बुधवार, १२ एप्रिल, २०१७

               २.  भगवंतांचे अधिष्ठान आवश्यक 


सध्या आपल्या देशात आणि विशेष करून महाराष्ट्रात जातीयवादाचा भस्मासुर दिवसेंदिवस बेसुमार वाढतो आहे. पैशाला चटावलेली  वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि त्यातही विशेषकरून टी.व्ही. चॅनेलवाले जाणूनबुजून या कुप्रवृत्तीला पोसत आहेत. कोणतीही दुर्घटना घडली की त्यात मीठ-मसाला टाकून त्याचा ओढून ताणून संबंध ब्राह्मणांशी जोडण्यास या माध्यमांना कमालीची धन्यता वाटते. यातून ते कोणते सामाजिक हित साधणार आहेत कोण जाणे? 

स्वतःला सत्यशोधक वा पुरोगामी म्हणविणारे हे भंपक सत्याचा विपर्यास करून विकृत जातीद्वेष पसरविणारी वक्तव्ये करीत आहेत. असे घडत असताना सुशिक्षित विचारी बहुजन समाज मात्र शांतपणे बघतो आहे. याचे मोठे आश्चर्य वाटते. अशा लोकांनाही अंतःकरणातून दुःख न वाटता सुख वाटते की काय? का, त्यांनाही उघडपणे ब्राह्मणांना शिव्या घालता येत नाही म्हणून समाधान वाटते?

काही अल्पबुद्धीच्या लोकांना वाटते की, केंद्रात काही मंत्री ब्राह्मण आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री ब्राह्मण आहे. पं. बंगाल आणि तामिळनाडू येथे ब्राह्मण स्त्रिया मुख्यमंत्री आहेत; परंतु हे सर्वजण या ब्राह्मण द्वेषावर काहीच करीत नाहीत? असे का? कारण याची अनेक करणे आहेत. या सत्ताधारी मंडळींना परत परत निवडून यायचे आहे; परंतु निवडून येण्यासाठी ३% ब्राह्मणी मतांची आवश्यकता नसून बहुमताची निकड आहे. त्यामुळे हे लोक विकृत विचारसरणीला विरोध करीत नाहीत. तसेच यातील सर्वांनाच ब्राह्मण असण्याची लाज वाटते. यांच्यात वेदशास्त्र प्रमाणित ब्राह्मण गुणांचा पूर्णपणे अभाव आहे. गीता-भागवतातील दिव्य ब्राह्मण गुणांचा हे लोक तिरस्कार करतात. यांना मद्य-मांस यांचे आकर्षण आहेच. त्यामुळे हे द्विजबंधू अर्थात पतित झलेले नामधारी ब्राह्मण आहेत. त्यामुळे हे लोक ब्राह्मणांवर कितीही अत्याचार झाला तरी एक चकार शब्दही काढणार नाहीत, कारण शेवटी त्यांना त्यांची  मतपेटी सांभाळायची आहे. 
परंतु हे मित्रवर्य, आपली मात्र कुचंबणा होत  आहे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात - बुडती हे जन पाहवेना डोळा । म्हणुनी कळवळा येतसे ।। त्याप्रमाणे आपली मनःस्थिती झालेली आहे. ब्राह्मणांची  अवहेलना आपणास बघवत नाही. पदोपदी ब्राह्मण समाजाची होणारी टिंगलटवाळी, हेटाळणी, शिक्षण वा अन्य क्षेत्रांत होणार तिरस्कार यांमुळे आपण व्यथित झाला आहात. ब्रिगेडी दहशती विरुद्ध संघर्ष करण्यासाठी आपण तळमळत आहात हे पाहून आम्हांस नवल वाटते. आपले हे आत्मसन्मानार्थ लढणे प्रशस्त वाटते. 

महोदय, परंतु आपली खरी सल ही आहे की, ज्यांच्यावर असत्य आरोप केले जातात हे ब्राह्मण स्वतः मात्र मूग गिळून गप्प बसतात. ते काहीच बोलत नाहीत. त्यामुळे आपल्याला भीती वाटते की, हे लोक गप्प राहिल्यामुळे इतरांची कोल्हेकुई सत्य वाटू लागते. ज्यु  द्वेष्ट्या हिटलरने ज्यू द्वेष पसरविण्यासाठी आधी पत्रके आणि पुस्तके छापली.भाषणे दिली आणि मग प्रत्यक्ष कृती केली. मोहमद अली जिनानेसुद्धा असेच केले. काश्मिरी पंडितांचा असाच विध्वंस करण्यात आला. तसाच विनाश ब्राह्मण जातीचा व्हावा असा प्रयत्न साध्या चालू आहे. आपल्याला असे वाटणे अगदी रास्त आहे. सध्याचा सर्वच समाज स्वार्थी झालेला आहे. जो तो आपल्याच इंद्रियतृप्तीत बुडालेला आहे; परंतु आपल्यासारखा विरळाच कोणी भविष्यातील उत्पाताविषयी चिंतन करतो. 

सध्या भयानकरीत्या गढूळ होणाऱ्या सामाजिक द्वंद्वाशी टक्कर देण्यासाठी आपल्याला कोणतेच साहाय्य देण्यासाठी समाज बांधव तत्पर नाहीत, कारण यांतील अनेक जण षंढवृत्तीचे झालेले आहेत. आपल्या क्षणभंगुर अशा दहा बाय दहा फुटांच्या बिऱ्हाडात कामग्रस्त झालेले आहेत. काहींना वाटते की, आपण जो न्यायासाठी संघर्ष करीत आहात तो म्हणजे डुकराशी कुस्ती खेळणे होय, कारण डुकराशी कुस्ती लढण्यासाठी आपल्याला गटारात उतरावे लागते. त्या घाणीत लोळावे लागते. भले आपण जरी ही कुस्ती जिंकलात तरी टाळ्या वाजवजला वा अभिनंदन करायला कोणीच नसते. असे असूनही आपण अभिमन्यूप्रमाणे लढू इच्छिता, हे मोठे साहस आहे आणि निश्चितच कौतुकास्पद आहे. यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा सदैव आपल्या पाठीशी आहेत. 
बरे काही लोक आपल्या कार्याचे तोंड भरून कौतुक करतीलही; परंतु कोणतेच भरीव पाठबळ देणार नाहीत. कारण महानगरतील आर्थिक उलाढाल जवळून बघणारा प्रगत ब्राह्मण विचार करतो की, ही 'डेड  इन्व्हेस्टमेंट' आहे. तर काही जण आपल्याच कोषात गुरफटलेले फुकाचा सल्ला देतात, कशाला एवढी  अनाठायी चिंता करता? स्वस्थ बसा, यातून काहीही साध्य होणार नाही. इतके सर्व निरुत्साही वातावरण असले तरी आपण मुळीच निराश होऊ नका. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि प्रत्यक्ष कार्य आरंभले त्या वेळी सर्वच जातीपातीच्या लोकांनी त्यांची हेटाळणी केली; परंतु त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले आणि यशस्वी झाले. आपली ही न्यायपूर्ण चळवळ निश्चितच यशस्वी होईल यात तिळमात्र शंका नाही. चळवळीविषयी समर्थ श्री रामदास स्वामी म्हणतात - सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील त्यांचे| परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भागवंतांचे।।         

आम्ही अनेक तथाकथिक विद्वानांचे साहित्य वाचले आहे. त्यात त्यांनी स्वामींचा हा श्लोक संदर्भ म्हणून दिलेला आहे; परंतु यातील ९०% पढत विद्वान भागवंतांच्या अधिष्ठानाची हेटाळणी करतात. ते भागवंतांच्या उपस्थितीची कुचेष्टा करतात. त्याला अंधश्रद्धा संबोधतात आणि तेथेच घोडं पेंड खात! कारण या अल्पज्ञानी लोकांना माहीत नसते की, परमेश्वराच्या इच्छेविना काहीच घडत नाही. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, आपल्या या चळवळीला बृहत्स्वरूप येण्यासाठी भगवंतांचे अधिष्ठान निश्चितच हवे. अनेक डोकी गोळा करून प्रारंभ केलेली चळवळ म्हणचे दुर्योधनाची विशाल सेना  आणि भगवंतांचे अधिष्ठान म्हणजे अर्जुनाचे सारथ्य करणारे भगवान श्रीकृष्ण!

भगवद्गीतेत (१८. ७८) संजय अंध धृतराष्ट्राला सांगतो - 
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयो भुतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।
'जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत, तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. हे माझे मत आहे.'

आपल्याला जर खरोखरच ब्राह्मणांचे आणि संपूर्ण समाजाचे हित साधायचे असेल, तर आपल्याला आपल्या सर्वश्रेष्ठ हितचिंतकांशी संपर्क साधावा लागेल. जसे कोणाला मोठी शाळा, विशाल मंदिर वा अन्य काही भव्य कार्य संपन्न करायचे असेल, तर तो त्या गोष्टीची आवड असणाऱ्या धनवान हितचिंतकाकडे जातो. त्याच्या समक्ष निवेदन ठेवतो. त्याची स्तुती करतो. त्याला प्रसन्न करून आपला उद्देश साध्य करतो. तर मग आम्हीसुद्धा असेच करायला पाहिजे. आम्ही ब्राह्मणांच्या श्रेष्ठ हितचिंतकांकडे गेले पाहिजे. तर मग असे हितचिंतक कोण आहेत? या संबंधी विष्णू पुराणात (१.१९.३५) सांगितले आहे - 
नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च । 
जगद्हीताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः ।।
'मी त्या भगवान श्रीकृष्णांना सादर नमस्कार करतो, जे समस्त ब्राह्मणांचे आराध्यदेव आहेत. ते गायी आणि ब्राह्मणांचे हितचिंतक आहेत तथा ते सदैव संपूर्ण जगताचे हितचिंतक आहेत. मी कृष्ण आणि गोविंद नामाने विख्यात भगवंतांना वारंवार नमस्कार करतो.'

बुद्धिमान मनुष्याने हे ध्यानात ठेवले पाहिजे की, भगवान श्रीकृष्ण केवळ गायी आणि ब्राह्मणांचेच हितचिंतक नसून ते संपूर्ण जगताचे हितचिंतक आहेत. ते संपूर्ण विश्वाचा भार स्वतः वाहतात म्हणून त्यांना 'विश्वम्भर' म्हणून संबोधले जाते; परंतु सध्या आम्ही त्यांना विसरलो आहोत. त्यामळे आज संपूर्ण विश्वात प्रचंड युद्धे आणि संघर्ष चालू आहेत . प्रत्येक व्यक्ती रोगग्रस्त आहे. पीडित आहे. दुःखी आहे. हे असे का? कारण आम्ही आमच्या परम हितचिंतकाला विसरलो आहोत. भगवान श्रीकृष्णांकडे आम्ही पाठ फिरविली आहे. मूर्खांचे साहित्य वाचून आम्ही श्रीकृष्णांना दोष देण्यात स्वतःला धन्य मानत आहोत. 
भागवन श्रीकृष्णांना प्रिय असलेल्या गायींविषयी आम्हाला किंचितही प्रेम उरलेले नाही. जर आम्ही श्रीकृष्णांच्या प्रिय गायींना सुखी ठेवत नाही, तर मग श्रीकृष्ण आम्हाला कसे काय सुखी ठेवतील? यावर आपण म्हणाल की, आम्ही महानगरात राहतो. आम्हालाच राहण्यासाठी प्रशस्त घर नाही, खावयास चांगले अन्न नाही. प्याव्याचे शुद्ध जल नाही. तर मग गायीला कुठे ठेवणार? तिला काय खाऊ-पिऊ घालणार? परंतु काळजी करू नका. आपण प्रातःकाळी उठल्यावर आणि रात्री निद्राधीन होण्यापूर्वी गायींचे समरण नक्कीच करू शकतो. आपण विरंगुळा म्हणून सप्ताहाअंती किंवा महिन्यातून एकदातरी घरापासून दूर जातोच ना? त्या वेळी जिभेचे चोचले भागवण्यासाठी अनावश्यक खर्च करतोच ना? मग त्या ऐवजी आपण महानगराबाहेरील निसर्गाच्या सान्नीध्यात वसलेल्या गोशाळेत जाऊ शकतो. तेथील गायींच्या पाठींवरून प्रेमाने हात फिरवू शकतो. तिच्या चारापाण्यासाठी काही धन अर्पण करू शकतो. गायीच्या संपर्कात येवून तिची थोडी सेवा केल्यामुळे आपल्या कितीतरी मानसिक आणि शारीरिक व्याधी दूर पळून जातील. जेव्हा आमच्याकडून अल्प प्रमाणात गोसेवा घडते, तेव्हा गायी आमच्यावर प्रसन्न होतात आणि आम्हाला भरपूर आशीर्वाद देतात. परंतु याची आम्हाला पुसटशी कल्पनासुद्धा नाही. छत्रपती शिवरायांना याचे पूर्ण ज्ञान होते. त्यासाठीच त्यांनी आपल्या स्वराज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी लागू केली होती. गोसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले होते. देव, देश आणि धर्म यांचा विध्वंस करणाऱ्या अफजल खानाचा वध करण्यापूर्वी छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावरून निघतेवेळी एक सालंकृत सवत्स गाय एका सत्पात्री ब्राह्मणाला दान दिली होती. आता आम्ही हे सर्व सोईस्करपणे विसरलो आहोत. छत्रपती शिवरायांप्रमाणे आम्ही सुद्धा गोसेवा-गोपूजा केला तर गाय आमच्यावर प्रसन्न राहील आणि जेव्हा गाय प्रसन्न असेल तेव्हा तिचे पालन करणारे गोपाळकृष्ण आमच्यावर प्रसन्न होतील आणि आमचे हितरक्षण करतील. 
भगवान श्रीकृष्णांना ब्रह्मण्यदेवाय अर्थात ब्राह्मणांचे आराध्यदेव म्हटले आहे. परंतु अज्ञानामुळे किंवा मुर्खपणामुळे आम्ही त्यांना तिरस्कृत केले आहे. आमच्या या निर्बुद्ध अवस्थेचे वर्णन मार्मिक शब्दांत स्कंद पुराणात केले आहे - 
वासुदेवं परित्यज्य यो न्यदेवमुपासते ।
स्वमातरं परित्यज्य स्वपचीं वन्दते हि सः ।।
'जी व्यक्ती वासुदेवांचा परित्याग करून अन्य देवांची उपासना करते, ती व्यक्ती म्हणजे एका चेटकिणीचा आश्रय मिळविण्यासाठी स्वमातेच्या आश्रयाचा त्याग करणारी होय.'

तर मग आम्ही ब्राह्मणांनी अन्य कोणाचाही आश्रय न घेता, अन्य कोणाचेही गुणगान न गाता, अन्य कोणाकडेही भीक न मागता संपूर्णपणे भगवान श्रीकृष्णांवर अवलंबून राहिले पाहिजे, कारण तेच आमचे परम हितचिंतक आहेत. आमचा संघर्ष हे युद्धचे आहे आणि त्यासाठी सदैव त्यांचेच समरण केले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला निमित्तमात्र करून आम्हा सर्वांना संबोधित करताना म्हणतात -  
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
'तू सदैव माझे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे.' भगवद्गीता ८. ७ 

तर मग अशा प्रकारे आपण आपली चळवळ किंवा संघर्ष भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करीत चालू ठेवाल तर आपला विजय निश्चित आहे. 





      

शनिवार, ८ एप्रिल, २०१७

                          ब्राह्मणद्वेष 

            आदरणीय श्रीमान दिलीपराव अलोणी यांसी,
            सप्रेम नमस्कार.
            आपल्यासंबंधी वृत्तपत्रातील वार्ता वाचून उत्सुकतेपोटी आपल्याशी भ्रमणध्वनीवर केलेले संभाषण आणि मुंबईतील श्री श्री राधाकृष्ण मंदिरातील प्रत्यक्ष भेटीअंती झालेला वार्तालाप यांवरून आम्हाला आपल्या दुःखाची जाणीव झाली. आपण परदुःखेदुःखी आहात हे पाहून आम्हास आपली विशेष काळजी वाटली. आपल्या बोलण्यातून कळून आले की, काही विशिष्ट जात्यंध व्यक्ती बहुजन समाजाला भ्रमित करण्यासाठी ब्राह्मणद्वेष पसरविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी विद्वान, देशभक्त, प्रामाणिक, निःस्पृह आणि उत्तम गुणांनी युक्त असलेल्या ब्राह्मणांवर चिखलफेक करण्याचे मोठे कार्य  हाती घेतले आहे. विविध वृत्तपत्रे, पुस्तके, पत्रके छापणे, भाषण देणे, दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरील चर्चा संत्रातून रेटून खोटे बोलणे, इलेक्ट्रॉनिक  माध्यमातून अपप्रचार करणे, इत्यादी विविध मार्गांनी ब्राह्मण विरोधी धुळवड उडवली जात आहे. या मुर्खांच्या तीव्र टीकेमुळे किंवा त्यांनी केलेल्या निंदानालस्तीमुळे आपण व्यथित झाला आहात. आपल्याप्रमाणे अनेक सुज्ञ लोकसुद्धा दुःखिकाष्टी झाले असणार यात तिळमात्र शंका नाही. या सर्व गोष्टींचा मनःस्ताप होणे हे आपल्यासारख्या कोमल हृदयी मनुष्यासाठी खरोखर कठीण आहे.
           दुष्ट प्रवृत्तींविरुद्ध लढण्यासाठी आपण सजग आहात हे पाहून समाधान वाटले. अपप्रवृत्तींविरुद्ध संघर्ष करण्यासाठी आपण करीत असलेले कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे. आपल्या न्यायपूर्ण लढ्यास आमचा मनःपूर्वक पाठींबा आणि शुभेच्छा. आपल्या या कार्याच्या अनुषंगाने मी आपल्याशी काही चर्चा पत्ररूपाने करू इच्छितो आणि यासाठी आपणही उत्सुक असाल अशी आशा व्यक्त करतो.
           सर्वप्रथम आपण ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यामध्ये चाललेल्या संघर्षाविषयी काही चर्चा करूया. तसे पाहता ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा संघर्ष सत्ययुगापासूनचा आहे. हा संघर्ष काही मोजक्याच व्यक्तींमध्ये होत असे. संपूर्ण समाज यात सहभागी होत नसे. उदाहरणार्थ - सत्ययुगात विश्वामित्र आणि वसिष्ठ यांच्यातील संघर्ष. या संघर्षात विश्वामित्रांनी अनेक विनाशकारी अस्त्रांचा प्रयोग वशिष्ठांवर केला; परंतु वशिष्ठांनी आपल्या ब्रह्मदंडाच्या तेजाने ती सर्व अस्त्रें  नष्ट केली. त्यामुळे विश्वामित्रांनी कठोर तपस्येद्वारे ब्रह्मतेज प्राप्त केले. त्यांनी क्षात्रवृत्तीचा त्याग करून ब्रह्मर्षीपद प्राप्त केले.
        या संघर्षांनंतर झालेला मोठा संघर्ष म्हणजे परशुरामांचे कार्य; परशुराम हे भगवान श्री विष्णूंचे शक्त्यावेश अवतार आहेत. त्यामुळे त्यांनी आसुरी प्रवृत्ती धारण केलेल्या नास्तिक आणि दुष्ट क्षत्रियांचा संहार केला; परंतु सीता स्वयंवरात शिवधनुष्य भंग केल्यानंतर अयोध्येला परतणाऱ्या श्री रामाना परशुरामांनी विष्णूधनुष्य पेलण्याचे आव्हान दिले. त्यावेळी प्रभू श्री रामांनी त्यांच्याकडील विष्णूधनुष्य हिरावून घेते वेळी त्यांची अद्भुत शक्तीही हिरावून घेतली. त्यानंतर मात्र परशुराम महेंद्र पर्वतावर निवास करून ब्राह्मणाचे शांततामय जीवन कंठू लागले. पुढे त्यांचा एकदा क्षत्रियाशी संघर्ष झाला. अर्थात यावेळी तो क्षत्रिय त्यांचाच प्रिय शिष्य भीष्मदेव होते. भीष्मदेवांनी या संघर्ष युद्धाद्वारे परशुरामांना प्रसन्न केले, मात्र परशुराम भीष्मादेवांचा निर्णायक पराभव करू शकले नाहीत. 
          त्रेतायुगात भगवान श्री राम क्षत्रिय कुळात प्रकटले आणि ब्राह्मणपुत्र राक्षसराज रावणाचा विनाश केला. हा सुद्धा एक अद्भुत संघर्ष होता. 
         त्रेतायुगात आणखी एक संघर्ष झाला होता. या वेळी अंबरीष महाराज आणि दुर्वास मुनी होते. क्षत्रिय अंबरीष महाराज हे भगवान श्री विष्णूंचे महान भक्त होते. त्यांची भगवद्भक्ती इतकी महान होती की त्रैलोक्यात त्यांच्या भक्तीचे गोडवे गायिले जात. त्यामुळे दुर्वास मुनींनी त्यांचा अकारण अपमान केला आणि त्यांना ठार मारण्यासाठी अग्निमय राक्षस निर्माण केला. भगवद्भक्तांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असलेल्या सुदर्शन चक्राने त्या राक्षसाचा नास केला आणि त्याचे निर्माता दुर्वासांचा पाठलाग केला. दुर्वास मुनींनी आपल्या रक्षणासाठी स्वर्गात इंद्राकडे, ब्रह्मलोकात ब्रह्मदेवांकडे आणि कैलासात शिवांकडे याचना केली; परंतु त्या तिघांनी असमर्थता दर्शवली तेव्हा दुर्वास मुनी वैकुंठात नारायणांकडे गेले. नारायणांनी त्यांना सांगितले की, सुदर्शनाचा ताप केवळ अंबरीष महाराजच शांत करू शकतात. तू त्यांच्या चरणांशी शरणागत होऊन क्षमा माग. तेव्हा दुर्वास मुनी भूतलावर येऊन अंबरीषांच्या चरणांशी लोळण घेतात. शेवटी अंबरीषांच्या प्रार्थनेवरून सुदर्शन चक्र शांत होऊन वैकुंठास परत जाते. 
       द्वापार युगाच्या अंती कौरव-पांडवांच्या भीषण युद्धात द्रोणाचार्यांचा संघर्ष होतो. द्रोणाचार्य आणि द्रुपद राजा यांच्या संघर्षात द्रुपद पराजीत होतो. प्रतिशोध घेण्यासाठी द्रुपद यज्ञाद्वारे धृष्टद्युम्न नामक पुत्राची उत्पत्ती करतो. कशासाठी? तर केवळ द्रोणाचार्यांचा विनाश करण्यासाठी! महाभारताचे युद्ध क्षत्रियांमध्ये असते. या युद्धात ब्राह्मणांनी भाग घ्यायाचा नसतानाही द्रोणाचार्य भाग घेतात. ब्राह्मणांचे कार्य आहे शस्त्र आणि शास्त्र यांचे ज्ञान क्षत्रियांना देणे. त्यांनी युद्ध करायचे नसते. परंतु कौरवांचे धन घेतल्यामुळे द्रोणाचार्यांना युद्धात भाग घ्यावा लागतो. द्रोणाचार्यांच्या या युद्धकृतीमुळे भगवान श्रीकृष्ण त्यांना मारण्याचा आदेश देतात आणि धृष्टद्युम्न निःशस्त्र द्रोणाचार्यांचा वध करतो. 
          या काही मोजक्याच घटनांचे वर्णन अतिशय संक्षिप्त रूपात येथे करण्यात आले आहे. तशी अनेक उदाहरणे आहेत. त्यांचे वर्णन 'संघर्ष' या ग्रंथात विस्ताराने करण्यात येईल. 
        सत्य, त्रेता आणि द्वापार युगानंतर आले कलियुग! या भयावह कलियुगाचा प्रारंभ ब्राह्मण शापने झाला. या पृथ्वीवरील शेवटचे सम्राट परीक्षित महाराज यांना शृंगी नामक ब्राह्मण पुत्राने शाप दिला की, माझ्या पित्याचा अवमान करणाऱ्या राजाला तक्षक सर्प सातव्या दिवशी दंश करील. शृंगीचे पिता शमीक ऋषींना जेव्हा हे वृत्त कळते, तेव्हा ते आपल्या पुत्राची कठोर शब्दांत निंदा करतात आणि राजाला असा शाप देणे पूर्णपणे चूक आहे असे सांगतात. परिक्षित महाराज हे अर्जुनाचे पौत्र आणि भगवान श्रीकृष्णांचे महान भक्त असतात. ब्राह्मणाचा शाप परतविण्याची क्षमता त्यांच्यात असते. तरीही ते तो शाप भगवान श्रीकृष्णांची कृपा म्हणून स्वीकारतात. ते आपल्या सर्वस्वाचा  त्याग करून गंगातटावर बसतात. तेथे ते श्री व्यासपुत्र शुकदेव गोस्वामींकडून सात दिवस आणि सात रात्री भागवत कथा श्रावण करतात आणि तक्षकाने दंश केल्यावर सरळ भगवद्धामास प्रयाण करतात. 
         भागवत पुराणात (१. १. १०) कलियुगातील जीवांचे वर्णन पुढील प्रमाणे आहे - 
प्रायेणाल्पायुष: सभ्य कलावस्मिन् युगे जना: ।
मन्दा: सुमन्दमतयॊ मन्दभाग्या ह्योपद्रताः ।।
' हे  सभ्य! कलियुग नामक या लोहयुगात लोक अल्पायुषी आहेत. ते भांडखोर आहेत, आळशी आहेत, मार्ग चुकलेले आहेत, दुर्दैवी आहेत आणि पूर्णपणे त्रासलेले आहेत.'

कलियुगातील सर्वच वर्णाच्या लोकांचे हे वर्णन आहे. दंभ आणि कलह यांनी भरलेल्या या युगात सर्व जण भांडत आहेत. कलियुगाच्या प्रभावामुळे शृंगीचे झालेले पतन हा ब्राह्मणांच्या पतनाचा आरंभ आहे. आळस आणि मंद बुद्धीमुळे शास्त्रांचा चुकीचा अर्थ काढून ब्राह्मणांनी क्षत्रियांना तिरस्कृत केले आणि क्षत्रियांनी वैश्यांना तिरस्कृत केले आणि या तिन्ही वर्णांनी त्यांची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या शूद्रांना तिरस्कृत केले. त्यामुळे काय  झाले? अन्य त्रियुगातील दैवी वर्णाश्रम धर्म कलियुगात विकृत आसुरी वर्णाश्रम धर्म झाला. लोक स्वतःला नाममात्र जन्मजात विशिष्ठ जातीचे म्हणून संबोधू लागले. या सर्व वर्णांमध्ये निकृष्ठ हीन वृत्तीचे गुण दिसू लागले. खरे पाहता हे वर्ण त्या त्या मनुषांच्या कर्माप्रमाणे आणि गुणयोग्यतेप्रमाणे विभागलेले होते. मूळ रूपाने या चार वर्णांची रचना अशा प्रकारे केली आहे की, समाज भौतिकधृष्टया प्रगती करेल आणि चार आश्रमांची रचना अध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. ही एक अशी पद्धत आहे की ज्यामुळे सभ्य मनुष्य सफलतापूर्वक मानवजीवनाचा हेतू अर्थात आत्मसाक्षात्कार प्राप्त करेल. वर्णाश्रम संस्था अशाकरिता रचलेली होती की तिच्या योगाने मनुष्याला परम सत्याचा अनुभव येऊ शकतो. एका वर्णने दुसऱ्या वर्णावर कृत्रिम वर्चस्व लादावे याकरिता ही समाजरचना मुळीच नाही. खरे पाहता अन्य तिन्ही युगांतील शूद्रांचे आचरणही इतके श्रेष्ठ होते की आज त्या युगातील शूद्र प्रगट झाल्यास कलियुगातील ब्राह्मण त्याच्यापुढे निकृष्ट आणि तिरस्करणीय वाटतील. पूर्वीच्या युगात आताचे गलिच्छ प्रकार मुळीच नव्हते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. 
      कलियुग प्रारंभ झाल्यानंतर साधारणपणे २५०० वर्षांनंतर इतिहासप्रसिद्ध ब्राह्मण-क्षत्रिय संघर्ष झाला. हा संघर्ष चाणक्य पंडित आणि धनानंद तथा त्याचे आठ पुत्र यांच्यात झाला! या संघर्षात चाणक्य पंडिताने आपले ब्राह्मणत्व गुंडाळून ठेवले नाही. 'साधी राहणी आणि उच्च विचार सरणी' याचा आदर्श चाणक्य पंडिताने आपल्या आचरणात ठेवला. उन्मत्त, सत्तालोलुप आणि प्रजेप्रति निष्ठूर असलेल्या नवनंदांचा विनाश करून चाणक्याने मातृभूमीचा गौरव वाढविला. वैदिक शास्त्रांत निपुण असा सम्राट, जो त्याने स्वतः प्रशिक्षित केला होता, त्या चंद्रगुप्त मौर्याला साम्राज्यावर स्थापित केले आणि सर्व काही संपन्न झाल्यावर चाणक्य पंडितांनी संन्यास ग्रहण करून सर्वस्वाचा त्याग केला. 
       पुढे बौद्धांचा नास्तिक प्रभाव भारतात आणि भारताबाहेर वाढल्यावर वैदिक धर्म प्रायः लोप पावला. अशा वेळा श्रीपाद शंकराचार्य (आद्य) प्रकट झाले आणि त्यांनी वैदिक धर्माला परत गतवैभव प्राप्त करून दिले. 
       त्यांनतर भारतभूमीवर इस्लामच्या आक्रमणाची शृंखला प्रारंभ झाली. या महाभयंकर आक्रमकांशी ब्राह्मण आणि क्षत्रियांनी प्रखर संघर्ष केला. काही वेळा ते विजयी झाले तरी संपूर्ण भारत इस्लाममय झाला. आता या इस्लामी आक्रमकांच्या काळात भारतीयांना हिंदू म्हणून संबोधण्यात येऊ लागले. इस्लामच्या पाशवी आक्रमणापुढे हतवीर्य झालेल्या ब्राह्मणांनी आणि क्षत्रियांनी विविध सुलतानांकडे चाकरी करण्यास प्रारंभ केला. जबरदस्तीमुळे काही लोक बाटले तर काही जण लाचारपणे, तर काही जण अंशतः स्वधर्माचे पालन करीत होते. 
       शेकडो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतभूमीला परत स्वतंत्र करण्याचे कार्य छत्रपती शिवरायांनी आरंभले. त्यांच्या या हिंदवी स्वराज्यात सर्वांना स्थान होते. परंतु यावेळी क्षत्रियांनी हाती शस्त्र शिवरायांना विरोध केला आणि ब्राह्मणांनी शास्त्रांचा चुकीचा अर्थ सांगून विरोध केला. दोघेही दोषी असूनही सध्या मात्र या इतिहासाचे विकृतीकरण सादर केले जात आहे. 
      जेव्हा ब्रिटिश येथे आले, तेव्हा त्यांनी भारताचा सूक्ष्मरीत्या अभ्यास केला. त्यांनी विविध क्षत्रियांसाठी विविध रेजिमेंट काढून त्यांना आपले बूट साफ करावयास लावले. तसेच ब्राह्मणांना A B C D शिकवून बाबू-क्लार्क बनवून आपली गुलामगिरी स्वीकारण्यास भाग पाडले. 'फूट पाडा आणि राज्य करा' या नीतीने त्यांनी अठरापगड जातींना आपल्या गुलामगिरी व्यवस्थित अडकवले. ब्रिटिशांनी खोटा इतिहास रेटून सांगण्यास आणि शिकविण्यास प्रारंभ केला. ते सांगू लागले की, ब्राह्मण हेच परकीय असून त्यांनाच तुडवा-बुडवा. ब्रिटिशांच्या हाती सत्ता असल्यामुळे त्यांनी आपल्या शाळा महाविद्यालयांतून खोटा इतिहास पसरविण्यास चालू केले. ब्रिटिश आपल्या योजनेत यशस्वी झाले आणि त्यांचाच कित्ता गिरवत आज येथील सर्वपक्षीय सत्ताधारी यशस्वी होत आहेत. 
        बहुजन समाजातील धूर्त राजकीय नेत्यांना चांगलेच माहित आहे की, आपल्या समाजाची दिशाभूल केली तरच ते एकगठ्ठा मते आम्हाला देतील आणि मग आम्ही आरामात सत्ता उपभोगू शकता; परंतु बहुजन समाजाला योग्य तो मार्ग ब्राह्मण लोक दाखवतील आणि त्यांना बुद्धिमान करतील आणि आम्ही सत्ताभ्रष्ट होऊ. यासाठी त्यांनी काही पैसा धूर्त आणि लुच्च्या लोकांसमोर फेकला आणि आपला कार्यभाग साधून घेतला. 
       खोटा इतिहास रेटून बोला, ब्राह्मणांना शिव्या घाला आणि आपली तुंबडी भरा. यात हे जात्यंध लोक यशस्वी होत आहेत. कारण त्यांना पक्के ठाऊक आहे की ३% असलेले ब्राह्मण आमचे काहीच वाकडे करू शकत नाहीत. तसेच या ३% असलेल्यांवर सत्तेत येण्यासाठी काहीच उपयोग नाही; त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष यांची बाजू घेणार नाही. 
       या सर्व विषयांची पत्ररूपाने सविस्तर चर्चा आम्ही आमच्या बुद्धीनुसार, आमच्या आकलन क्षमतेनुसार आपल्यापाशी करीत आहोत. 

                                                                                                कळावे 
                                                                                आपला शुभचिंतक 
                                                                               विनय शंकर गोडसे 













मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

               पैशापायी उत्तम गुणांचा सर्वनाश 

एका संस्कृत सुभाषितात म्हटले आहे - 
लोभोविष्टो नरो वित्तम् वीक्षते न तु संकटम् ।
दुग्धम् पश्यति मार्जारो न तथा लगूडाहतिम् ।।

' लोभी माणसाला पैसा दिसतो, पण संकटे मात्र दिसत नाहीत. जसे मांजराला दूध दिसते पण बडगा दिसत नाही.'
भारताचे लाडके पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी फारच मोठे साहस केले आहे. नोटा बंदीचा निर्णय घेवून समस्त भारतीयांना प्रामाणिकपणे कार्य करण्यासाठी प्रेरित केले आहे. त्यांच्या  या बडग्याने अतिरेकी, नक्षली, भ्रष्ट राजकारणी, काळा बाजार करणारे, ढोंगी आणि पाखंडी असे अनेक लोक धाराशायी पडले आहेत. पैशासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा। अशी विचित्र अवस्था सर्वांची झाली आहे.     
      पूर्वी भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर आता रामराज्य येईल असे अनेक भावूक लोकांना वाटू लागले होते. परंतु असे काहीही न होता, उलट रावणराज्य सर्वत्र फोफावू लागले. कलिच्या प्रभावामुळे लबाडी वाढू लागली होती. प्रत्येक राजकारणी लाच खाणे आणि लाच देणे यांचेच संस्कार लोकांच्या गळी उतरवू लागले होते. 
      बहुसंख्य लोकही ५०० वा १००० रुपयांची नोट घेवून मतदान करून अधिकाधिक भ्रष्ट लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडून देत. यथा राजा तथा प्रजा ऐवजी यथा प्रजा तथा राजा असे नविन समिकरण प्रस्थापित झाले. 
     लोकांमधील सुसंस्कारांनी कधी स्वार्थी विकृतिचे रूप घेतले, हे कळायला मोठमोठया चिंतकांनाही कळले नाही. 
       कोणे एके काळी संपूर्ण विश्वात भारतीयांच्या उत्तम गुणांचे कौतुक केले जात असे. 
       संपूर्ण विश्वात कलियुगाचा प्रभाव झपाटयाने वाढत असताना आणि इस्लामच्या आक्रमणापूर्वी भारतीय जनजीवन सुखसमृद्धीने नटलेले होते. चाणक्य पंडितांच्या उच्च मार्गदर्शनाखाली सम्राट चंद्रगुप्त मौर्यांच्या काळात भारतीयांची उदात्त जीवनमूल्ये अधिकच भरभराटीला आली होती. त्याच्या राज्यसभेत पाच वर्षे राहिलेला ग्रीकांचा राजदूत मेगॅंस्थेनीसने भारतीयांविषयी गौरवोद्गार लिहून ठेवले आहेत. त्यांनतर भारतात अनेक विदेशी येऊन गेले. त्यातील काही प्रमुख एरियन, स्ट्रँबो, ह्युएनत्संग, फ्रायर, जॅर्डेनस, मार्कोपोलो  होते. या परदेश लेखकांनी लिहून ठेवले आहे की, 'भारतीयांमध्ये न्यायबुद्धी, प्रामाणिकपणा, सचोटी, सरलवृत्ती ठासून भरलेली आहे.'
      इस्लामी आक्रमणानंतर आणि ब्रिटिश राजवटीतही भारतीयांमध्ये हे गुण बाऱ्याच प्रमाणात टिकून होते. अगदी इंग्रजांचे सर्वप्रथम राज्य बंगालमध्ये इ.स. १७५७ मध्ये नुकतेच चालू झाले त्यावेळची एक घटना येथे नमूद करावीच लागेल. कोलकत्याच्या कोण्या एका मार्गावर भिस्ती मुलगा पखालीने पाणी भरत होता. 'पखाली' म्हणजे बोकड वा रेडयाच्या चामड्याची भली मोठी पिशवी आणि त्यातून पाणी भरून नेणाऱ्याला 'भिस्ती' म्हणतात. तो भिस्ती पाणी भरून नेत असताना एक पाद्री समोरून येत होता आणि अचानक त्या पाद्र्याला वाटेत काही तरी चमकलेले दिसले. ते एक सोन्याचे नाणे होते. ते तो घेण्यासाठी वाकणार तेव्हड्यात तो भिस्ती मुलगा पखालीतून पाणी घेऊन त्याच्या समोरा आला. पाद्रीयाने लागलीच ते नाणे पायाखाली दाबून ठेवले. तो मुलगा त्याच्याकडे बघत पुढे गेला आणि पाणी भरून परत आला. असे त्याने दोन वेळा केले; तरी तो पदरी तेथेच उभा होता. शेवटी त्या मुलाने हात जोडून त्याची चौकशी केली असता तो म्हणाला,"तुला एका मोठ्या  पाप कर्मापासून मी वाचवतो आहे."
      तेव्हा तो मुलगा म्हणाला,"आपण कोणत्या पापकर्मापासून मला वचवीत आहात ते मला कळेल का?"
     त्यावेळी पाद्री आपल्या तोंडावर मोठा गंभीर आव आणत म्हणाला,"हे बघ, येथे पडलेले हे सोन्याचे नाणे अन्य कोणाचे तरी आहे आणि ते तू हळूच खिशात टाकशील आणि घेऊन जाशील. त्यामुळे तुझ्याकडून पाप घडेल. त्या संभाव्य पापापासून तुला वाचविण्यासाठी मी येथे उभा आहे."
हे ऐकल्यावर तो बालक हात जोडून नम्रपणे म्हणाला,"महोदय, मागील तीन दिवसांपासून हे नाणे येथेच पडलेले आहे आणि मी ते उचलले नाही; कारण जी वस्तू आपली नाही त्याला हात लावू नये असे माझ्या आई वडिलांनी मला शिकविले आहे. त्यामुळे माझ्याकडून कधीच न होणाऱ्या  पापविषयी आपण चिंता करू नये."
      असे बोलून तो मुलगा आपल्या मार्गास लागला आणि पाद्री दिग्मूढ होऊन त्याच्या पाठमोऱ्या  मूर्तिकडी पाहतच राहिला!
      हे सर्व सांगण्याचा हेतू हाच की, पूर्वीच्या काळी भारतीयांमध्ये असा प्रामाणिकपणा होता. आता मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. दिल्ली ते गल्ली पर्यंत प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टचार बोकाळला आहे. प्रामाणिकपणे जीवन व्यतीत करणाच्यांची संख्या अतिशय नगण्य होत चालली आहे. आध्यामिक मार्गात प्रगती करू इच्छीणाऱ्या व्यक्तींकडूनही प्रमाद घडताना दिसून येतो, मग अन्य धर्मज्ञानहीन लोकांविषयी काय बोलवे?
      श्रील भक्तीसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात,'या भौतिक जगात दोन प्रकारचे लोक आहेत, फसणारे आणि फसविणारे!' मात्र केवळ हाताच्या बोटावर गणती करण्याइतकेच अल्प प्रमाणात काही प्रामाणिक कृष्णभक्त आहेत की, जे स्वतः सर्व प्रकारचे कष्ट, पीडा वा अपमान सहन करून समस्त जीवांच्या उद्धारासाठी झटत असतात. 
      या भौतिक जगतात निवास करताना प्रत्येक ज्ञानी वा ज्ञानहीन मनुष्याला धनाची नितांत आवश्यकता असतेच. परंतु किती? केवळ आपले आणि आपल्या कुटुंबियांचे पालन पोषण करण्यासाठी जितके आवश्यक आहे तितकेच; परंतु दिव्य ज्ञानाच्या अभावामुळे आणि आसुरी वृत्ती धारण केल्यामुळे मनुष्य सदैव धनाच्यामागे धावत असतो. त्यामुळे कृष्णप्रेमाचा अमूल्य ठेवा प्राप्त करण्याची सुवर्णसंधी त्यागून तो मृत्तिकेच्या मागे लागतो. 
वित्ते कलौ नृणां जन्माचारगुणोदयः ।
धर्मन्यायव्यवस्थायां कारणं बलमेव हि ।।

'कलियुगात केवळ 'वित्त' -पैशालाच मनुष्याचा उत्तम जन्म, योग्य व्यवहार आणि सद्गुणांचे लक्षण मानले जाईल. धर्म आणि न्याय तर मनुष्याच्या बळानुसार लागू होईल.' - भागवत पूर्ण १२.२. २
      कलियुगात सर्वच गोष्टींचे मोजमाप पैशाने केले जाते. ज्याच्याकडे पैसा आहे तो कसल्याही प्रवृत्तीचा का असेना ! लोक त्याच्या दारात तिष्ठत उभे राहतील. 'जो वरी पैसा तो वरी बैसा', या न्यायाने पैसा आसणाऱ्याचा लोक सन्मान करतील. पैसा म्हणजे भगवान आहे. पैशाच्या जोरावर काय वाटेल ते प्राप्त करू शकतो. पैशाच्या बळाने न्याय विकत घेता येतो. सरकारी यंत्रणा वेठीला धरता येते. निवडणुक जिंकता येते. पण पैसा नसेल तर काहीच मिळत नाही. 
       परंतु प्रामाणिक भगवद्भक्त गुरु, साधू आणि शास्त्र यांची कास धरतो आणि धन संपदेच्या जंजाळातून मुक्त असे आनंदी जीवन जगतो.  
लेखन सेवा - विनय शंकर गोडसे, बेळगांव. 
संपर्क - ९२४२१७६५८७
-                                          --------------------------------------










सोमवार, ३ एप्रिल, २०१७

             रामराज्य - गांधींचे  अन् अण्णांचे! 


      ब्रिटिश राजवटीत भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची जागृती करण्यासाठी मोहनदास करमचंद गांधी भारतभर भ्रमण करीत होते. ब्रिटिशांच्या अधीन असलेल्या संस्थानांमधून भ्रमण करीत असतात ते एके दिनी कोकणातील सावंतवाडी या संस्थानात आले. त्याकाळी आणि आजही सावंतवाडी नगरी हिरव्यागार झाडी झुडपांनी आणि विशाल वृक्षांनी  व्यापलेली आहे. नारळ, सुपारी, अंबा, काजू, कोकम, फणस, सगवान  वा अन्य किती तरी वृक्षांनी  आणि  डोंगरांनी सावंतवाडी बहरलेले आहे. वनसंपदेने  समृद्ध आहे. नाशिक पासून ते कोल्हापूर पर्यँत महामार्गावरून जाताना दिसणारे बोडके डोंगर कोकणात नाहीत. 
        तीनशे वर्षांपूर्वी मोती सरोवराकाठी खेम-सावंतांनी बांधलेले श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आज सरोवरापासून दूर वाटते. कारण  पूर्वीच्या खेम सावंत राजांनी सरोवरात भर घालून सरोवर लहान केले आणि प्रजेच्या कल्याणार्थ नवीन भूमी उपलब्ध करून दिली होती. असो. 
        तर या ब्रिटिश संस्थानात १९२० च्या सुमारास कधीतरी गांधी जनजागृती कारण्यासीठी आले. आडपंचा लावून गांधी भ्रमण करीत.  त्याकाळी कोकणात सर्वच लोक आडपंचा लावत. त्यामुळे तेथे गांधींच्या 
आडपंचाचे आकर्षण कोणालाच नव्हने. त्याकाळी गांधींच्या निवासस्थानाची आणि न्याहारीची व्यवस्था मेख-सावंतांच्या राजवाडचात केलेली होती. गांधी सकाळी उठल्यावर त्यांना स्नानासाठी उनपाणी देणे आणि न्याहरी देणे इत्यादी सेवा एक सेवक करीत होता. कोकणातील साधीच वेशभूषा त्या सेवकाने केली होती. कोकणी अर्धी चड्डी, वर बंडी आणि खांद्यावर एक पंचा असा त्या सेवकाचा वेश होता. गांधी सेवकाकडून स्मित  हास्य करीत सेवा स्वीकार करित आणि मग दिवसभर संस्थानातील ग्रामीण भागात फेरफटका मारण्यास जात. अनेकांच्या गाठीभेटी, चर्चा, संवाद वा प्रचारात गांधींचा  संपूर्ण दिवस जात असे. 
      गांधींनी आधी बघितलेला ब्रिटिश भारत आणि सावंतवाडी संस्थानातील भारत यात पुष्कळच अंतर होते. बहुतेक करून संपूर्ण भारत ब्रिटिशांमुळे कंगाल झाला होता. लोकांना खावयास दोन घास अन्न नाही की, ल्यावयास वस्त्र नाही. परंतु सावंतवाडी संस्थातील लोक जरी गरीब असले तरी कष्टाळू आणि समाधानी होते. अंगभर चार माणसांना पुरतील इतकी वस्त्रे एकटाच माणूस घालतो आहे अशी युरोपियन प्रथा तेथे नव्हती. लोक साधीच पण नीटनेटकी वस्त्रे परिधान करीत. गांधींना हे विशेष वाटले. 
             येथील कोकणी समाज हा आपल्यापेक्षा अधिकच पापभीरू आणि देवभक्त आहे. यांना आपल्यापेक्षा अधिकच पुराण-शास्त्रे कळतात. आपण ज्या 'साधी रहाणी आणि उच्च विचार सरणी' याचा सर्वत्र प्रचार करीत आहोत, तो तर येथील लोकांमध्ये निसर्गतः आहेच. प्रामाणिकपणा, सचोटी, सत्यनिष्ठा कोकणवासियात पूर्वीपासूनच आहे. ज्या रामराज्यासाठी मी सर्वत्र प्रचार करतो आहे ते तर येथेच अनुभवण्यास मिळत आहे. येथील राजा पुत्रवत प्रजेची काळजी घेत आहे. येथे गांधीविचार थोपण्याची आवश्यकताच नाही. माझ्या कल्पनेतील रामराज्य या सावंतवाडीतच आहे. 
            गांधींची   एकवीस दिवसांची सावंतवाडी यात्रा संपून परतीचा दिवस उजाडला. निरोपाची वेळ निकट आली, सकाळी न्याहरी आणून देणाऱ्या  सेवकाला गांधी म्हणाले, "मी येथे ज्याच्या या राजवाडचात निवास केला त्या राजाला मला भेटायचे आहे." 
       गेले एकवीस दिवस चड्डी-बंडी परिधान केलेला तो सेवक हात जोडून विन्रमतेने म्हणाला, "तो राजा मीच आहे."
       हे ऐकताच गांधी एक माड उंच उडाले. आश्चर्यचकीत होऊन आवासून त्या सेवकाकडे बघतच राहिले. काय बोलावे हे त्यांना सुचेनाच!
      होय! तो साधारण वस्त्रातील विनम्र सेवक म्हणजेच सावंतवाडी संस्थानाचे राजा, पंचम खेमराज उपाख्य श्रीमंत बापूसाहेब महाराज होत!
      लोक गांधींना बापू म्हणत आणि या बापूंनी आपल्या समक्ष आणखी एक बापू हात जोडून विनम्रतेने उभा असलेला  पहिला. गांधी भारतभर ढोल पिटत होते 'साधी राहणी आणि उच्च विचार सरणी', 'रामराज्य' इत्यादी! पण हे सावंतवाडीत पूर्वीपासूनच होते. ते पाहून गांधी थक्क झाले होते. 
         श्रीमंत बापूसाहेबांनी गांधींना सर्व राजवाडा आणि श्री पाटेश्वर महादेवाचे मंदिर स्वतः फिरवून दाखविले. हे सर्व पाहून निःशब्द गांधीनी  सावंतवाडीतील राजा आणि त्याच्या रामराज्याचा निरोप घेतला. 
      पुढे भारताला स्वातंत्र्य  मिळाले, गांधी हत्येचा परिपूर्ण लाभ उठत गांधींच्या काँग्रेसने साठ वर्ष भारतावर रावणीराज्य स्थापून प्रंचड भ्रष्ठाचार केला आणि  गांधींच्या मनातील रामराज्य  अस्तित्त्वात येवू दिले नाही. समस्त भारतीयांची चाललेली कुतरओढ पाहून आणखीन एका गांधींचा उदय झाला. भ्रष्ठाचार मुक्त भारतासाठी अण्णा हजारेंच्या रूपाने नवीन गांधी प्रकटले. समस्त मीडियाने मोठा गाजावाजा करून या नूतन अण्णा गांधींची वावटळ सर्वत्र उडवून दिली होती. 
         नुकताच त्यांच्या जीवनावर एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि डब्यात गेलाही. त्यावेळा अण्णागांधी ऑक्टोबर २०१६ मध्ये मुंबईत आले होते. गांधींचा प्रतिवारसा  सांगणाऱ्या  या अण्णांची आणि त्यांच्या सेवक सेविकेची उत्तम व्यवस्था जुहू येथील हरे कृष्ण मंदिरात केली होती. प्रत्येकासाठी तीन स्वतंत्र वातानुकूलीत कक्ष आणि महाप्रसाद यांची सेवा करण्यासाठी एक ब्रह्माचारीही मंदिराने नियुक्त केला होता. तेथील आदरतिथ्याने अण्णा भारावून गेले. 
     मंदिरातील काकड(मंगल) आरती आणि दर्शन आरतीमध्ये  भाग घेण्याची इचछा अण्णांनी प्रकट केली. ज्यांच्या कृपाछत्राखाली आपण विश्रांतीसुखाचा अनुभव घेतो त्या श्री श्री सीताराम, श्री श्री राधाकृष्ण, श्री चैतन्य महाप्रभु आणि आचार्य श्रील प्रभुपाद यांचे दर्शन घेणे, त्यांना धन्यवाद देणे आवश्यक आहे. हे गांधी विचार आणि कृतीला धरूनच होते. 
    छान स्वादिष्ट कृष्णप्रसाद ग्रहण करून अण्णा निद्राधीन झाले. विश्रांतीसुखाचा असा काही अनुभव घेतला की, अण्णा आदल्या रात्रीची योजना विसरून गेले. ते मंगल आरतीला उठले नाहीत की दर्शन आरतीला! देवाचीये द्वारी उभा क्षण भरी' हा विचारही त्यांना शिवला नाही. 
    उशीरा उठून अण्णांनी सरळ चित्रपटसृष्टीतील धेंडांचे दर्शन घेतले, दिवस घालवाल आणि आपले गाव गाठले. 
       सांगण्याचे तात्पर्य म्हणजे बोलणारे  गांधीवादी रामराज्य कधीच आणू शकत नाहीत. परंतु न बोलता 'नमो' मात्र सर्वत्र देवदर्शन घेत 'मुमें गांधी आणि बगल में शिवराय' ठेवून रामराज्याकडे जात आहेत. 
आम्ही या लेखात गांधीना 'महात्मा' शब्द का चिकटवला नाही याचे काहींना आश्चर्य वाटेल. मी गोडसे आहे असा तर्क व्यर्थ आहे. कारण गांधी महात्मा नव्हते, नव्हते म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी 'महात्मा' या शब्दाची व्याख्या भगवद्गीतेत (९. १३/१४) केलेली आहे -- 
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रितः।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा  भूतादिमव्ययम् ।।
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च द्दढव्रताः।
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपसते ।।
'हे  पार्थ, मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण, ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी, पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणून जाणतात. 
हे महात्मेजन, सतत माझे कीर्तन करीत, दृढनिश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझे उपासना करतात.' 
      हि व्याख्या राजकारणी वा समाजसुधारकांना लागू पडत नाही म्हणून आम्ही त्याचा उपयोग गांधी वा अन्य कोणासाठीही करीत नाही, क्षमस्व! 
    लेखन सेवा - विनय शंकर गोडसे 
      ९२४२१७६५८७