शनिवार, ६ मे, २०१७

                             ३. ब्राह्मण कोणास म्हणावे?


     कलियुगाच्या प्रभावामुळे संपूर्ण प्रजेचे पतन झालेले आहे. यात ब्राह्मणांचे पतन आधी झाले. ब्राह्मण पतित झाल्याने समाजाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करणारे ब्राह्मणच उरले नाहीत. परिणामी संपूर्ण समाज अधोगतीला गेला. वस्तुतः धर्मरक्षणाचे पहिले दायित्त्व ब्राह्मणांवर आहे. त्यांनी आपले विचार, आचार आणि प्रचारद्वारे धर्म रक्षणाचे कार्य करावयाचे असते. आपल्या या कार्यास भगवंतांची कृपाशक्ती प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे; परंतु ही भगवद्कृपा तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा ब्राह्मण भगवद्ज्ञानाने अवगत होऊन आपल्या शुद्ध आचरणाने कार्य करेल. 
     तर सर्वात आधी ब्राह्मण कोणास म्हणतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. एका पुराणोत्त श्लोकात वर्णन आहे --
जन्मना जायते शूद्र: संस्कारात भवेद् द्विजः ।
वेदे पठाद् भवेद् विप्रो ब्रह्म जानात् इति ब्राह्मण: ।।
     'जन्माने प्रत्येकजण शुद्र असतो. परंतु संस्काराने तो द्विज होतो. वेदांचे अध्ययन केल्यानंतर तो विप्र बनतो आणि जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण होतो.' 
     या श्लोकात असे म्हटले आहे की, जन्माने प्रत्येक मनुष्य शुद्रच असतो. तसेच पुराणातून वर्णन केले आहे - कलौ शुद्र: सम्भवः अर्थात कलियुगात सर्व जण शुद्र आहेत. असे का म्हटले आहे? कारण कलियुगात प्रत्येक मनुष्य दिवसा  धन (पैसा) गोळा करण्यात आणि रात्री निद्रा तथा मैथुन करण्यात व्यस्त असतो. कोणताही विचार न करता वाटेल ते भक्षण करणे, धूम्रपान, मद्यपान करणे, वेश्यागमन करणे, केवळ इंद्रियतृप्ती, भोगवृत्ती वा चंगळवाद यांतच गुंतून राहणे, इत्यादी कार्ये करण्यात मग्न असणाऱ्या मनुष्याला शुद्र म्हणतात. तसेच श्वानवृत्ती बाळगणे, लांडीलबाडी करणे, फसवणूक करणे इत्यादी वृत्ती अंगी बाळगणाऱ्या माणसाला सुद्धा शुद्र म्हणतात. तसेच ज्याला ब्रह्मजिज्ञासा करण्याची किंवा आत्मसाक्षात्काराची तथा भगवद्प्राप्ती करून घेण्याची मुळीच आवड नाही अशा माणसालासुद्धा शुद्र म्हणतात. तर मग आपण सर्व जण कोण आहोत? शुद्र! केवळ शुद्रच! 
     आज आपण बघतो की, जन्माने ब्राह्मण म्हणवून घेणारे सुद्धा शुद्राप्रमाणे आचरण करीत आहेत. वस्तुतः जन्माने सर्व जण शुद्र असले तरी संस्काराने त्यांना शुद्ध  करता येते, संस्कारात भवेद् द्विजः अर्थात  संस्काराने त्यांचा दुसरा जन्म होतो. वैदिक संस्काराने जो द्विज होतो त्याला वेद पठणाचा अधिकार प्राप्त होतो. वेद पठण म्हणजे केवळ घोकमपट्टी किंवा पोपटपंची नव्हे. वेदे पाठाद् भवेद् विप्रो अर्थात वेदांच्या अध्ययनाने विप्र होणे. असा विप्र होण्यासाठी प्रमाणित आणि प्रामाणिक, अशा योग्य साक्षात्कारी सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली वेदांचे अध्ययन करणे अत्यंत आवश्यक आहे आणि जेव्हा असा विप्र वेदाध्ययनाने आत्मज्ञानी म्हणजेच ब्रह्म-साक्षात्कारी होतो तेव्हाच त्याला ब्रह्म जानात् इति ब्राह्मण: म्हणून संबोधले जाते. 
     आता असा शास्त्रोत्त विचार केल्यावर आपल्याला असे दिसून येते की, आम्ही सारे ब्राह्मण केवळ जात ब्राह्मण अर्थात शुद्र आहोत. ब्राह्मण होण्यासाठी आमच्यावर उत्तम संस्कार होण्याची नितांत आवश्यकता आहे. जर आमच्यावर उत्तम संस्कार झाले नाहीत, तर आमचीही गणना शुद्रांमध्ये होते. कारण या भारतभूमीतील मानव समाजात वावरताना मद्यपान, धूम्रपान, मांसाहार, जुगार वा परस्त्री-पुरुष गमन करण्यात मग्न असणाऱ्या अज्ञानी लोकांना शुद्र म्हणतात. आम्ही आमचे चालणे, बोलणे, वागणे वा आचार - विचार इत्यादी सर्व काही खालच्या स्तरावर नेत राहिलो किंवा जाती व्यवस्था मोडीत काढण्यासाठी कितीही प्रयत्नशील राहिलो तरी समाजातील अन्य घटक आम्हाला शुद्र वा जातीहीन किंवा धर्मनिरपेक्ष पुरोगामी इत्यादी न म्हणता ब्राह्मण म्हणून संबोधतात किंवा हिणवतात.
याच्या उलट आमचा अनुभव आहे. जेव्हा आम्ही ब्राह्मणांप्रमाणे अर्थात भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे आमचे आचरण ठेवतो, तेव्हा समाज आम्हाला मान-सन्मान, प्रेम, दान-दक्षिणा इत्यादी देतेवेळी कुठेच कमी पडत नाही. हे जग कितीही प्रगत किंवा वेगवान होवो, महानगरातील बजबजपुरी कितीही वाढो, लोकांचे आमच्यावर बारीक लक्ष असतेच. लोक आमच्या गुणांचे, अवगुणांचे वा दुर्गुणांचे निरीक्षण करतातच. असे असताना आम्ही ब्राह्मणांच्या उत्तम गुणांच्या त्याग का करावा? उलट ब्राह्मणी गुणांचा अंगीकर केल्यामुळे आमचा व्यत्तिगत लाभ तर होईलच आणि समस्त समाजालाही भरपूर लाभ होईल. 
भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत (१८.४२) ब्राह्मणी गुणांचे वर्णन केले आहे       शमो दमस्तप: शौचं क्षांतिरार्जवमेवच ।
    ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ।।
'शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात.'
    आता या सर्व ब्राह्मणी गुणांविषयी वाचल्यावर कोणी सुटाबुटातील, उच्च भौतिक शिक्षण घातलेला, आद्ययवत, तथाकथित ब्राह्मण म्हणेल की, हे सर्व दंतकथेतील वर्णन असून या काळात त्याचा काहीच उपयोग नाही. आता काळ बदलला आहे. आम्हाला असल्या ब्राह्मणी गुणांची मुळीच आवश्यकता नाही. तर कोणी अतिउत्साही या गुणांचा तिरस्कार करण्यास सांगेल. हे सर्व गुण अन्य युगातील ब्राह्मणांकडे होते. आम्ही तर कलियुगातील पतित ब्राह्मण आहोत. आम्हाला या गुणांचे पालन करणे शक्य नाही. 
    परंतु आमची समस्त ब्राह्मणांना विनंती आहे की, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या या ब्राह्मणांच्या गुणांपैकी एका गुणावर जरी आम्ही लक्ष केंद्रित केले तरी श्रीकृष्णांच्या कृपेने आम्ही आमच्या भौतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनात यशस्वी होऊ. आजही भौतिक शिक्षणाद्वारे आर्थिक प्रगती वा विकास करण्यासाठीसुद्धा या ब्राह्मणी गुणांची नितांत आवश्यकता आहेच.
     राजसूय यज्ञासमयी युधिष्ठीर महाराजांनी साक्षत्कारी भगवद्भक्त आणि महान गुरु श्री नारद मुनी यांना अनेक प्रश्न विचारले होते. त्या वेळी त्यांची उत्तरे देताना नारद मुनींनी परिपूर्ण समाज व्यवस्थेचे वर्णन करताना ब्राह्मणगुणांविषयी सांगितले होते -
शमो दमो स्तप शौचं सन्तोष: क्षान्तिरार्जवम् ।  
ज्ञानं दयाच्युतात्मानं सत्यं च ब्रह्मलक्षणम् ।।      
     'हे राजन, मनोनिग्रह, इंद्रियसंयम, तपस्या, शुची, समाधान, क्षमा, साधेपणा, ज्ञान, दया, सत्य आणि भगवंतांची पूर्ण शरणागती ही ब्राह्मणाची लक्षणे होते.'  भागवत पुराण ७. ११. २१ 
     भगवद्गीता आणि भागवत पुराणानुसार सांगितलेल्या ब्राह्मणी गुणांवर संक्षिप्त विवरण पुढील प्रमाणे आहे - 
१) मनोनिग्रह - 
कोणतेही सत्कार्य करण्यासाठी मनोनिग्रह आवश्यक आह, कारण मनाचे काम आहे संकल्प करणे वा विकल्प करणे, कधी एखाद्या कार्याचा निश्चय करणे वा ते कार्य त्वरित सोडून देणे आणि भलतेच काहीतरी करणे. 
मनाविषयी अर्जुन म्हणतो - 
     चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत्द्दढम् ।
     तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ।।   
    'हे कृष्ण, मन हे चंचल, उच्छ्रुंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही 

अत्यंत कठीण आहे असे मला वाटते.' भगवद्गीता ६. ३४
     अर्जुनात वादळालाही नियंत्रित करण्याची क्षमता होती; परंतु मनाला नियंत्रित करणे अतिशय कठीण! माकड, बालक आणि मन काधीच स्वस्थ बसत नाहीत. मनुष्य आपल्या प्रयत्नांनी मनाला नियंत्रित करू शकत नाही. या मनाचे नियंत्रण केवळ श्रीकृष्ण जे 'मनोहर' आहेत तेच करू शकतात. आम्ही आपल्या मनाला श्रीकृष्णांच्या सेवेत लावून मनोनिग्रह करू शकतो. यास्तव श्री ज्ञानेश्वर माउलींचा उपदेश आहे - 
जो मनोमार्गे गेला तो येथेची मुकला । 
जो हरिपाठी गेला तोची स्थिरावला ।। 
मनोनिग्रहासाठी समर्थ रामदास स्वामी म्हणतात - 
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे । 
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।। 
२) इंद्रायसंयम -
एका यशस्वी ब्राह्मणासाठी इंद्रियसंयम अत्यंत आवश्यक आहे. नेत्र सदैव अश्लील चित्रे वा चित्रपट बघण्यासाठी उत्सुक असतात. जीभ अनेक चटकदार आणि अपवित्र पदार्थांची चव चाखण्यासाठी नेहमीच वळवळत असते. नाक धुम्रपानासाठी आसुसलेले असते. कान चावट गोष्टी ऐकण्यासाठी तत्पर असतात आणि त्वचा भिन्न लिंगी व्यक्तीचा स्पर्श करण्यासाठी सदैव संधी शोधत असते. या पाच इंद्रियांपैकी कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर मनुष्याची अधोगती निश्चित आहे. मग या इंद्रियांचा संयम करण्यासाठी काय करावे? महान कृष्णभक्त श्रीपाद रूप गोस्वामी सांगतात - हृषीकेण ह्रीषीकेश सेवनं हृषीक म्हणजे इंद्रिये आणि ईश म्हणजे ईश्वर; अर्थात हृषीकेश भगवान श्रीकृष्ण यांच्या सेवेत इंद्रियांना संलग्न करणे. ते कसे काय? तर श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या अन्नाचे सेवन करणे. श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे संकीर्तन करणे. त्यांच्या चरणकमलांवर अर्पण केलेल्या फुलांचा सुवास घेणे. त्यांच्या मधुर लीलांचे श्रवण करणे. त्यांच्या श्रीविग्रहांचे नेत्रांनी दर्शन घेणे इत्यादी कृत्यांद्वारे आमच्या इंद्रियांना श्रीकृष्ण अर्थात हृषीकेश यांच्या सेवेत लावून आम्ही इंद्रियसंयम करू शकतो. 
३) तपस्या - 
आज ९९% ब्राह्मणांना कोणत्याच प्रकारची तपस्या करण्याची मुळीच इच्छा नाही. तसेच अन्य युगांतील ब्राह्मणांप्रमाणे कलियुगातील ब्राह्मणांमध्ये तपस्या करण्याची क्षमताही नाही. अगदी रात्री लवकर झोपून पहाटे सूर्योदयापूर्वी लवकर उठण्याची तपस्यासुद्धा करण्याची इच्छा ब्राह्मणांमध्ये नाही. लवकर निजे, लवकर उठे त्यास ज्ञान, आरोग्य, संपत्ती इत्यादी भेटे याची जाणीवच राहिलेली नाही. ब्राह्मणांना चहा-कॉफी, तंबाखू, दारू इत्यादींची व्यसने इतकी अंगवळणी पडली आहेत की या मादक पदार्थांचे  सेवन करणे ते सभ्यतेचे लक्षण समजतात. या मादक द्रव्यांचा मनःपूर्वक त्याग केला तरच तपस्या करणे शक्य आहे. 
४) शुची -  
शुची म्हणजे पावित्र्य. ब्राह्मणाने त्रिकाल स्नान-संध्या करून आपले शरीर बाहेरून स्वच्छ ठेवले पाहिजे आणि गायत्री तथा हरिनाम जप करून आपले अंतःकरण पवित्र ठेवले पाहिजे. परंतु अवैध स्त्री-संग केल्याने आमची शुची अर्थात पवित्रता नष्ट झालेली आहे. त्यामुळे कित्येक अनर्थ आणि व्याधी आम्ही स्वतःवर ओढवून घेतल्या आहेत. 
५) समाधान - 
आचार्य चाणक्य सांगतात की, मानवाला अन्न, धन आणि स्त्रीसंग यांचा कितीही पुरवठा केला तरी तो कधीही संतुष्ट होत नाही. प्रत्येक क्षणी त्याची भूक, कामना व वासना वाढतच जाते. परंतु जर ब्राह्मणाने भगवद् विज्ञानाची कास धरली तर तो नक्कीच समाधानी होऊ शकतो. 
ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान या संत वचनांवर दृढ विश्वास ठेवल्याने ब्राह्मण समाधानी राहू शकतो. 
६) क्षमा - 
या एकाच गुणाचा अंगीकार केला तर आम्ही अनेक मित्र जोडू शकता, परंतु 'क्षमा' या गुणाचा आम्हाला विसर पडला आहे. लहान सहान गोष्टींमुळे आम्ही त्वरित क्रोधित होतो. तसेच इतरांना तुच्छ लेखतो. त्यामुळे ब्राह्मण आपल्याकडील 'क्षमा' हे बहुमूल्य रत्न हरवून बसले आहेत. जेव्हा भगवान परशुराम सम्राट कार्तवीर्यार्जुनाचा वध करून त्यांनी अपहरण करून नेलेल्या सवत्स कामधेनूला सोडवूड आणतात, त्या वेळी त्यांचे पिता जमदग्नी म्हणतात, "हे वीर! हे पुत्र परशुराम, तू अकारण राजाला मारले आहेस, कारण राजा सर्व देवतांनी युक्त असल्याचे मानले जाते. तू हे पाप केले आहेस. आम्ही सर्व जण ब्राह्मण आहोत आणि आमच्या क्षमाशीलतेमुळे जनसामान्यांसाठी आम्ही पूजनीय झालो आहोत. या गुणामुळेच या ब्रह्मांडाचे  परम गुरू  ब्रह्मदेवांना त्यांचे पद प्राप्त झाले आहे. ब्राह्मणांचे हे कर्तव्यच आहे की, त्यांनी क्षमाशीलता या गुणाचे संवर्धन करावे. हा गुण सूर्यसमान तेजस्वी आहे. भगवान श्री हरी क्षमाशील व्यक्तींमुळे प्रसन्न होतात."
७) साधेपणा - 
या महत्त्वपूर्ण गुणाचा अर्थ असा नव्हे की आम्ही बावळट किंवा गबाळेपणा अंगीकारावा! साधेपणा म्हणजे केवळ एखादा कळकट पंचा गुंडाळणे, असे मुळीच नाही. साधेपणा म्हणजे हृदयाचा सरळपणा. 'साधी राहणी आणि उच्च विचार सरणी.' एखादा धनाढ्य मनुष्य जर कृष्णभक्तीचा उत्तम ज्ञाता 
असेल तर तो सुद्धा मोठ्या बंगल्यात राहून वा वातानुकूलित गाडीतून फिरून साधेपणाने युक्त असू शकतो. त्याच्या वर्तनात साधेपणा असणे आवश्यक आहे. जसे भारताचे द्वितीय पंतप्रधान श्री. लाल बहादूर शास्त्री होते. 
८) ज्ञान -
वेद म्हणजे ज्ञान. परंतु या दिव्या ज्ञानपासून ब्राह्मण कितीतरी दूर गेले आहेत. ते तथाकथित तंत्रज्ञानालाच ज्ञान समजत आहेत. या भौतिक ज्ञानाच्या संवर्धनाने आम्ही सारे ब्राह्मण परत उच्च पदावर विराजमान होऊ शकतो असा अनेकांचा भ्रम आहे. परंतु आम्ही हे ध्यानात ठेवले पाहिजे की, भौतिक ज्ञान हे मायेचे वैभव आहे. आध्यात्मिक ज्ञान हेच खरे ज्ञान आहे. भौतिक ज्ञानामुळे आम्हाला पैसा निश्चितच मिळतो. या जड
विद्येमुळे शारीरिक सुख मिळेल; परंतु आत्मसुख मुळीच मिळणार नाही. जड भौतिक ज्ञानामुळे आम्ही जन्म-मृत्यू-जरा-व्याधी या चार दुःखांवर विजय मिळवू शकत नाही. तर आत्मा आणि शरीर यांतील अंतर काय आहे हे जाणल्यामुळे आम्ही खरे ज्ञानी होऊ शकतो आणि हेच ज्ञान वेदांचे सार असलेल्या गीता-भागवतात दिलेले आहे. 
९) दया -
सर्व जीवांप्रति दया दाखविणे हा सुद्धा ब्राह्मणाचा श्रेष्ठ गुण आहे. परंतु पशुहिंसा केल्याने दयाभाव नष्ट होतो. आज अंडी, मासे, कोंबडी, बकरी आणि गायी यांची हत्या करून मांस भक्षण करण्यात सर्वच समाज पुढारलेला आहे. त्यात ब्राह्मणही आघाडीवर आहेत. जे ज्ञान इतर जीवांप्रति दयाभाव ठेवत नाही त्याच्याप्रति  प्रकृतीही दयाभाव ठेवत नाही. सध्या ब्राह्मणांच्या वाट्याला येणाऱ्या दुःखाचे हे एक प्रमुख कारण आहे की त्यांच्यात इतर जीवांप्रति दयाभाव नाही. 
१०) सत्य -
ब्राह्मणाने सत्य बोलावे, प्रिय बोलावे, जे सत्य तर आहे परंतु प्रिय नाही, असे वचन त्याने बोलू नये. त्याचप्रमाणे जे ऐकण्यास गोड पण असत्य असेल तर तसेही बोलू नये. सत्यानेच पृथ्वीला धारण केले आहे. सत्यामुळेच सूर्य तळपतो, सत्याच्या प्रभावाने वायू वाहतो. तसेच संपूर्ण विश्व सत्यातच प्रतिष्ठित आहे. सत्यामुळे लोकांचा विरोध पत्करावा लागतो, तर असत्याने लोकरंजन होते. सत्य हे एकपदी ब्रह्मच आहे. धर्म सत्यावर आधारलेला आणि स्थिर झालेला आहे. सत्य म्हणजे अक्षय वेदच. सत्याने सारे काही प्राप्त होते. यास्तव ब्राह्मणाने कधीही सत्यवचनी असावे आणि सदैव ध्यानात ठेवावे की, अंतिम सत्य भगवान श्रीकृष्ण आहेत. 
११) भगवंतांची पूर्ण शरणागती -
वस्तुतः ब्राह्मणाने एकमेवाद्वितिय अशा भगवान श्रीकृष्णांना सोडून अन्य कुणापुढेही झूकू नये. याचा अर्थ असा नव्हे की त्याने उद्धट असावे. ब्राह्मणाने माता-पीता, वडीलधारी माणसे, राजा यांच्यापुढे सदैव नतमस्तक असावे. परंतु शरणागती मात्र भगवंतांचीच स्वीकारावी. भगवद्भक्ती प्रज्वलित अग्रीसमन असून ती जीवनातील समस्त पापकर्मे जाळून भस्म करते. त्यामुळे ब्राह्मण शुद्ध गुणांनी युक्त होतो. परंतु जर ब्राह्मण भगवद्भक्त नसेल तर त्याच्याकडे दैवी गुणांचा पूर्णपणे अभाव असेल. प्राचीनकाळी काशाला पाऱ्याचा स्पर्श करून सोन्यात रूपांतरित केले जात असे. त्याचप्रमाणे भगवद्भक्तीचा स्पर्श होताच ब्राह्मणात दिव्या गुणांचा प्रादुर्भाव होतो. यास्तव ब्राह्मणाने भगवंतांची पूर्ण शरणागती स्वीकारली पाहिजे. भगवद्शरणागतीमुळे ब्राह्मणात दिव्या ज्ञान जागृत होते. त्यामुळे सर्व पापांचा क्षय होतो. त्याचे हृदय कोमल होते. समस्त वासनांचे शमन होते. त्याच्या हृदयात प्रखर शुद्ध कृष्णप्रेम जागृत होते आणि कृष्णकृपेमुळे तो स्वतःचे आणि इतर जीवांचे कल्याण करू शकतो. 
     आता कोणी आडमुठेपणाने वाद घालेल की, आम्ही श्रीकृष्णांनाच का भजावे? याचे उत्तर अगदी सरळ आहे. श्रीकृष्णच पूर्ण  पुरुषोत्तम भगवान आहेत. या विषयी  काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत - 
ईश्वरः परमः कृष्ण: सच्चिदानन्दविग्रह:। 
अनादिरादिर्गोविन्द: सर्वकारणकारणम् ।।                                           'श्रीकृष्ण जे गोविंद या नावाने संबोधले जातात, ते सर्वोच्च परमेश्वर आहेत. त्यांचे शरीर सच्चिदानंद अर्थात शाश्व्त, ज्ञानमय आणि आनंदमय आहे. ते सर्व गोष्टींचे उगमस्थान आहेत, त्यांचा कोणी उगम नाही, ते सर्व करणाचे  आदीकारण आहेत. ' - श्रीब्रह्मसंहिता १
 कृष्णो वै परमं दैवतम् श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत. एको वशी सर्वग: कृष्ण ईड्य: श्रीकृष्ण हेच एकमेव भगवान आहेत आणि ते पूजनीय आहेत. एको पि सन्बहुधा यो वभाति - श्रीकृष्ण हे एकमेवाद्वितीय आहेत, परंतु तेच  अनंत रूपांमध्ये आणि अवतारांमध्ये प्रकट होतात. - गोपाल तापनी उपनिषद् 
     श्रीकृष्ण समस्त ईश्वरांचे परम नियंत्रक (परम ईश्वर) आहेत. जरी अनेक देवी-देवता अस्तित्वात असल्या आणि त्या सर्वांना ईश्वर म्हणून सम्बोधले जात असले तरी ते सर्वजण सर्वोच्च ईश्वर नाहीत. केवळ भगवान श्रीकृष्ण सर्वोच्च ईश्वर आहेत आणि सर्वजण त्यांच्या अधीन आहेत. सर्व देवीदेवता दुय्यम  किंवा उपदेवता आहेत. देवांमध्ये भगवान श्रीकृष्णांचे वर्णन 'असमउर्ध्व ' असे वर्णन आहे. अ म्हणजे नाही. सम म्हणजे समान आणि उर्ध्व म्हणजे श्रेष्ठ, अर्थात  कोणीही भगवान श्रीकृष्णांसमान नाही आणि  कोणीही भगवान श्रीकृष्णांपेक्षा श्रेष्ठ नाही. 
परंतु अज्ञानवश किंवा वैदिक शास्त्रांच्या दिव्यज्ञानाच्या अभावामुळे सामान्यजन आपल्याला जो आवडतो त्याला 'भगवान' म्हणून स्वीकार करतात. कारण त्यांना सर्व देवता समानच आहेत असे वाटते. परंतु केवळ बुद्धिमान मनुष्य जाणतात की वास्तविक ' भगवान' कोण आहेत. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात - मत: परतरं नान्यत्- माझ्या भगवान रूपापेक्षा इतर कोणाही  श्रेष्ठ नाही. अहं आदिर्हि देवांनाम् - मीच सर्व देवानांचे उगमस्थान आहे. 
श्रीकृष्णांकडून गीतेचे ज्ञान प्राप्त झाल्यावर अर्जुन म्हणतो - 
परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजम् विभूम् ।।     
' तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परमपवित्र,  परमसत्य आहात. तुम्हीच शाश्व्त, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा, विभू आहात.' - भगवद्गीता १०.१२ 

                                           * * * * * *





1 टिप्पणी: