गुरुवार, ३० मार्च, २०१७

      शाळेत न गेलेले श्रीशिवराय छत्रपती झाले!


भ्रमणध्वनीच्या शोधामुळे जग अधिकच जवळ आलेले आहे यात शंकाच नाही. त्याचा चांगल्याप्रकारे वापर कसा करावा याची बुद्धिमत्ता नसल्यामुळे दुरुपयोग अधिक प्रमाणात होत आहे. या भ्रमणध्वनीतील  व्हाट्स अँपमुळे तर बरीच धमाल उडवली जाते. द्वेष, मत्सर वा अफवाही पसरवल्या जातात. या अँपमुळे छत्रपती शिवरायांचा गुणगौरवही मोठ्या  प्रमाणात पसरवीला जात आहे. अनेक वेळा शिवरायांचा गौरव करता करता, आपण न कळत त्यांचे अवमूल्यनही करीत आहोत याचे आम्हाला भानही रहात नाही. अधुनमधून एक संदेश फिरत असतो की, शाळेत नापास झालेली लता मंगेशकर गानकोकिळा  झाली! दहावी नापास सचिन तेंडूलकर भारतरत्न झाला ! पेट्रोल पंपावरचा  कामगार धिरू अंबानी जगप्रसिद्ध उद्योगपती झाला!  अशी अनेक उदाहरणे देत देत शेवटी संदेश  असतो , शाळेत न गेलेला शिवबा छत्रपती झाला. माझा राजा किती महान होता याचे ढोल वाजवता-वाजवता आपण इतरांना चुकीचा संदेश देत आहोत याचे भान आंधळ्या शिवभक्तांना रहात नाही. या संदेशामुळे अनेक अज्ञानी विचार करतात की, शाळा शिकून काहीच लाभ नाही! एका अंगाने हे   मॅकॉले पद्धतीचे  शिक्षण आम्हाला पैसे मिळवून देत असेलही, परंतु या भौतिक शिक्षणामुळे आम्ही आमचा स्व-धर्म, स्व-राज्य, स्व-किय, स्व-भाषा आणि स्व-अभिमान विसरून जातो. अनेकदा आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी या  जड विद्याचा आम्हाला काहीच लाभ होत नाही. मी एक पौरोहित्य करणारा असून या कार्यात मला माझ्या शालेय शिक्षणाचा काहीच लाभ झाला नाही. अर्थात केवळ श्रम जाहले. असो!  शाळेत न जाताच अर्थात शिक्षण न घेताच, अडाणी शिवराय छत्रपती झाले असा खोटा अभिमान बाळगणे म्हणजे घोर अज्ञान आहे. आम्ही आमच्या छत्रपतींची विटंबना करीत आहोत. जरा विचार कराच!        
      छत्रपती शिवराय ज्या काळात जन्माला आले होते त्या काळाचा ही आपल्याला जरा विचार करावयास हवा! त्याकाळी इस्लामी क्रौर्यामुळे समृद्ध वैदिक शिक्षण पद्धत उद्ध्वस्त  झाली होती. तक्षशिला-नालंदा सारख्या विश्वप्रसिद्ध महाविद्यालयांच्या ग्रंथालयांना  लावलेल्या आगी सहा मासापेक्षा अधिक काळ जळत होत्या. यावरून आपण तर्क करू शकतो किती प्रकारची ज्ञान संपदा इस्लामी आक्रमकांनी नष्ट केली असेल?        अनेक राजे आणि  त्यांची राज्ये पाशवी इस्लामी अत्याचारांनी नष्ट झाली. या राजांच्या आश्रयाने रहाणारे गुणी शिक्षक, साधू-संत, कलाकार, वैद्य इत्यादी नष्ट-भ्रष्ट झाले. गुरुकुल पद्धत नष्ट झाली. थोडीफार होती ती पुढे इंग्रजांनी समूळ नष्ट केली. आचार्य चाणक्य अन् सम्राट चंद्रगुप्त यांनी  भरभरटीला आणलेली व्यवस्था जवळ जवळ लुप्त झाली होती.       
     सतत इस्लामी वरवंट्याच्या खाली ३०० वर्षे महाराष्ट भरडला जात होता. त्यामुळे कुठेच पाठशाळा अस्तित्वात नव्हत्या. त्यामुळे मातोश्री जिजाऊसाहेबांनी आपल्या पुत्राला शाळेत धाडण्याचा प्रश्नच उद्भवला नाही! याचा अर्थ शिवबाराजे अडाणी वा अशिक्षिती होते असा मुळीच होत नाही.     
     चाळीस एक वर्षांपूर्वी एका कुविचारी पुरोगाम्याने तर्क प्रस्तुत केला होता की, शिवाजी महाराज निरक्षर होते. कारण त्यांचे हस्ताक्षर कुठेच उपलब्ध नाही. त्याच्या या तर्कावर बाबासाहेब पुरंदरे त्याला म्हणाले होते की, अजूनपर्यंत औरंगजेबाची विजार तरी कुठे मिळाली आहे? असो.     छत्रपती शिवरायांचे सूर्यवंशी भोसले घराणे आणि त्यांचे आजोळ चंद्रवंशी जाधव घराणे सुसंस्कृत, सुशिक्षित आणि घरंदाज होते. शहाजी राजांच्या आश्रयाला अनेक विद्वान ब्राह्मण, कवी, पंडित, शास्त्री इत्यादी होते. स्वतः शहाजीराजे संस्कृत, मराठी, फारसी, हिंदी आणि कन्नड यांचे जाणकार होते. ते अतिशय धार्मिक, साहसी, स्वाभिमानी, स्वतंत्रवृत्तीचे होते. तसेच जिजाऊसाहेब अत्यंत धीरगंभीर होत्या. देवाधर्मावर त्यांची अढळ श्रद्धा होती. वेद-पुराण इत्यादी शास्त्रांवर त्यांची श्रद्धा होती.  सत्वशीलता, संयम, विवेकशीलता, द्रष्टेपणा, न्यायीवृत्ती, करारीपणा, डोळस व्यवहारज्ञान, कार्यनिष्ठा इत्यादी गुणांची खाण होत्या जिजाऊसाहेब! माता-पित्याकडून हे सर्व सद्गुण छत्रपती शिवरायांमध्ये पूर्णपणे संस्कारित झाले होते.    जिजाऊसाहेबांनी  आपल्या लाडक्या शिवबाकडे उत्तमप्रकारे लक्ष दिले होते. महादेव भट महाभास हे गुरुजी शिकविण्यासाठी होते. त्याकाळच्या भीषण सुलतानी संकटातही वैदिक संस्कृती काही अंशी टिकून होती. त्यामुळेच जिजाऊसाहेबांनी शिवबाराजेंना रामायण, महाभारत, पुराणे आणि इतिहास यांचे शिक्षण दिले होते. संस्कृत आणि फारसी भाषाही शिकविल्या  होत्या. लेखन-वाचन वा गणित यांच्या शिक्षणासोबत अश्वारोहण, मल्लविद्या, तलवार, दांडपट्टा, धनुष्यबाण चालविणे, भालाफेक करणे इत्यादी शास्त्रांचे ज्ञानही शिवबाराजेंना मिळाले होते.    
     महाराजांना बालपणीच मिळालेल्या शिक्षणाचे वर्णन शिवभारतात केलेले आहे. त्यानुसार श्रुति, स्मृति, पुराणे, भारत, राजनीती, सर्वशास्त्रे, रामायण, व्यायाम, वास्तुविद्या, फलज्योतिष, धनुर्वेद, सामुद्रिक निरनिराळ्या भाषा, पद्य, सुभाषित, हत्ती-घोडे-रथ-आरोहण, त्यांची लक्षणे, चढणे-उतरणे, दौड मारणे, उडी मारणे, तलवार, धनुष्य, चक्र, भाला, पट्टा, शक्तीयुद्ध, बाहुयुद्ध, दुर्ग अभेद्य करणे, दुर्लक्ष्य निशाण वेधणे, दुर्गम स्थानातून निसटून जाणे, इंगित जाणणे, जादुगिरी आणि विष उतरवणे, रत्न परीक्षा, अवधाने, सर्व विद्या शास्त्रे आणि कला हे शिक्षण छत्रपती शिवरायांनी बालपणीच घेतले.      
     १२ एप्रिल १६६३ मध्ये फिलीफ गीफर्ड नामक इंग्रजाने राजापूरच्या  वखारीतून सुरतेला पाठविलेल्या पत्रात उल्लेख केला आहे की, शाहिस्तेखानाच्या प्रसंगावरचे पत्र स्वतः महाराजांनी लिहून राहुजींना पाठविले.        
      दुसऱ्या  सुरत लुटीचे वेळी शिवरायांनी स्वतः स्वाक्षरी केलेले पत्र फ्रेचांना पाठविले होते. त्याचा उल्लेख डचांनी केलेला आहे. तसेच अनेक तहांच्या कागदांवर महाराजांनी स्वतः स्वाक्षरी केल्या आहेत. अकबर बादशहाप्रमाणे महाराज निरक्षर नव्हते. महाराजांना संस्कृतची आवड होतीच. फारसी आणि हिंदीचे ज्ञान होते. बालपणी सहा वर्ष कर्नाटकात वडिलांपाशी निवास केला तेव्हा तेथे कन्नडसुद्धा शिकले होते.         त्यांना दुर्गबांधणीचे उत्तमज्ञान होतेच. राजव्यवहार कोष, कारणकौस्तुभ, शिवभारत इत्यादी ग्रंथरचनेला शिवरायांनीच मार्गदर्शन केले होते. असे असताना 'माझा राजा न शिकता छत्रपती झाला' असे म्हणणे केवढे हास्यास्पद आहे!            
     शिवरायांचे सर्व घराणे सुशिक्षित होते. त्यांनी आपले चिरंजीव संभाजीराजे यांना संस्कृत शिकविण्यासाठी केशव पंडिताना नियुक्त केले होते. त्यांच्याकडून शंभूराजांनी आपल्या चौदाव्या वर्षी संपूर्ण रामायण आणि अन्य पुराणे शिकून घेतली. त्यांनी रचलेला 'बुधभूषण' ग्रंथ वैशिष्ट्यपूर्ण आहे. 
     तंजावरच्या ग्रंथालयातील एका जुन्या हस्तलिखित पोथीत शिवरायांच्या अंगी कोणकोणते गुण होते याची एक सूची दिलेली असून ती पुढील प्रमाणे आहे - देवाचे ठायी निष्ठा, बळे पखर, राजकलेची अदब, तरतिबर हारवेष उत्तम, दरशनी, रत्नपरीक्षा, अश्वपरीक्षा, शस्त्रपरीक्षा, बोलणे, रसिक, नेत्रांमध्ये लज्जा, शाळीग्राम परीक्षा, गजपरीक्षा, उत्तम न्याय करणे, शहाणपण, राजकारणी, मनुष्यपारखी, घोडेस्वारी, हत्ती चालविणे, वरकवित्वशक्ती, प्रामाणिक, शूर, उदार, वित्पन्न, सखोल, धीर इत्यादी.     
     तरी समस्त शिवप्रेमींनी आंधळेपणाने कोणताही संदेश वाचू नये आणि इतरांना पाठवून गोंधळ उडवू नये. सावधान! 
    लेखन सेवा - विनय शंकर गोडसे 
      ९२४२१७६५८७
----------------------------------- 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा