गाढवाला गुळाची चव काय ?
माणसाला जाणता येईल अशा सर्व गोष्टी वेदांमध्ये सांगितलेल्या आहेत. वेद सांसारिक आणि आध्यात्मिक साक्षात्कारासंबंधित आहेत. वेदांमध्ये ज्ञानाच्या सर्व नियामक तत्त्वांचा अर्थात, सामाजिक, राजकीय, धार्मिक, अर्थशास्त्रीय, सैनिकी, वैद्यकीय, रासायनिक, भौतिक आणि तत्त्वज्ञान इत्यादी विषयांचा समावेश आहे आणि देह तथा आत्मा एकत्र ठेवण्यासाठी या सर्वांची आवश्यकता आहे. या सर्वांपेक्षा अधिक विशेष महत्वाची गोष्ट ही आहे की, त्यामध्ये आध्यात्मिक साक्षात्कारासाठी मार्गदर्शन आहे. परंतु ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे, अशा अज्ञानी लोकांना वेदांचा अर्थ सांगणे कठीण आहे. गाढवाला गुळाची चव काय ? आंधळ्यापुढे आरसा धरल्याने, कावळ्यांपुढे कपूर टाकल्याने, गाढवाला अत्तर फासल्याने काय लाभ ?
वेद ज्ञानात रुची असणाऱ्या मनुष्याला वेदांच्या ज्ञानाने आध्यात्मिक स्तरावर प्रगती करता येते. परंतु ज्यांची बुद्धी कुविचारांनी आधीच नासलेली आहे किंवा सडलेली आहे अशा मुर्खांना वेद जाणणे कठीण आहे. श्री तुकाराम महाराज सांगतात, " वेदांचा अर्थ आम्हास ठाऊक आहे, इतरांनी केवळ भार वहावा." अशा भार वाहक गाढवापुढे गीता कितीही वाचली तरी काय उपयोग?
कलियुगाच्या प्रभावामुळे मूढमती लोकांचे प्राबल्य वाढलेले आहे. त्यांच्यात प्रामाणिकपणाचा पूर्णपणे अभाव आहे. हे लोक आपल्या तथाकथित भौतिक ज्ञानाने आध्यात्मिक ज्ञानाचे आकलन करू इच्छितात. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे हे मूर्ख, उत्तम इंग्रजी जाणणाऱ्या वकिलांकडे जाऊन आपल्या जुनाट रोगासाठी औषोधोपचार विचारात आहेत
श्री तुकाराम महाराज सांगतात -
आम्ही वैकुंठवासी । आलो याच कारणासाठी ।।
बोलिले जे ऋषी | साच भावें वर्ताया ।।
झाडू संतांचे मार्ग | आडरानी भरले जग|
उच्छिष्टांचा भाग | शेष उरला तो सेवूं ।।
अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्द ज्ञाने ।
विषय लोभी माने । साधने बुडविली ।।
पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ।
तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ।।
"आम्ही वैकुंठात वास्तव्य करणारे आहोत पण व्यास ऋषींनी दिलेल्या वेदप्रणीत मार्गाचे पालन करून दाखविण्यासाठी , भौतिक जगात आलो आहोत. आम्ही अशा संतांनी आखून दिलेला मार्ग स्वच्छ करू, कारण या मार्गावर अज्ञानाचे रान वाढले आहे. व्यासांसारख्या संतांचे शब्दरूपी उच्छिष्ट आम्ही सेवन करू. सर्व वेद पुराणाचे सार आहे हरिनाम, पण विषयलोभी व्यक्तींनी वेदांच्या नावाखाली स्वतःच्या विचारांचा शब्दघोळ करून लोकांना भ्रमित केले आहे. पारमार्थिक साधने नाहीशी केली. तुकाराम महाराज म्हणतात, त्यासाठी आम्ही भक्तीचा डांगोरा पिटू आणि ज्यायोगे कळिकाळालाही भय उत्पन्न होते. त्या हरिनामाचा आनंदाने जयजयकार करू."
वस्तुतः भगवंतांच्याच प्रेरणेने अनेक तथाकथित विद्वान जन्माला येतात आणि वेदांचे खंडन करतात. आपल्या वेड्यावाकड्या कुअर्थाने ते मुर्खांना भ्रमित करतात, ते असे का करतात? कारण भगवंतांना अशा पापी आणि दुराचारी लोकांना या भौतिक जगात दुःख भोगायला ठेवायचे असते आणि केवळ प्रामाणिक शुद्ध भक्तांना या दुःखमय जगातून मुक्त करून आपल्या शाश्वत धामाला न्यायाचे असते. त्यामुळे भगवंत अशी खेळी खेळत असतात.
पाच सहस्र वर्षांपूर्वी या पृथ्वीला भारतवर्ष म्हणत आणि याचे शेवटचे सम्राट परीक्षित महाराज होते. त्यांच्या मृत्यू नंतर या पृथ्वीवर कलीचे साम्राज्य पसरले. महाराज परीक्षिताना अर्धवट ज्ञान असलेल्या शृंगी नामक बारा वर्षीय ब्राह्माणाने शाप दिला आणि तेव्हा पासून ब्राह्मणांचे पतन प्रारंभ झाले आणि त्यानंतर क्रमशः क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांचे पातन झाले. मोठमोठ्या यज्ञात पशु बळी दिल्याने क्षत्रिय बलशाली आणि ऐश्वर्य संपन्न होतात अशी भलावण करून पतित ब्राह्मण यज्ञ करीत. या यज्ञात बळी दिलेल्या पशूचे मांस सर्वजण प्रसाद म्हणून भक्षण करीत. यज्ञाच्या नावाखाली होणारी अनेक निष्पाप पशूंची हत्या थांबवण्यासाठी भगवान श्रीविष्णुंनी बुद्धदेव हा अवतार धारण केला. ज्या भगवंतांनी वेद निर्माण केले तेच भगवान बुद्धदेव म्हणून वेदांचा आणि यज्ञाचा प्रतिकार करू शकत होते. सामान्य मानवाला त्याकाळी असा विरोध करता येणे शक्य नव्हते. या ठिकाणी हेही ध्यानात ठेवले पाहिजे की भगवंतांचे अवतार बुद्धदेव आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध भिन्न आहेत. भेसळ करून स्वतःचा आणि इतरांचा घोटाळा करू नये.
कालांतराने हळूहळू बौद्ध मत संपूर्ण भारतात पसरले आणि वेद प्रणित यज्ञ बंद झाले. पुढे कालांतराने बौद्धमताचेही विकृतीकरण वाढू लागले. वैदिक धर्म लोप पाऊन सिद्धार्थाचे नास्तिक बौद्ध मत प्रबळ झाले. त्यामुळे वैदिक धर्माची पुनः स्थापना करण्यासाठी भगवान श्रीविष्णुंच्या आज्ञे वरून भगवान शंकर, शंकराचार्य म्हणून प्रकट झाले आणि त्यांनी बौद्धमत परास्त केले.
श्रीपाद आद्य शंकराचार्यांना भगवद्भक्तीचा मार्ग शुद्ध ठेवायचा असल्यामुळे त्यांनी प्रच्छन्न बौद्धमत मांडले.
पद्म पुराणात भगवान महादेवानी पार्वती देवींना आपल्या प्रकटयाचे गुपित सांगितलेले आहे मायावादम् असतशास्त्रं प्रच्छन्नम् बौद्धमुच्यते|
मयैव काल्पितं देवि कलौ ब्राह्मणरुपिना ।।
ब्राह्मणश्चापरं रूपं निर्गुणं वक्ष्यते मया ।
सर्वस्वं जागतोअप्यस्य मोहनार्थं कलौ युगे||
वेदांते तु महाशास्त्रे मायावादमवैदिकम् ।
मयैव वक्ष्यते देवि जगतां नाशकारणात ।।
"मायावादी तत्वज्ञान असत शास्त्र आहे. अधार्मिक आहे. हे झाकलेले बौद्धमत आहे. प्रिय पार्वती मी कलियुगात ब्राह्मण रूपाने येतो आणि या मायावाद नामक काल्पनिक तत्वज्ञानाचा प्रचार करतो. नास्तिकांना फसविण्यासाठी ते रूपरहित आणि निर्विशेष असल्याचे मी पुरुषोत्तम भगवंतांचे वर्णन करतो. तद्वत, वेदान्ताचे स्पष्टीकरण करताना पुरुषोत्तम भगवंतांच्या व्यक्तिगत रूपाला नाकारून सर्व मानवजातीला नास्तिकतेकडे पथभ्रष्ट करण्यासाठी मी 'मायावाद' तत्वज्ञानानुसार त्याचे वर्णन करतो. "
असे करण्यासाठी पुरुषोत्तम भगवंतांनी शिवांना सांगितले होते -
द्वापारादौ युगे भूत्वा कलया मनुषादिषु ।
स्वागमै: काल्पितैस्तवं च जनान्मद्विमूखानकरु ।।
"कलियुगात जनसामान्यांना संभ्रमित करण्यासाठी वेदांचा काल्पनिक अर्थ काढ आणि त्यांची दिशाभूल कर." - शिव पुराण
सर्वात महत्त्वाचे हे आहे की, ज्यांनी ज्यांनी वेदांचे खंडन केले आहे त्या समस्त तथाकथित विद्वानांनी वेदांचा अर्थ आपल्या मानाने लावलेला आहे. यातील अनेकांना संस्कृतचे ज्ञान मुळीच नव्हते. त्यांनी कोणत्याही प्रमाणित आणि प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेतून शुद्ध ज्ञान घेतले नव्हते. त्यामुळे ते सदैव कु अर्थच लावणार. अशा आंधळ्यांच्या मागे जाणारेही आंधळेच असणार.
लेखन सेवा - विनय शंकर गोडसे, बेळगाव.
संपर्क - ९२४२१७६५८७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा