शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

                                       कलियुगाची लक्षणे 

     आपल्याला मानवाच्या सध्याच्या आवश्यकतांची जाणीव असली पाहिजे. आजचा मानव भौगोलिक मर्यादांनी बांधलेला नाही. तो विशिष्ट देश, खंड, समाज, जाती-पाती, धर्म यांनी जखडलेला नाही. मध्ययुगापेक्षा मानवाची क्षितिजे विस्तारलेली आहेत. दूरध्वनी, दूरदर्शन, भ्रमणध्वनी वा संगणक प्रणालीने आज विश्वप्रवृत्ती एक देश, एक समाज अशीच वाढत आहे. तिची वाढ वा प्रगती अतिशय झपाट्याने होत आहे. 
     आजचा माणूस विस्मृतीच्या अंधकारात नाही. त्याने संपूर्ण विश्वात भौतिक सुखसोयींमध्ये, भौतिक शिक्षणात, आर्थिक प्रगतीत, खाण्यापिण्यात, वस्त्रालंकार घालण्यात आणि अन्य अनेक प्रकारच्या क्षेत्रांत प्रचंड प्रगती केली आहे. स्त्रिया पुरुषांच्या खांदा लावून नव्हे तर वेळ प्रसंगी पुरुषाला खांदा देऊन सर्वच क्षेत्रांत भरारी घेत आहेत. असे असले तरी मानवांत प्रचंड विषमता, भिन्नता दिसून येते. लैंगिक शोषण आणि शिक्षण प्रचंड वाढत आहे. खून-मारामाऱ्या, लूट-भ्रष्टाचार, व्देष  यांचा आलेखही प्रचंड आहे. त्यामुळे साध्यासाध्या गोष्टींना घेऊन  संघर्ष होताहेत.
      आज विशिष्ट समाजाकडून इतरांना शिक्षणापासून वा स्वातंत्र्यापासून वंचित ठेवता येत नाही. शिक्षण सर्वांनाच मिळू शकते. शेतीमध्ये कितीतरी क्रांती झाली असली तरी अजूनही शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. बळीराजाला कर्जबाजारीपणा येत असून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. तर शहरीकरणाच्या प्रचंड वाढीत मोठा पगार घेणारे सुद्धा असंतुष्ट आहेतच. प्रत्येक मानवाला काही ना काही पीडा सतावते आहे. 
वसतुतः मानवाच्या विषमतेचे कारण म्हणजे त्यांची चंगळवृत्ती, भोगविलासी प्रवृत्ती आणि नास्तिक संस्कृतितील नियमांचा अभाव हे होय. 
     वेदशास्त्रें  सांगतात की, परमेश्वर एक आहे, तो सर्वशक्तिमान आहे. त्याच्यापासून प्रत्येक वस्तू निर्माण होते, त्याच्याकडूनच सर्वांचे पालनपोषण होते आणि त्याच्यातच विश्रंतीसाठी सर्वांचा विलय होतो. असे शास्त्रवचन सत्य असले तरी भौतिक विज्ञानाने परम उद्गमाचा शोध घेण्याचा जो बालिश खटाटोप चालवला आहे तो निरर्थक आहे, व्यर्थ आहे. परंतु सत्य हे आहे की, प्रत्येक वस्तूचा परम स्रोत एकच आहे. याच परम स्रोताची तर्कशुद्ध आणि अधिकृत व्याख्या वेदशास्त्रांचे परिपक्व फळ सुंदर अशा भागवत पुराणात केलेली आहे. 
    भागवत पुरणाची रचना पाच सहस्र  वर्षांपूर्वीच केलेली असून सध्याच्या तथाकथित प्रगतिशील मानवाविषयी काही सुस्पष्ट वर्णन यात केलेले आहे. सध्याच्या भोगविलासी आणि नास्तिकांकडून करून घेऊ शकतो. यांयतील काही आश्चर्यकारक वर्णनांवर या ठिकाणी विस्तृत चर्चा करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत.            

©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७  
             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा