८. ब्राह्मणांची दुःखांतून सुटका
नथुराम गोडसे यांनी गांधींची हत्या केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मणांची प्रचंड नासाडी करण्यात आली. विशेषकरून मुंबई, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात समस्त ब्राह्मण देशोधडीला लागले. खरे तर ब्राह्मणांवर असे संकट कोसळणार याची फार पूर्वीपासून सूचना पूज्य टेंब्ये स्वामींनी दिली होती आणि याचे कारण ब्राह्मणांची चांगली वागणूक नाही असे त्यांनी सूचित केले होते. १९४८ च्या मे महिन्यात ब्राह्मणेतर
पुढाऱ्यांनी ब्राह्मणलुटीची योजना आखली होती. परंतु जानेवारी महिन्यात गांधी हत्येचे आयते कोलीत मिळाल्यामुळे ही योजना आधीच राबविण्यात आली. सुक्या सोबत ओले जळते त्याप्रमाणे अनेक निष्पाप ब्राह्मण या वणव्यात होरपळले गेले. यातून देशोधडीला लागलेले अनेक ब्राह्मण आपल्या अंगी असलेल्या गुणांमुळे आणि परिश्रमामुळे परत नावारूपाला आले.
याच काळात पुणेरी पतित ब्राह्मणांच्या नादाला लागून अनेक ब्राह्मण आपले ब्राह्मणोचित गुणधर्म सोडून मांस भक्षण, मदिरा सेवन, जुगार आणि व्यभिचार यात प्रगती करू लागले. पुरोगाम्यांच्या कुप्रचारामुळे 'हम दो हमारे दो' किंवा एक असे म्हणून गर्भपात करू लागले. त्यामुळे समस्त ब्राह्मणांचे अध:पतन झाले. कधी कधी चुकून इतिहास वाचणारे आम्हाला प्रश्न विचारतात की, वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, लोकमान्य टिळक, सावरकर बंधू, पिंगळे, चंद्रशेखर आझाद, कान्हेरे-देशपांडे इत्यादी अनेक तेजस्वी क्रांतिवीर होऊन गेले. परंतु आता असे तेजस्वी तारे ब्राह्मणांच्या घरी जन्माला का येत नाहीत? पूर्वी या तेजस्वी सुपुत्रांचा जन्म होण्याआधी त्यांचे माता-पिता वेदेशास्त्रांना जाणत होते. त्यांनी केलेल्या गर्भाधान संस्कारामुळे असे प्रख्यात बुद्धिमान पुत्र जन्माला आले; परंतु आता अशी नररत्ने जन्माला येत नाहीत, कारण ब्राह्मण संस्कारहीन झाले आहेत. ते गर्भाधान सारख्या पवित्र संस्कारावर विश्वास न ठेवता केवळ इंद्रियतृप्तीवर विश्वास ठेवतात आणि या इंद्रियभोगातून प्राप्त होणाऱ्या फळास कन्या व पुत्र म्हणून स्वीकारतात. शुद्ध बीजाच्या अभामुळे रसाळ गोमटी फळे मिळणे दुष्प्राप्य झाले आहे.
ब्राह्मणांकडे दिव्य गुणांचा अभाव असल्यामुळे काही स्वार्थी आणि धूर्त राजकारणी बहुजनांच्या एकगठ्ठा मतांच्या प्राप्तीसाठी ब्राह्मणांवर गरळ ओकतात. त्यामुळे बहुजन त्यांना सत्ता प्रदान करतात आणि दुःख भोगतात. खरे पाहता ब्राह्मण भगवद्ज्ञानहीन झाल्यामुळे स्वतःही दुःख भोगत आहेत आणि इतरेजन दिव्य ज्ञानाच्या मार्गदर्शकांच्या अभावामुळे दुःख भोगत आहेत. नास्तिक, लंपट, देशद्रोही, धर्मभ्रष्ट लोक सर्वच जातीपातीत आहेत. त्यामुळे एकमेकांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
संपूर्ण वेदांचे परिपक्व फळ असलेल्या भागवत पुराणात (५.२.२८) सांगितले आहे की, 'जेव्हा जेव्हा नास्तिक लोक उपद्रव देतात, तेव्हा तेव्हा आस्तिक लोकांना संरक्षण देण्यासाठी भगवंतांचे अवतार ग्रहलोकांतून प्रकट होत असतात.'
कलियुगात भगवंतांनी भगवत पुराणाच्या आणि श्रीहरिनामाच्या रूपात अवतार घेतला आहे. जर या कलियुगातील ब्राह्मणांना आपले आणि समस्त समाजाचे कल्याण साधायचे असेल, तर त्यांनी केवळ श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीमद्भभागवत पुराण या दोन ग्रंथांचे अध्ययन आणि अनुसरण करण्याची सवय लावून घ्यावी; म्हणजे त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट सफळ होईल. श्रीमद्भगवद्गीता म्हणजे भगवंताचा प्राथमिक अभ्यास असून श्रीमद् भागवत जीवनाचे सारसर्वस्व आहे. ते साक्षात श्रीकृष्ण रूप आहे. म्हणून भागवताला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचे स्वरूप म्हणून स्वीकारायला हवे.
भागवत पुराण (१.३.२९) सांगते -
जन्म गुह्यम् भगवतो य एतत्प्रायतो नरः ।
सायं प्रातर्गृणन् भक्त्या दुःखग्रामाद्विमुच्यते ।।
'जो मनुष्य भगवंतांच्या रहस्यमय अवतारांच्या कथांचे प्रातःकाळी आणि सायंकाळी नियमपूर्वक गायन-पठण करतो, त्याची जीवनातील सर्व दुःखांपासून सुटका होते.'
भागवत अध्ययनासमवेत भगवंतांच्या पवित्र नावांचे सामूहिक कीर्तन आणि जप करणे परम आवश्यक आहे.
कालेर्दोषनिधे राजन्नस्ति ह्योको महान् गुण ।
कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंग: परं व्रजेत् ।।
'हे राजन, जरी कलियुग दोषांचा सागर असला, तरीही या युगात एक महान गुण आहे - केवळ कृष्णनामाचे कीर्तन केल्याने मनुष्य भवबंधनातून मुक्त होतो आणि दिव्य धामाची प्राप्ती करतो.' (भागवत १२.३.५१)
ज्याप्रमाणे एक शक्तीशाली राजा असंख्य चोरांना मारू शकतो, त्याप्रमाणे एक आध्यात्मिक सद्गुण या युगातील सर्व कल्मषांचा नाश करतो. या घोर कलियुगात झालेल्या जीवांचा उद्धार कशा प्रकारे करता येईल, हे विचारण्यासाठी श्री नारद मुनी आपले पिता तथा आध्यात्मिक गुरु श्री ब्रह्मदेवांकडे गेले. त्यांच्यात झालेला संवाद यजुर्वेदातील 'कलिसंतरण उपनिषद' मध्ये दिलेला आहे. तो असा - हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। इति षोडशकंनाम्ना कालिकल्मष नाशनम् । नात: परतोपाय: सर्ववेदेषु दृष्यते ।
द्वापारयुगाच्या अंती नारद मुनी ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांना दंडवत करून म्हणाले, "हे प्रभू, या कलियुगात भवसागरातून तरून जाण्यासाठी कोणता मार्ग आहे?"
ब्रह्मदेव म्हणाले, "हे पुत्र, तू चांगला प्रश्न विचारला आहेस. सर्व वेदांचे जे अनाकलनीय गुपित आहे, ते ऐक. त्यामुळे कलिरूपी भवसागरातून तू विनाप्रयास तरून जाशील. पहा, आदिपुरुष भगवान श्री नारायणांच्या केवळ नामोच्चारणाने कलियुगाच्या कल्मषांचा नाश होतो."
नारद मुनींनी पुन्हा विचारले,"ते नाम कोणते?"
त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, " हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। या सोळा नामांचा जो महामंत्र आहे, तो कलिच्या दोषांचा नाश करणारा आहे. सर्व वेदांमध्ये अन्य उपाय नाही."
नारदांनी पुन्हा विचारले, "हे भगवंत, या महामंत्राच्या कीर्तनाची पद्धत कोणती आहे?"
ब्रह्मदेव म्हणाले," या कीर्तनाची कोणतीही पद्धत किंवा नियम नाही."
पवित्र किंवा अपवित्र कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही वेळी याचे कीर्तन करणारा ब्रह्महत्या, हिंसा, चोरी इत्यादी सर्व पापांतून मुक्त होऊन, भवसागर तरून जातो आणि प्रामुख्याने श्रीकृष्णांचे प्रेम प्राप्त करतो. म्हणून या अतिशय पतित युगात - हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। या महामंत्राच्या कीर्तनाचे महत्त्व अपार आहे.
भागवत महापुराणाच्या अंतिम श्लोकात (१२.१३.२३) श्री सूत गोस्वामी म्हणतात -
नामसंकिर्तनं यस्य सर्व पापप्रणाशनम् ।
प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरि परम् ।।
'मी भगवान हरींना सादर प्रणाम करतो की ज्यांच्या पवित्र नामाचे सामूहिक कीर्तन सर्व पापांना नष्ट करते आणि त्यांना नमन करण्याने सर्व दुःखांतून मुक्ती मिळते.'
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : ९२४२१ ७६५८७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा