गुरुवार, २२ जून, २०१७

                     ७. ब्राह्मणांची प्रगती की अधोगती 


      आम्ही हा दावा कधीच करीत नाही की, ब्राह्मण धुतलेल्या तांदळासारखे आहेत. वास्तविक पाहता कलियुगाचा प्रारंभ झाला तो ब्राह्मणांच्या पतनामुळे! ब्राह्मण पतित झाले म्हणूनच सर्व समाज पतित झाला आहे. इतरांना दोष देत बसण्यापेक्षा आधी आपण आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. 

इस्लामी आक्रमकांविरुद्ध ब्राह्मण आणि क्षत्रिय लढले; परंतु इस्लामी राजवट स्थिर झाल्यावर क्षत्रियांनी जशी सुलतानांची नोकरी पत्करली तशीच ब्राह्मणांनीही स्वीकारली. कुराणाची शिकवण संस्कृतमध्ये अल्लोपनिषद् म्हणून ब्राह्मणाने सिद्ध केली. दिल्लीच्या बादशाहांसाठी यमुनातटी ब्राह्मण प्रार्थना करीत. याच काळात शास्त्र ज्ञान नसलेले निर्बुद्ध ब्राह्मण मोठ्या संख्येने निर्माण झाले. भगवंतांची उपासना सोडून भ्रामक पूजा-पाठ वाढविणाऱ्यांची संख्यासुध्दा लक्षणीय झाली आहे.     
      ब्राह्मणांनी स्वतःला कितीही देशभक्त वा हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेतले तरी बहुजन समाज ब्राह्मणांनाच का लक्ष्य करतो, याचाही विविध अंगांनी विचार करणे आवश्यक आहे. 
     आज अनेक ब्राह्मण संघटना प्रभावी संघटन करीत आहेत. ब्राह्मणांची अधिवेशने मोठ्या  संख्येने भरत आहेत. उद्योगधंदे, व्यवसाय यावर ब्राह्मणांची प्रगतीही चांगलीच वाढत आहे. टी.व्ही., सिनेमांतून ब्राह्मणांच्या मुली बिनधास्त वस्त्र उतरवून नाचत आहेत. 
     दुप्पट पैसे मिळतात म्हणून कोकणातील ब्राह्मण आपली भूमी हिंदूंऐवजी मुसलमानांना विकत आहेत. मुली मुसलमान वा ब्राह्मणेतरांशी विवाह करण्यास पुढाकार घेत आहेत. ब्राह्मण मुले थोराड झाली तरी त्यांना ब्राह्मण मुली विवाहासाठी मिळत नाहीत. हे असे का होत आहे? कारण ब्राह्मणांनी आपल्या शाश्वत धर्माचा त्याग केला आहे. ब्राह्मणांनी आपले परमशुभचिंतक आणि शाश्वत संरक्षक भगवान श्री विष्णू वा श्रीकृष्णांचा त्याग केला आहे. ब्राह्मणांनी भगवंतांच्या चरणकमळांचा आश्रय सोडून मानवनिर्मित खोट्या देवांचा स्वीकार केलेला आहे. ब्राह्मणांचे योगक्षेम स्वतः भगवंत करतात; परंतु त्या भगवंतांचा त्याग करून, त्यांच्या दिव्य उपदेशांचा त्याग करून ब्राह्मण मर्त्य मानवांची उपासना करतात. ते परम पवित्र हरिनामाचा त्याग करून मानवनिर्मित नावांचा जप करतात. 
नारद पुराणात स्पष्ट सांगितले आहे - 
      ब्राह्मणो पि मुनिर्ज्ञानी देवमन्यं न पुज्येत् ।
     मोहेन कुरते यस्तु सद्यश्चाण्डालतां व्रजेत् ।।
     सदान्यदेवताभक्तीर्ब्राह्मणानां गरियासी ।
     विदुरयति विप्रत्वं चण्डालत्वं प्रयच्छति ।।
     'मुनी आणि ज्ञानी ब्राह्मण अन्य देवतांची पूजा करणार नाहीत; परंतु जे मोहग्रस्त असे करतात ते त्याच क्षणी चांडाळांचा स्तर प्राप्त करतात. अन्य देवतांप्रति भक्ती ठेवल्यामुळे ब्राह्मणांचे विप्रत्व नष्ट होते आणि त्यांना चांडाळत्व प्रकट होते.'
      वर्तमानकाळी समस्त ब्राह्मण ब्राह्मणोचित आचरणापासून भ्रष्ट झालेले असून चांडाळ सदृश झाले आहेत. ब्राह्मणांचे पतन इतके झाले आहे की त्यांना भगवंत कोण आहेत याचेही ज्ञान नाही. ते अल्पबुद्धीचे देवतापूजकसुद्धा राहिलेले नाहीत. तर त्यापेक्षाही पतित होऊन सामान्य मानवाला विष्णूंचा अवतार म्हणून त्यांची आराधना करीत आहेत. अनंत कोटी ब्रह्माम्डांचे नायक, राजाधिराज, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत. असे असूनही ज्ञानहीन ब्राह्मण मर्त्य बाबा-बुवांना अनंत कोटी ब्रह्माण्डाचे नायक समजत आहेत.  केवढी ही अधोगती झाली आहे पहा!
      महाभारताच्या हरिवंशात म्हटले आहे - 
      यस्तु विष्णुं परित्यज्य मोहादन्यमुपासते ।
      स हेमराशिमुत्सृज्य पांशुराशिं जिघृक्षति ।।
      'जी मोहग्रस्त व्यक्ती श्री विष्णूंचा परित्याग करून अन्य देवतांची उपासना करते, ती सुवर्ण राशीचा परित्याग करून धुळीच्या राशीला ग्रहण करण्याची इच्छा ठेवते. 
      स्कंद पुराणात ब्रह्मदेव नारद मुनींनी सांगतात - 
     वासुदेवं परित्यज्य यो न्यदेवमुपासते ।
     त्यक्त्वामृतं स मूढात्मा भुंक्ते  हलाहलं विषम् ।।
     'जे लोक श्री वासुदेवांना सोडून अन्य देवतांची उपासना करतात, ते मूढात्मा अमृताचा त्याग करून हलाहल विषाचे पान करतात.'  
      शास्त्रांतील वरील स्पष्ट कथनांविषयी ब्राह्मणांनी मनन-चिंतन केले तर त्यांना कळून येईल की, आपले वास्तविक सुख कशात आहे? परंतु कलियुगात ब्राह्मणांचे दुर्दैव इतके भयंकर आहे की ते कश्यपपुत्र हिरण्यकशिपूप्रमाणे त्वरित क्रोधित होतात. स्वतःला पुरोगामी समजून शास्त्रवचनरुपी दिव्य ज्ञानाला ठोकरतात. त्यांची यथेच्छ टिंगलटवाळी करून पोथ्या जाळून टाकण्यास सांगतात. 
      श्री विष्णूंना नष्ट करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन हिरण्यकशिपू समस्त असुरांना आदेश देतो की, यज्ञशाला, ऋषीमुनींचे आश्रम, महत्त्वपूर्ण वृक्ष, गायी यांचा नाश करा. या वैदिक ब्राह्मण संस्कृतीचा नाश झाला की विष्णू आपोआप मरून जाईल. समस्त असुर तत्काळ आपल्या नेत्याच्या आदेशाचे पालन करू लागतात. हिरण्यकश्यपू देवतांना स्वर्गातून पिटाळून लावतो. त्याच्या क्रौर्यामुळे विविध ग्रहांच्या लोकपालांसह संपूर्ण प्रजा अतिशय दुःखिकष्टी होते. त्रस्त आणि भयक्रांत झाल्यामुळे ते सर्व जण कोणताही आश्रय न मिळाल्यामुळे शेवटी भगवान श्री विष्णूंना शरण जातात. ते सर्व जण निद्राचा त्याग करून, पूर्णपणे मनोनिग्रह करून आणि केवळ वायू भक्षण करून भगवान श्री विष्णूंची आराधना करतात. त्यांनी केलेल्या याचनेमुळे भगवान त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या दिव्य वाणीद्वारे सांगतात, "हे विद्वान देवतांनो! भयभीत होऊ नका. तुमचे कल्याण होवो! देव हो! तुम्ही माझ्याविषयी श्रवण-कीर्तन करून तथा माझी स्तुती करून माझे भक्त व्हा, कारण अशा कृतींमुळे सर्व जीवांना खचितच सर्व प्रकारचे वर प्राप्त होतात. मला हिरण्यकशिपूची सर्व दुष्कृत्ये माहित असून मी लवकरच ती थांबविणार आहे. तथापि, कृपया योग्य काळाची प्रतीक्षा करा."         
     सध्या ब्राह्मणांची जी दुःखद अवस्था झाली आहे त्याला जसा अन्य समाज उत्तरदायी आहे तसा स्वयं ब्राह्मण समाजही आहे. ब्रिग्रेडीवृत्ती जर हिरण्यकशिपूप्रमाणे वागत असेल, पुरोगामी, साम्यवादी वा अंनिससारखे समस्त नास्तिक धर्मावर आघात करत असतील, इसिससारख्या इस्लामी अतिरेकी संघटना वा पाश्चात्त्य ख्रिस्ती हिंदू संस्कृतीचा नाश करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतील, तर ब्राह्मणांनी तत्काळ भगवंतांना शरण गेले पाहिजे. त्यांच्या आदेशानुसार केवळ भगवंतांचेच नाम श्रवण-कीर्तन करून त्यांचे प्रामाणिक भक्त झाले पाहिजे. तरच भगवान ब्राह्मणांचे रक्षण करतील. भगवान आपल्या आश्रितांना स्पष्टपणे सांगतात - 
     यदा  देवेषु वेदेषु गोषु विप्रेषु साधुषु ।
     धर्मे मयि च विद्वेष: स वा आशु विनश्यति ।। 
     'मनुष्य जेव्हा भगवंतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवांचा, ज्ञानाचा भांडार असणाऱ्या वेदांचा, गायींचा, ब्राह्मणांचा, साधूंचा (वैष्णवांचा), धर्मतत्त्वांचा आणि अंततः मज भगवंतांचा द्वेष करतो, तेव्हा खचितच तो आणि त्याची संपूर्ण संस्कृती त्वरित नष्ट होते.' - भागवत ७.४.२७
      अर्थात समस्त संकटांतून मुक्त होऊन आनंदपूर्ण जीवन जगण्यासाठी ब्राह्मणांनी प्रामाणिक बनले पाहिजे. चारित्र्यवान आणि ज्ञानवान बनले पाहिजे. केवळ आयटीचे भौतिक ज्ञान घेऊन, बक्कळ पैशाच्या जोरावर समस्त प्रकारची इंद्रियतृप्ती प्राप्त करणे म्हणजे प्रगती नव्हे. ही तर नरकामध्ये नेणारी अधोगती आहे. 
     एखाद्या शुद्राने श्रावण मासात एक वेळ दारू प्राशन केले  नाही तर त्याला पुष्कळ पुण्य प्राप्त होऊन स्वर्गात निवास करण्याची संधी मिळते, परंतु एखादा ब्राह्मण एकदा जरी नशापान करेल तर त्याला अनंतकाळासाठी नरकवासी व्हावे लागते. आताचे ब्राह्मण मात्र वेदांवर विश्वास ठेवत नाहीत. वेदांची आणि भगवंतांचीच टिंगलटवाळी करतात. त्यामुळेच भगवान श्रीकृष्ण अशा मुर्खांना दंड देतात. 
      ब्राह्मण जर खरोखरच बुद्धिमान असतील तर त्यांनी देवांचा, ज्ञानाचे भांडार असणाऱ्या वेदांचा, सर्व प्रकारचे भौतिक आणि अध्यात्मिक सुख प्रदान करणाऱ्या गायींचा, ब्राह्मणांचा, साधूंचा अर्थात भगवंतांच्या शुद्ध भक्तांचा, धर्मतत्वांचा आणि प्रामुख्याने भगवंतांचा द्वेष न करता, त्यांची प्रेममयी सेवा करावी. त्यामुळे त्यांचे सर्वप्रकारे रक्षण होईल. आत्मसन्मान मिळेल. प्रेम पेरले तर प्रेमाची मधुर फळे मिळतील. द्वेष पेरला तर द्वेष मिळेल. काय मिळवायचे ते ज्याचे त्याने ठरवावे.          
           
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७  







   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा