास नाही म्हणून त्रास, तर काहींना अधिक खाण्याने  त्रास, महागाई, रोगराई, प्रचंड धावाधाव, ताण तणाव, दुष्काळ, भ्रष्टाचार, दंगे, युद्ध अशा एक नाही तर अनेक समस्यांनी कलियुगातील माणसे त्रस्त आहेत. कोणतेही वर्तमानपत्र उघडून पहा. अपघात, अपमृत्यू, रोग, चोरी इत्यादी अनेक दुःखद वार्तांनी ती भरून गेलेली असतात. अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याची भयंकर दुःस्थिती. पण दारू आणि मांसाहाराचा सुकाळ. दिवसेंदिवक पेट्रोल, डिझेल महाग होत आहे. तर गाड्यांची संख्या वाढतेच आहे. त्यातून बाहेर पडणाऱ्या धुराने वायुप्रदूषण वाढून कर्करोग वा अन्य व्याधी वाढत आहेत. एकूण काय तर मनुष्य त्रासलेला आहे.            

©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७  
        







    
     

               
       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा