मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

               पैशापायी उत्तम गुणांचा सर्वनाश 

एका संस्कृत सुभाषितात म्हटले आहे - 
लोभोविष्टो नरो वित्तम् वीक्षते न तु संकटम् ।
दुग्धम् पश्यति मार्जारो न तथा लगूडाहतिम् ।।

' लोभी माणसाला पैसा दिसतो, पण संकटे मात्र दिसत नाहीत. जसे मांजराला दूध दिसते पण बडगा दिसत नाही.'
भारताचे लाडके पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी फारच मोठे साहस केले आहे. नोटा बंदीचा निर्णय घेवून समस्त भारतीयांना प्रामाणिकपणे कार्य करण्यासाठी प्रेरित केले आहे. त्यांच्या  या बडग्याने अतिरेकी, नक्षली, भ्रष्ट राजकारणी, काळा बाजार करणारे, ढोंगी आणि पाखंडी असे अनेक लोक धाराशायी पडले आहेत. पैशासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा। अशी विचित्र अवस्था सर्वांची झाली आहे.     
      पूर्वी भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर आता रामराज्य येईल असे अनेक भावूक लोकांना वाटू लागले होते. परंतु असे काहीही न होता, उलट रावणराज्य सर्वत्र फोफावू लागले. कलिच्या प्रभावामुळे लबाडी वाढू लागली होती. प्रत्येक राजकारणी लाच खाणे आणि लाच देणे यांचेच संस्कार लोकांच्या गळी उतरवू लागले होते. 
      बहुसंख्य लोकही ५०० वा १००० रुपयांची नोट घेवून मतदान करून अधिकाधिक भ्रष्ट लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडून देत. यथा राजा तथा प्रजा ऐवजी यथा प्रजा तथा राजा असे नविन समिकरण प्रस्थापित झाले. 
     लोकांमधील सुसंस्कारांनी कधी स्वार्थी विकृतिचे रूप घेतले, हे कळायला मोठमोठया चिंतकांनाही कळले नाही. 
       कोणे एके काळी संपूर्ण विश्वात भारतीयांच्या उत्तम गुणांचे कौतुक केले जात असे. 
       संपूर्ण विश्वात कलियुगाचा प्रभाव झपाटयाने वाढत असताना आणि इस्लामच्या आक्रमणापूर्वी भारतीय जनजीवन सुखसमृद्धीने नटलेले होते. चाणक्य पंडितांच्या उच्च मार्गदर्शनाखाली सम्राट चंद्रगुप्त मौर्यांच्या काळात भारतीयांची उदात्त जीवनमूल्ये अधिकच भरभराटीला आली होती. त्याच्या राज्यसभेत पाच वर्षे राहिलेला ग्रीकांचा राजदूत मेगॅंस्थेनीसने भारतीयांविषयी गौरवोद्गार लिहून ठेवले आहेत. त्यांनतर भारतात अनेक विदेशी येऊन गेले. त्यातील काही प्रमुख एरियन, स्ट्रँबो, ह्युएनत्संग, फ्रायर, जॅर्डेनस, मार्कोपोलो  होते. या परदेश लेखकांनी लिहून ठेवले आहे की, 'भारतीयांमध्ये न्यायबुद्धी, प्रामाणिकपणा, सचोटी, सरलवृत्ती ठासून भरलेली आहे.'
      इस्लामी आक्रमणानंतर आणि ब्रिटिश राजवटीतही भारतीयांमध्ये हे गुण बाऱ्याच प्रमाणात टिकून होते. अगदी इंग्रजांचे सर्वप्रथम राज्य बंगालमध्ये इ.स. १७५७ मध्ये नुकतेच चालू झाले त्यावेळची एक घटना येथे नमूद करावीच लागेल. कोलकत्याच्या कोण्या एका मार्गावर भिस्ती मुलगा पखालीने पाणी भरत होता. 'पखाली' म्हणजे बोकड वा रेडयाच्या चामड्याची भली मोठी पिशवी आणि त्यातून पाणी भरून नेणाऱ्याला 'भिस्ती' म्हणतात. तो भिस्ती पाणी भरून नेत असताना एक पाद्री समोरून येत होता आणि अचानक त्या पाद्र्याला वाटेत काही तरी चमकलेले दिसले. ते एक सोन्याचे नाणे होते. ते तो घेण्यासाठी वाकणार तेव्हड्यात तो भिस्ती मुलगा पखालीतून पाणी घेऊन त्याच्या समोरा आला. पाद्रीयाने लागलीच ते नाणे पायाखाली दाबून ठेवले. तो मुलगा त्याच्याकडे बघत पुढे गेला आणि पाणी भरून परत आला. असे त्याने दोन वेळा केले; तरी तो पदरी तेथेच उभा होता. शेवटी त्या मुलाने हात जोडून त्याची चौकशी केली असता तो म्हणाला,"तुला एका मोठ्या  पाप कर्मापासून मी वाचवतो आहे."
      तेव्हा तो मुलगा म्हणाला,"आपण कोणत्या पापकर्मापासून मला वचवीत आहात ते मला कळेल का?"
     त्यावेळी पाद्री आपल्या तोंडावर मोठा गंभीर आव आणत म्हणाला,"हे बघ, येथे पडलेले हे सोन्याचे नाणे अन्य कोणाचे तरी आहे आणि ते तू हळूच खिशात टाकशील आणि घेऊन जाशील. त्यामुळे तुझ्याकडून पाप घडेल. त्या संभाव्य पापापासून तुला वाचविण्यासाठी मी येथे उभा आहे."
हे ऐकल्यावर तो बालक हात जोडून नम्रपणे म्हणाला,"महोदय, मागील तीन दिवसांपासून हे नाणे येथेच पडलेले आहे आणि मी ते उचलले नाही; कारण जी वस्तू आपली नाही त्याला हात लावू नये असे माझ्या आई वडिलांनी मला शिकविले आहे. त्यामुळे माझ्याकडून कधीच न होणाऱ्या  पापविषयी आपण चिंता करू नये."
      असे बोलून तो मुलगा आपल्या मार्गास लागला आणि पाद्री दिग्मूढ होऊन त्याच्या पाठमोऱ्या  मूर्तिकडी पाहतच राहिला!
      हे सर्व सांगण्याचा हेतू हाच की, पूर्वीच्या काळी भारतीयांमध्ये असा प्रामाणिकपणा होता. आता मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. दिल्ली ते गल्ली पर्यंत प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टचार बोकाळला आहे. प्रामाणिकपणे जीवन व्यतीत करणाच्यांची संख्या अतिशय नगण्य होत चालली आहे. आध्यामिक मार्गात प्रगती करू इच्छीणाऱ्या व्यक्तींकडूनही प्रमाद घडताना दिसून येतो, मग अन्य धर्मज्ञानहीन लोकांविषयी काय बोलवे?
      श्रील भक्तीसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात,'या भौतिक जगात दोन प्रकारचे लोक आहेत, फसणारे आणि फसविणारे!' मात्र केवळ हाताच्या बोटावर गणती करण्याइतकेच अल्प प्रमाणात काही प्रामाणिक कृष्णभक्त आहेत की, जे स्वतः सर्व प्रकारचे कष्ट, पीडा वा अपमान सहन करून समस्त जीवांच्या उद्धारासाठी झटत असतात. 
      या भौतिक जगतात निवास करताना प्रत्येक ज्ञानी वा ज्ञानहीन मनुष्याला धनाची नितांत आवश्यकता असतेच. परंतु किती? केवळ आपले आणि आपल्या कुटुंबियांचे पालन पोषण करण्यासाठी जितके आवश्यक आहे तितकेच; परंतु दिव्य ज्ञानाच्या अभावामुळे आणि आसुरी वृत्ती धारण केल्यामुळे मनुष्य सदैव धनाच्यामागे धावत असतो. त्यामुळे कृष्णप्रेमाचा अमूल्य ठेवा प्राप्त करण्याची सुवर्णसंधी त्यागून तो मृत्तिकेच्या मागे लागतो. 
वित्ते कलौ नृणां जन्माचारगुणोदयः ।
धर्मन्यायव्यवस्थायां कारणं बलमेव हि ।।

'कलियुगात केवळ 'वित्त' -पैशालाच मनुष्याचा उत्तम जन्म, योग्य व्यवहार आणि सद्गुणांचे लक्षण मानले जाईल. धर्म आणि न्याय तर मनुष्याच्या बळानुसार लागू होईल.' - भागवत पूर्ण १२.२. २
      कलियुगात सर्वच गोष्टींचे मोजमाप पैशाने केले जाते. ज्याच्याकडे पैसा आहे तो कसल्याही प्रवृत्तीचा का असेना ! लोक त्याच्या दारात तिष्ठत उभे राहतील. 'जो वरी पैसा तो वरी बैसा', या न्यायाने पैसा आसणाऱ्याचा लोक सन्मान करतील. पैसा म्हणजे भगवान आहे. पैशाच्या जोरावर काय वाटेल ते प्राप्त करू शकतो. पैशाच्या बळाने न्याय विकत घेता येतो. सरकारी यंत्रणा वेठीला धरता येते. निवडणुक जिंकता येते. पण पैसा नसेल तर काहीच मिळत नाही. 
       परंतु प्रामाणिक भगवद्भक्त गुरु, साधू आणि शास्त्र यांची कास धरतो आणि धन संपदेच्या जंजाळातून मुक्त असे आनंदी जीवन जगतो.  
लेखन सेवा - विनय शंकर गोडसे, बेळगांव. 
संपर्क - ९२४२१७६५८७
-                                          --------------------------------------










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा