शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

                           हिंदुनी कोणाच्या आश्रयास जावे ?

आता पूर्वीचा काळ राहिलेला नाही. कोणीही यावे आणि हिंदुंच्या टपलीत मारावे आणि सहज फसवावे. आजचा तरुण हिंदू नथुराम गोडसेंनी गांधींना का मारले याची जिज्ञासा करतो आहे. सम्राट कृष्णदेवरायाच्या विशाल साम्राज्याचा सत्य इतिहास दडपून अकबराचा खोटा इतिहास थोपण्याचे षडयंत्र विफल केले जात आहे. मागील ७० वर्षातील फसवणुकीच्या कथा आता कळू लागल्या आहेत. आताचा तरुण हिंदू स्वदेश, स्वधर्म, स्वहित आणि स्वाभिमान यांची योग्य प्रकारे चिकित्सा करू लागला आहे. हे पाहून अनेक आसुरी प्रवृत्तीचे लोकही हिंदुंना भ्रष्ट करण्यासाठी अधिक वेगाने सक्रिय झाले आहेत. वेदशास्त्रे, देवीदेवता आणि सणांची वेगवेगळ्या सुधारणेच्या नावाखाली टिंगल टवाळी करून सातत्याने बुद्धीभेद केला जात आहे. गायींचा उपयोग नाही. ब्राह्मणांचा तिरस्कार करा. दोन चार भणंग साधुंमुळे सर्वच साधुंचा तिरस्कार करण्यास सांगणे, मात्र पाद्री आणि मुल्ला-मौलवी कसे चांगले असतात यांचे उदात्तिकरण प्रत्येक चित्रपटातून सतत करणे. चार कोटी बांग्लादेशी आणि आता एक लाख रोहिंग्या मुसलमानांना मानवतेच्या नावाखाली भारतात वसवण्याचे कारस्थान चालवणे आणि देशोधडीला लागलेल्या काश्मिरी पंडितांविषयी थोबाड बंद ठेवणे. अशी एक नव्हे अनेक कारस्थाने साम्यवादी, पुरोगामी, समाजवादी, अंनिस आणि समस्त राजकीय पक्षांकडून सातत्याने चालू आहेत. 
    अशा भयावह स्थितीत जे बुद्धीमान हिंदू आहेत हे या संकटांना ओळखून आपल्या बुद्धी चातुर्याने काही योजना प्रयोगात आणू इच्छितात. काही कट्टर हिंदू दुष्टांचे पारिपत्य करण्यास अतिशय उत्साही आहेत. परंतू  म्हणावे तसे यश मिळत नाही, का? कारण सर्वंकष विजयासाठी आवश्यक असलेले भगवंतांचे अधिष्ठान त्यांच्या चळवळीत नाही. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या सर्वोत्तम उपदेशांचे ज्ञान आत्मसात करून त्यानुसार चालण्याची इच्छाही नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात-  
    तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । 
    सर्व काळी माझे स्मरण करीत युद्ध कर.                      
    पूर्वीच्या युगातून ज्या ज्या वेळी देवता असुरांकडून पराभूत होत त्या त्या वेळी त्या शक्तिशाली देवतासुद्धा विनम्रतेने भगवंताना शरण जात आणि संरक्षणासाठी प्रार्थना करीत. त्यांनी केलेल्या याचनेमुळे भगवंत त्यांच्यावर प्रसन्न होत आणि त्यांचे संरक्षण करीत. आजही आम्ही हिंदुनी जर प्रामाणिकपणे अभय प्रदान करणाऱ्या भगवंतांच्या चरणकमळांचा आश्रय स्वीकारला तर भगवान श्रीकृष्ण निश्चित आमचे रक्षण करतील. आपल्या हितरक्षणासाठी प्रार्थना करणाऱ्या देवतांना आश्वस्त करताना भगवान सांगतात -
    यदा देवेषु वेदेषु गोषु विप्रेषु साधुषु ।
    धर्मे मयि च विव्देषः स वा आशु विनश्यति ।।
    'मनुषय जेव्हा भगवंतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवांचा, ज्ञानाचे भांडार असणाऱ्या वेदांचा, गायींचा, ब्राह्मणांचा, साधूंचा, धर्मतत्त्वांचा आणि अंततः मज भगवंतांचा द्वेष करतो, तेव्हा खचितच तो आणि त्याची संपूर्ण संस्कृती त्वरित नष्ट होते. ' भागवत ७.४.२७  
   थोडा धीर धारा आणि वाट पहा, भगवंतांची लाठी कशाप्रकारे कार्य करते. 
           

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७


                                   गाढवाला गुळाची चव काय ? 
     माणसाला जाणता येईल अशा सर्व  गोष्टी वेदांमध्ये सांगितलेल्या आहेत.  वेद सांसारिक आणि आध्यात्मिक साक्षात्कारासंबंधित आहेत. वेदांमध्ये ज्ञानाच्या सर्व नियामक तत्त्वांचा अर्थात, सामाजिक, राजकीय, धार्मिक, अर्थशास्त्रीय, सैनिकी, वैद्यकीय, रासायनिक, भौतिक आणि तत्त्वज्ञान इत्यादी विषयांचा समावेश आहे आणि देह तथा आत्मा एकत्र ठेवण्यासाठी या सर्वांची आवश्यकता आहे. या सर्वांपेक्षा  अधिक विशेष महत्वाची गोष्ट ही आहे की, त्यामध्ये आध्यात्मिक साक्षात्कारासाठी मार्गदर्शन आहे.  परंतु ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे, अशा अज्ञानी लोकांना वेदांचा अर्थ सांगणे कठीण आहे. गाढवाला गुळाची चव काय ? आंधळ्यापुढे आरसा धरल्याने, कावळ्यांपुढे कपूर टाकल्याने, गाढवाला अत्तर फासल्याने काय लाभ ?
     वेद ज्ञानात रुची असणाऱ्या मनुष्याला वेदांच्या ज्ञानाने आध्यात्मिक स्तरावर प्रगती करता येते. परंतु ज्यांची बुद्धी कुविचारांनी आधीच नासलेली आहे किंवा सडलेली आहे अशा मुर्खांना वेद जाणणे कठीण आहे. श्री तुकाराम महाराज सांगतात, " वेदांचा अर्थ आम्हास ठाऊक आहे, इतरांनी केवळ भार  वहावा." अशा भार वाहक गाढवापुढे गीता कितीही वाचली तरी काय उपयोग?
        कलियुगाच्या प्रभावामुळे मूढमती लोकांचे प्राबल्य वाढलेले आहे. त्यांच्यात प्रामाणिकपणाचा पूर्णपणे अभाव आहे. हे लोक आपल्या तथाकथित भौतिक ज्ञानाने आध्यात्मिक ज्ञानाचे आकलन करू इच्छितात. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे हे मूर्ख, उत्तम इंग्रजी जाणणाऱ्या वकिलांकडे जाऊन आपल्या जुनाट रोगासाठी औषोधोपचार विचारात आहेत 
श्री तुकाराम महाराज सांगतात -
आम्ही वैकुंठवासी । आलो याच कारणासाठी ।।
बोलिले जे ऋषी | साच भावें वर्ताया ।।
झाडू संतांचे मार्ग |  आडरानी भरले जग|
उच्छिष्टांचा भाग |  शेष उरला तो सेवूं ।।
अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्द ज्ञाने ।
विषय लोभी माने । साधने बुडविली ।।
पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ।
तुका म्हणे करा । जयजयकार  आनंदे ।।
"आम्ही वैकुंठात वास्तव्य करणारे आहोत पण व्यास ऋषींनी दिलेल्या वेदप्रणीत मार्गाचे पालन करून दाखविण्यासाठी , भौतिक जगात आलो आहोत. आम्ही अशा संतांनी आखून दिलेला मार्ग स्वच्छ करू, कारण या मार्गावर अज्ञानाचे रान वाढले आहे. व्यासांसारख्या संतांचे शब्दरूपी उच्छिष्ट आम्ही सेवन करू. सर्व वेद पुराणाचे सार आहे हरिनाम, पण विषयलोभी व्यक्तींनी वेदांच्या नावाखाली स्वतःच्या विचारांचा शब्दघोळ करून लोकांना भ्रमित केले आहे. पारमार्थिक साधने नाहीशी केली.  तुकाराम महाराज म्हणतात, त्यासाठी आम्ही भक्तीचा डांगोरा पिटू आणि ज्यायोगे कळिकाळालाही भय उत्पन्न होते. त्या हरिनामाचा आनंदाने जयजयकार करू."
   वस्तुतः भगवंतांच्याच प्रेरणेने अनेक तथाकथित विद्वान जन्माला येतात आणि वेदांचे खंडन करतात. आपल्या वेड्यावाकड्या कुअर्थाने ते मुर्खांना भ्रमित करतात, ते असे का करतात? कारण भगवंतांना अशा पापी आणि दुराचारी लोकांना या भौतिक जगात दुःख भोगायला ठेवायचे असते आणि केवळ प्रामाणिक शुद्ध भक्तांना या दुःखमय जगातून मुक्त करून आपल्या शाश्वत धामाला न्यायाचे असते. त्यामुळे भगवंत अशी खेळी खेळत असतात. 
       पाच सहस्र वर्षांपूर्वी या पृथ्वीला भारतवर्ष म्हणत आणि याचे शेवटचे सम्राट  परीक्षित महाराज  होते. त्यांच्या मृत्यू नंतर या पृथ्वीवर कलीचे साम्राज्य पसरले. महाराज परीक्षिताना अर्धवट ज्ञान असलेल्या शृंगी नामक बारा वर्षीय ब्राह्माणाने शाप दिला आणि तेव्हा पासून ब्राह्मणांचे पतन प्रारंभ झाले आणि त्यानंतर क्रमशः क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांचे पातन  झाले.  मोठमोठ्या यज्ञात पशु बळी  दिल्याने क्षत्रिय बलशाली आणि ऐश्वर्य संपन्न होतात अशी भलावण करून पतित ब्राह्मण यज्ञ करीत. या यज्ञात बळी दिलेल्या पशूचे मांस सर्वजण प्रसाद म्हणून भक्षण करीत. यज्ञाच्या नावाखाली होणारी अनेक निष्पाप पशूंची हत्या थांबवण्यासाठी भगवान श्रीविष्णुंनी बुद्धदेव हा अवतार धारण केला. ज्या भगवंतांनी वेद निर्माण केले तेच भगवान बुद्धदेव म्हणून वेदांचा आणि यज्ञाचा प्रतिकार करू शकत होते. सामान्य मानवाला त्याकाळी असा विरोध करता येणे शक्य नव्हते. या ठिकाणी हेही ध्यानात ठेवले पाहिजे की भगवंतांचे अवतार बुद्धदेव आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध भिन्न आहेत. भेसळ करून स्वतःचा आणि इतरांचा घोटाळा करू नये. 
         कालांतराने हळूहळू बौद्ध मत संपूर्ण भारतात पसरले आणि वेद प्रणित यज्ञ बंद झाले. पुढे कालांतराने बौद्धमताचेही विकृतीकरण वाढू लागले. वैदिक धर्म लोप पाऊन सिद्धार्थाचे नास्तिक बौद्ध मत प्रबळ झाले. त्यामुळे वैदिक धर्माची पुनः स्थापना करण्यासाठी भगवान श्रीविष्णुंच्या आज्ञे वरून भगवान शंकर, शंकराचार्य म्हणून प्रकट झाले आणि त्यांनी  बौद्धमत परास्त केले. 
श्रीपाद आद्य शंकराचार्यांना भगवद्भक्तीचा मार्ग शुद्ध ठेवायचा असल्यामुळे त्यांनी प्रच्छन्न बौद्धमत मांडले. 
        पद्म पुराणात भगवान महादेवानी  पार्वती देवींना आपल्या प्रकटयाचे गुपित सांगितलेले आहे       मायावादम् असतशास्त्रं प्रच्छन्नम् बौद्धमुच्यते| 
      मयैव काल्पितं देवि कलौ ब्राह्मणरुपिना ।।
      ब्राह्मणश्चापरं रूपं निर्गुणं वक्ष्यते मया ।
      सर्वस्वं जागतोअप्यस्य मोहनार्थं कलौ युगे|| 
      वेदांते तु महाशास्त्रे मायावादमवैदिकम् ।
      मयैव वक्ष्यते देवि जगतां नाशकारणात ।।
"मायावादी तत्वज्ञान असत शास्त्र आहे. अधार्मिक आहे. हे झाकलेले बौद्धमत आहे. प्रिय पार्वती मी कलियुगात ब्राह्मण रूपाने येतो आणि या मायावाद  नामक काल्पनिक तत्वज्ञानाचा प्रचार करतो. नास्तिकांना फसविण्यासाठी ते रूपरहित आणि निर्विशेष असल्याचे मी पुरुषोत्तम भगवंतांचे  वर्णन करतो. तद्वत, वेदान्ताचे स्पष्टीकरण करताना पुरुषोत्तम भगवंतांच्या व्यक्तिगत रूपाला नाकारून सर्व मानवजातीला नास्तिकतेकडे पथभ्रष्ट करण्यासाठी मी 'मायावाद' तत्वज्ञानानुसार त्याचे वर्णन करतो. "
    असे करण्यासाठी पुरुषोत्तम भगवंतांनी शिवांना सांगितले होते -
      द्वापारादौ युगे भूत्वा कलया मनुषादिषु  ।
      स्वागमै: काल्पितैस्तवं च जनान्मद्विमूखानकरु ।।
  "कलियुगात जनसामान्यांना संभ्रमित करण्यासाठी वेदांचा काल्पनिक अर्थ काढ आणि त्यांची दिशाभूल कर." - शिव पुराण 
   सर्वात महत्त्वाचे हे आहे की, ज्यांनी ज्यांनी वेदांचे खंडन केले आहे त्या समस्त तथाकथित विद्वानांनी  वेदांचा अर्थ आपल्या मानाने लावलेला आहे. यातील अनेकांना संस्कृतचे ज्ञान मुळीच नव्हते.  त्यांनी कोणत्याही प्रमाणित आणि प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेतून शुद्ध ज्ञान घेतले नव्हते. त्यामुळे ते सदैव कु अर्थच लावणार. अशा आंधळ्यांच्या मागे जाणारेही आंधळेच असणार. 
लेखन सेवा - विनय शंकर गोडसे, बेळगाव. 
संपर्क - ९२४२१७६५८७
      

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

                              सोवळे आवळे 

     पुरोगामी पुण्यात स्वयंपाकासाठी आलेल्या बाईने आपली जात लपवून सोवळे ओवळे मोडले म्हणून डॉ. मेधा खोले यांनी या प्रकरणी  तक्रार  दाखल केली आणि सर्वत्र चर्चा, आरोप अन् प्रत्यारोप यांचा धुरळा उडू लागला. 
     डॉ. मेधा खोले यांनी २०१६ मध्ये आपल्या आई वडिलांच्या श्राद्धसाठी आणि त्यानंतर गणपती-गौरीच्या सोवळ्यातील स्वयंपाकासाठी एका सुवासिनी ब्राह्मण बाईची नेमणूक केली. त्या बाईनी आपले नाव सौ. निर्मला कुलकर्णी असे सांगितले आणि तिच्या जातीची फडताळणी  करण्यासाठी डॉ. मेधा खोले यांनी त्या बाईच्या धायरी येथील घराला भेटही दिली. पुढे दोन वर्षांनंतर जोशी भटजींनी त्या बाई ब्राह्मण नसल्याचे डॉ. मेधा खोले यांना सांगितले. हे ऐकून डॉ. मेधा खोले यांना आपली फसवणूक झाली असे वाटून त्यांनी त्या बाईविरुद्ध पोलिसात तक्रार केली आणि त्या सुवासिनी नसलेल्या निर्मला यादव यांनी डॉ. मेधा खोले यांच्या विरुद्ध तक्रार केली. 
     आता या प्रकरणावर जो तो आपापली तिखट, आंबट वा कडवट प्रतिक्रिया देऊन आपापला द्वेष  आणि अज्ञान प्रकट करीत आहे. या विषयावर आमचे चिंतन पुढील प्रकारे आहे. 
     डॉ. मेधा खोले या भौतिक शिक्षणात अतिशय प्रगत असून हवामान खात्याच्या उच्च पदावर शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. परंतू माता पित्याच्या मृत्यूच्या धक्क्यानंतर त्या स्वतःला सावरू शकल्या नाहीत आणि कामावर जाणे सोडले. 
     भारत स्वतंत्र झाल्यापासून ब्राह्मणांनी भौतिक शिक्षणात विलक्षण प्रगती करून प्रचंड पैसा मिळविण्यास प्रारंभ केला आहे. त्यांना पैशाच्या जोरावर सर्वप्रकारच्या शारीरिक सुखसुविधा मिळत असल्या तरी आत्मज्ञानाच्या अभावामुळे दुःखसुद्धा प्रचंड मिळत आहे. आध्यात्मिक ज्ञानाची किंचितही जोपासना न केल्यामुळे ब्राह्मण स्वतःवर कोसळणाऱ्या दुःखापासून स्वतःला सावरू शकत नाहीत. दिव्य आध्यात्मिक ज्ञानाच्या अभावामुळे त्यांच्या अंतःकरणात क्षुद्र दुबळेपणा त्वरित प्रकट होतो आणि या दुबळेपणापासून मुक्त होण्यासाठी डॉ. खोलेंनी सर्व सामान्य मानुषांप्रमाणे कर्मकांडी जोशी नामक ब्राह्मणाचा आश्रय  घेतला. या ब्राह्मणाच्या सल्ल्यानेच डॉ. खोलेंनी निर्मला यांना सोवळ्यातील स्वयंपाक करण्यास नेमले. 
     निर्मला बाईंनी केलेल्या तक्रारीनुसार कळून येते की, जोशीनीच त्यांची जात मराठा असल्याचे डॉ. खोलेंना सांगितले आणि सर्व चर्चा चवाट्यावर आली. दोन वर्षांनंतर जोशीने असे का सांगितले? कारण स्पष्ट आहे; जोशीला बाईकडून कमिशन मिळाले नाही. 
     डॉ. खोलें जर बुद्धिमान आहेत तर त्यांना निर्मला यादव यांच्या घरी गेल्यावर त्यांचे घर, बोलणे, वागणे वा गोत्र यावरून त्या कुळकर्णी आहेत की नाही हे कळायला हवे होते. पण त्यांना ते कळले नाही; उलट त्यांची खात्री झाली की त्या सव्वशीणा आहेत. परंतु जोशीने चहाडी केल्यावर त्यांना कळले की आपण नेमलेली बाई सव्वशीण नाही अन् ब्राह्मणही नाही, तेव्हा त्यांनी आधी जोशींविरुद्ध तक्रार करावयास हवी होती. पण असे न करता एका निःसहाय अन् निर्धन स्त्रीला छळले. 
     मागील दोन वर्षांपासून आई वडिलांच्या मृत्यूमुळे डॉ. खोलेंना जो मानसिक धक्का बसला आहे त्या धक्क्यातून त्या सावरल्या नाहीत. हे कसे काय शक्य आहे? बरे मानसिक धक्का बसलेले लोक देवाला दोष देतात आणि कोणतेही कर्मकांड करत नाहीत. असे असूनही त्यानी पोलिस ठाण्यात रितसर आणि पूर्ण विचारांती तक्रार केली आहे; हे त्यांच्या लेखी तक्रारी वरून कळून येते. याचाच अर्थ हा की त्यांना विशेष धक्का बसलेला नाही. 
     हल्ली ९५% सुशीक्षित ब्राह्मण सुतकातही हास्यविनोद करत असतात आणि मग पुण्यासारख्या पुढारलेल्या नगरातील या दोघी उच्च शिक्षित भगिनी कशा काय सावरल्या नाहीत? पूर्वी म.टा. वृत्तपत्रात डॉ. खोलेंवर प्रसिद्ध झालेल्या एका अप्रतिम लेखावरून त्यांच्या बुद्धीमत्तेची  अन् कार्यक्षमतेची उंची कळून येते. असे असूनही त्या मानसिक धक्क्यातून सावरल्या नाहीत हे कसे काय?
     अशोचन्प्रतिकुर्वीत यदि पश्येत्पराक्रमम् ।
     भैषज्यमेतद्दुःखस्य यदेतन्नानुचिन्तयेत् ।।                            
      पराक्रम करता येईल असे वाटले तर शोक सोडून प्रतिकार करावा. दुःखाचे सतत चिंतन करीत न बसणे हीच गोष्ट त्या दुःखावर औषध असते. - महाभारत, स्त्रीपर्व २.२७ 
     वास्तुत: डॉ. खोलेंनी आपले दुःख विसरण्यासाठी स्वतःला आपल्या देशहितार्थ असलेल्या कार्यात झोकून द्यावयास हवे होते. पण असे न करता त्यांनी एका अल्पबुद्धीच्या ब्राह्मणाचा आश्रय घेतला आणि स्वतः वरील दुःखाचा भार अधिकच वाढविला. 
     पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात - 
     कामैस्तैस्तैऱहृतज्ञानाः  प्रपद्यन्ते अन्यदेवताः ।
     तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ।।
     ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे, ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपापल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. - भगवद् गीता ७.२०                            
     ज्या लोकांना मनुष्य जन्माचे उच्च ध्येय काय आहे आणि त्याची प्राप्ती कशी करावी याचे ज्ञान नसते तथा जे तुच्छ अशा आकांक्षानी प्रेरित झालेले असतात तेच लोक देवतांची उपासना अर्थात कर्मकांड करतात आणि त्यासाठी आवश्यक असलेले सोवळे-ओवळे अर्थात आपापल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. डॉ. खोलेंना सुद्धा आपल्या स्वभावानुसार गौरी-गणपती आणि श्राद्धाच्या विधिविधानांचे पालन करण्यासाठी सव्वाशीण बाईने बनलेला स्वयंपाक हवा होता. पण पुण्यासारख्या महानगरात ३% शिल्लक असलेल्या ब्राह्मण समाजातून अशी बाई मिळणे कठीण असल्यामुळे जोशी भटाने अन्य स्त्री उभी केली आणि तिलाही खोटे आचरण करण्यास लावले. अजूनही सर्वसामान्य गरीब स्त्रिया ब्राह्मणावर विश्वास ठेऊन खोटे बोलून काम करण्यास धजावतात. अर्थात असे करण्यास ब्राह्मणच उत्तरदायी असतो. वस्तुतः अशा सव्वाशीण मिळणे कठीण असल्यामुळे सुज्ञ ब्राह्मणांनी स्वतः पुढाकार घेऊन अन्य समाजातून योग्य आणि गुणवान स्त्रियांना ब्राह्मणी संस्काराने प्रशिक्षित केले पाहिजे कारण ब्राह्मण हा समाजाचा मार्गदर्शक असल्यामुळे समाजहितार्थ जे जे आवश्यक आहे ते ते त्याने केले पाहिजे. परंतु असे होत नाही. कलह आणि दंभ यांनी भरलेल्या या भीषण कलियुगात ब्राह्मणांचेच पतन सर्वात आधी झाले आहे त्यामुळे संपूर्ण समाज पतित झाला आहे मग इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे? 
     वस्तुतः विविध कर्मकांडे करणे हे काही बुद्धिमंताचेलक्षण नव्हे. 
      पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांगतात - 
     अन्यवत्तु फलं तेषां तद् भवत्यल्पमेधसाम् ।
     अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित आणि अनित्य असतात - भगवद् गीता ७.२३   
                   
     आता काही तर्कवादी लोक मोठ्या आवेशात सोवळ्याचा तिरस्कार करताना दिसतात. अर्थात यासाठीही ब्राह्मणच उत्तरदायी आहेत. ते कसे काय? कारण ब्राह्मणांनाच सोवळ्याचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे तथाकथीत विज्ञाननिष्ठ, बुद्धिजिवी वा पुरोगामी सोवळ्यावर सडकून टिका करतात. सोवळे वा स्वच्छता काय असते हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला थोडे इतिहासाचे ज्ञान घेणे सुद्धा आवश्यक आहे. 
     शेकडो वर्षांपासून इस्लामी आक्रमणाखाली भरडला जाणारा हिंदू समाज या इस्लामी आक्रमणाचा प्रतिकार करण्यात गुंतून पडला होता. त्याला संघटित आणि व्यवस्थित होण्यासाठी काही कालावधी मिळत असतानाच इंग्रज आणि पोर्तुगीज इत्यादी गोऱ्यांची आक्रमणे यशस्वी होऊ लागली आणि त्यांच्या  धूर्त आणि असुरी संस्कृती (विकृती)चे हिंदुंवर आक्रमण झाले. त्यांच्या वेगळ्या युरोपीय संस्कृतीचे मायाजाल आम्ही जाणू शकलो नाही. हिंदू वचनाचे पक्के आणि इंग्रजादी गोरे संधी मिळताच वचनभंग करून विश्वासघात करणारे. हिंदू शरणार्थींना आश्रय प्रदान करणारे आणि गोरे शरणार्थी म्हणून आले आणि आश्रय देणाऱ्यांचीच हत्या करणारे. हिंदू प्रामाणिक व्यापारी तर इंग्रज व्यापाऱ्यांच्या रूपातील ठग आणि लुटारू. हिंदू युद्धात पकडलेल्या शत्रूंचाही सन्मान करणारे तर इंग्रज शत्रूंच्या मस्तकांना कापून फुटबाँल प्रमाणे लाथाडणारे! हिंदू वनातील हिंस्त्र पशूंची मृगया करणारे, तर इंग्रज मनोरंजनासाठी निःशस्त्र गुलामांची शिकार करणारे. हिंदू मानवतेच्या सद्गुणांची पराकाष्ठा  प्रदर्शित करणारे आणि गोरी चामडी असलेले हे लोक क्रूर असुर, इतका भयंकर पतित समाज हिंदुंच्या कल्पनेपलीकडचा होता. 
     भारतीय अर्थव्यवस्था कोसळल्यामुळे संपूर्ण सामाजिक व्यवस्था कोसळून समाज नष्टभ्रष्ट झाला. कुटिल कारस्थानी इंग्रजांनी खोटीनाटी, कपटकारस्थाने रचून, नवनवीन चाली खेळून समाजात एकमेकांविरुद्ध ईर्षा, संशय, द्वेष आणि भ्रम निर्माण करून समाजाला नष्ट केले. 
      इंग्रज ज्याप्रमाणे काळ्या लोकांना अस्पृश्य मानत होते, त्याप्रमाणे भारतात कोण्या जातीला  अस्पृश्य मानण्याची प्रथा नव्हती. भारतात अपराधी मनुष्याला दंडित करण्यासाठी समाजातून बहिष्कृत केले जात असे. जोपर्यंत तो आपला दंड भोगत नाही, तोपर्यंत तो अस्पृश्य राहत असे. 
      विशेष पूजा-अनुष्ठानांच्या वेळी सोवळ्याचे पालन पवित्रतेच्या दृष्टीने होत असे, ते सध्याच्या वैज्ञानिकांच्या hygiene (स्वच्छता) पेक्षा अधिक शास्त्रीय होते. 
     ज्या इंग्रजांना ' उष्टे ' हा शब्दच माहीत नव्हता, शौचानंतर डावा हात स्वच्छ धुतला पाहिजे हे ज्ञात नव्हते, महिनोंमहिने स्नान करणे माहित नव्हते, वस्त्र बदलणे माहित नव्हते, त्यांना भोजनातील उष्टे-खरकटे यांचे पालन करण्यात काय विज्ञान आहे हे कसे काय कळणार? त्यांनी पद्धतशीरपणे शुद्र जातींना अस्पृश्य बनविले आणि सर्व दोषारोपण ब्राह्मणांवर केले. 
     इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतातील प्रत्येक मनुष्य शिक्षित होता. ज्या गावची लोकसंख्या चारशे आहे तेथे एक पाठशाळा होती. अशा पाठशाळांतून पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक विध्यार्थी आणि शिक्षक शूद्र होते. मुलींना घरातूनच शिक्षण घेण्याची व्यवस्था होती.  
     अशा सुंदर भारताला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी सर्वप्रथम येथील गुरुकूल शिक्षण पद्धत नष्ट केली. पंधरा वर्षे काहीही करू दिले नाही आणि त्यानंतर आपले मॅकॅलोप्रणीत इंग्रजी शिक्षण चालू केले. आपल्या शासन व्यवस्थेसाठी कारकुनांची आवश्यकता असल्यामुळे इंग्रजांनी मोठ्या नगरातून ABCD शिकवणाऱ्या शाळा काढून तेथील ब्राह्मणांना शिकवून थोडा पैसा देऊन त्यांना इतरेजनांपासून तुम्ही वेगळे आहात असे शिकवून समाजात भेद पाडला. 
     १९४७ नंतर ब्राह्मणांच्या घरातील आजी आजोबा देवघरात पूजा करत असताना इंग्रजी शिकलेला नातू बेधडक जोडे घालून आत शिरत असे आणि असे करू नकोस असे म्हणताच मोठ्या आढ्यतेने उलट उत्तर देत असे की, तुमचा धर्म वेगळा आहे आणि माझा वेगळा आहे. हळूहळू समाजवादी, पुरोगामी, अंनिस, बामसेफी वा ब्रिगेडी कुविचारांचा पगडा वाढू लागला. तथाकथीत भौतिक शिक्षणाने अंध झालेले पतित ब्राहमण मांस, मद्य, जुगार आणि व्यभिचार यात इतके गुरफटून गेले की, त्यांना हीच हिंदू धर्माची प्रगती वाटू लागली आहे. जे कार्य इस्लामी वा पाश्चिमात्य किरिस्तावांना करता आले नाही ते धर्मद्रोही हिंदू मोठ्या आनंदाने करीत आहेत.                                                                           
      सांगण्याचे तात्पर्य हेच की कर्मकांड असो वा भगवद्भक्ती, वेद असो वा पुराण, सोवळे अर्थात शुचिर्भूतता (स्वच्छता) ही पूर्णपणे वैज्ञानिक असून मानवाच्या भौतिक आणि आध्यात्मिक लाभासाठीच आहे. परंतु कलियुगाच्या प्रभावामुळे याचे शास्त्रोक्त ज्ञान नसल्यामुळे पोटभरू द्विजबंधू   समाजाला भ्रमित करतात आणि दुष्ट, पाखंडी, देशद्रोही लोक वेदशास्त्रांचा नाश करण्यासाठी मोठ्या त्वेषाने मर्माघात करतात. 
     बरे आपल्याला सोवळे आणि कर्मकांड हाच आपला धर्म वाटत असेल तर मग तो तरी काटेकोरपणे पाळावा. त्यात धूर्त वकीला प्रमाणे चोरवाटा शोधत बसू नये. 
     धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ।।
     धर्माचा घात केल्यास धर्म आपला घात करतो. आपण धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले रक्षण करतो.  - महाभारत, वनपर्व ३१३.१२८
     डॉ. खोले या जर स्वतःला ब्राह्मण मानून सोवळ्याची अपेक्षा करत असतील तर त्यांनी सर्वात आधी सरकारी नोकरी सोडली पाहिजे कारण नोकरी करणे हे तर शुद्राचे काम आहे; ब्राह्मणाचे काम नाही आणि नोकरी करायचीच असेल तर ब्राह्मणी कर्मकांड आणि सोवळे यांचा त्याग करावा. तसेच एका प्रामाणिक ब्राह्मणाने झाल्या घटने विषयी दुसऱ्याला दोष न देता उदार मनाने क्षमा करण्यास तत्पर असले पाहिजे. 
     भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत (१८.४२) ब्राह्मणी गुणांचे वर्णन केले आहे - 
     शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेवच ।
     ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ।।
   शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात. 
      यातील एकही गुण आचरणात आणता येत नसेल तर मग ती व्यक्ती कशी काय ब्राह्मण असेल? अशा गुणहीन ब्राह्मणाच्या सोवळ्यातील पूजनाने देवीदेवता कधी तरी प्रसन्न होतील काय?
     भगवान श्रीकृष्णांचे साहित्यिक अवतार श्री वेदव्यास आपला पुत्र शुकदेव गोस्वामींना सांगतात - 
     ब्राह्मण्यं बहुभिरवाप्यते तपोभिस् 
     तल्लब्ध्वा न रतिपरेण होलितव्यम् ।
     स्वाध्याये तपसि दमे च नित्ययुक्तः 
     क्षेमार्थी कुशलपरः सदा यतस्व ।।
    अनेक प्रकारे तप करावे तेव्हा ब्राह्मणत्व मिळते. ते लाभल्यावर उपभोगाच्या मागे लागून ते ब्राह्मणत्व वाया घालवू नये. ज्याला स्वतःचे कल्याण साधण्याची इच्छा असेल, त्याने वेदाभ्यास, तप आणि इंद्रियसंयम यांमध्ये दक्ष राहावे आणि सत्कर्म करण्यासाठी झटून प्रयत्न करावा. - महाभारत १२.३२१.२४
     निर्मला यादव यांनी त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे असत्य बोलून फसवणूक केली असेलही; त्यांना  त्यांच्या कर्माचे फळ भोगावे लागेल. परंतु डॉ. खोलेंचे काय? त्यांच्या या वागण्यामुळे  वृत्तपत्रे. टी.व्ही., पुरोगामी, बामसेफी, ब्रिगेडी वा अंनिसवाल्यांना ब्राह्मणांविरुद्ध आणि पर्यायाने हिंदू धर्माविरुद्ध गरळ ओकण्यास चांगलीच संधी मिळाली आहे. आपल्यात ब्राह्मणी गुणांचा अभाव असताना इतरांना दोष का द्यावा? 
     अतिक्रान्तं हि यात्कार्यं पश्चाच्चिन्तयते नरः ।
     तच्चास्य न भवेत्कार्यं चिन्तया च विनश्यति ।।
     एखादी घटना घडून गेल्यानंतर त्याविषयी मागाहून जो काळजी करत बसतो, त्याचे ते कार्य तर होत नाहीच, पण काळजीमुळे त्याचा नाश होतो.                                                                   - महाभारत, कर्णपर्व ३१.२९ 
      या सर्व प्रकरणात अनेक लोक आपापल्या बौद्धिक क्षमतेनुसार तर्क प्रस्तुत करीत आहेत. प्रत्येकजण आपापल्या मनोधर्माला पुढे रेटत आहे. मी सांगतो तेच कसे खरे आहे, मीच धर्माचा कसा जाणकार आहे इत्यादी. परंतु आम्ही हे ध्यानातच घेत नाही की, जेव्हा यमदूत आमच्या समक्ष प्रकट होतील तेव्हा त्यांना आमचे तर्क, आमचे बौद्धिक चातुर्य, आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आम्हाला वाटणारा तथाकथीत धर्म हे सर्व कुचकामी ठरणार आहे. कारण या भौतिक ब्रह्मांण्डात यमदूत कोणाचेही काहीही ऐकत नाहीत. ते केवळ आपले स्वामी यमराजांचेच ऐकतात आणि यमराजांचा यमदूतांना स्पष्ट आदेश आहे, धर्मंतु साक्षात् भगवद्प्रणितम्।अर्थात धर्म साक्षात भगवान श्रीकृष्णनांनी सांगितलेला आहे. भगवद् प्रणित धर्माव्यतिरिक्त अन्य सर्व कैतव धर्म आहेत. 
     आज सर्व लोक आपापल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आपल्याला आवडेल अशा धर्माचा उदोउदो करण्यात व्यस्त आहेत. परंतु यमदूतांवर याचा यत्किंचितही परिणाम होत नाही. ते आम्हाला बलपूर्वक पकडून यमपुरीला नेतात आणि यमराजांच्या आज्ञेनुसार दंडित करतात. 
     आज जो तो आपल्या सामर्थ्यानुसार  धर्माची चळवळ पुढे रेटत आहे. परंतु त्यांच्या या चळवळीत भगवंतांचे अधिष्ठाना मुळीच नाही. तर्कावर आधारीत असलेले त्यांचे धर्मज्ञान काही काळसाठी त्यांना समाधान मिळवून देत असेलही; पण शाश्वत सुख खचितच नाही. आपल्या मानसिक, बौद्धिक, शारीरिक धर्मांपेक्षा एक असा परमश्रेष्ठ धर्म आहे की, जो आम्हाला नित्य संतुष्ट ठेवेल.
     स वै पुंसां परौ धर्मो यतो भक्तिरधोक्षजे।
     अहैतुक्यप्रतिहता ययात्मा सुप्रसीदति ।।
     अखिल मानव जातीचा परम धर्म तो होय, ज्यामुळे मनुष्याला परम दिव्य अशा अधोक्षज भगवंतांची प्रेममय भक्ती प्राप्त होते. अशी भक्ती अहैतुकी आणि अखंड स्वरूपाची असावी म्हणजे अशा  भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रेसन्न होतो. - श्रीमद् भागवत १.२.६                                           
                                                                      

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

रामनिष्ठ होऊया 

    माझ्या प्रिय हिंदू धर्मप्रेमी युवा बंधुनो,
    कृपया माझे नम्र प्रणाम स्वीकारावेत.    
     आज आपली भारतभूमी इस्लामी आतंकवाद, लव्ह जिहाद, क्रिस्तीकरण, भोगवाद, चंगळवाद, भ्रष्टाचार, चुंबनवाद आणि नैतिक अधःपतनाने आक्रांदत आहे. अशा या परमपवित्र भूमीवर आणि येथील प्राचीन वैदिक अर्थात हिंदू धर्मावर होणाऱ्या अत्याचारांमुळे आपण विचलीत होत आहोत. समस्त अन्यायांविरुद्ध आपल्या मनात प्रचंड चिड आहे आणि धर्मासाठी, न्यायासाठी लढण्यास, संघर्ष करण्यास आपण अतिशय उत्सुक आहात. परंतु म्हणावे तसे यश आपल्याला मिळत नाही. कारण आमचेच धर्महीन हिंदू बांधव आमचा विरोध करीत आहेत. समाजवादी, पुरोगामी, साम्यवादी, गांधीवादी, अनिस वा तत्सम नामधारी हिंदूच वा टी.व्ही. चॅनलवाले आमच्या संस्कृतीविरुद्ध सदैव अप्रचार करीत असतात. बुवाबाजी करणाऱ्या संधीसांधूंचे विकृतीकरण सर्वत्र प्रदर्शित केले जात आहे आणि खऱ्या धर्माचे, ज्ञानाचे आणि संतांचे सुकार्य झाकून ठेवले जात आहे. हे असे का होते याचे यथार्थ वर्णन एका संस्कृत सुभाषितात पुढील प्रमाणे केलेले आहे - 
        सीदन्ति सन्तो विलसंत्यसन्तः
        पुत्रा  म्रियन्ते जनकश्चिरायुः ।
        परेषु मैत्री स्वजनेषु वैरं 
        पश्यन्तु लोकाः कलिकौतुकानि ।।         
         संत सज्जनांना यातना भोगाव्या लागत आहेत, तर दुष्ट दुर्जन वैभवात लोळत आहेत। पुत्र मृत्यू पावत आहेत, तर पिता चिरायू होत आहे! परक्यांशी मैत्री आणि स्वजनांशी वैर केले जाते आहे! लोकहो, हा कलियुगाचा चमत्कार पहा. 
                                    कामशास्त्र नैपुण्य 

           सध्याच्या तथाकथित मनुष्य जीवनाचे सुस्पष्ट वर्णन संपूर्ण वेदांचे परिपक्कफळ असलेल्या भागवत पुराणात पुढील प्रमाणे केलेले आहे -- 
           दाम्पत्ये भिरुचिर्हेतुर्मायैव व्यावहारिके ।
           स्त्रीत्वे पुंस्त्वे च हि रतिर्विप्रत्वे सूत्रमेव हि ।।
           पुरुष आणि स्त्रिया केवळ बाह्य आकर्षणामुळे एकत्र राहतील आणि व्यावहारिक सफलता कपटावर अवलंबून असेल. पुरुषत्व आणि स्त्रीत्व यांचा निर्णय कामशास्त्रातील त्यांच्या निपुणतेनुसार केला जाईल. - भागवत पुराण १२.२.३
           या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की, कलियुगातील स्त्री-पुरुष कशा प्रकारे एकमेकांच्या शारीरिक आकर्षणामुळे अर्थात कामवासनेमुळे एकत्र येतात. स्त्रिया तंग-तोकडे कपडे, भडक कामुक शृंगार करून पुरुषांना उत्तेजित करतात. विशिष्ट वस्त्रांमुळे विषयवासनेच्या दृष्टीने स्त्री आकर्षक वाटलीच पाहिजे. तरच तिला चांगली स्त्री संबोधले जाते. त्याच प्रकारे स्त्रियांना पुरुषही कामवासनेच्या दृष्टीने चांगले दिसले तरच स्त्रिया त्यांच्याकडे बघतात. चित्रपट, टी.व्ही. इंटरनेट द्वारे यांचे सदैव प्रदर्शन केले जाते. नटनट्यांची लफडी-कुलंगडी, चित्रांसह वृत्तपत्रे-मासिके यांतून मोठ्या प्रमाणात छापली जातात आणि आवडीने वाचली जातात. 
        कलियुगातील माणसे सदैव उन्मत्त अवस्थेतच असतात. नूनं प्रमत्तः कुरुते विकर्म - सदैव वाईट कृत्ये करण्यात मग्न असतात. मूर्ख माणसे सदैव भिन्न लिंगी व्यक्तिद्वारे आकर्षित होतात. घराघरातून योग्य प्रशिक्षण नसल्यामुळे युवक - युवती शारीरिक भोगाप्रति जबरदस्त आकृष्ट होतात. मुला-मुलींनी एकत्र मिसळणे, हास्यविनोद करणे, भ्रमणध्वनीतून विविध कामुक संदेशांची/चित्रांची देवाण घेवाण करणे सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. बेळगावातील एका डॉक्टरच्या २३ वर्षीय मुलाने तरुणींना मॉडेल बनवितो या आकर्षक योजनेनुसार आपल्या जाळ्यात ओढले आणि शेकडो तरुणींची अर्ध/पूर्ण नग्न चित्रे आपल्या भ्रमणध्वनी आणि संगणकात संग्रहित केली. यात कित्येक विवाहित तरुणी सुद्धा आहेत. जर बेळगावच्या टिळकवाडी सारख्या उपनगरात इतक्या तरुणी आकृष्ट होतात तर मग विचार करा संपूर्ण जगातील किती कोट्यवधी तरुण-तरुणी या आकर्षणात फसल्या असतील. 
          स्त्रिया आणि पुरुष तरुण्यावस्था प्राप्त होताच शारीरिक भोगाच्या इच्छेने एकमेकांशी घनिष्ठता प्राप्त करण्यासाठी आणि 'काम' व्यवहारातील यशोशिखर गाठण्यासाठी प्रत्येक संधीचा पुरेपूर उपभोग घेतात. असे करण्यासाठी त्यांना काही निवडक प्रसंगच मिळतात. परंतु त्यांची चेतना सदैव एकमेकांच्या शरीराचा स्पर्श करणे, त्यांची विवस्त्र शरीरे बघणे आणि संभोगरत होण्याच्या विचारात मग्न असते. या सर्व आकर्षक कामाला ते 'प्रेम' असे गोंडस नाव देतात. परंतु हे सर्व काही आहे 'कामप्राविण्य'. 
          या युगात स्त्रियांशी अवैध संबंधामुळे अनेक स्त्रिया आणि त्यांच्यापासून जन्मलेली बालके अनाथ होत आहेत. तरुण तरुणी काही काळ एकत्र राहून नंतर विभक्त होतात. स्त्रिया पुरुषांशी फारकत घेऊन स्वतंत्र राहू इच्छितात आणि त्यामुळेच एका स्वतंत्र स्त्रिचा भोग अन्य पुरुष घेतात. कोणत्याही जाहिरातीत आपण बधू शकता स्त्रियांची अर्धनग्न चित्रे! लोक स्त्रियांप्रति सन्मानाची भावना हरवून बसले आहेत. ते स्त्री शरीराचे शोषण करण्यासाठी विविध वस्त्रे, आभूषणे व अन्य वस्तूंद्वारे प्रसार माध्यमातून प्रोत्साहन देत आहेत. शारीरिक आकर्षणातून एकत्र येणारे स्त्री-पुरुष विवाहाला औपचारिक तडजोड समजतात. जोपर्यंत ते एकमेकांपासून इंद्रियसुख प्राप्त करतात, तोपर्यंत एकत्र राहतात आणि नंतर विवाह विच्छेद करतात. 
         तसे पाहिले तर तात्त्विक रूपाने तरुण-तरुणींचे तथाकथित सुंदर-सुडौल शरीर म्हणजे काय आहे? केवळ एक चामड्याची झोळी! ज्यात केवळ कफ-पित्त-वायू-मल-मूत्र-मांस, चरबी-रक्त-हाडे आणि अन्य कितीतरी घाणेरडे पदार्थ भरलेले असतात. कुत्रा-कुत्री, डुकर-डुक्रीण जसे एकमेकांशी संभोग करतात तसेच नर-नारीही करतात. त्यांनी कामशास्त्रातील प्राविण्य प्रदर्शित करणे म्हणजे काहीतरी विशेष करणे  असे नव्हे. हे काही अद्भूत कृत्य नसून ही तर एक शारीरिक क्रिया आहे. एक साधारण नैसर्गिक अनुभवाची प्रतिक्रिया आहे. तरीही प्रत्येक जण यात मग्न आहे. जगातील श्रेष्ठ राजे-महाराजे केवळ स्त्री सहवासासाठी युद्ध करीत. ज्युलियस सिझर प्रचंड पराक्रमी, अनेकांवर त्याचे नियंत्रण होते. पण क्लिओपात्राशी संभोग करता यावा म्हणून तो तिच्याशी लोचटपणे लगट करी. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनची पत्नी त्याची उत्तम प्रकारे सेवा करीत असे पण आईनस्टाईन तिच्यावर आसक्त न होता आपल्या चुलत बहिणीवर आसक्त असे. चाकांच्या खुर्चीविना काहीच हालचार करू न शकणारा एका प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञाने  आपल्या नर्सला गर्भवती केले. एकूण काय भारतीय असो वा अमेरिकन राष्ट्रप्रमुख असो, कोणी श्रीमंत असो वा रस्त्याकडेचा भिकारी असो, सर्व जण या मैथुनक्रीयेत व्यस्त आहेत.
          बहुसंख्य लोकांना देव, देश, धर्म वा संस्कृती यांची मुळीच आवड नाही. मग त्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या अध्यात्मशास्त्रांची आवड कशी असणार? 
           राजा भर्तृहरी आपल्या वैराग्य शतकमध्ये लिहितो - 
           उडुराजमुखी, मृगराजकटी 
           र्गजराजविराजित मन्दगतिः ।
           यदि सा वनिता हृदये निहिता,
           क्व तपः? क्व जपः? क्व समाधिरतिः? ।।
           चंद्रासारखे मुख असलेली, सिंहासारखी कटी असलेली, गजराजासारखी डौलदार पण मंद गती असलेली सुंदरी जर हृदयात ठाण मांडून बसली असेल, तर कुठले तप, कुठला जप आणि कुठली समाधीची आवड?

           डॉ. केविन स्कीन (टिटिंग पोर्नीग्राफी ऑडिक्शन) म्हणतात, "सांप्रत प्रसार माध्यमांद्वारे लोकांच्या चेतनेवर होणारा कामुकतेचा भडीमार संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात इतका कधीच झाला नव्हता. लैंगिक वासना चालविणारे घटक आणि कामवासनेच्या प्रभावाला आपण सर्वजण बळी पडत असल्यामुळे आजचा समाज डोळ्यांसमक्ष अधोगतीला जात असल्याचे आपण पाहू शकत नाही. आजच्या अशा समाजात कामवासनेला बळी पडलेले कोट्यवधी लोक असतील."

(क्रमशः )

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

पितृ पक्ष 


         प्रत्येक वर्षी भाद्रपद मासात जो कृष्णपक्ष येतो त्या पंधरा दिवसात पौर्णिमेनंतर प्रतिपदा ते आमावस्येपर्यंत पितरांसाठी विशेष विधी संपन्न केला जातो. या सकाम कर्माच्या विधीला 'श्राद्ध' असे म्हणतात. श्रील गोपाल भट्ट गोस्वामी म्हणतात, "श्रद्धाद्वारे केले जाणारे कर्म म्हणजे 'श्राद्ध' होय."           
           वर्षातील हे पंधरा दिवस आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी राखून ठेवलेले असतात. या दिवसांमध्ये पूर्वजांना जळ आणि अन्न अर्पण केले जाते. आपले माता-पिता ज्या महिन्यात ज्या तिथीला निधन पावले त्या तिथीला त्यांच्या स्मरणार्थ पिंडदान केले जाते. या कर्मकांडीय विधीत केवळ तीनच पिंढ्यांना श्राद्ध कर्म अर्पण केले जाते. पिता ज्या महिन्यात ज्या तिथीला निधन पावले होते त्या तिथीला पिता, पितामह आणि प्रपितामह अर्थात - वडील, आजोबा आणि पणजोबा यांना जळ आणि अन्न अर्पण केले जाते. तसेच माता ज्या तिथीला गेली आहे त्या तिथीला आई, तिची सासू आणि सासूची सासू यांनाही श्राद्ध अर्पण केले जाते. परंतु, केवळ तीनच पिढ्यांना श्राद्ध अर्पण केले जाते. मग बाकीचे  नातेवाईक वा आप्तेष्ट यांचे काय? तर या सर्व ज्ञात-अज्ञात पूर्वजांसाठी या पंधरवड्यात श्राद्ध कर्म केले जाते. वडीलांची ज्या दिवशी तिथी असते ती या पंधरवाड्यात जेव्हा येते तेव्हा आई-वडील, काका-काकू आजोबा-पणजोबा, आजी-पणजी, मामा-मावशी, सख्खे आणि चुलत बंधू, पुत्र, कन्या, पुतणे आणि कुलगुरु वा कुलपुरोहित तसे गुरुजनांना सर्वांनाच जळ आणि अन्न अर्पण केले जाते. 
             वर्षातून एकदाच येणाऱ्या तिथीला आपण आपल्या पितरांना भोजन अर्पण करतो. मग कोणी विचारेल की, आम्ही तिन्ही वेळा भोजन करतो आणि तेही प्रत्येक दिवशी! मग पितरांना वर्षातून एकदाच का? कारण, पृथ्वीवरील कालगणना आणि पितृलोकातील कालगणना भिन्न आहे. पृथ्वीवरील एक वर्ष पितृलोकातील एक दिवसाएवढे आहे. अर्थात, आपण दरवर्षी अर्पण केलेले अन्न पितरांना प्रात्प होते. 
                                         अर्जुनाची शंका 

         भगवद्गीतेत (१.४१) अर्जुन शंका उपस्थित करतो - 
          सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
          पतन्ति पितरो ह्येषां  लुप्तपिण्डोदकक्रियाः ।।
          " अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कूळ तसेच कुळपरंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जलार्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते."
          अर्जुनाची शंका रास्त आहे. कलह आणि दांभिकतेच्या या युगात वर्णसंकारांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकाना आपल्या माता-पित्यांची मृत्युतिथी ठाऊक नाही. त्यांनी पितरांसाठी श्राद्ध-कर्म केव्हा करावे? अशा पितरांच्या अज्ञात तिथीसाठी पक्षाच्या पंधराव्या दिवशी (अमावास्येला) श्राद्ध कर्म करावे. ही तिथी समस्त पितरांसाठी निर्धारित आहे, म्हणून या तिथीला सर्वपित्री आमावस्या म्हणतात. 
          वरील श्लोकाच्या तात्पर्यात श्रील प्रभुपाद लिहितात - "सकाम कर्मांच्या विधीविधानांनुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जळ आणि पिंडदान करणे आवश्यक असते. विष्णुपूजेने ही अर्पणक्रिया सिद्ध होते, कारण श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसादरूपाने खाल्ल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या पापकर्मांतून मुक्त होतो. कधी कधी विविध प्रकारच्या पापकर्मांमुळे पूर्वज दुःख भोगीत असतील आणि कधी कधी तर त्यांच्यापैकी काहीजण स्थूल भौतिक शरीराची देखील प्राप्त करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्ये भूतपिशाच्च म्हणून राहणे भाग पडते. म्हणून वंशज जेव्हा प्रसादरूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात, तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूतपिशाच्च योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना साहाय्य करणे, ही वंशपरंपरा असते. भक्तिमार्गाचा अवलंब न करणाऱ्यांना या प्रकारचे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते. जो भक्तिमार्गाशी संलग्न आहे, त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही. केवळ भक्तिमय सेवा करून एखादा शेकडो आणि सहस्रो पूर्वजांची सर्व प्राकाराच्या कष्टांतून  मुक्तता करू शकतो."
          अर्थात, ज्याला कोणत्याही सकाम कर्मांच्या विधीमध्ये गुंतायचे  नाही आणि स्वतःचा तसेच पूर्वजांचाही उद्धार करायचा आहे, त्याने शतप्रतिशत श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करणे अत्यंत आवश्यक आहे.                                             
                                         प्रह्लादांचे उदाहरण 


           श्री नृसिंह देवांनी हिरण्यकशिपूचा वध केल्यानंतर आपला भक्त प्रह्लाद यास वरदान मागण्यास सांगितले. परंतु, प्रह्लाद महाराज स्वतःकरिता काहीच मागण्यास इच्छूक नव्हते. नृसिंह देवांनी पुन्हा आग्रह केल्यावर प्रह्लाद म्हणाले, "हे भगवन! आपण पतितपावन असल्यामुळे मला एक वर द्यावा. माझ्या पित्याच्या मृत्यूसमयी तुम्ही त्याच्यावर दृष्टिक्षेप टाकल्याने, तो  खचितच शुद्ध झालेला आहे; परंतु, तुमचे अनुपम सामर्थ्य आणि परम सत्तेविषयी तो अज्ञानी असल्यामुळे त्यांनी अनावश्यकच आपणावर क्रोध प्रकट केला. तसेच, आपणच  हिरण्याक्षाला मारले आहे, असा चुकीचा विचार त्यांनी केला. त्यांनी अखिल जीवांचे आध्यात्मिक गुरु असणाऱ्या, आपली घोर निंदा केली. आपला भक्त असणाऱ्या मला मारण्यासाठी उग्र पापकर्में केली. कृपया त्यांना या सर्व पापांपासून तुम्ही मुक्त करावे, अशी माझी तुम्हांस विनंती आहे."
           यावर श्री नृसिंहदेव उत्तरले, "हे परम पवित्र प्रह्लाद! हे साधुपुरुष! तुझे पिता आपल्या एकवीस पूर्वजांसह पवित्र झालेले आहेत. तुझा जन्म या कुळामध्ये झालेला असल्याने हे संपूर्ण कूळ पवित्र झालेले आहे. 
             या श्लोकाच्या तात्पर्यात श्रील प्रभुपाद लिहितात, "मनुष्य चार किंवा पाच पिढ्यांपर्यंत आपल्या कुळाची गणना करू शकतो; परंतु, भगवंतांनी येथे एकवीस पिढ्यांचा उल्लेख केलेला असल्यामुळे त्यांनी दिलेला वर इतर भक्तांच्याही कुळाला लागू पडतो. भक्ताने वर्तमान कुळापूर्वी अन्य कुळांमध्येही जन्म घेतलेला असतो. त्यामुळे वैष्णवाचा एखाद्या कुटुंबामध्ये जेव्हा जन्म होतो, तेव्हा भगवत्कृपेने तो केवळ त्याच कुळाचा नव्हे तर पूर्व जन्मांतील अन्य कुळांचाही उद्धार करतो."
             मनुष्य श्राद्ध कर्मात केवळ याच कुळातील तीन पिढ्यांना जल अर्पण करू शकतो; परंतु, जर त्याने मुक्तिदात्या भगवान श्री मुकुंदांच्या चरणकमळांचा नित्य आश्रय घेऊन त्यांची प्रेममयी भक्ती केली तर तो एकवीस पिढ्यांचा उद्धार कोणतेही श्राद्ध कर्म न करताच करू शकतो. 
            तसेच श्री नृसिंहदेव प्रह्लाद महाराजांना सांगतात, "हे प्रह्लाद! तुझा पिता मृत्युसमयी माझ्या दिव्य देहाच्या केवळ स्पर्शानेच शुद्ध झालेला आहे. तरीही पित्याच्या मृत्यूनंतर और्ध्वदेहिक  कर्मे करणे हे पुत्राचे कर्तव्य आहे, कारण अशा कर्मांमुळे पिता उच्चतर ग्रहांवर उन्नत होऊन तेथे उत्तम नागरिक अथवा भक्त होऊ शकतो."
             या संदर्भात श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर स्पष्ट करतात की,  हिरण्यकशिपू मृत्युसमयी जरी शुद्ध झाला होता, तरी त्याला उच्चतर ग्रहांवर पुन्हा भक्ताचा जन्म घ्यावा लागला. भगवंतांनी प्रह्लाद महाराजांना शास्त्रमर्यादा रक्षणार्थ पित्याची और्ध्वदेहिक कार्ये करण्यास सांगितले, कारण ते कोणत्याही परिस्थितीत नियामक तत्त्वांचे उल्लघंन करीत नाहीत. प्रभू रामचंद्रांनी पुष्करला आपले पिता, दशरथ महाराजांचे श्राद्ध संपन्न केले होते. श्री चैतन्य महाप्रभूंनी देखील गयेला आपले पिता, जगन्नाथ मिश्रांचे श्राद्ध केले होते. 
               श्रील प्रभुपाद तात्पर्यात लिहितात, "भगवंतांनी प्रह्लाद महाराजांना वेदोक्त संस्कार नियमांचे पालन करण्यास सांगितले. याचे कारण असे की, प्रह्लाद महाराज पित्याच्या मृत्यूमुळे सम्राट होणार होते आणि इतर लोक त्यांचे उदाहरण अनुसरणार होते. पुढे नृसिंह देवांनी त्यांना राज्यकर्तव्यांचे योग्य रीतीने पालन करण्यास सांगितले, कारण त्यांचे कर्तव्य पालन पाहून सर्वसामान्य लोक भगवद्भक्त होणार होते. भक्ताने ऐहिक कार्यांवर आसक्त असू नये; त्याने ही कार्ये अशा पद्धतीने केली पाहिजेत की त्यामुळे सामान्य लोकांना वेदांपासून दूर न जाण्याची शिकवण मिळाली पाहिजे."
               भागवतातील सप्तम स्कंधातील चौदाव्या अध्यायात नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना आदर्श कौटुंबिक जीवनाविषयी संबोधित करताना सांगतात, "धनवान ब्राह्मणाने भाद्रपद मासातील कृष्णपक्षाच्या काळात पितरांचे श्राद्ध करावे. त्याचप्रमाणे त्याने अश्विन मासामधील महालयाच्या काळात पितरांच्या नातेवाईकांचे श्राद्ध करावे."

                           एकादशी तिथीस श्राद्ध निषिद्ध  

          आपले वाड-वडील एकादशी तिथीला गेले असतील, तर श्राद्ध विधी एकादशीस न करता द्वादशीस करावा. श्रील जीव गोस्वामी या संदर्भात विविध शास्त्रांचा उल्लेख करून स्पष्ट करतात. ब्रह्मवैवर्त पुराणात म्हटले आहे - 
          ये कुर्वन्ति महिपाल श्राद्धं चैकादशीदिने ।
          त्रयस्ते नरकं यान्ति दाता भोक्ता च प्रेरकः ।।
          "मनुष्याने जर एकादशीस पितरांचे श्राद्ध केले, तर श्राद्ध करणारा दाता, ज्या पितरांसाठी श्राद्ध केले जाते ते पितर आणि अशा श्राद्धास प्रेरणा देणारा  प्रेरक पुरोहित, हे तिघेही नरकात जातात."

                                        किती खर्च करावा? 
          श्रील प्रभुपाद म्हणतात की, भारतात लोक आपल्या जीवनात तीन वेळा मोठ्या प्रमाणावर खर्च करतात - १) पुत्र प्राप्तीनंतर, २) कन्येच्या विवाहाप्रसंगी आणि ३) माता-पित्याच्या श्राद्ध समयी. श्राद्धासाठी अनावश्यक खर्च टाळावा. दोन किंवा तीन ब्राह्मणांना श्राद्ध दिनी भोजनाचे आमंत्रण द्यावे. 
           सांप्रत कलियुगाच्या प्रभामुळे उत्तम ब्राह्मण मिळणे दुष्कर आहे. अशा वेळी भगवद्भक्तांना भोजन, दक्षिणा आणि वस्त्र दान करावे. त्यातही जे भक्त निर्धन आहेत किंवा ज्यांना धनाची नितांत आवश्यकता आहे, अशा भक्तांना दान द्यावे. हे सर्व करण्यास शक्य नसल्यास श्राद्ध तिथीस भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात अन्न-धान्य, फळे, वस्त्र आणि दक्षिणा अर्पण करावी. 
                               श्राद्ध पात्र कोणास द्यावे?
                ज्या गृहस्थांना श्राद्ध तिथीस आपल्या घरी भोजन अर्पण करणे शक्य आहे, त्यांनी दोन किंवा तीन वैष्णवांना घरी आमंत्रित करावे. त्या वैष्णवांच्या मुखातून हरिकथा आणि हरिनाम श्रवण करून त्यांना भोजन अर्पण करावे. हे कार्य करताना आमंत्रित केलेला भक्त जन्माने ब्राह्मण नसला तरी काळजी करू नये. श्रील अद्वैत आचार्यांनी नामाचार्य हरिदास ठाकुरांना श्राद्ध पात्राचे मुख्य स्थान दिले होते. श्रील हरिदास ठाकूर जन्माने यवन परिवारातील होते, तरीही त्यांना हा सन्मान देण्यात आला. त्यावेळी स्मार्त ब्राह्मणांनी अद्वैत आचार्यांची निंदा केली होती.                                 शरणागत भक्तांसाठी श्राद्धकर्म अनावश्यक
     श्रील प्रभुपाद आपल्या वाणीने, लेखणीने आणि कृतीने सर्वांना शुद्ध कृष्ण-भक्त होण्यासाठी प्रेरित करतात. ते म्हणतात, "एका समर्पित कृष्णभक्तसाठी सर्व प्रकारची कर्मकांडे करण्याची आवश्यकता नसते." यासाठी ते भागवतातील (११.५.४१) श्लोक उद्धृत करतात, 
        देवर्षि भूताप्तनृणां पितृणां 
         न किडकरो नायनृणां च राजन ।        
        सर्वात्मना यः शरणं शरण्यं 
        गतो मुकुन्दं परिह्यत्य कर्तम् ।।                   
 "ज्याने सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग करून मोक्षदात्या श्रीमुकुंदांच्या  
चरणकमळांचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभिर्याने भक्तिमार्गाचा अंगिकार केला आहे, त्याची देवदेवता, ऋषीमुनी, इतर जीव, कुटुंबातील सदस्य, मानवता आणि पूर्वज यांच्या संबंधी कोणतीही कर्तव्ये किंवा ऋण फेडणे बंधनकारक नसते." 
       अर्थात, यासाठी श्रीकृष्णांचा पूर्णपणे शरणागत भक्त होणे परम आवश्यक आहे.                   

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

                                       कलियुगाची लक्षणे 

     आपल्याला मानवाच्या सध्याच्या आवश्यकतांची जाणीव असली पाहिजे. आजचा मानव भौगोलिक मर्यादांनी बांधलेला नाही. तो विशिष्ट देश, खंड, समाज, जाती-पाती, धर्म यांनी जखडलेला नाही. मध्ययुगापेक्षा मानवाची क्षितिजे विस्तारलेली आहेत. दूरध्वनी, दूरदर्शन, भ्रमणध्वनी वा संगणक प्रणालीने आज विश्वप्रवृत्ती एक देश, एक समाज अशीच वाढत आहे. तिची वाढ वा प्रगती अतिशय झपाट्याने होत आहे. 
     आजचा माणूस विस्मृतीच्या अंधकारात नाही. त्याने संपूर्ण विश्वात भौतिक सुखसोयींमध्ये, भौतिक शिक्षणात, आर्थिक प्रगतीत, खाण्यापिण्यात, वस्त्रालंकार घालण्यात आणि अन्य अनेक प्रकारच्या क्षेत्रांत प्रचंड प्रगती केली आहे. स्त्रिया पुरुषांच्या खांदा लावून नव्हे तर वेळ प्रसंगी पुरुषाला खांदा देऊन सर्वच क्षेत्रांत भरारी घेत आहेत. असे असले तरी मानवांत प्रचंड विषमता, भिन्नता दिसून येते. लैंगिक शोषण आणि शिक्षण प्रचंड वाढत आहे. खून-मारामाऱ्या, लूट-भ्रष्टाचार, व्देष  यांचा आलेखही प्रचंड आहे. त्यामुळे साध्यासाध्या गोष्टींना घेऊन  संघर्ष होताहेत.
      आज विशिष्ट समाजाकडून इतरांना शिक्षणापासून वा स्वातंत्र्यापासून वंचित ठेवता येत नाही. शिक्षण सर्वांनाच मिळू शकते. शेतीमध्ये कितीतरी क्रांती झाली असली तरी अजूनही शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. बळीराजाला कर्जबाजारीपणा येत असून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. तर शहरीकरणाच्या प्रचंड वाढीत मोठा पगार घेणारे सुद्धा असंतुष्ट आहेतच. प्रत्येक मानवाला काही ना काही पीडा सतावते आहे. 
वसतुतः मानवाच्या विषमतेचे कारण म्हणजे त्यांची चंगळवृत्ती, भोगविलासी प्रवृत्ती आणि नास्तिक संस्कृतितील नियमांचा अभाव हे होय. 
     वेदशास्त्रें  सांगतात की, परमेश्वर एक आहे, तो सर्वशक्तिमान आहे. त्याच्यापासून प्रत्येक वस्तू निर्माण होते, त्याच्याकडूनच सर्वांचे पालनपोषण होते आणि त्याच्यातच विश्रंतीसाठी सर्वांचा विलय होतो. असे शास्त्रवचन सत्य असले तरी भौतिक विज्ञानाने परम उद्गमाचा शोध घेण्याचा जो बालिश खटाटोप चालवला आहे तो निरर्थक आहे, व्यर्थ आहे. परंतु सत्य हे आहे की, प्रत्येक वस्तूचा परम स्रोत एकच आहे. याच परम स्रोताची तर्कशुद्ध आणि अधिकृत व्याख्या वेदशास्त्रांचे परिपक्व फळ सुंदर अशा भागवत पुराणात केलेली आहे. 
    भागवत पुरणाची रचना पाच सहस्र  वर्षांपूर्वीच केलेली असून सध्याच्या तथाकथित प्रगतिशील मानवाविषयी काही सुस्पष्ट वर्णन यात केलेले आहे. सध्याच्या भोगविलासी आणि नास्तिकांकडून करून घेऊ शकतो. यांयतील काही आश्चर्यकारक वर्णनांवर या ठिकाणी विस्तृत चर्चा करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत.            

©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७