गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

                                          बावळट कोण ?


     लहानपणी १९७५ मध्ये मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मुंबई बघण्यासाठी मामा-मावशीकडे गेलो होतो. काही दिवस गिरगांवला मावशीकडे आणि काही दिवस ठाण्याला मामाकडे अशी  दोन्हीकडे दिवाळी केली. परंतु गावाकडील शिवरायांचे किल्ले बनविण्याचा आनंद मुंबईत मिळाला नाही. 
     सावंतवाडी सारख्या कोकणातील लहानशा टुमदार आणि डोंगरांनी-झाडाझुडपांनी वेढलेल्या गावापेक्षा मुंबापुरी प्रचंड मोठी होती. तेथील सर्वच गोष्टी अतर्क्य  वाटत. मावशीचे नोकरीला जाणे आणि दिवसभर घरात नसणे मोठे गमतीचे वाटे. माझा मावसभाऊ माझ्यापेक्षा लहान असून आकाराने मोठा होता. येता जाता सारखा चरत असे आणि मलाही त्याचे विविध खाऊ देत असे. पण कोकणातील आमच्या घरी असे काही नव्हते. वेळच्या वेळी असे. त्यामुळे सारखे खाणे जमत नसे. त्यामुळे मुंबईत मी बावळट झालो. येता जाता सर्वजण म्हणत, काय पण बावळट आहे!'
       चौपाटी असो वा हँगिंग गार्डन सर्वच ठिकाणी मुंबईकर मोठे हुशार! आम्ही मात्र बावळट पदवी प्राप्त! आई-वडील गावांकडे, ताई मात्र लगेचच स्मार्ट झाली. तेथे आमच्या बावळटपणाला मायेने सावरणारे कोणीच नव्हते. कधी एकदा दिवाळीची सुट्टी संपते आणि गावाकडे सावंतवाडीला जातो असे झाले. 
     बालपणी 'झुकझुक गाडीतून मामाच्या गावाला जाऊया' असे काही तरी गाणे रेडिओवर ऐकून मामाच्या गावचे आकर्षण वाटे; मात्र प्रत्यक्षात मामाच्या गावी ठाण्याला आल्यावर मात्र भ्रमनिरास झाला. तेथेही 'काय पण बावळटच आहे!' या पालुपदाने मन खट्टू झाले; पण उलट बोलण्याची सोयच नव्हती. कसे बोलणार? सडेतोड उत्तर देण्याच्या बाबतीत आम्ही परत बावळटच होतो ना! 
     माझी मामे बहिण बोलण्यात मोठी फटाकडी; त्यांच्या इमारतीला लागूनच एक पटांगण होते. त्याकाळी भाषणबाजीला रात्रीच्या वेळेचे बंधन नव्हते. पुष्कळ उशीरापर्यंत भाषणे चालत. एकदातर या मामेबहिणीने कमालच केली. अत्रेंचे भाषण रात्री ११ नंतर रंगात आले होते. त्यावेळी आमची मामेताई अत्र्यांना उद्देशून मोठ्याने ओरडली 'अहो! अत्रे आम्हाला झोपायचे आहे. बंद करा तुमची बडबड!'       
      मुंबई-ठाण्याचे लोक मोठे धाडसी अन् हुश्शार! दोन्ही हात पसरले की यांचे घर संपले. पण काय त्यांचा रुबाब - स्वतःचा फ्लॅट ना! आम्ही आपले गावाकडच्या कौलारू घरातील भाडेकरू म्हणजे बावळटच! काय त्यांचे कपडे, काय त्यांचा पैसा, मोठे कौतुकच! चौपाटीवर भेळ खाणे किती आत्मप्रौढिचे! पण सागराच्या लाटाच तेवढ्या भेळ बोकांडत बघायच्या! तेथे शंख शिंपले पण विकले जात होते. जे आम्ही रेडीच्या समुद्र किनाऱ्यावर हवे तेवढे फुकट गोळा करू! समुद्रात मनोसोक्त डुंबू, कसलेच बंधन नसे. पण मुंबईतील लोक मात्र लांबूनच लाटा बघत. हे असे का? हे आम्हाला लहानपणी कळत नसे; कारण आम्ही बावळट! 
     शेवटी एकदाची दिवाळीची सुट्टी संपली आणि आम्ही सावंतवाडीला आलो आणि करटी ढूंमचा  खेळ मोठ्या आनंदाने खेळू लागलो. 
     पण मनास मात्र एकच टोचणी लागून राहिली होती की, मुंबईकारांपुढे आम्ही बावळटच! त्यांना प्रत्युत्तर देऊ न शकणारा एक बावळट! 
     वर्षामागून वर्षे गेली पण हा बावळटपणाचा वेताळ आमच्या मानगुटीवरून काही केल्या उतरेना! हळूहळू वर्तमानपत्रातून मुंबईच्या वार्ता कळू लागल्या. साखळी बॉम्ब स्फोट, हिंदू-मुस्लिम दंगे इत्यादी वार्ता कळू लागल्या आणि एक दिवस कुठे तरी वाचण्यात आले की, पाकिस्तानने दाऊद टोळी मार्फत हे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या आधी त्यांची योजना होती की, मुंबई महानगरीला जोडणारे रेल्वे पूल, महामार्गावरील पूल आणि पाण्याची पाईपलाईन इतकेच उद्ध्वस्त करायचे, म्हणचे मुंबईचा खेळ खल्लास! मुंबई खल्लास म्हणजे भारत खल्लास! हसके लिया पाकिस्तान बम्बसे लेंगे हिंदुस्थान!!! पण बेनझिर भुट्टो घाबरली, असे केले तर जगभर पाक नापाक होईल. तिने परवानगी नाकारली आणि साखळी बॉम्बस्फोटाला अनुमती दिली.  खरे-खोटे अल्लाच जाने!
     मुंबईच्या अशा सर्व लीला ऐकून आमच्या मनात मात्र वादळे वाहू लागली. या वादळांनी आमच्या मानगुटीवर बसलेल्या बावळट नामक ब्रह्मसंबंधाला मात्र पार उडवून दिले. एके काळच्या बावळट मनात विचारांचे धुमारे फुटू लागले. 
     मागील हजार बाराशे वर्षांपासून पवित्र कुराणाच्या आदेशानुसार प्रत्येक तुर्की, इराकी, पठाणी, अफगाणी, अरबी, मोगली आणि पाकिस्तानी मुसलमान संपूर्ण जगाला 'दार-उल-इस्लाम' बनविण्यासाठी मोठ्या इनामे इतबारे कोशिश करीत आहेत. अल्ला मेहेरबान आहे. त्यामुळे आता जल्द भारताचे  'मुगलीस्तान ' आणि मुंबईचे 'मुस्लमाबाद' होणार हे निश्चित! जगाची वाटचाल त्याच दिशेने चालू आहे आणि न घडो, पण तसे झाले तर मग या मुंबईतील हुश्शार-स्मार्ट लोकांचे काय होणार? लहानपणी आम्हाला कळत नव्हते. अरे , यांना पिण्याचे पाणी गांवाकडून जाते. भाजी-पाला, फळ-फळावळ , अन्नधान्य, फुले सर्व काही बावळटांच्या गावाकडून जाते. मग यांच्या कारखान्यातून काय पिकते? नट बोल्ट! छान छान कपडे बनतात, पण कापूस तर गावाकडूनच जातो ना?
    गावाकडच्या शेतकऱ्या एवढी छाती नसली तरी त्याच्या चारपट पोट असलेले हे महानगरातील लोक मॉलमधील साठवलेले अन्न किती दिवस खाऊ शकतात. कितीही 'स्मार्ट सिटी' बनल्या तरी कुकरमध्ये नोटा वा नटबोल्ट शिजवून खाता येत नाहीत आणि हो पाकिस्तान असो वा आय. एस. ते बॉम्ब फेकणार महानगरांवर, तेथील उत्तुंग इमारतींवर, तेथील फ्लाय ओहरवर! रस्ते उद्ध्वस्त, कारखाने उद्ध्वस्त, पाणी नाही प्यायला, अन्न नाही खायला; अहो श्वास घ्यायला गावाकडची शुद्ध हवा पण नाही. 
    मग सांगा पाहू बावळट कोण?
 ©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७  
  

सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

                                  भगवंताना दोष का देता ?

           अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांवर अतिरेक्यांनी भीषण आक्रमण करून सात भाविकांना ठार मारले. काही लोक घायाळ झाले. अल्पावधीतच ही भीषण वार्ता सर्वत्र पसरली आणि मग सर्वत्र निषेध, चर्चा, प्रतिशोध इत्यादींची उधळण चालू झाली. पुरोगाम्यांनी साळसुदपणे मौन स्वीकारणे पसंद केले. 
            या क्रौर्या विषयी कोणी बडबडले की, या आक्रमणास मोदी उत्तरदायी आहेत, कारण मरणारे गुजरातचे भाविक होते. कोणी कोकलले, यात्रेसाठी चाळीस सहस्र  सशस्त्र सैनिक असून काय उपयोग झाला? परदेशी पैशांवर पोसले जाणारे संपादक आपल्या कुबुद्धीचे दिवे पाजळत लिहिते झाले की, आता धर्ममार्तंडांनी असल्या यात्रेंचा विचार करावयास हवा. अनेकांनी अनेक प्रकारे मत प्रदर्शन केले. बोलणाऱ्यांचे  तोंड आणि खरडणाऱ्यांचे हात आपण धरू शकत नाही हे मात्र खरेच आहे. 
           माझ्या प्रखर हिंदुत्ववादी मित्राने मला खोचकपणे विचारले, "काय रे, भक्त मारले जात असताना देव त्यांचे रक्षण का करीत नाही?"
            त्याच्या या शाब्दिक आक्रमणामुळे मी क्षणभर बावचळलो; पण लगेचच गुरु आणि भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने मी विचार करू लागलो की,  या मित्राचा खोचक प्रश्न माझ्यासाठी एक वरदानच आहे. ते कसे काय ? कारण त्यामुळे मला भगवद्विज्ञान आणि भगवद्कृपेवर चिंतन करण्याची एक चांगली संधी लाभली! त्या संधीचा सकारात्मक उपयोग देशबांधवांच्या सेवेसाठी होऊ शकतो. 
         सर्व प्रथम आपण ध्यानात ठेवले पाहीजे की, भगवंत आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्याही प्रकारे ढवळाढवळ वा हस्तक्षेप करीत नाहीत. जसे माता-पिता आपली कन्या वा पुत्र सज्ञानी झाल्यावर त्यांच्या दैनंदिन जीवनात सारखा हस्तक्षेप करून त्यांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करीत नाहीत. माता-पिता पुत्राला दुचाकी गाडी देते वेळी ती कशी चालवावी याचे प्रशिक्षण देतात; परंतु प्रत्येक दिवशी त्याला सारख्या सुचना देत नाहीत. आता त्या सज्ञानी पुत्राने स्वमस्तकावर शिरस्त्राण न घालता, मैत्रिणीला सोबत घेऊन, दारू ढोसून, भरपावसात धिंग्गाणा घालत, वाहतुकीचे सर्व नियम तोडत गाडी चालवली आणि काही तर भयंकर घडले तर त्याच्या दोषांचे खापर माता-पित्याच्या डोक्यावर फोडण्यात काय अर्थ आहे? अगदी त्याच प्रकारे पंतप्रधान मोदींना दोष देण्यात काय अर्थ आहे? कोणत्याही प्रकारे हिंदुत्वाचा गाजावाजा न करता मोदींनी अमरनाथ यात्रेसाठी अनेक चांगल्या सुविधा प्रदान केल्या आहेत; ज्या पूर्वीच्या कोणत्याही पंतप्रधानाने वा त्यांच्या शासनाने केल्या नव्हत्या. 
          आता ज्या गाडीवर आक्रमण झाले त्या गाडीतील लोकांनी सर्व प्रकारच्या सुचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष्य केले होते. त्यांनी सुरक्षा नियमांचे पालन केले नव्हते. यात्रेसाठी नोंदणी केली नव्हती आणि अधिकृत अनुमतीही घेतली नव्हती. शासनाने प्रदान केलेली सुरक्षा यंत्रणा न घेताच, सर्व प्रकारे नियमांची पायमल्ली करून आपल्या लहरीनुसार यात्र प्रारंभ केली होती. जर त्यांनी सर्वप्रकारे नियम पाळले असते तर अशी दुर्दैवी घटना घडली नसती आणि घडली असती तरी आपल्या सैनिकांनी चोख उत्तर दिले असते. त्यांनी अतिरेक्यांची योजना हाणून पाडली असती. 
         वस्तुतः हिमालयातील हृषिकेश, बद्रिनाथ, केदारनाथ, अमरनाथ वा मानससरोवर इत्यादी यात्रा कोणासाठी आहेत? विविध वेदशास्त्रातून वा पुराणातून या यात्रांचे आणि तेथील पुण्यक्षेत्रांचे वर्णन वाचावयास मिळते. हिमालयातील ही समस्त तीर्थक्षेत्रे दिव्य तपोभूमी आहेत. या स्थानांतून केवळ तपस्या करण्यासाठी भ्रमण करायचे असते. ही तपस्वी अन् योगी जनांची भूमी आहे; ही भोगी लोकांची नाहीच नाही. असे असूनही जेथे देवदूत जाण्यास कचरतात तेथे मूर्ख लोक घुसतात आणि दुःख पावतात. 
         सध्याचे केंद्र शासन हिंदुच्या बहुमतावर निवडून आलेले आहे. त्यामुळे ते अनेक तिर्थस्थानांची सुधारणा करीत आहेत; सुखसोयी देत आहे. आपले माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी खरे शिवभक्त असल्यामुळे ते नेहमीच काशी विश्वनाथ, पशुपतीनाथ इत्यादी शिव मंदिरातून देवदर्शन वा पूजाअर्चा करण्यासाठी तिर्थाटन करीत असतात. ते तेथे देशवासीयांच्या कल्याणार्थ प्रार्थना करून मोठ्या प्रमाणावर दान सुद्धा देतात. त्यामुळे त्यांच्या या भगवद्सेवेची वार्ता समस्त टी.व्ही. वाहिन्यांवरून प्रक्षेपित केली जाते  आणि वृत्तपत्रातून वृत्तांकने छापली जातात. सोशल मीडियावरून एकमेकांना आवर्जुन पाठविली जातात. हे सर्व पाहून अनेक उत्साही अन् अज्ञानी लोक खिशात खुळखुळणाऱ्या पैशाच्या जोरावर सर्वत्र पर्यटन करण्यास जातात. परंतु आम्ही हे मात्र विसरतो की मोदी पर्यटन न करता तिर्थाटन करीत आहेत. ते शास्त्रविधींचे पालन उत्तम प्रकारे करतात. ते साधुंप्रमाणे नियमांचे आचरणही करतात. ते कधीही मांसाहार, नशापान वा परस्त्रीगमन करीत नाहीत. ते तिर्थस्थानी कचरा करीत नाहीत. परंतु याच्या उलट आपली स्थिती आहे. आम्ही हौशे, गौशे आणि नौशे लोक पैशाच्या धुंदीत यात्रेला जातो. सिगरेटची पाकिटे, निरोधची पाकिटे, गुटखा-तंबाखुच्या पुड्या, दारूच्या बाटल्या, पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या इत्यादी अपवित्र गोष्टींची आम्हाला चटक लागलेली असते. अंडी आणि मांस हवेच हवे. सर्व प्रकारचे इंद्रियभोग करीत आम्हाला यात्रा करावयाची असते. समस्त शास्त्राज्ञांचे उल्लंघन करीत मौज-मजा-मस्ती आम्हाला प्रिय असते. मग आपल्या या दुष्कर्मांची फळेही आपल्यालाच भोगावी लागणार ना? आपण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन तेथे कितीतरी प्लॅस्टीकचा कचरा करून तेथील आध्यात्मिक वातावरण दूषित करीत आहोत याचे आम्हाला जरासुद्धा भान नसते किंवा आम्हाला तिकडे ध्यान द्यायचेच नसते . कोणी चांगले सांगितले तर आम्हाला त्या शुभचिंतकाचा भयंकर राग येतो. आम्ही त्याच्यावर तोंडसुख घेतो. त्यांची टिंगल टवाळी करतो. 
        वास्तविक पहाता अशा तिर्थक्षेत्री केवळ यती, योगी, संन्यासी वा विरक्त आध्यात्मवादी लोकांनी भ्रमण करायचे असते. ज्यांनी सर्व प्रकाच्या इंद्रियसुखाचा, तृप्तीचा वा अभिलाषेचा पूर्णपणे त्याग केलेला आहे आणि एकमात्र भगवद्सेवेचा अंगिकार केला आहे अशा लोकांनीच तिर्थयात्रा करायची असते. अशा यात्रेवेळी भगवद्परायण भक्त भगवंतांचा आश्रय स्वीकारून त्यांच्या कृपेवरच यात्रा करीत असतो आणि केवळ आपल्या आश्रितांचेच भगवान संरक्षण करीत असतात. अशा शुद्ध भक्तांविषयी भगवान श्रीकृष्ण सांगतात -
          अनन्याश्चिन्तयंतो  मां ये जनाः पर्युपासते ।
          तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।।
           'परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या आवश्यकता मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो.' - भगवद् गीता ९.२२
             अर्थात बुद्धिमान मनुष्याच्या हे तत्काळ लक्षात येईल की, भगवंत कोणाचे रक्षण करतात. असा हा भगवद्भक्त जेव्हा तिर्थक्षेत्रातून यात्रा करतो तेव्हा तो स्वतःच्या इंद्रियांच्या संतुष्टतेसाठी कोणत्याही भौतिक सुविधा प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत नाही. भौतिक ऐश्वर्याच्या बळावर आश्रित न राहता तो केवळ भगवद्कृपेवर आश्रित असतो. अन्न-पाणी, निवारा इत्यादींसाठी तो अनावश्यक प्रयत्न करीत नाही. तो सर्व प्रकारच्या शारीरिक पीडा सहन करीत तपस्येत मग्न असतो. पण आमचे काय? आम्हाला हवे अगाऊ आरक्षण, वातानुकुलीत हॉटेल, आरामदायी गरम अंथरुण - पांघरूण! आम्ही कोणत्याही प्रकारचे श्रम करू इच्छित नाही. आम्ही योगी बनू इच्छित नाही. केवळ भोगी होऊ इच्छितो. त्यामुळे आमच्या पदरी दुःख, शोक, रोग, क्लेष आणि मृत्यू मिळतो. जर आपणच आपल्या सर्व प्रकारच्या दुष्कर्मांचे कर्मी आहोत तर मग देवाला किंवा इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे?